Halloween Costume ideas 2015
Latest Post


महामारी झाली तर मस्जिदीत आल्यावर ती बरी होते किंवा माझ्या समाधीजवळ आले तर ती महामारी दूर होऊन जाते अथवा मक्का-मदिना याबाबतीत चमत्कार करत असतात, असा दावा किंवा तशी शिकवण प्रेषितांनी कधीही दिलेली नाही. (स्वत:ला ‘बाबा’ असल्याचे सांगून भोंदूगीरी करणारे काही लोकं तसा दावा करत असतील, त्याचा प्रेषितांच्या शिकवणीशी काहीएक संबंध नाही.) प्रेषितांची शिकवण तर इतकी पुरोगामी होती की, जगाचा निरोप घेतांना प्रेषित मुहम्मद सल्लम प्रार्थना करतात की, “हे अल्लाह! माझ्या कबरीचा देव (दैवतीकरण) होऊ देऊ नको, जसं पूर्वीच्या प्रेषितांच्या समुदायांनी त्यांच्या कबरींचा देव (दैवतीकरण) करून टाकलं होतं.” कित्ती कित्ती पुरोगामी भुमिका ही! अशा पुरोगामी प्रेषितांची शिकवण न अभ्यासता निसर्गकर्त्याला डॉक्टरशी अन् मस्जिदीला दवाखान्याशी तुलना करणे विवेकशील बुद्धीमत्तेला धरून नाही.

कोरोना काळात ज्या महान अस्तित्वावर आरोप होतोय, तो आहे तरी कोण? नास्तिकलोक ज्याला ‘निसर्ग’ म्हणून संबोधतात तो निसर्ग नेमका आहे तरी कोण? एखादं झाड म्हणजे निसर्ग असतो का? की एखादी नदी म्हणजे निसर्ग असते का? खरं म्हणजे हा सगळा निसर्ग आणि नैसर्गिक क्रियाकलाप चालविणार्‍या ज्या शक्तीला लेखक ‘गूढ शक्ती’ संबोधित आहेत, तोच तर क़ुरआनातला सृष्टीकर्ता अल्लाह आहे. निसर्गात त्या सृष्टीकर्त्याच्या अस्तित्वाच्या पुराव्यांविषयी स्वत: सृष्टीकर्ताच क़ुरआनात सांगतो -

“आणि तोच आहे ज्याने आकाशातून पाण्याचा वर्षाव केला मग त्याद्वारे सर्व प्रकारच्या वनस्पती उगविल्या, मग त्याद्वारे हिरवीगार शेते व झाडे उगविली, मग त्याच्यापासून थरावर थर असलेले दाणे काढले आणि खजुराच्या फुलोर्‍यांतून फळांचे भरघोस उत्पन्न केले जे ओझ्यापायी झुकले जात आहेत आणि द्राक्षे, जैतून (ऑलिव्ह) व डाळिंबाच्या बागा, ज्यांची फळे एकमेकांंशी साम्य तर ठेवतात तरीसुद्धा त्यांची वैशिष्ट्ये वेगवेगळी आहेत. या झाडांना जेव्हा फळे येतात तेव्हा फळे येण्याची व मग ती पिकण्याची प्रक्रिया जरा विचारपूर्वक पाहा (चिकित्सा करा), या गोष्टीत संकेत आहेत त्या लोकांसाठी जे श्रद्धा ठेवतात” (संदर्भ: क़ुरआन, अध्याय - 6, श्‍लोक - 99)

हा ईश्‍वर, अल्लाह, निसर्गकर्ता किंवा रब वगैरे नावं वेगळी असली तरीही ते एकच अस्तित्व आहे. त्या निसर्गकर्त्याविषयी चर्चा करण्याअगोदर सर्वप्रथम कोरोना रोगाविषयी समजून घेऊ या. हा विषाणु सृष्टीकर्त्यावर नव्हे तर ज्या मानवी समाजाची बहुसंख्या मस्तवाल झाली होती, त्या मानवी समाजावर भारी पडला आहे. हा हल्ला धर्मावर नसून अधर्मी होत चाललेल्या लोकांवर आहे. आता गव्हासोबत किडेही रगडले जातात, तसं या हल्ल्यापासून वाईटांसोबत चांंगलेही भरडले जात आहेत. त्या चांगल्या लोकांचा दोष हा की, ते वाईट लोकांविरूद्ध एक जागतिक चळवळ म्हणून उभी करू शकले नाहीत. जगभरात असहाय समाजावर धनदांडगे देश अत्याचार करत असतांना राष्ट्रवाद, प्रांतवाद, जातीयवादामुळे त्यांची मदत करण्याऐवजी हात आखडता घेतला. आपल्या देशातही धनदांडगे राज्यकर्ते एकानंतर एक अत्याचाराचे निर्णय घेतांना, न्यायव्यवस्थेच्या धुरीणांकडूनच संविधानाच्या मूलतत्त्वांची नालस्ती होत असतांना, देशाच्या मुलभूत समस्यांकडे दुर्लक्षित करण्यासाठी भावनिक मुद्यांना हात घालतांना, अन् काळे कायदे करत असतांना आजही देशातला एक फार मोठा वर्ग बघ्याची भुमिका घेतोय. अन् या अन्यायाविरूद्ध काही थोडेफार लोकं रस्त्यावर उतरून आंदोलन करत असतांना त्यांच्यावर लाठीचार्ज करणे, त्यांना अटक करणे, त्यांच्यावर गोळीबार करणे अन् याला देशभक्ती म्हणून त्यांचं समर्थन करणे हे सगळे प्रकार तो सृष्टीकर्ता कसा काय सहन करून घेईल?

सृष्टिकर्त्याने त्याच्या प्रेषितांद्वारे तीक्ष्ण दात असलेले, तीक्ष्ण पंजे असलेले जंगली हिंस्र प्राणी खायचे नाही, असं स्पष्ट सांगितलेले असतांना अनेक जण वटवाघळे, साप व असेच काहीही भलते सलते प्राणी खात आहेत. अशाप्रकारे त्या निसर्गनिर्मात्याच्या नैसर्गिक नियमांची खुलेआम पायमल्ली झाल्यावर मग त्याने अतिशय सुक्ष्म असे किडे सोडून जगभरातील मोठ-मोठ्या धनदांडग्या देशांना हलवून सोडलंय तर त्यात त्या सृष्टीकर्त्याचा दोष काय?

जबाबदार कोण? 

या निसर्गनियमांची पायमल्ली करणारे, अन्याय करणारे, अन्याय होऊ देणारे, अन् हो! अन्याय सहन करणारेही जबाबदार आहेत. कारण सुज्ञ लोकांनी मानवी समाज व निसर्गावरही होणार्‍या या सगळ्या अत्याचाराविरूद्ध चळवळ राबविली पाहिजे. काही लोकांच्या संकल्पनेत असा कडक न्याय करणारा अन् शिक्षा देणारा उपास्य नसतो. भक्ताच्या हो ला हो करणार्‍या, त्याचं प्रत्येक काम करून देणार्‍या पण न्याय न करणार्‍या अशा असहाय उपास्यांची संकल्पनाच मूळात चुकीची आहे. त्यामुळे काही लौकिक फायदा झाला तर तो चांगला अन् नुकसान झालं तर वाईट, अशी काहींची व्यावहारिक धारणा असते. ती मानवी स्वभावाच्या अनुकूल असली तरी वरकरणी दिसणार्‍या नुकसानामागे त्या निसर्गकर्त्याची काय योजना आहे अन् त्या योजनेने पारलौकिक जीवनाच्या दृष्टीने कसा फायदा होऊ शकतो, तेही अभ्यासणे महत्त्वाचे आहे.

अशी संकटं म्हणजे एक परिक्षाच

आता इथे पारलौकिक जीवन हे शब्द आल्यावर अनेकांच्या भुवया उंचावतील. पण पुढे येणार्‍या काही गोष्टींचा उलगडा करण्यासाठी हे पारलौकिक जीवन समजून घेणे गरजेचे आहे. ज्यांचा सृष्टीकर्त्यावर विश्‍वासच नाही, त्यांच्याशी याबाबतीत पुढे चर्चाच शक्य नाही. पण ज्यांचा त्याच्याशी इमान आहे, त्यांना मृत्यु पलिकडच्या जीवनावरही विश्‍वास ठेवणे अपरिहार्य ठरते. कारण तो सृष्टीकर्ता जर अस्तित्वात आहे तर मग तो न्यायीदेखील असलाच पाहिजे. सगळा न्याय इथे पूर्ण होऊ शकत नाही. इथे एक खून करणार्‍याला एकदाच फाशी मिळते, दहा खून करणार्‍यालाही एकदाच फाशी मिळते. कधी-कधी तर दुसर्‍यांचे धर्मस्थळ तोडणार्‍यालाच ते धर्मस्थळ देऊन टाकले जाते, अन् पिडीत समाजाला पाच एकर जमीन देऊन टाकली जाते. मग हा परिपूर्ण न्याय आहे का? नाही! मग परिपूर्ण न्याय केंव्हा होईल? मग यावरही विश्‍वास ठेवावाच लागेल की, तो सृष्टीकर्ता जर अस्तित्वात आहे, तर मग मृत्युनंतर तो सगळ्यांना पुन्हा जीवंत करून केलेल्या कृत्यांचा जाब घेणार आहे. त्या सृष्टीकर्त्याशी इमान राखून त्याने जे प्रेषित पाठवले त्यांच्या शिकवणीनुसार जर सत्कर्मे केली तर आनंदायी, चिरसुख देणारी शाश्‍वत अशी जन्नत मिळेल नेहमीसाठी. अन्यथा अन्यायी, अत्यचारी, बेइमान लोकांसाठी नरकाग्नी भडकावला जाईल अन् तिथे त्यांना मृत्यु येणार नाही, पण वेदना होत राहतील. सुजलाम सुफलाम सर्वसुखसंपन्न असलेल्या जन्नतसाठी तो सृष्टीकर्ता या लौकिक जीवनात परिक्षा घेऊन जन्नतचे नागरिक निवडतोय. हे जग एक परीक्षागृह आहे. कधी संकटं आणून तर कधी नैसर्गिक आपत्ती तर कधी महामारी आणून परीक्षा घेतोय.

आपण नीतीमत्तेवर राहतो की नाही त्याची परीक्षा, लॉकडाऊन झाल्यावर वस्तुंची साठेबाज़ी करतो की नाही त्याची परिक्षा. जर अत्याचारी अन्याय करतच चालला असेल अन् पीडित तसेच इतर बघ्यांचीच भुमिका घेत असतील तर मग निसर्गकर्त्याला महामारी आणून किंवा नैसर्गिक आपत्ती आणून असा हस्तक्षेप करावा लागतोच. इतिहास साक्षी आहे की, इजिप्तचा फिरऔन व इराकच्या नमरूदसारखे अत्याचारी सत्ताधारी आणि आद व समुदसारखी बलाढ्य राष्ट्रे त्यांनी केलेल्या अन्यायामुळे  किंवा बघ्याची भुमिका घेतल्याने निसर्गकर्त्याने पाठविलेल्या नैसर्गिक आपत्तीत गारद झालीत. क़ुरआनात जागोजागी त्यांचा उल्लेख करून लोकांना चेतावणीचे इशारे दिलेले आहेत, तसेच अनेक ठिकाणी चेतावणीही दिलेली आहे की, निसर्गकर्त्याच्या प्रकोपापासून भिऊन रहा अन् चांगले वागा.

तो कधी कधी संकटात त्वरीत मदत का करत नाही? -

लौकिक जीवनातली ही परीक्षा तो निसर्गकर्ता साक्षात समोर येऊन घेत नसतो, तर लौकिक जीवनाच्या साधनांच्याचद्वारे तो ही परीक्षा घेतो. हे एका उदाहरणानं आपण समजून घेऊ शकतो की, समजा काही विद्यार्थ्यांची वार्षिक परीक्षा सुरू आहे अन् काही विद्यार्थी चुकीची उत्तरे लिहित आहेत. तेंव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवणारे पर्यवेक्षक किंवा मुख्य परीक्षकांंच्या हे लक्षात आले की, अमुक-अमुक विद्यार्थी चुकीची उत्तरे देत आहेत, तरीही ते विद्यार्थ्याचा हात पकडून त्याला योग्य उत्तर सांगत नाही. ते त्यांची मदत करतील तर मग परीक्षेला अन् त्यानंतरच्या निकालाला तसेच पर्यायाने उत्कृष्ट निकालप्राप्त करणार्‍यांच्या कौशल्याला काहीएक अर्थच उरणार नाही, नव्हे मानवी गुणांनाच अर्थ उरणार नाही. त्यामुळे ते त्याला चुका करू देतात. पण परीक्षा संपल्याचे टोल वाचताच परीक्षार्थीच्या हातातून पेपर हिसकाऊन घेतला जातो अन् मग निकालाच्या दिवशी त्याच्या हातात निकाल दिला जातो. ज्यांनी जास्त योग्य उत्तरे दिलीत, त्यांना एकप्रकारे बक्षिस म्हणून पुढील आयुष्यासाठी यशप्राप्तीची संधी मिळते तर ज्यांनी चुकीची उत्तरे जास्त दिलीत, त्यांना आणखी काही वर्षे गचके खाण्याची शिक्षा मिळते.

पण या लौकिक जीवनाच्या परीक्षेत निसर्गकर्त्याने प्रेषितांमार्फत ग्रंथ रूपाने मार्गदर्शन करून एकाप्रकारे परीक्षा सुरू असतांनाच समोर ‘गाईड’ ठेऊन दिली आहे अन् त्या गाईडमध्ये बघून जीवनाच्या एका एका समस्येरूपी प्रश्‍नाचं उत्तर देण्याची खुली सूट देऊन टाकली आहे. तरीही काही माणसं इतके गाफील की, ती ‘गाईड’ वाचण्याची अन् मानवी जीवनाच्या समस्या सोडविण्याचीही तसदी ते घेत नाही. जर निसर्गकर्त्याने प्रेषितांमार्फत निश्‍चित केलेल्या नैसर्गिक नियमाप्रमाणे हे जीवन व्यतीत केले नाही, तर मरणोत्तर जीवनात आपला निकाल तो निसर्गकर्ता आपल्या हाती देणार आहे, हे लक्षात घेतलं पाहिजे. 

