Halloween Costume ideas 2015
Latest Post


तुम्हाला आता जे धान्य रेशन दुकानातून मिळत आहे ते 2017 पूर्वी मिळत होते काय? तेव्हा तर ते, ’अब्बाजान’ म्हणविणारे फस्त करत होते.’’ फ्रान्स पेक्षा मोठे क्षेत्रफळ असलेल्या उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्याचे हे विधान कुठल्याही दृष्टीने लोकशाही अनुरूप आहे असे म्हणता येणार नाही. या वाक्यामधून योगी आदित्यनाथ यांच्या मनामध्ये मुस्लिम समुदायाबद्दल घृणा किती ठासून भरलेली आहे याचा सहज अंदाज येतो. जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या आपल्या देशात घटनात्मक पदावर विराजमान या व्यक्तीचे हे सार्वजनिकरित्या केलेले कथन लोकप्रियता मिळवून जाते. 

कारण बहुसंख्यांकांच्या मते योगी हे प्रखर राष्ट्रवादी आहेत व त्यांचे प्रत्येक विधान राष्ट्राच्या हितासाठीच असते. मुस्लिमांविषयी योगींनी यापेक्षाही अधिक आक्षेपार्ह विधाने भूतकाळात केलेली आहेत. त्यांच्यावर दाखल फौजदारी गुन्हे मुख्यमंत्री झाल्यावर त्यांनी स्वतः कोर्टातून माघारी घेऊन नैसर्गिक न्याय तत्त्वाचे हनन केलेले आहे. परंतु त्यांची ही विधानं आणि कोर्टातून फौजदारी गुन्हे मागे घेण्याची कृती ही राष्ट्रवादाच्या मुलाम्याखाली सपादून जाते. भाजपचे हेच वैशिष्ट्ये आहे की ते आपल्या सांप्रदायिक राजकारणाला राष्ट्रवादाची फोडणी देतात, म्हणून तिच्याबद्दल कोणीही आक्षेप घेत नाही, कोर्टसुद्धा नाही. 

दूसरे विधान प्रसिद्ध सिनेअभिनेता नसरूद्दीन शहा यांचे आहे. तालीबानची अफगानिस्तानमध्ये सत्ता आल्यानंतर बोटावर मोजता येतील एवढ्या भारतीय मुस्लिमांनी आनंद व्यक्त केला होता. त्यासंदर्भात शहा यांनी आपले मत मांडतांना (त्या) अपवादात्मक मुस्लिमांच्या प्रतिक्रियांसोबतच सर्व भारतीय मुस्लिमांना उद्देशून विधान केले की, ’’भारतीय मुस्लिमांनी तालीबानच्या क्रूर राजवटीचे समर्थन करू नये. भारतीय इस्लाम पेक्षा तालीबानचा इस्लाम वेगळा आहे, मध्ययुगीन आहे, बर्बरतापूर्ण आहे.’’ शहा यांनी एका झटक्यात समस्त भारतीय मुस्लिम समाजाला तालीबान समर्थक ठरवून टाकले. आसामच्या ज्या 14 तरूणांनी तालीबानच्या समर्थनात समाज माध्यमांवर आपले मत प्रदर्शन केले होते त्यांच्याविरूद्ध युएपीए सारख्या -(आतील पान 2 वर)

कठोर कायद्याअंतर्गत कारवाई झाली, स.पा.चे खा. शफिकुर्रहमान बर्क आणि प्रसिद्ध उर्दू शायर मुनव्वर राणा यांच्याविरूद्ध सुद्धा देशद्रोही वक्तव्य केल्याबद्दल एफआयआर दाखल झाले, याकडे नसिरूद्दीन शहा यांनी सपशेल दुर्लक्ष केले व समस्त भारतीय मुस्लिम समाजाला हिंदू बांधवांच्या नजरेमध्ये शंकास्पद बनवून टाकले. शहा यांचा इस्लामी आचरणाशी दुरान्वयेही संबंध नसतांना त्यांनी भारतीय मुस्लिम समाजाला ज्ञान देण्याचा जो प्रयत्न केला तो बहुसंख्यवादाच्या दबावातून दिला यात शंंका नाही. 

तिसरे उदाहरण जावेद अख्तर या घोषित नास्तीक कविचे आहे. बॉलीवुडमध्ये आपल्या लेखन आणि काव्याच्या माध्यमातून एक वेगळा ठसा उमटविणारे जावेद अख्तर यांनी भावनेच्या भरात तालीबानची तुलना संघाच्या स्वयंसेवकांशी करून टाकली. त्यानंतर माध्यमामधून जो गदारोळ झाला त्याला नियंत्रित करण्यासाठी जावेद यांना तात्काळ डॅमेज कंट्रोल करत दैनिक सामनामधून लेख लिहून स्