या लौकिक जीवनात काही लोकं प्रामाणिक वागतात, ते लोकांचं प्रबोधन करण्याचा आणि जगात न्याय व समतेवर आधारित एक व्यवस्था कायम करण्याचा प्रयत्न करत असतात. तेंव्हा दुसरे काही स्वार्थी लोकं त्यांना त्रास देतात, अत्याचार करतात. त्यामुळे निसर्गकर्ता अशा महामारीचा प्रकोप आणून वाईट लोकांसोबतच त्या प्रामाणिक लोकांनाही त्रास देतो, पण मरणोत्तर जीवनात त्या प्राणाणिक लोकांना त्यांच्या सत्कर्माचा योग्य मोबदला तो देणारच आहे. असं हे निसर्गकर्त्याचं गणित आहे. ते समजून घेतलं पाहिजे. अशाप्रकारे निसर्गकर्त्याने आपल्या नैसर्गिक मदतीला लौकिक साधन सामुग्री व मानवाच्या प्रयत्नाशी जोडून टाकलेले आहे.

सृष्टिकर्त्याची मदत, प्रयत्न व खबरदारी -  

ही गोष्ट आणखी एका उदाहरणावरून स्पष्ट होईल की, एखाद्या पशुला एका दोरीने एका खुंट्याला बांधुन टाकलेले आहे. तर ती दोरी जीतकी लांब असेल, तितक्याच दूर तो जाऊ शकतो. म्हणजे त्याच्या दोरीच्या लांबीची त्रीज्या करून त्या पशुच्या भोवती एक वर्तुळ रेखाटलं आणि त्या वर्तुळाच्या बाहेर जर त्या पशुचं खाद्य ठेवलं, तर त्या पशुनं कित्तीही प्रयत्न केला तरीही ते खाद्य त्याला मिळणारच नाही, कारण त्याला बांधलेली दोरी तितकी लांब नाही. पण तेच खाद्य त्या वर्तुळात ठेवलं तर मात्र तो त्या खाद्यापर्यंत चालत जाऊन ते खाद्य खाऊ शकतो. पण एखादा आळशी पशु एकाच जाग्यावर बसुन राहिला आणि त्याची इच्छा असेल की, ते वर्तुळात असलेलं खाद्य निसर्गकर्त्याने त्याच्या तोंडात टाकावं, तर असं घडत नाही. कारण ‘प्रयत्नांती कर्मफळ’ असतं. ते वर्तुळ हेच त्याचं नशिब आहे. पण त्यात असलेलं खाद्य मिळविण्याकरिता त्याला जागेवरून उठावं लागेल, चालावं लागेल अन् ते चाऊन खावं लागेल. म्हणजे प्रयत्न करावे लागतील. तसेच ते खाद्य जर विषारी असेल किंवा पचन होणारे नसेल तर प्रत्येक पशुमध्ये निसर्गकर्त्याने याचं ज्ञान दिलंय की, तो नाकाद्वारे वास घेऊन काय खावं अन् काय खाऊ नये, याचा निर्णय घेऊ शकतो. उदाहरणार्थ गाढ़वासमोर तंबाखु टाकलं तर तो खात नाही. कारण तो स्वत:ची काळजी घेतो, खबरदारी घेतो. अशाप्रकारे प्रयत्न आणि खबरदारी या दोनच गोष्टी निसर्गकर्त्याने प्रत्येक जीवाच्या अख्त्यारित दिल्या आहेत. बाकी त्या प्रयत्नांना अन् खबरदारीचा काय परिणाम होतो, ते निसर्गकर्त्याच्या हातात आहे. तरीही सर्व सजिवांमध्ये फक्त काही मानवप्राणीच आहेत की, ते प्रयत्नही करत नाही अन् खबरदारीही घेत नाही. आता कुणी स्वत:च खबरदारी न घेता चिनी लोकांसारखं वटवाघळं खात असेल किंवा संपुर्ण देश लॉकडाऊन झालेला असतांनाही विनाकारण बाहेर घोळक्यानं हिंडत असेल अन् त्याला कोरोना झाला तर त्यात निसर्गकर्त्याचा काय दोष?

सृष्टिकर्त्याची मदत आणि नैसर्गिक साधनं -  

अशाप्रकारे निसर्गकर्ता स्वत: प्रत्यक्ष हस्तक्षेप करून मदत किंवा शिक्षा करत नाही, तर नैसर्गिक साधनांद्वारे तो हे कार्य करत असतो. याचं आणखी एक उदाहरण म्हणजे कोणतंही औषध थेट माणसाला बरं करत नाही, तर मानवी शरिरातील रोगप्रतिकार करणार्‍या या शक्तीचे घटक (अँटी बॉडीज़) आहेत, त्यांना या औषधी मजबूत करतात अन् ते घटक या रोगजंतूशी संघर्ष करून त्यांचा खातमा करत असतात. आता या अँटी बॉडीज़ शरीरात कोण बनविल्या? सृष्टिकर्त्यानेच. कोरोनावर जेव्हा औषध किंवा लस निघालेली नसतांना जगात हजारो रूग्ण बरे होत होते, ते कसे? त्यांच्या शरिरातील याच रोग प्रतिकारशक्तीच्या घटकांद्वारे जी सृष्टिकर्त्याने निर्माण केलेली आहेत.

उपासनेचा परिणाम -

रोगावर उपचारासाठी औषधाव्यतिरीक्त आणखी एक घटक परिणामकारक असतो, तो म्हणजे तुमची इच्छाशक्ती. त्यामुळेच सर्व नागरिकांना खुश राहून सकारात्मक विचार करण्याचे आवाहन तज्ञ करत आहेत. कारण त्यामुळे तुमची इच्छाशक्ती वाढते. अशाप्रकारे शारीरिक उपचारासोबतच मानसिक उपचाराचीही गरज भासते. ही इच्छाशक्ती, हा मानसकि उपचार त्या सृष्टिकर्त्याची उपासना केल्यानेही होतो. अन्यथा महामारी राहीली एकीकडं पण बीपीचे पेशंट भीतीनेच दगावल्याची अनेक उदाहरणं आहेत. तसेच भयगंड (पॅनिक) निर्माण होऊन बरेच लोकं गरज नसतांना मास्क व सॅनिटायजर्सचा साठा करत बसतात. त्यामुळे या साधनांचा कृत्रिम तुटवडा पडतो. त्यामुळे उपचार करणार्‍या या डॉक्टरांना या साधनांची सर्वात जास्त गरज असतांना त्यांच्या अभावामुळे ते डॉक्टर वेळेवर उपचार करू शकत नाहीत अन् ही महामारी वेगाने वाढत जाते. म्हणून हा भयगंड (पॅनिक) घालविणे औषधाइतकेच अनिवार्य आहे. हा भयगंड अल्लाहवर नितांत विश्‍वास अन् त्याची उपासना केल्याने हमखास दुर होतो. पण ही उपासना फक्त मस्जिदीतच करायची असते, असे नाही. बिकट परीस्थितीत ती घरीही केली जाऊ शकते. खबरदारी म्हणून अल्लाहची इबादत घरीही केली जाऊ शकते.

उपाय योजना -      

खबरदारी म्हणून या संकटसमयी वैद्यकीय उपाययोजना तर कराव्याच लागतील, पण सृष्टिकर्त्याचा रोष ओढवून घेऊ नये म्हणून प्रत्येकाला आत्मचिंतनही करावच लागेल आणि नीतीमत्तेच्या मार्गाने चालावं लागेल. नीतीमत्ता नेमकी कोणती? याच्या मार्गदर्शनासाठी त्या सृष्टिकर्त्यानेच माणसांमधुनच काही माणसं निवडली आणि त्यांना मानवांच्या प्रबोधनाची जबाबदारी दिली. त्या महापुरूषांनाच ‘प्रेषित’ म्हणतात. असे प्रेषित जगभरात प्रत्येक देशात, प्रत्येक युगात आलेले आहेत. त्यांची मूळ शिकवण सारखीच होती. पण अनेक प्रेषित जग सोडून गेल्यानंतर काही स्वार्थी लोकं त्यांच्या माघारी त्यांच्या शिकवणीत भेसळ करून मूळ शिकवणीला भ्रष्ट करून टाकत गेले. त्याचंच सृजन करण्यासाठी दुसरे प्रेषित येत गेले. असे जगभरात जवळपास एक लाख चोवीस हजार प्रेषित होऊन गेले. सर्वात शेवटी प्रेषित मुहम्मद सल्लम हे समस्त जगवासीयांकरिता मार्गदर्शक म्हणून निसर्गकर्त्याने नियुक्त केले. त्यांच्या शिकवणीत जीवनाच्या प्रत्येक ़क्षेत्राविषयी मार्गदर्शन मिळते. हो महामारीच्या संकटसमयी काय उपाय योजना कराव्यात? याचंही मार्गदर्शन मिळते.

महामारीवर पैगंबरी उपाय -    

प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या जीवनातही दोन वेगवेगळ्या बिकट प्रसंगी दोन वेगवेगळ्या भुमिका आपल्याला दिसतात. एका प्रसंगी प्रेषित मुहम्मद (सल्लम.) हे अत्यंत आजारी असतांना आणि त्यांना आपल्या पायावर व्यवस्थित उभेही राहता येत नव्हतं इतके थकलेले असतांनाही त्यांनी इतर सहकार्‍यांचा आधार घेत मस्जिदीत येऊन नमाज अदा केली. त्यांच्या सहकार्‍यांनीही अशा अवस्थेत नमाज अदा केल्याची उदाहरणं इतिहासात सापडतात. परंतु मुसळधार पाऊस पडून अतिवृष्टीचं संकट ओढवलेलं असतांना किंवा भरमसाठ थंडी पडून लोकं आजारी पडण्याची शक्यता असतांना प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी त्यांच्या एका सहकार्‍यांमार्फत लोकांना मस्जिदीत न येता आपल्या घरीच नमाज अदा करण्याच्या सूचना दिल्या. इतकंच नव्हे तर या सुचना देण्यासाठी दररोज दिली जाणार्‍या अजानच्या ओवींमध्ये एक ओळ अतिरीक्त म्हणण्यास सांगितले. ती ओळ अशी होती -

“सल्लु फी बुयुती़कूम (घरातच नमाज पढा)”

अशाप्रकारे स्वत: प्रेषित मुहम्मद सल्लम यांनी नैसर्गिक आपत्तीच्यावेळी खबरदारी घेतलेली इतिहासात आढळते. पुढे जाऊन त्यांच्या सहकार्‍यांनीही महामारीची साथ आलेली असतांना रोगींना वेगळं केलं असण्याचे उल्लेख इतिहासात आपल्याला मिळतात.

कोरोना संंकटासंबंधीमुस्लिम समाजाची भुमिका 

प्रेषितांच्या जीवनचरित्रातून स्पष्ट होते की, संकट किती मोठे आहे, त्याची व्याप्ती किती आणि ते सहन करण्याची लोकांमध्ये क्षमता किती याचा अंदाज लाऊनच परिस्थितीनुरूप प्रेषित सल्लम व त्यांच्या सहकार्‍यांनी किती खबरदारी घ्यायची याविषयी निर्णय घेतलेले आहे. काही मस्जिदींना तर कुलुप लाऊन लोकांना गेटवरूनच परत पाठविण्यात आले. काही ठिकाणी तर मौलवी व मुफ्ती लोकांनी रस्त्यावर येऊन लोकांना आपापल्या घरी जाण्याची अन् रस्त्यावर न फिरण्याची विनंती केली. काही मस्जिदींच्या लाऊड स्पीकर्सवरून सरकारने लावलेल्या जमावबंदीच्या आदेशासंबंधी  माहीतीही देण्यात आली. (यावरून मस्जिदीवरील लाऊड स्पीकर्सचे महत्त्वही लक्षात येते.) या दरम्यान अपवादानेच काही मस्जिदींमध्ये मोठ-मोठ्या धार्मिक सभा झाल्या. तेंव्हा मस्जिदीत मोठ्या संख्येने जमा होऊन खबरदारी घेतली नाही म्हणून त्यांच्यावर अनेक पुरोगाम्यांनी टिका केली. अन् आता मस्जिदी रिकाम्या केल्या जात आहेत, तेंव्हाही जर कुणी ‘देव मैदान सोडून गेला’ अशी टिप्पणी करत असेल तर हा दुटप्पीपणा आहे. पण आता सरकारने धर्मस्थळ उघडण्याची आणि काही खबरदारी घेऊन मर्यादित संख्येत उपासना करण्याची परवानगी दिली असता,मस्जिदीदेखील उघडण्यात आल्या आहेत, पण अर्थातच शासनाच्या अटिशर्थीसह. अशाप्रकारे निसर्गकर्ता महामारीही देतो अन् त्यापासून बचाव करण्याची खबरदारी कशी घ्यावी यासंबंधी प्रेषितांमार्फत मार्गदर्शनही करतो तसेच त्याविरूद्ध लढण्याकरिता प्रतिकारशक्तीही तोच प्रदान करतो. त्याच्याशी इमान राखणारे लोक हे त्या मार्गदर्शनावर आणि शासकीय निर्देशांवरही अंमलबजावणी करत आहेत. 

मस्जिद दवाखाना नव्हे

महामारी झाली तर मस्जिदीत आल्यावर ती बरी होते किंवा माझ्या समाधीजवळ आले तर ती महामारी दूर होऊन जाते अथवा मक्का-मदिना याबाबतीत चमत्कार करत असतात, असा दावा किंवा तशी शिकवण प्रेषितांनी कधीही दिलेली नाही. (स्वत:ला ‘बाबा’ असल्याचे सांगून भोंदूगीरी करणारे काही लोकं तसा दावा करत असतील, त्याचा प्रेषितांच्या शिकवणीशी काहीएक संबंध नाही.) प्रेषितांची शिकवण तर इतकी पुरोगामी होती की, जगाचा निरोप घेतांना प्रेषित मुहम्मद सल्लम प्रार्थना करतात की, “हे अल्लाह, माझ्या कबरीचा देव (दैवतीकरण) होऊ देऊ नको, जसं पूर्वीच्या प्रेषितांच्या समुदायांनी त्यांच्या कबरींचा देव (दैवतीकरण) करून टाकलं होतं). कित्ती कित्ती पुरोगामी भुमिका ही! अशा पुरोगामी प्रेषितांची शिकवण न अभ्यासता निसर्गकर्त्याला डॉक्टरशी अन् मस्जिदीला दवाखान्याशी तुलना करणे विवेकशील बुद्धीमत्तेला धरून नाही. निष्ठूर अशी नास्तिकता आणि भाबडा असा दैववादाच्या अंधारापेक्षा व्यावहारिक व संतुलित असा प्रकाश आपल्याला अल्लाहचा संदेश आणि प्रेषित मुहम्मद सल्लम यांच्या जीवनात आणि त्यांच्या शिकवणीत पाहायला मिळतो. बुद्धीजीवी, विचारवंत, पुरोगामींनीही टिका करण्यापूर्वी ही पुरोगामी शिकवण अभ्यासण्याची अन् पटली तर ती स्वीकारण्याची गरज आहे. तेंव्हा चला तर कोरोनामुळे काही लोकांनी हेतुपुरस्पर पसरविलेल्या नास्तिकता , ईशद्रोह व दांभिकतेच्या अंधारातून इमानच्या प्रकाशाकडे!



- नौशाद उस्मान 

(लेखक : पत्रकार तथा साहित्यिक आहेत. संपर्क : 9029429489)


Madina

जगात अनेक सभ्यता संस्कृती आहेत. असंख्य समाज-समूह आहेत, राष्ट्रे आहेत, कबिले-टोळ्या आहेत. प्रत्येक सभ्यता जनसमूह एक किंवा अनेक धार्मिक श्रद्धा आणि त्यानुसार शिकवणींचा अवलंब करतात. काही समाज-राष्ट्रे अशीदेखील अहेत जी कुठलाही धर्म मानित नाहीत. त्यांच्या मते या जगाला एखाद्या ईश्‍वराने निर्माण केलेले नाही.

मानवी सभ्यतेची सुरुवात स्त्री-पुरुषाच्या एका जोडप्याने झाली. त्यांच्यापासून संतती होऊन एक कुटुंब बनले, अनेक कुटुंबांपासून मग एक जनसमूह आणि शेवटी एक सभ्यता बनली. माणूस किंवा कोणताही जीव जसे एका सूक्ष्म जीवापासून (उशश्रश्र) जन्म घेतो त्या जीवाची विभागणी होऊन इतर सूक्ष्म जीव निर्माण होतात. ही प्रक्रिया चालूच असते. एक सूक्ष्म जीव धडधाकड माणूस होतो. अर्थातच लहान बाळापासून प्रगती होत होत मोठा माणूस (स्त्री/पुरुष) जन्माला येतो. पशुंचेही तसेच आणि वनस्पती जगताचेही तसेच होते. ही प्रक्रिया फक्त माणसात म्हणजेच सजीवांतच होत नसते, तर सृष्टीलाही तोच नियम लागू होतो. आधी फक्त एक गोळा (वशर्लीश्रर) होता. एकदम मोठा विस्फोट होऊन त्यापासून पुन्हा ही सृष्टी आणि यातील गृह आणि तारे वेगळे झाले. जशी माणसाची एका जीवापासून उत्पत्ती तशीच सृष्टीचीही उत्पत्ती. जशा माणसाच्या वेगवेगळ्या जाती, कबिले, राष्ट्रे इत्यादी निर्माण झाले त्याचप्रमाणे निरनिराळ्या आकाशगंगा, सूर्य, सौरमंडल निर्माण झाले आणि जसे माणसांच्या संख्येत वाढ होऊन राष्ट्रे जनसमूह विस्तारित झाली अगदी तसेच या सृष्टीचाही विस्तार चालूच आहे. एकदा ईश्‍वराने निर्माण करून त्यांची संख्या थांबवली नाही, तसेच ईश्‍वराने आपल्या क्षमतेने ही सृष्टी निर्माण केली आणि तोच त्या सृष्टीला विस्तारत आहे. त्याचनुसार माणूस, पशू, पक्षी, वनस्पतीचाही विस्तार होत आहे. याचा अर्थ एकच की माणूस या सृष्टीपासून वेगळा नाही तर तो या सृष्टीचाच एक भाग आहे. म्हणून जे कोणते नियम कायदे सृष्टीला लागू आहेत तसेच नियम कायदे मानवी जीवनालाही लागू आहेत. एकच नियम सृष्टीचा मानवी जीवनाचा म्हणजेच एकाच ईश्‍वराने या सर्वांना निर्माण केले आहे. जो नियम त्या ईश्‍वराने सगळ्या सृष्टी आणि मानवी जीवनाला लागू केला तो म्हणजे इस्लाम! ह्या धरतीवरील सर्व निर्मिती आणि सृष्टी जसे त्यांना लागू केलेल्या नियमांचे म्हणजेच इस्लामचे पालन करते आहे तसेच मानवांनीही त्याच नियमांचे पालन करावे, यांनाच इस्लामच्या शिकवणी म्हणतात. एकच निर्माता, एकच धर्म, एक नियमावली जशी सारी सृष्टी समान तसेच मानवजातीदेखील समान कारण सर्वांचा निर्माता एकच.

इस्लाम काय आणि त्याच्या शिकवणी कोणत्या ज्यांचे आचरण करून मानवांनी ईश्‍वराच्या नियमांचे-आज्ञांचे पालन करावे, याची माहिती देण्यासाठी ईश्‍वराने पैंगबरांची योजना केली. सर्वांत पहिले मानव म्हणजे आदम (अ.) हे धरतीवरील पहिले पैगंबर. त्यानंतर 1 लाख 24 हजार पैगंबर हे धरतीच्या प्रत्येक भूभागात, मानवसमाजात, राष्ट्रात पाठवले गेले, भारतातही आले. गौतम बुद्ध, श्रीकृष्ण आणि राम यांच्या बाबतीत इस्लामी विद्वान आणि धर्मपंडितांचे असे म्हणणे आहे की तेदेखील भारतात आलेले पैगंबर असतील कदाचित. धरतीवर लाख-दीड लाख प्रेषित आलेले आहेत पण पवित्र कुरआनात फक्त त्या पैगंबरांची - प्रेषितांची नावं दिलेली आहेत जे अरबस्थानात आले होते. कारण तेथील लोक त्यांच्या नावांशी परिचित होते. पैगंबर मुहम्मद (स.) याच श्रंखलेतील शेवटचे पैगंबर होते.

वर सांगितल्याप्रमाणे एका पुरुष-स्त्रीपासून या धरतीवर असंख्य पुरुष-स्त्री जन्माला आले. त्यांचे निरनिराळे जनसमूह बनले. काही टोळ्या-कबिल्यांपर्यंत सीमित झाले तर काही भौगोलिक राष्ट्रे बनली. अशा प्रकारे सभ्यता-संस्कृतीचा जन्म होत गेला. टोळी सभ्यतेपासून राष्ट्र सभ्यता उदयास आली. शेवटी जसजसे माणसाच्या ज्ञानात भर पडत गेली ज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास झाला. नवनवीन विचार, आविष्कार, ज्ञानांची भर पडत गेली. त्या विचारंद्वारे माणसाने विचारधारा निर्माण केल्या. निरनिराळ्या जीवनव्यवस्था राजकीय व्यवस्था आणि इतर व्यवस्थांच्या आधारावर सभ्यतांचे संवर्धन केले, मानवी जीवन अशा प्रकारे वृद्धिंगत होत गेले.

ज्या लोकांनी पैगंबरांच्या शिकवणींचे आचरण केले त्यांनी त्यांच्यासाठी ईश्‍वराने निवडलेल्या नियमांचा म्हणजेच इस्लामचा स्वीकार करून स्वतःला ईश्‍वराला म्हणजेच अल्लाहला समर्पित केले. त्यांना अल्लाहने पवित्र कुरआनात मुस्लिम हे नाव दिले आहे.

ईश्‍वराने पशू, पक्षी आणि इतर सजीवांना प्राण दिले पण त्यांना आत्मा आणि आपल्या विचार-आचार स्वातंत्र्याचा अधिकार दिलेला नाही. निर्जीव निर्मितीला प्राणही दिले नाहीत की आत्माही नाही. तेव्हा त्यांच्या आचारविचारांचा संबंधच नाही. त्यांना जे विहित केले आहे तसेच ते वागतात, म्हणजेच ते सुद्धा ईश्‍वरानं घालून दिलेल्या नियमांचे पालन करत असतात. जसे वारा धरती व आकाश यांच्या मध्येच वाहत असतो. पाणी पाषाणासारखे होत नाही की दगड-माती पाण्यासारखे वागत नाहीत. त्यांना जसे बनवले आहे तोच त्यांचा धर्म. त्यानुसारच त्यांना राहावे लागते. त्याचबरोबर माणूस वगळता सजीव निर्मिती, पशु-पक्षी, वनस्पती इत्यादींनीही त्यांना विहीत केलेल्या सेवा कराव्या लागतात. निर्जीव आणी सजीव तसेच सृष्टीतील सकल निर्मिती सूर्य, चंद्र, तारे, विविध ग्रह माणसाच्या अधीन केले आहेत. माणूस आपल्या गरजांप्रमाणे त्यांचा वापर करू शकतो. ईश्‍वराने माणसासाठीच हे सारे विश्‍व निर्माण केले आहे.

पशु-पक्षी, वनस्पती, हवा, पाणी इत्यादी जसे ईश्‍वरी आज्ञांचे पालन करतात. तसेच माणसानेही करावे ही ईश्‍वराची योजना. माणूस सजीव असून त्याचा आत्मासुद्धा आहे. म्हणून ईश्‍वरी आदेशांचे लक्ष त्याचा आत्मा असते. आत्म्याला संबोधून ईश्‍वर मानवजातीला आज्ञा देतो. आज्ञांच्या या वर्तुळाची सुरुवात माणसाच्या वैयक्तिक जीवनापासून होते. अर्थातच माणसाला जे आदेश दिले जातात, ते त्यांनी आपले वैयक्तिक जीवन कसे व्यतीत करावे, यावर आधारित असतात. नंतर माणसाचे माता-पिता, त्यांची मुलंबाळं, त्यांचे नातलग आणि समाज मग राष्ट्र या सर्वांशी माणसाने कसे वागायचे यावर आधारित असतात. म्हणजे सुरुवातीला माणसांनी कसे जगावे, काय करावे, कशा गोष्टींपासून लांब राहावे, कोणती कार्ये अजिबात करू नयेत याचा तपशील आपण खालीलप्रमाणे पाहू या.

सर्वप्रथम माणसाने अल्लाह (ईश्‍वरा)वर श्रद्धा ठेवायला हवी. म्हणजे तोच त्याचा आणि सार्‍या सृष्टीचा निर्माता आहे. तो एकटाच ईश्‍वर आहे. त्याच्याशिवाय अन्य कुणीही ईश्‍वर नाही. त्याच्यासारखा कुणी नाही. त्याच्या तोडीचा कुणी नाही. म्हणजेच माणसांना त्याच एका ईश्‍वराला आपले जीवन समर्पित करावे, केवळ त्याचेच आणि त्याच्या प्रेषितांचे आज्ञापालन करावे.

ईश्‍वरावर श्रद्धा ठेवत असताना ईश्‍वरानं या जगात माणसाच्या मार्गदर्शनासाठी पाठवूनव दिलेल्या सर्व पैगंबरांवर श्रद्धा ठेवावी. त्याचबरोबर ज्या प्रेषितांसोबत अल्लाहनं माणसाच्या मार्गदर्शनासाठी जे ग्रंथ काही पैगंबरांसोबत पाठवून दिलेत, त्यांच्यावर श्रद्धा ठेवावी आणि माणसाला मरणोपरांत पुन्हा अल्लाह त्यांना जीवित करणार आहे आणि त्यांनी ईश्‍वराचे आणि त्याच्या पैगंबरांच्या शिकवणींचे काटेकोरपणे पालन केले, पाठवून दिलेल्या शिकवणींनुसार आचरण केले. त्यात काही कसर केली जावी, चुका केल्या, पापं केली असतील म्हणजेच माणसाला अल्लाहकडे जाब द्यावा लागेल. अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जगात सुरुवातीपासून प्रलयाच्या दिवसापर्यंत जेवढी माणसे जन्माला आली त्या सर्वांना ईश्‍वरासमोर हजर राहावयाचे आहे. त्या दिवशी माणसांचा हिशोब घेऊ, त्यांना चांगल्या, कर्मांचा मोबदला दिला जाईल आणि वाईट कर्मांसाठी शिक्षा केली जाईल, यावर श्रद्धा ठेवायला हवी.

त्या शिकवणी कोणत्या?

अल्लाहची आराधना करा, त्याचा कुणी भागीदार बनवू नका. मातापित्याशी सद्वर्तन करा. त्याचबरोबर आपल्या नातलगांशी, अनाथांशी, गोरगरीबांशी, आपल्या शेजार्‍यांशी आणि वाटसरूंशी चांगले वर्तन करा. शेजार्‍यांविषयी पैगंबर मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, अशी व्यक्ती श्रद्धावंत - मुस्लिम होऊच शकत नाही, जेे स्वतः आपल्या घरी पोटभर जेवतात आणि त्यांचा शेजारी उपाशी असेल. एकदा पैगंबरांच्या पत्नी ह. आयेशा (र.) यांनी पैगंबराना विचारलं की, मी माझे दोन शेजारी आहेत, मी कुणाला भेट (ॠळषीं) देऊ? पैगंबरांनी उत्तर दिले की ज्याच्या घराचे दार तुमच्या घरापासून जास्त जवळ असेल. राग येऊ देऊ नका. मुस्लिम असे असतात जे आपल्या रागावर नियंत्रण ठेवतात. दुसर्‍यांच्या चुका माफ करतात. - (उर्वरित पान 8 वर)

(पान 7 वरून) अशाच लोकांशी अल्लाह प्रेम करतो. अल्लाहने प्रत्येक माणसाच्या प्राणास आदरणीय ठरवलं आहे. रागाच्या भरात कुणाची हत्या करू नका. जर कुणी नाहक कुणाची हत्या केली तर त्याने खर्‍या अर्थानं माणुसकीची हत्या केली. अल्लाहच्या मर्जीखातर अपल्याला सर्वांत प्रिय असलेली संपत्ती नातलगांसाठी, अनाथांसाठी, गोरगरीबांसाठी खर्च करणारे वास्तवात नेक लोक असतात.

आपल्या साथीदारांच्या वा इतरांच्या चुकांकडे दुर्लक्ष करा. लोकांच्या मदतीला धावून जाण्यासाठी इस्लामच्या शिकवणींत खूप महत्त्व दिले गेले आहे. जोपर्यंत माणूस दुसर्‍या माणसांची मदत करत असतो तोपर्यंत अल्लाह त्याची मदत करत असतो. जे ज्ञानाच्या शोधात राहातात, अल्लाह त्यांच्यासाठी स्वर्गाची दारे खुली करतो.

मुस्लिम लोक एकमेकांचे भाऊबंध आहेत. मुस्लिमांनी शत्रूराष्ट्राची सुद्धा थट्टा करू नये. त्यांची अवहेलना करू नये. ते तुमच्यापेक्षा कदाचित चांगले असतील. एकमेकांची टिंगलटवाळी करू नका. वाईट नावांनी कुणाला हाक मारू नका. एकमेकांची चहाडी करू नका. चहाडी करणे म्हणजे मृत माणसाचे मांस खाण्यासारखे आहे. वायफळ खर्च करू नका. अल्लाह कुणाला विपुल साधनसंपत्ती देतो तर कोणाला मोजक्या प्रमाणात देतो. आपल्या संततीला उपजीविकेच्या भीतीने ठार करू नका. तुम्हाला आणि त्यांना उपजीविका देणारा अल्लाह आहे. व्याभिचाराच्या जवळदेखील फिरकू नका. कोणास वचन दिल्यास ते पाळा.

ज्या चुका अल्लाहच्या अधिकारात असतील म्हणजे त्याची आराधना, नमाज, रोजा वगैरे त्यात काही कमीजास्त झाले तर अशा चुकांना अल्लाह माफ करू शकतो. पण सजीव, माणूस आणि पशुपक्षी वगैरे यांच्या हक्कामध्ये काटकसर केली, त्यांच्यावर अन्याय-अत्याचार केले असतील तर अल्लाह क्षमा करणार नाही, जोपर्यंत ती पीडित व्यक्ती क्षमा करत नाही. पवित्र कुरआनमध्ये अल्लाह म्हणतो की मद्यपान करू नका, जुगार खेळू नका ही सैतानी कृत्यं आहेत. सैतानाचा बेत आहे की त्याने तुमच्यात शत्रुत्व निर्माण करावे.

ह. लुकमान (अ.) अल्लाहचे पैगंबर होते. त्यांनी आपल्या मुलाला खालीलप्रमाणे उपदेश दिला होता- माझ्या मुला, नमाज कायम कर. न्यायाने वाग, अन्याय करू नकोस. काही आपत्ती कोसळल्यास संयमाने वाग. निश्‍चितच ही कामं मोठ्या हिंमतीची आहेत. लोकांशी बोलताना तोंड वाकडं करू नकोस. धरतीवर अहंकारानं चालू नकोस. अल्लाहला उद्धटपणा करणारे आवडत नाहीत. मध्यम गतीनं चालत जा. आपला आवाज धीमा ठेव. सर्वांत वाईट गाढवाचा आवाज असतो.आणखीन दुसर्‍या ठिकाणी असे म्हटले आहे की-

जमिनीवर अहंकारानं वागू नकोस. तू जमिनीला दुभंगू शकणार नाहीस की पर्वताएवढी उंची गाठू शकणार नाहीस. अल्लाहबरोबर इतर कोणासही भागीदार बनवू नकोस. निष्कलंक महिलांवर खोटे आरोप करू नको.

शेवटचे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी जगातील सार्‍या मानवजातीला संबोधून जे आपल्या आयुष्यातील अंतिम प्रवचन दिले ते असे- “अल्लाहशिवाय कोणी ईश्‍वर नाही. तो एकमेव असून त्याचा कोणी भागीदार नाही. अल्लाहनं आपलं वचन पूर्ण केलं. त्यानं आपल्या भक्तास मदत केली आणि एकट्यानं एकत्रित आलेल्या सगळ्या खोट्या शक्तींना पराभूत केलं.” 

“मानवांनो! मी सांगतो ते ऐका. मला नाही वाटत आपण पुन्हा एकत्रित येऊ. मला एक वर्ष लाभेल असेही मला वाटत नाही.

“आजचा हा दिवस, हा महिना, हे ठिकाण पवित्र आहे. तसंच लोकहो! सर्वांचं जीवन (रक्त) आणि मालमत्तेचा आदर करा, ते पवित्र आहेत. लक्षात ठेवा, तुम्हा सर्वांना अल्लाहच्या हुजुरात हजर व्हायचंय. तुमच्या कर्मांची मग तिथं विचारपूस होईल. कुणाचं नाहक रक्त सांडू नका. घराघरांचा नाश करू नका. तिथं सर्व कर्मांची झडती द्यावी लागेल. 

“अज्ञानकाळात झालेल्या खुनांचा सूड घेणं आता रद्द होतंय. सर्वप्रथम मी आपल्या परिवाराच्या खुनाचा बदला माफ करून टाकतो. हारिसचा मुलगा रबीआच्या खुनाचा सूड घेतला जाणार नाही.

“मानवांनो! अल्लाहनं तुम्हाला एकच पुरुष आणि एकाच स्त्रीपासून जन्म दिलाय. तुमच्या जमाती आणि टोळ्या बनवल्या एकमेकांच्या ओळखीसाठी. पण अल्लाहपाशी तुमच्यापैकी तोच प्रतिष्ठित जो सदाचारी असेल जो ईशपरायणतेमध्ये पुढे असेल.” 

सारे मानव आदमची संतती आहेत. आदम यांना चिखलमातीपासून निर्माण केलंय. कुणा अरबास अरबेतरावर प्रभुत्व नाही की अरबेतर अरब माणसापेक्षा प्रतिष्ठित नाही. तसंच काळ्या माणसाला गोर्‍या माणसावर आणि गोर्‍या माणसाला काळ्या माणसावर प्रतिष्ठा नाही. अज्ञानकाळातल्या सगळ्या प्रतिष्ठा मी माझ्या पायाखाली तुडवित आहे. कुरैशच्या लोकांनो! अल्लाहनं तुमच्या खोट्या अहंकारास नष्ट करून टाकलं. तुमच्या बापजाद्यांच्या पराक्रमांवर घमेंड करण्याला काही अर्थ नाही.

“सावकारी निषिद्ध झाली. व्याजबट्ट्याचा व्यवहार निषिद्ध झाला. सर्वप्रथम मी माझे चुलते अब्बास यांचं व्याज रद्दबातल करतो.

‘लोकहो! तुमच्या पत्नींचे तुमच्यावर काही अधिकार आहेत, तसंच तुमचे त्यांच्यावर हक्क आहेत. आपल्या पत्नीबाबत अल्लाहचं भय बाळगा. अल्लाहस वचन देऊन तुम्ही त्यांना आपल्या भार्‍या स्वीकारल्या आहेत. त्यांच्याशी सहानुभूतीनं, नरमाईनं, दयेनं वागा. कठोरपणे नका वागू.

“कुणा स्त्रीनं आपल्या पतीच्या संपत्तीतून त्याच्या अनुमतीशिवाय काही घेणं हे वैध नाही. तुमच्या पत्नीवर तुमचा हा अधिकार आहे की त्यांनी अशा कुणा व्यक्तीस घरी बोलवू नये ज्यास तुम्ही पसंत करीत नाही. त्यांनी आपल्या शीलांचं रक्षण करावं. जर त्यांनी तसं केलं नाही तर तुम्ही त्यांना शिक्षा करू शकता; पण सौम्य प्रकारची. त्यांच्या खाण्या-पिण्याची व्यवस्था करा.

“कोणी विश्‍वास करून तुमच्याकडे अमानत ठेवली तर विश्‍वासघात करू नका. दिलेलं वचन पाळा. सारे मुस्लिम एकमेकांचे भाऊबंद आहेत. दुसर्‍यानं तुम्हाला काही राजीखुशीनं दिलं तर ते घ्या. त्याच्या मर्जीशिवाय त्याच्या मालाला हात लावू नका. अन्याय करू नका.

“अल्लाहनं ज्याचे त्याला हक्क दिलेत. आता कोणी कुणाच्या बाबतीत मृत्युपत्र करू नये.

“ज्याच्या बिछान्यावर बाळानं जन्म घेतला असेल ते बाळ त्याचंच. ज्यानं व्याभिचार केला त्यास दगडानं ठेचून मृत्युदंड दिला जाईल. त्यांचा हिशेब अल्लाहपाशी होईल.” “कोणी आपलं कुळ बदलू नये, दुसर्‍यास आपला पिता मानू नये. कोणी असं केल्यास त्याचा अल्लाह धिक्कार करील. “कर्ज घेतल्यास ते परत करा. कोणी भेटवस्तू दिल्यास तुम्हीही द्या. 

“मी तुमच्या दरम्यान एक वस्तू सोडून जातोय. तिला घट्ट धरल्यास तुम्ही कधी मार्गभ्रष्ट होणार नाही. ती ‘कुरआन’ आहे! धर्माच्या बाबतीत अतिरेक करू नका. तुमच्या पूर्वीच्या लोकांचा यामुळेच विनाश झाला.

“लोकहो! ऐका. आकाश आणि पृथ्वीची निर्मिती झाली, त्याच ठिकाणी आता काळ लोटून आलाय. अल्लाहनं ज्या वेळी आकाश आणि पृथ्वी निर्माण केली त्यावेळी वर्षाचे बारा महिने ठरविले आहेत. यात चार महिने आदरणीय आहेत. हा (इस्लाम) धर्म कायमस्वरूपी आहे. लक्षात ठेवा. माझ्यानंतर नाकारणारे होऊ नका. एकमेकांचं रक्त सांडू नका. सैतान आता निराश झालाय. प्रार्थना करणारे (नमाज अदा करणारे) त्याची पूजा करणार नाहीत; पण तो तुम्हाला एकमेकांविरूद्ध उभं करील.”

प्रेषितांनी त्या लोकांना विचारलं, “मी तुम्हाला अल्लाहचा संदेश पोचता केला?” सगळे लोक एका सुरात म्हणाले, “होय, अल्लाहचे प्रेषित!” त्यावर प्रेषित म्हणाले, “अल्लाह! मी तुझा संदेश पोचता केला, माझं कार्य पूर्ण केलं. तू साक्षी आहेस.” आणि मग म्हणाले,

“जे आज इथं हजर आहेत त्यांनी हा संदेश जे इथं हजर नाहीत त्यांना पोचवावा. जे इथं आहेत, कदाचित त्यांच्यापेक्षा जे इथं नाहीत ते हा संदेश चांगल्या रीतीनं ओळखतील आणि लक्षात ठेवतील.

“तुमचे जे गुलाम, सेवक आहेत त्यांच्याशी चांगलं वागा. तुम्ही खाता तेच त्यांना द्या. तुम्ही घालता तसेच कपडे त्यांना द्या. त्यांनी चूक केल्यास माफ करा. “मी अल्लाहचा संदेश पोचवला. अल्लाह! तू साक्षी आहेस.

“ऐका! तुमच्यावर जर एखाद्या काळ्या अ‍ॅबिसीनियन (निग्रो) गुलामाला जरी प्रमुख नेमलं गेलं तर त्याच्या आज्ञांच पालन करा. जर तो अल्लाहच्या ग्रंथानुसार निर्णय घेत असेल तर !

“मानवानो! आपल्या विधात्याची उपासना करा. पाच वेळा नमाज अदा करा. महिनाभर रोजे ठेवा. आपल्या संपत्तीतून जकात अदा करा, खूश दिलानं. आपल्या अल्लाहच्या घराची हजयात्रा करा. आपल्या प्रमुखाचं पालन करा. तुम्ही स्वर्गात प्रवेश कराल. “आणि पाहा, एकानं केलेल्या अपराधापायी दुसर्‍याला जबाबदार धरलं जाणार नाही. बापानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या मुलाला की मुलानं केलेल्या गुन्ह्याची शिक्षा त्याच्या बापाला दिली जाणार नाही. “लोकहो, माझ्याविषयी तुम्हाला विचारलं जाईल (अल्लाहपाशी) तेव्हा तुम्ही काय उत्तर द्याल?”

लोक म्हणाले, “तुम्ही अल्लाहचा धर्म आम्हास पोचता केला याची आम्ही साक्ष देऊ. आपण प्रेषित्वाची जबाबदारी पार पाडली, आमचं भलं केलं.” लोकांचं हे बोलणं ऐकून प्रेषितांनी आपलं बोट आकाशाकडे उंच केलं आणि तीन वेळा उच्चारलं, “अल्लाह! तू साक्षी आहेस. अल्लाह! तू साक्षी आहेस. अल्लाह! तू साक्षी आहेस.”

कोण होते हे प्रेषित मुहम्मद (स.)? अल्लाहने त्यांना निवडले होते जगावरील आजवर जन्माला आलेले आणि यापुढे जन्माला येणारे सर्व मानवांत सर्वोत्तम. त्यांचे नाव होते मुहम्मद मुस्तफा. म्हणजे त्यांनी सर्वोत्तमांतील सर्वोत्तम होते.

साधा आणि सोपा, एका निरक्षर माणसापासून विद्वानापर्यंत सर्वांना समजण्यासारखा, त्यानुसार आचरण करण्यासारखा- इस्लाम! फक्त एक धर्म नसून ती विचारधारा आहे, सभ्यता आहे. मानवी जीवनातील सर्व क्षेत्रं, मग ती सामाजिक असोत की राजकीय, कौटुंबिक असोत की आंतरराष्ट्रीय; समस्या, प्रश्‍न, विज्ञानाविषयी, कायदे, संविधान अशा सर्व बाबी ज्या मानवी समूहाला अत्यावश्यक आहेत अशा सर्वच क्षेत्रांत मार्गदर्शनांनी संपन्न. (इतिहासकार मोशे शेरॉन, बेन गोरिऑन विद्यापीठ, इस्राईल)

आपल्या प्रेषित्वकाळात लोकांना इस्लाम धर्म सांगताना त्यांना ईश्‍वराकडे बोलविताना प्रेषितांना अमाप यातनांना सामोरे जावे लागले. ते कधी डगमगले नाहीत. कधी भयभीत झाले नाहीत. कुणाकडे दयेची विनंती केली नाही, मग तो मक्केत असतानाचा काळ असो की मक्का सोडून ताईफकडे इस्लाम प्रचारास जाण्याचा प्रसंग असो. ताईफच्या लोकांनी त्यांच्यावर दगडांचा वर्षाव केला. रक्ताने त्यांची वस्त्रं भिजून गेली. तरीदेखील त्यांनी त्यांच्यावर इतके अत्याचार करणार्‍यांना श्राप दिला नाही. त्यांनी आशेची कास सोडली नाही. ते म्हणत असत की यांना नाही तर यांच्या संततीला समज येईल. आपल्या ध्येयासाठी संकटांना सामोरे जावे लागते तेच प्रेषितांबाबतही घडले. समोर डोंगराएवढे संकट होते. बद्रच्या युद्धावेळी, विरोधकांचे 3000 सैनिक घोडे, शस्त्रे. प्रेषित ते पाहून चलविचल झाले नाहीत. घाबरून गेले नाहीत. त्यांच्याकडे 300 पेक्षा कमी लोक होते. गंजलेल्या दोन तीन तलवारी. त्यांना घेऊन ते शत्रूसैन्याशी भिडले आणि विजयी झाले. त्यांनी दाखवून दिले की अफाट संख्या आधुनिक शस्त्रास्त्रे, दारूगोळा आपल्या धैर्यासमोर कवडीमोल असतो.

काबादर्शनासाठी निघाले असता त्यांनी कोणतेही हत्यार बाळगले नव्हते. जिथे जायचे आहे तिथे सारेच शत्रू आहेत हे त्यांना माहीत होते. तरीदेखील ते निघाले. तेच मक्केतील विरोधक त्यांच्या आगमनाच्या नुसत्या बातमीने भयभीत झाले. रस्त्यात येऊन त्यांना अडवले. या वेळी त्यांना काबादर्शनासाठी येऊ नये म्हणून साकडे घातले. आपसात करार करण्याचा प्रस्ताव पुढे केला. प्रेषितांनी मान्य केले. त्या करारातील सगळ्या अटी प्रेषितांच्या विरोधात असल्या तरीदेखील त्या मान्य करून करारावर सही केली. पण त्याच कराराचा असा परिणाम झाला की गेली दहा वर्षे जितक्या लोकांनी इस्लाम स्वीकार केला नव्हता ते एकाच वर्षांत त्यांची संख्या 10,000 वर गेली. आपल्या निर्णयात सृजनशीलता कशी असावी हे प्रेषितांनी दाखवून दिले. अल्लाहने त्या करारास अधिक स्पष्ट विजय घोषित केले होते.

मनुष्य सामाजिक प्राणी असल्याचे म्हटले जाते. ते स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत की विकास करू शकत नाहीत. त्यांना एकमेकांची साथ हवी असते. अचानकपणे कोणत्याही जनसमूहाला जगातील कोणत्याही नेत्याने, विचारवंताने, बलाढ्य शक्ती असलेल्या सत्ताधार्‍याने रातोरात त्यांच्यात बदल घडवला नाही, हा आजवरचा इतिहास आहे. पण जगाला जे शक्य झाले नाही, ते प्रेषितांनी एका क्षणात करून दाखविले. मद्यपान आतापासून निषिद्ध असल्याची कुरआनने घोषणा करताच ज्यांच्या हातात मद्याचे प्याले होते ते त्यांनी भिरकावून दिले. ज्यांनी मद्याचा घोट घेतला होता त्यांनी थुंकून दिले. दारूने भरून ठेवलेली भांडी रस्त्यावर रिकामी करण्यात आली.

आपल्या ध्येयप्राप्तीसाठी ते नेहमी ठाम होते. मक्केच्या लोकांनी कंटाळून एकदा प्रेषितांसमोर प्रस्ताव मांडला की तुम्हाला जे काही करायचे तुम्ही करा, तुम्हाला संपत्ती हवी असेल तर आम्ही उदंड संपत्ती गोळा करून देतो. सत्ता हवी असेल तर तुम्हाला आम्ही आपला सत्ताधारी बनवतो. जर एखाद्या संपन्न आणि सुंदर स्त्रीशी लग्न करायचे असेल तर आम्ही तेही करू. पण आमच्या देवीदेवतांना तुम्ही वाईट म्हणू नका. प्रेषित म्हणाले की, मला यातलं काहीही नको. उलट मी तुम्हाला ज्या ईश्‍वरावर श्रद्धा ठेवायला सांगतो ते जर तुम्ही मान्य कराल तर सकल जगावर तुम्ही राज्य कराल.

हा होता प्रेषितांचा दृढसंकल्प. कोणत्याही लोभाला, मोहाला ते कधीच बळी पडले नाहीत. उलट अत्याचाराला, छळाला बळी जात असताना ते कधी घाबरले नाहीत. ही त्यांची सृजनशील शक्ती होती, ज्यामुळे 23 वर्षांच्या काळात सार्‍या अरबस्थानास इस्लामच्या प्रभावाखाली आणलं.

मानवी समूहामध्ये बहुसंख्य लोक साधे-सरळ असतात. अल्पसंख्यांक लोकांमध्ये क्षमता, सृजनशीलता, बौद्धिक शक्ती असते, साधनांनी संपन्न असतात, असे लोक बहुसंख्य लोकांवर राज्य करतात. प्रेषितांनी जो समाज निर्माण केला त्यात वरिष्ठ-कनिष्ठ, उच्च-नीच असे काहीच नव्हते. त्या सगळ्यांचे श्रद्धास्थान अल्लाह आणि त्याचे प्रेषित होते. समाजातील अभिजनवर्गाचे ते कधीच गुलाम बनले नाहीत. आजही नाही. विषमतेचा नाश करण्यासाठी तर इस्लाम आलेला आहे. मानवांच्या कल्याणासाठी अल्लाहने मुस्लिमांना या जगात उभं केलं आहे. हीच इस्लामची शिकवण अंधारातून प्रकाशाकडेचा मार्ग आहे. हा इस्लामच्या शिकवणींचा फक्त ओझरता परिचय.



- सय्यद इफ्तिखार अहमद

( लेखक : शोधनचे संपादक आहेत.  मो. 9820121207)



सध्याचं जग हे धावत जग आहे़ अनेक प्रश्‍न डोक्यात कल्लोळ माजवत आहेत़ बोलणं सोपं झालं आहे परंतु प्रत्यक्षात उतरविणे अवघड झाले आहे़ जिथे तिथे गोड शब्द ऐकायला मिळतात परंतु व्यवहारातून मात्र कडवट अनुभव मिळत आहेत़ मग ते घर असो की गल्ली, गाव असो की शहर, राज्य असो की देश चोहिकडे मोठ्या प्रमाणात भरकटलेली मने दिसून येत आहे़ भौतिकतेच्या आहारी आणि व्यावसायिक शिक्षणाच्या नादी लागून उच्चशिक्षित पिढीही अशिक्षितापेक्षा वाईट वागू लागली आहे़  लोक क्षणाच्या सुखासाठी अनंतकालीन दु:ख पदरात पाडून घेत आहेत़ मग या वर्तमानरूपी अंधारात भरटकलेल्या मनांना ईश्‍वरीय अनंतकालीन सुखाचा अनुभव देणार्‍या व्यवस्थेतील प्रकाशाची वाट दाखविणे प्रत्येक ईमानधारकांचे कर्तव्य आहे़  

त्यासाठी स्वत:पासून सुरूवात करावी लागेल़ स्वत:शी जिहाद (आत्मसंघर्ष) करावा लागेल़  स्वैर मनाला लगाम लावावा लागेल़ त्यागाची भावना अंगी बाळगावी लागेल, संयमाची पातळी आणि  सत्कर्माची गती वाढवावी लागेल़  जमाअते इस्लामी हिंद महाराष्ट्रच्या ’अंधारातून प्रकाशाकडे’ या मोहिमेच्या निमित्ताने आज आपणांसर्वांना निश्‍चय करावा लागेल की, पुढील आयुष्यात ईश्‍वरीय व्यवस्थेचा अंगीकार करून ऐहिक आणि पारलौकिक जीवन यशस्वी करण्यासाठी सर्व लोकांपर्यंत प्रेषित मुहम्मद सल्ल़ यांचा संदेश पोहोचवू.

आज व्यवहारातील देवाण-घेवाण किचकट बनली आहे़  साठेबाजारीला तर कायद्याने मान्यताच मिळाली आहे़ खोट बोल पण रिटून बोलाची प्रवृत्ती सामान्यांपासून ते शासनकर्त्यांपर्यंत बळावत चालली आहे़ असत्य मनावर बिंबविण्याच्या नवनवी क्लृप्त्या शोधून त्याचा मारा केला जात आहे़ जगण्याची ओढ अनैतिकमार्गाकडे घेऊन जात आहे़ गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत खोट्या आश्‍वासनांची खैरात वाटताना कोणालाही दुःख वाटत नाही. प्रत्येक क्षेत्रात काम कमी आणि मार्केटिंग जास्त झाली आहे़ अशात सामान्य माणूस आपले जगणे हरवत चालला आहे़ त्याने कोणापाशी आपले मन हलकं करावे त्याला कळेनासे झाले आहे़ तरीपण आलेला दिवस तो जड अंत:करणाने ढकलत आहे़ तो सुखाच्या शोधात भरकटत आहे़ फक्त गरीबच नव्हे तर मध्यवर्गीय आणि श्रीमंतही भरकटू लागले आहेत़  या सर्व अंधःकारमय परिस्थितीतून मार्ग काढण्यासाठी कुरआनला अभिप्रेत असलेला प्रकाशच कामी येऊ शकेल, याची खात्री आहे. 

जीवनाचा भरपूर लाभ घेणे, यथायोग्य आनंद प्राप्त करणे आणि खर्‍या अर्थाने यशस्वी जीवन पार पाडणे खात्रीने आपला हक्क आहे़ मात्र त्याच वेळी जेव्हा जीवनयापनाची कुशलता आपण जाणत असाल, यशस्वी जीवनाच्या नियमांशी व शिष्टाचारांशी परिचित असाल, एवढेच नव्हे तर त्या नीतीनियमांना व शिष्टाचारांना आचरणात आणून आपल्या जीवनाला सुशोभित बनविण्याच्या प्रयत्नात राहता़ 

सुसंस्कार आणि चांगली आचरणशैली, प्रतिष्ठा, शुद्धता आणि शुचिर्भूतता, अभिरूची आणि चांगली निवड, क्रमबद्धता आणि व्यवस्थापन, अनुभूतीची सुक्ष्मता आणि चांगली आवड, उच्च नीतिमत्ता आणि सभ्यता, सहानुभूती आणि शुभचिंतन, मृदू संभाषण आणि वाक् मधूरता, आदर आणि विनम्रता, त्याग आणि बलिदान, नि:स्पृहता आणि सचोटी, धैर्यशील स्वभाव आणि पुरूषार्थ, कर्तव्याची जाण आणि तत्परता, ईशभीरूता आणि सचोटी, दुराचापारापासून अलिप्तता, ईश्‍वरावर निष्ठा, पूर्ण कृतीशिलता ही इस्लामी जीवनाची ती नीतीमूल्ये होत़ ज्यांच्यामुळे ईमान राखणार्‍या माणसाच्या सुशोभित जीवनात ती असाधारण आकर्षण आणि अथांग ओढ निर्माण करतात़ केवळ इस्लामचे अनुयायीच नव्हे तर इस्लामशी अनभिज्ञ असलेले इतर लोकदेखील आकर्षित होऊन त्याच्याकडे खेचले जातात़ हा इतिहास तसेच वर्तमान आहे.  इस्लाम हा निश्‍चितच हवा आणि प्रकाशाप्रमाणे समस्त मानवांचा संयुक्त वारसा आहे़ इस्लामी जीवन पद्धती नि:संशय या योग्यतेची आहे की संपूर्ण मानवजातीने तिचा स्वीकार करून तिच्या आधारावर आपल्या व्यक्तीगत व सामूहिक जीवनाची यशस्वी उभारणी करावी़  जेणेकरून ऐहिक आणि पारलौकिक दोन्ही जगामध्ये यशस्वी होता येईल. 

पवित्र कुरआनमध्ये अल्लाहने ही पद्धत मोठ्या महत्तेसह वर्णिली आहे की, जो मनुष्य ईश मार्गदर्शनासाठी तहानलेला असतो त्याला अल्लाह मार्गदर्शनाच्या पथावर चालवतो़ ज्याच्या मनात ईश मार्गदर्शनाची तृष्णा नसते त्याला तो मुळीच मार्गदर्शन करीत नाही़ अल्लाह असे कदापि करीत नाही की मासे मागणार्‍याला साप द्यावा आणि सापाची मागणी करणार्‍याला मासे प्रदान करावेत़ जो मनुष्य ईश मार्गदर्शनाची अभिलाषा बाळगतो, त्याच्याशी अल्लाह तर त्याच प्रकारचा व्यवहार करतो, जसा व्यवहार मनुष्य आपल्या प्रिय बालकाशी आणि प्रेमळ शिक्षक आपल्या होतकरू आणि खूप मेहनत करणार्‍या विद्यार्थ्यांशी करतो़ अल्लाह त्याला आपला मार्ग दाखवतो आणि सन्मार्गी लावून सोडून देत नाही तर त्याला सातत्याने आपल्याकडे खेचत राहातो व पुढे जाण्याची प्रेरणा देत राहतो़ 

ह्या उलट, ज्याच्या मनात ईश मार्गदर्शन प्राप्त करण्याची इच्छा नसते, अशा माणसासोबत अल्लाह बेपर्वा होतो़ त्याला मोकळे सोडून देतो की त्याने वाटेल त्या मार्गावर आणि वाटेल त्या पद्धतीकडे जावे. पवित्र कुरआन समस्त मानवांच्या मार्गदर्शनासाठी अवतरले आहे़  याच्या प्रकाशाचा लाभ तोच घेऊ शकतो ज्याच्या मनात ईश-मार्गदर्शनाची तृष्णा आहे़ प्रत्येक आस्थेवाईक मनुष्याने प्रथम ईश्‍वराकडे प्रार्थना करावी के, ”ऐे अल्लाह! तू अत्यंत दयावंत व असीम कृपावंत आहे़ स्तवन फक्त तुझ्यासाठीच आहे तू सर्व सृष्टीचा पालनकर्ता आहे़ एकमात्र कृपावंत आणि दयावंत, निर्णयाच्या दिवसाचा स्वामी आहेस आम्ही तुझीच भक्ती करतो आणि तुझीच मदत मागतो़ आम्हाला सरळ मार्ग दाखव, त्या लोकांचा मार्ग ज्यांना तू अनुग्रहित केलेस आणि जे कोपग्रस्त झाले नाहीत व जे मार्गभ्रष्ट नाहीत़ ” 



- बशीर शेख 

विशेषांक संपादक

मो. 9923715373



निर्मात्याने अज्ञान दूर करण्यासाठी अनेक पैगंबरांना ज्ञानासह पाठविले. त्यांच्या संदेशाचा सारांश हा की, या जगात प्रत्येक माणूस जबाबदार आहे ! प्रत्येकाला एका ठराविक वेळी निर्मात्यासमोर जाब द्यावाच लागेल ! दुनिया अंधेर नगरी नव्हे, पाहणारा आहे! कुरण, मोकळ रान नव्हे, परिक्षागृह आहे. हे जीवन खरे पाहता प्रत्येकाची परीक्षा आहे.

अंधार हा एक व्यापक अर्थाचा शब्द असून प्रामुख्याने त्याने ’अज्ञान’  अभिप्रेत आहे. तर प्रकाश हाही व्यापक अर्थाचा शब्द असून प्रामुख्याने त्याने ’ज्ञान’ अभिप्रेत आहे. साहजिकच समाजाला अज्ञानातून ज्ञानाकडे आवाहन करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे. ’अज्ञान’ हाही व्यापक अर्थाचा शब्द आहे त्याने अभिप्रेत भौतिक विषयांविषयी अज्ञान तर आहेच पण प्रामुख्याने सृष्टीच्या आणि खुद्द मानवाच्या निर्मात्याविषयीचं अज्ञान, जीवनाच्या मूळ व वास्तविक उद्दिष्टाविषयीचं अज्ञान, मृत्यु आणि मृत्युपलिकडील जीवनाच्या वास्तवतेबद्दल अज्ञानही अभिप्रेत आहे.

अद्वतच ’ज्ञान’ हाही  व्यापक अर्थाचा शब्द आहे. त्याने अभिप्रेत भौतिक ज्ञान तर आहेच पण त्याच बरोबर स्वत:ची खरी ओळख, निर्मात्याची ओळख, जीवनाच्या खर्‍या उद्देशाची जाणीव आणि मृत्यू व त्या पलिकडील जीवनाचे वास्तविक ज्ञानही अभिप्रेत आहे.

सद्य युगात मानव जातीने भौतिक ज्ञानाला सर्वाधिक महत्व दिले आहे. परिणामस्वरूप भौतिक प्रगती तर साध्य झाली. माणूस असमंतात भरारी घेऊ लागला. उभं जग ग्लोबल व्हिलेज मध्ये रूपांतरीत झाले. माणसं भौतिक दृष्टा तर जवळ आली. मात्र मनाने दुरावत गेली. माणूस ’माणूस’ राहिला नाही. तो पशूंपेक्षाही नीच वागू लागला. हिंस्त्र पशूंनी शरमेने मान खाली घालावी एवढं नीच तो वागू लागला. हे वृध्दाश्रम कल्चर, हा बोकाळलेला भ्रष्टाचार, ही बेईमानी, अगदी कोरोनासारख्या महामारीतही औषधांचा काळाबाजार, हॉस्पिटलमध्ये होणारी रूग्णांची लूट, ही अश्‍लीलता, ही नग्नता ही हाथरसची आणि तत्सम इतरत्र घडणार्‍या अत्यंत निर्घृण, निर्दयी, मानवतेला, देशाला काळीमा फासणार्‍या घटना हे सर्व कशाचं द्योतक आहेत? प्रगतीचे? विकासाचे? प्रकाशाचे? ज्ञानाचे की अधोगतिचे? भकासपणाचे? अंध:काराचे? अज्ञानाचे? 

या दुर्दशेेचं मूळ कारण माणसांची स्वत:बरोबरच निर्मात्या विषयीचं अज्ञान आहे. जीवनाच्या वास्तविक उद्दिष्टाविषयीचं अज्ञान आहे. मृत्यू व मृत्यू पलिकडील जीवनाविषयीचं अज्ञान आहे. माणसाने असा गैरसमज करून घेतलाय की, मी या जगात गुराढोरांप्रमाणेच एक बेजबाबदार निर्मिती आहे. ना कोणी निर्माता ना कोणी पाहणारा आणि ना कोणी ऐकणारा. ही दुनिया अंधेर नगरी आहे! ही दुनिया एक कुरण आहे, चरण्यासाठी! मोकळं रान आहे! घ्या चरून! हवं तेथे, हवं तसं, हवं तेवढे! मेलं मातीत गेलं म्हणजे संपलं! कसला जाब नि कसला जबाब? कसला न्याय नि कसला निवाडा! जे काही आहे ते फक्त आणि फक्त सद्य जीवनच आहे ! मृत्यु पलिकडे काहीच नाही! अग्नि दिला राख झाली, दफन केलं माती झाली म्हणजे संपलं! हेच माणसाचं भयंकर अज्ञान आहे.

निर्मात्याने हे अज्ञान दूर करण्यासाठी अनेक पैगंबरांना ज्ञानासह पाठविले. त्यांच्या संदेशाचा सारांश हा की, या जगात प्रत्येक माणूस जबाबदार आहे ! प्रत्येकाला एका ठराविक वेळी निर्मात्यासमोर जाब द्यावाच लागेल ! दुनिया अंधेर नगरी नव्हे, पाहणारा आहे! कुरण, मोकळ रान नव्हे, परिक्षागृह आहे. हे जीवन खरे पाहता प्रत्येकाची परीक्षा आहे. आज तुला आचार विचारांचे स्वातंत्र्य जरूर आहे! पण हे स्वातंत्र्य स्वैराचारासाठी नव्हे, भ्रष्टाचारासाठी नव्हे, विध्वंस करण्यासाठी नव्हे तर सेवेसाठी, इमाने इतबारे कमावण्यासाठी, रचनात्मक, विधायक कार्य करण्यासाठी आहे.

      इथे मृत्यु अटळ आहे! काळ्या दगडावरची रेघ आहे. मात्र मृत्यु आला, अग्नि दिला, राख झाली किंवा दफन केले, माती झाली म्हणजे शेवट नव्हे. राख, मातीच्या पलिकडे जीवन आहे. निरंतर जीवन, अविनाशी जीवन! मात्र याद राख, त्या निरंतर जीवनाच्या यशापयाशाची धुरा आपल्या सद्य जीवनातील कर्मांवर आहे. ’यह दुनिया आखिरतकी खेती है - पैगंबर मुहम्मद (स.).’ बीज बोए बभूलके, आम कहाँसे पाए? - संत कबीर. पेरी कडू जिरे, मागे अमृत फळे, अर्के वृक्षा केळी कैसे येती? - तुकोबा. वैज्ञानिक दृष्टिकोनातूनही विचार केला तर राख अथवा माती कुणाची होते? पेशंटची? कदापि नव्हे! अग्नी तर पेशंट गेल्यावर देतात! दफन तर पेशंट गेल्यावर करतात! पेशंट गेला आता राहिलं ते काय? डेड बॉडी, प्रेत, शव, मढं! आणि दफन करतात ते या डेड बॉडीला! पेशंटला कदापि नव्हे! मग पेशंंटची राख अथवा माती होण्याचा काय प्रश्‍न?

आता प्रश्‍न हा की हे जीवन परीक्षा असेल तर या जीवनात त्याग करणार्‍यांना, विधायक काम करणार्‍यांना, ईमाने इतबारे जीवन जगणार्‍यांना सदाचार्‍यांना त्यांच्या सत्कृत्यांबद्दल मोबदला मिळावा की नव्हे? आणि दुराचार्‍यांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा मिळावी की नाही? माणसाचं अंत:र्मन म्हणतं की हो! सज्जनांना त्यांच्या सत्कृत्यांबद्दल योग्य इनाम मिळायलाच हवा! आणि दुष्टांना त्यांच्या दुष्कृत्यांबद्दल शिक्षा मिळायलाच हवी! हेच आहे वास्तव! मृत्यु पलिकडे जीवन आहे आणि त्याची धुरा सद्य जीवनातील आचार-विचारांवर,  बर्‍यावाईट कर्मांवर अवलंबून असणार आहे.

तात्पर्य हे की जीवनाविषयीचं हे ज्ञान अत्यंत मोलाचं आहे. मात्र आज बहुतेक लोक त्याविषयी अज्ञानी आहेत. त्यांना या अज्ञानातून बाहेर काढण्यासाठी आणि त्यांच्यापर्यंत हे ज्ञान पोहचविण्यासाठीच ही मोहीम राबविण्यात येत आहे. तर मग चला ’अंधारातून प्रकाशाकडे.’ 


- डॉ. सय्यद रफिक

(लेखक हे कुरआनचे व संत साहित्याचे गाढे अभ्यासक आहेत. मो. 9423161508)



निश्‍चितच 21 व्या शतकात मानवाने अभूतपूर्व प्रगती केली. मानव पृथ्वीच्या कक्षा ओलांडून अगदी मंगळ गृहापर्यंत पोहचला आहे. माहीती आणि तंत्रज्ञानाचे युगात संपुर्ण जग जणू एक छोटेसे खेडेच झाले आहे. या क्रांतीमुळे जीवन अत्यंत गतीमान झाले. भौतिक स्तरावर एकीकडे जगाने दैदिप्यमान आर्थिक प्रगती केली परंतु नैतिक पातळीवर माणूस सर्रास अपयशी ठरल्याचे प्रत्यय येतो. संपूर्ण जगात गुन्हेगारीचे वाढलेले प्रमाण हे मानवाच्या नैतीक आणि वैचारीक दिवाळखोरीचा पुरावा आहे. किंबहुना जो देश जितका प्रगतीशील गुन्हेगारीचे प्रमाण तेवढेच जास्त असल्याचे दिसून येते. मानवाचे सर्वात मोठे वैशिष्ट्ये त्याची माणुसकी आहे. तसे पाहता आधुनिक जगात माणसाच्या या वैशिष्ट्याची देखील प्रगती अपेक्षित होती. परंतु दुर्दैवाने असे झाले नाही. आर्थिक प्रगतीच्या प्रचंड झगमगीत माणुसकी दुर्मीळ झाली. वाढलेल्या प्रचंड जनसागारात माणूस शोधायला मिळेनासा झाला.

माहिती आणि तंत्रज्ञाने या जगाला एक छोट्याशा खेड्यात परीवर्तीत केले खरे पण माणूस स्वत:पासूनच दूर गेला यामुळे या वर्दळीत एकटा पडत चालला. या एकट्यापणामुळे तो नैराश्याच्या गर्तेत जाऊ लागला. यामुळे मानवी समाजाला व्यसनाने घेरले. तो स्वत:पासून दूर पळू लागला. मनःशांतीसाठी वेगवेगळ्या अनैतिक कृत्यांच्या  आहारी जाऊ लागला. इतकेच काय या सर्व उपायाने देखील शांती मिळत नाही म्हणून तो आत्महत्यासारखे टोकाचे पाऊल उचलण्यास बाध्य झाला. आज आपला देश आत्महत्यांच्या बाबतीत जगात प्रथम क्रमांकावर पोहचला आहे. याचा स्पष्ट अर्थ असा होतो की, आपण मानसिक स्तरावर अपयशी ठरत आहोत.

यंत्रयुगाने निश्‍चितच उत्पादन भरघोस वाढविले. परंतु यंत्रासोबत राहत असताना माणूस सुध्दा मशीन झाला की काय अशी शंका निर्माण होते. कारण जशी-जशी या जगाची प्रगती झाली तसा तसा माणूस संवेदनाहीन होत आहे. कधी नव्हे एवढ्या नीच थराला माणूस पोहोचला. पूर्वी देखील बलात्कार व्हायचे परंतु आज  ज्या अमानुष पद्धतीने बलात्कार होत आहेत; इतिहासात त्याचे दुसरे उदाहरण नाही. लोक एवढे पिसाळले की चार-चार वर्षाच्या चिमुकली सोबत देखील तोंड काळे करण्यास त्यांना लाज वाटत नाही. एवढ्यावरही न थांबता त्या पीडितेचे तुकडे-तुकडे केले जातात किंवा जाळून खाक केले जाते. हाच का माणूस? आणि हिच माणूसकी? आणि हिच का त्याची प्रगती? जर ही प्रगती असेल तर आम्हाला यापेक्षा पूर्वीचेच मागासलेपण हवंय, कारण त्याकाळी एवढी अमानवीयता तरी नव्हती?

या प्रगतीचे आणखी एक विदारक सत्य म्हणजे मानव कधी नव्हे एवढा स्वार्थी झाला. प्रत्येक गोष्टीत तो फक्त स्वार्थ शोधू लागला. त्याच्या या अप्पलपोटीपणामुळे हळूहळू त्याने आपल्या सामाजिक दायित्वाला तिलांजली दिली. मानसिक संकुचनाची सीमा म्हणजे तो आपल्या जन्मदात्यांना देखील विसरला. तो वस्तुप्रमाणे आपल्या वृद्ध आई-वडिलांना देखील अनुपयोगी समजून वृद्धाश्रमाची वाट दाखवू लागला. त्याच्यापायी प्रत्येक निरोपयोगी गोष्ट ही टाकावू झाली. नाते प्रासंगिक झाले. संवदेनांची जागा व्यवहाराने घेतली आणि माणूस संवेदनहीन झाला. रस्त्यावर अपघातात जबर जखमी झालेल्या माणसाच्या मदतीसाठी किंकाळ्याकडे लक्ष न देता व्हिडीओ करुन व्हायरल करण्यात तो स्वत:ला धन्य समजू लागला. एवढी अमानुषता बाळगणार्‍या या जगाने खरंच प्रगती केली का असा यक्ष प्रश्‍न आपल्या समोर उभा राहतो. 

आपल्याला या अंधारात माणसाचा शोध घ्यायचा आहे. त्याला प्रकाशाकडे न्यायचे आहे. यासाठी सर्वात प्रथम मानवाने स्वत:ला ओळखण्याची आवश्यकता आहे. भूतलावरील सर्वश्रेष्ठ निर्मिती म्हणजे माणूस संपूर्ण जग आणि येथील प्रत्येक वस्तू ही मानवासाठी कार्यरत आहे. किती हा श्रेष्ठ प्राणी? एवढा श्रेष्ठ प्राणी असताना त्यानी स्वत:ला एवढे छोटे का करुन घेतले? कारण त्यांनी स्वत:ला खर्‍या अर्थाने ओळखले नाही. स्वत:ची महानता त्याला माहीत नाही. स्वत:ची क्षमता देखील तो ओळखत नाही. जो माणूस स्वत:लाच ओळखत नसेल तो दुसर्‍याला आणि जगाला तरी कसे ओळखणार? त्यानंतर तो जीवनाच्या महान उद्दिष्टांबद्दल देखील अनभिज्ञ झाला. श्रेष्ठ निर्मितीलाच श्रेष्ठ उद्देश्य असतो किंबहूना जीवनाचा उद्देश्य श्रेष्ठ असल्यामुळेच तो श्रेष्ठ ठरतो. मानवाला त्याच्या जीवनाचे उद्देश्य कोण सांगणार? निश्‍चितच तोच सांगणार ज्याने त्याला जीवन प्रदान केले. कोण तो निर्माता? आणि त्याला माझ्याकडून काय अपेक्षित आहे? मी जर हा उद्देश्य पूर्ण केला तर मला काय मोबदला मिळणार? आणि जर मी असफल राहिलो तर काय शिक्षा होणार? कारण श्रेष्ठ व्यक्तीकडून श्रेष्ठ प्रदर्शनच अनिवार्य असते आणि हे सर्व बरोबर असेल तर मला कोणती जीवनपध्दती अवलंबावी लागेल जेणे करुन मी या जगात आणि त्यानंतरही यशस्वी होईल? 

या सर्व प्रश्‍नांची यथायोग्य उत्तर इस्लामने दिली. कारण इस्लाम ही नैसर्गीक जीवनपध्दत आहे. अगदी तार्कीक आणि सामान्यातील सामान्याला देखिल पटणारे उत्तर. इस्लामने सांगीतले की या सृष्टीचा एकच निर्माता आहे. तो अत्यंत दयाळु आणि कृपावंत आहे. सर्व सृष्टीचा तो एकमात्र रचियता आहे. माणूस हा जगातील सर्वश्रेष्ठ प्राणी आहे आणि संपूर्ण सृष्टी त्यासाठी कार्यरत आहे. त्याला एक महान उद्देशासाठी निर्माण करण्यात आले आहे. हे जग त्याचे परिक्षागृह आहे. निर्माणकर्त्याने मानवाला निवडीचे स्वातंत्र्य दिले आहे. त्याला बुद्धी दिली आहे. चांगले आणि वाईट त्याच्यासमोर प्रेषितांमार्फत विशद केले आहे. निवडीचे पूर्ण स्वातंत्र्य असतांना माणूस कोणती निवड करतो हिच त्याची परिक्षा. चांगल्यांची निवड करणार्‍याला निश्‍चितच चांगला मोबदला मिळायला हवा आणि वाईटाची निवड करणार्‍याला वाईट परिणाम भोगणे आवश्यक आहे.

निर्मात्याने प्रत्येक मानवाला युनिक बनविले. त्याला अफाट क्षमता दिल्या. या क्षमतांचा वापर करून शिखरापर्यंत तो तेव्हाच पोहचू शकतो जेव्हा तो कुरआनच्या मागदर्शनाचा अवलंब करेल. कुरआन ही सफल जीवनाची गुरुकिल्ली आहेे. कुरआन मानवाला माणूस बनविण्याचा अभ्यासक्रम आहे. जोपर्यंत माणूस, माणूस बनत नाही तो पर्यंत त्याची सर्व प्रगती व्यर्थ आहे. आज जगात कोट्यावधी लोकसंख्या असली तरी त्यात माणंस किती हाच प्रश्‍न आहे? आणि मानवाच्या संपुर्ण समस्येचे मूळ त्याची हरवलेली माणूसकी! त्यामुळे सगळंकाही असून देखील त्याच्या जीवनात एक पोकळी आहे. मन:शांती नाही, समाधान नाही, पुर्णत्वाची भावना नाही की स्थिरता नाही, हेच सर्व समस्यांचे मूळ आहे.

इस्लामने मानवाला जीवनाचा महान उद्देश देत असताना शांती, समाधान, स्थिरता आणि पुर्णत्वाचे मूलमंत्र दिले. नैतिक मार्गाने भौतीक जीवनाच्या यशाचे सुत्र देत असताना अध्यात्मीक जीवनातून शांती आणि समाधानाची सुत्रे दिली, त्याचे जीवन अर्थपूर्ण केले. महान उद्देशासाठी त्याला प्रशिक्षित केले. निश्‍चितच जीवन एक कठीण परिक्षा आहे. कुरआन ही कठीण परीक्षा सोपे करण्याचे मार्गदर्शन आहे. जीवनातील अनेक मार्गांपैकी सर्वात सोपे, सफल आणि आधुनिक जीवनपध्दत जीवनातील सर्व अंधारातून मुक्त करून प्रकाशाची वाट सर्व अंधश्रध्दा, सर्व पुर्वाग्रह यातुन मुक्त अशी आधुनिक जीवनपध्दत अध्यात्मिकता आणि आधुनिकतेचे अद्वितीय संगम. 

असीम दयावंत आणि कृपावान निर्मात्याने मानवाला सफल जीवनाचे मार्गदर्शन केले.त्याच्या सर्व समस्येचे यथोचित समाधान दिले. त्याला असे श्रेष्ठत्व प्रदान केले की जीवनातील सर्व समस्या त्याच्यापुढे तोडक्या झाल्या. त्याला फक्त स्वत:च्याच यशाचे सिध्दांत दिले नाही तर त्याला समाजउपयोगी माणूस बनवून संपूर्ण समाजाला आणि देशाला घडविण्याचे महान कार्य केले. कुरआनने माणसाच्या नैराश्यावर विजय मिळवून त्याला नवचैतन्याचा मार्ग दाखविला. जीवनाच्या प्रत्येक परिक्षेत त्याला पर्वतासारखे उभे केले. प्रत्येक क्षणात त्याच्या महान निर्मात्याची साथ असल्याचे आश्‍वासन दिले. जेव्हा हा माणूस महान उद्देशासाठी कार्यरत असतो तेव्हा त्याला आत्मिक शांती आणि समाधान लाभते. अल्लाहने माणसाला कुरआनच्या माध्यमातून अंधारातून प्रकाशाकडे नेले. हा प्रकाश बाहेर झगमगणारा कृत्रिम प्रकाश नाही तर हा अख्खे विश्‍वही प्रकाशित करणारा प्रकाश आहे. जीवनाला अर्थपुर्ण करणारा. खर्‍या अर्थाने मानवाला सफल आणि शांतीपुर्ण जीवन देणारा प्रकाश. कारण ही जीवनपध्दत त्या निर्मात्याने दिली ज्याने सृष्टीच्या प्रत्येक गोष्टीला अचूक नियम दिले. जो चुकुन देखिल चुक करीत नाही, असा विश्‍वाचा निर्माता जो आपल्या मानवजातीवर असीम प्रेम करतो, जो अत्यंत दयाळू आणि कृपाळू आहे, आपल्या सर्वात प्रिय निर्मितीला अर्थात मानवजातीला अचूक मार्गदर्शन करणार नाही का? निश्‍चित करणार व केलेलेच आहे. केवळ कुरआनशी दूर राहिल्याने त्या प्रकाशाची जाणीव आपल्याला राहिलेली नाही. जमाअते इस्लामी हिंदच्या   अंधारातून प्रकाशाकडे या मोहिमेतून तो दाखविण्याचा प्रयत्न. 



- अर्शद शेख 

आर्किटेक्ट

(लेखक आर्किटेक्ट असून, समाजसेवेत अग्रेसर असतात.)

Sunrise

कुरआन मानवी प्रवृत्ती आणि भौतिक प्रगती यामध्ये द्वंद्व उत्पन्न होऊ देत नाही. दोघांचाही विकास नियंत्रित पद्धतीने होऊन एक निरामय समाजनिर्मिती होण्यासाठी सिद्धांत मांडतो. अज्ञानरूपी तिमिराकडून ज्ञानरूपी तेजाकडे ईमानधारकांना अल्लाह आणतो. अज्ञानाच्या अंधारात भरकटून व मार्गभ्रष्ट होऊन मनुष्य आपले कल्याण व भलाईपासून दूर अतिदूर जातो आणि वास्तवाविरूद्ध चालून स्वतःची शक्ती व प्रयत्नांना चुकीच्या मार्गात खपवितो. प्रकाश म्हणजे सत्य-ज्ञान आहे ज्याच्या प्रकाशात मनुष्य स्वतःची व सृष्टीची वस्तुस्थिती आणि जीवन-उद्देशाला ओळखून विचारांति एकच एक सत्यमार्गावर मार्गस्थ होतो. अज्ञानरुपी अंधकारातून ज्ञानप्रकाशाकडे मर्गस्थ होतो. हेच लोक ईमानधारक आहेत आणि अल्लाह त्यांचा समर्थक व सहाय्यक आहे.

जे लोक तिमिराकडून तेजाकडे येण्यास इन्कार करतात त्यांचा समर्थक व साहाय्यक सैतान आहे जो नेहमी मनुष्यापुढे नवनवीन मनोहारी गोष्टींना प्रस्तुत करतो. मनुष्याचे मनदेखील त्याला मनोकामनांचा दास बनवून जीवनाच्या वाममार्गांवर भरकटत नेते. तसेच असंख्य लोक मुलं-बाळं, पत्नी, नातेवाईक, खानदान, ओळखीचे लोक, समाज, राष्ट्र, नेता, मार्गदर्शक, शासन व शासक इ. सर्व मनुष्यासाठी तागूत बनतात. कारण आहे तिमिराकडून तेजाकडे येण्यास इन्कार! ज्यांचे समर्थक व मदतगार तागूत असतात जे त्यांना ज्ञान-प्रकाशातून अज्ञानाकडे म्हणजेच प्रकाशाकडून अंधाराकडे ओढत नेतात आणि हेच लोक नरकाग्नीमध्ये जाणारे आहेत, जेथे हे सदैव राहातील.

जगभर जे सर्व दुष्टव्य पसरलेले आहेत आणि क्षुब्धतेच्या सावल्या दिवसेंदिवस वाढू लागल्या आहेत. गुन्हेगारीला प्रतिष्ठा मिळू लागली आहे. पर्यावरणाचा नाश, कष्टकर्‍यांचे विस्थापन आणि सामान्यांचे आक्रंदन वाढतच आहे. चहुबाजूच्या अहर्निश तिमिर वर्षावात अख्खे विश्‍व होरपळतेय. काळोखाने घेरलेल्या लोकांनो! अशा कठीण समयी तरी तुम्ही प्रकाश का शोधत नाहीत? अखिल मानवजातीला ही विचारणा केली जात आहे, कारण दुराचार, अत्याचार, अन्याय व हिंसाचारामुळे जगभरात अंधकाराच्या कक्षा व्यापक होत आहेत आणि मानवी जीव गुदमरतोय! अशा वेळी लोक परलोक कल्याणावर श्रद्धा असलेल्या प्रकाशपथिकांनी विवेकरुपी तेजाचे पलिते हाती घ्यावेत आणि सामूहिक सामर्थ्याला तेजोमय करावे. महाविक्राळ तिमिराकडे वास्तवाचा स्वीकार भावना दूर सारण्याखेरीज शक्य नसतो.

विखारी वाटेवर चालणाळया, धर्म, पंथ, वर्ण, लिंग, वंश, जात, प्रदेशाच्या नावावर कळपनिर्मितीच्या मागे लागलेला समाज आज जिथे तिथे दिसतो. अशा वेळी समाजाला ताळ्यावर आणण्यासाठी काही लोक झटत आहेत. ही त्यातल्या त्यात सुखावह बाब आहे. अर्थपूर्ण जगणारा समूह म्हणजे ताळ्यावर असलेला समाज. भौतिक भरभराटीच्या मृगजळामागे धावत त्यातच रुतून बसलेला दुसळया प्रकाशाचा समाज ताळ्यावर नसलेल्यांचा असतो. अन्य समाजाशी भेदाभेदांची दरी निर्माण करणारे लोक सर्वत्र आहेत. समाजातील सहअस्तित्वासाठी आत्मदुःखाचा मार्ग निवडणारे तुलनेने कमी आहेत. भिनलेल्या परंपरांना छेद देण्याचा प्रयत्न झाला, की भावना भडकतात. राज्यसत्ता आणि धर्मसत्ता सुधारकांच्या विरोधात जातात. जगाच्या प्रत्येक काळात हेच होत आले आहे. सुधारकांना ‘प्राणवायू’ मिळू नये म्हणून याची तजवीज प्रत्येक समाजव्यवस्था करत असते. आजही ती सुरू आहे. घुसमटीचे ढग हाकणार्‍या हातांना आत्मबोध होईस्तोवर उशीर झालेला असतो.

आज जगात मानवाचे जीवनमान आणि समस्या वेगाने वाढतच चाललेल्या आहेत. त्याचे हे जगणे समृद्ध आहे का? याचे उत्तर मात्र नकारार्थी आहे. विश्‍वातील सर्वांत मोठा धोका विषाणूंचा नाही. आपण विषाणूंचा निःपात करू शकतो. माणसाच्या आत दडलेल्या द्वेष, लालसा व अज्ञान या राक्षसांचा नायनाट करणे, हे आपल्या पुढील मोठे आव्हान आहे. गुलामगिरीला, स्त्रीभ्रूणहत्येला विरोध हा रिवाज पैगंबर मुहम्मद (स.) यांनी प्रस्थापित केला होता. लोकशाहीची स्थापना ही त्यांचीच एक महत्त्वाची शिकवण. धर्मप्रसार करताना सलग तेरा वर्षे अत्यंतिक विरोध झाल्याने पैगंबर (स.) यांना मक्का सोडून मदीनेत आश्रय घ्यावा लागला होता. कुरैशचे कुटुंबिय त्यांचे कडवे विरोधक होते. त्यांनी मदीनेवरही हल्ले केले. एका संघर्षात पैगंबरांचे चुलते मारले गेल्यावर कुरैश कुटुंबाने मृतदेहाचे अक्षरशः धिंडवडे काढले. पुढे मक्केवर विजय मिळविल्यानंतर पैगंबर (स.) यांनी शत्रुत्वाचे पीळ लगेच पुसले. आत्यंतिक वैरत्व बाळगलेल्या कुरैश लोकांना त्यांनी उदार अंतःकरणाने क्षमा केली आणि माणुसकीचा पंथ प्रशस्त केला. पैगंबर (स.) आणि इस्लामला समजून घेण्यासाठी कोंडीचे नव्हे तर संवादाचे दालन खुले झाले, तर कोलाहल कमी होईल आणि विश्‍वगुरुला समजणे सोपे जाईल.

मानवी समस्यांचा, दुराचारांचा व अत्याचारांचा जो अंधार जगात पसरलेला आहे तो सदाचाराच्या प्रकाशानेच दूर होऊ शकतो. यासाठी सदाचारामागे मनुष्याचा कोणता भाव कार्यरत आहे, हे देखील महत्त्वाचं आहे. उदात्त भावनेने केलेल्या सदाचाराच्या प्रकाशानेच मानवी समस्यांचा अंधकार कायमचा दूर होऊ शकतो. 

आजपासून चौदाशे वर्षांपूर्वी पैगंबर (स.) यांनी समाज प्रबोधनाचा प्रकाश पसरवून जगाचा अंधकार दूर केला होता. एकेश्‍वरत्व, पैगंबरत्व व परलोकत्व या तत्त्वांची शिकवण देणारा अंतिम ईशग्रंथ कुरआनचं दिव्य अवतरण पैगंबर (स.) यांच्यावर सृष्टीनिर्मात्याकडून झाले. याच ग्रंथाचा प्रकाश पैगंबर (स.) व त्यांच्या अनुयायींनी घराघरांत देऊन एका आदर्श समाजाची निर्मिती केली होती. तीच क्रांती आजही जगात होणे शक्य आहे. आजही तीच शिकवण प्रत्येकाच्या अंधारलेल्या जीवनात पुन्हा प्रकाश आणू शकते. प्रेम, दया, करुणासागर पैगंबर (स.) यांच्या पवित्र जीवनाचे अध्ययन करून त्यांच्या शिकवणीनुसार जीवन साकारणे हाच एकमेव मार्ग त्यासाठी आहे.

समस्त मानवजातीला तेजाकडे आणणे म्हणजे निर्मिकाच्या निर्देशाकडे, जगात मनुष्याच्या वैयक्तिक व सामाजिक भल्यासाठी व परलोकात मुक्तीसाठी आवाहन करणे आहे. ही जीवनव्यवस्था आहे जिचे नाव कुरआनमध्ये इस्लाम ठेवण्यात आले आहे. जगात इस्लामच ती एकमेव जीवनव्यवस्था आहे जी मानवतेच्या अंतापर्यंत मानवतेला निर्देशित व मार्गदर्शन करणारी व जीवन सफलतेसाठी प्रकाश आहे. समस्त मानवतेला अज्ञानाच्या तिमिराकडून इस्लामच्या तेजाकडे येण्याचे आवाहन करणे आहे. तिमिराकडून तेजाकडे प्रवास करण्यासाठी मार्गस्थ होण्यासाठी आपल्याला अधिक माणूस व्हावे लागेल. खरोखरच आपण दिवसेंदिवस सुसंस्कृत होत चाललो आहोत का? अमानुष हिंसाचाराने सुबुद्ध, सचेत विश्‍वाला आतून छळण्याचे काम सुरू असताना सुसंस्काराचा दावा फोल तर ठरत नाही ना, ही शंका यायला लागली आहे, कारण वर्तमान तसे आहे. तिमिराकडून तेजाकडे प्रवास करण्यासाठी माणसांना माणसाने माणसासारखेच वागवावे लागेल. तिमिरातून तेजाकडेच्या प्रवासाला कोविड-19 मुळे एका अर्थाने आपण सर्वांनीच सुरूवात केली आहे.

तुमच्यापाशी अल्लाहकडून प्रकाश आणि एक असा सत्यदर्शी ग्रंथ आला आहे, ज्याच्याद्वारे सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या लोकांना जे त्याच्या प्रसन्नतेचे इच्छुक आहेत, शांती व सुरक्षिततेच्या पद्धती दाखवितो आणि आपल्या आदेशाने त्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणतो आणि सरळमार्गाकडे त्यांचे मार्गदर्शन करतो. (कुरआन, 5:16)

अल्लाह पृथ्वीचा व आकाशांचा प्रकाश आहे. काळोखाने घेरलेल्या लोकांनो! धाव घ्या त्या अल्लाहकडे जो सर्व विश्‍वांचा निर्मिक, मालक, पालक व शासक आहे. 


-


प्रा. अब्दुर रहेमान शेख

मो. 8888834519 

लेखक कुरआनचे अभ्यासक व अनुवादक आहेत. 


Quran

इस्लामपूर्व काळाला इस्लामी परिभाषेत ‘अज्ञानकाळ’ संबोधले जाते. या अज्ञानकाळातील रानटीपणा, पाश्‍वीपणा, अत्याचार, अन्याय अशा सर्व प्रकारच्या असंस्कृत विचारवर्तनांचे व अराजकतेचे तसेच सर्व दुर्गुणांचे प्रतिनिधित्व जणू अरबस्तानच्या वाट्याला आलेले होते. अशा या भयानक काळोखात अल्लाहने प्रेषितत्वाच्या शृंखलेतील अंतिम प्रेषित म्हणून आदरणीय मुहम्मद (स.) यांना पाठवले. ज्यामुळे अरब महाद्विपकल्पच नव्हे तर संपूर्ण जग इस्लामच्या महान शिकवणीने उजळून निघाले. याविषयी पवित्र कुरआनमध्ये अल्लाहचे फर्मान आहे,“तुमच्यासाठी अल्लाहकडून प्रकाश आणि एक असा सत्यदर्शी ग्रंथ (कुरआन) आला आहे ज्याच्याद्वारे सर्वश्रेष्ठ अल्लाह त्या लोकांना जे त्याच्या प्रसन्नतेचे इच्छुक आहेत, शांती व सुरक्षिततेच्या पद्धती दर्शवितो आणि आपल्या आदेशाने त्यांना अंधारातून बाहेर काढून प्रकाशाकडे आणतो आणि सरळमार्गाकडे त्यांचे मार्गदर्शन करतो. (सूरह अल् माइदा- 9-16)

आज निर्विवादपणे सिद्ध झाले आहे की या जगात इस्लामव्यतिरिक्त कुणाकडेही एक न्यायोचित जीवनधारा नाही, ना असा सत्यदर्शी ग्रंथ आहे जो त्यांच्या आयुष्यात क्रांतीकारक परिवर्तन घडवून आणील, ना शांती-सुरक्षिततेच्या प्रभावी व प्रबळ पद्धती आहेत ज्यामुळे ते इहलोक व परलोकात अभय प्राप्त करू शकतील, ना काळोखात खितपत पडलेल्या लाखो माणसांसाठी आशेचा असा एक प्रकाश किरण आहे की जेणेकरून त्यांचे जीवन सार्थकी लागावे. आज इस्लाम सर्व जीवनपद्धतींना पुरून उरला आहे. या संदर्भात अल्लाह म्हणतो, म्हणून जे लोक या प्रेषितावर (स.) ईमान राखतात आणि त्याचे समर्थन करतात आणि त्याला मदत करतात आणि त्या नूर (प्रकाश अर्थात कुरआन) चे अनुसरण करतात जो त्याच्यासमवेत पाठविण्यात आला आहे, असेच लोक परिपूर्ण साफल्य प्राप्त करणारे आहेत. (सूरह अल् आराफ - 157)

या आयतीच्या अंतिम शब्दांनी स्पष्ट होते की यशस्वी तर तेच लोक आहेत जे महान अंतिम प्रेषित मुहम्मद (स.) वर विश्‍वास ठेवतील आणि त्यांचे अनुसरण करतील. जे लोक प्रेषित मुहम्मद (स.) आणि त्यांच्या प्रेषितत्वाला दुर्लक्ष करतील ते अपयशी लोक आहेत आणि परलोकात सुद्धा लानीच भोगणारे आहेत, मग भलेही त्यांनी या नश्‍वर जगात कितीही भैतिक प्रगती साधलेली का न असो! त्याचप्रमाणे या आयतीत  आणि त्या नूरचे अनुसरण करतात असे शब्द आले आहेत. काही लोकांच्या मते ‘नूर’ने अभिप्रेत प्रेषित मुहम्मद (स.) आहेत. परंतु येथे आयतीनेच स्पष्ट होते की ‘नूर’ (प्रकाश) ने अभिप्रेत पवित्र कुरआन आहे, कारण आयतीत पुढे आले आहे की हे नूर त्याच्या (म्हणजे प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या समवेत पाठविण्यात आले आहे. परंतु ही वेगळी गोष्ट आहे की प्रेषित मुहम्मद (स.) यांच्या अनेक विशेषनामांत एक विशेषण ‘नूर’ सुद्धा आहे, ज्यामुळे ‘कुफ्र’ (इस्लामचा नकार) आणि ‘शिर्क’ (अनेकेश्‍वरवाद) चा अंधकार लोप पावला आणि इस्लामचा प्रकाश विस्तारला. या दृष्टिकोनातून अंति प्रेषितांच्या व्यक्तिमत्त्वात व गुणवैशिष्ट्यांत ‘नूर’चा जो स्वाभाविक गुणधर्म आहे ती एक उपमा आहे, तो प्रेषित मुहम्मद (स.) यांचा शारीरिक गुणधर्म नव्हे, जसे की प्रेषित मुहम्मद (स.) यांना पवित्र कुरआनमध्ये ‘सिराजूम्मूनिश’ (तेजस्वी दीपक) अशा उपमेने सुद्धा अलंकृत करण्यात आलेले आहे. 

सरतेशेवटी एका मनुष्याला जर मान-सन्मानाचे, सुख-समाधानाचे आणि चिंतारहीत आयुष्य व्यतीत करावयाचे असेल तर त्याला इस्लामवर ईमान पत्करल्याशिवाय अन्य पर्याय नाही. म्हणून पवित्र कुरआनची कळकळीची हाक आहे,

तर ईमान राखा अल्लाहवर आणि त्याच्या प्रेषितावर (स.) आणि त्या प्रकाशा (कुरआन) वर जो आम्ही उतरविला आहे. (सूरह अत्तगाबून-8)



- निसार मोमीन पुणे

मो. : 9763810609


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget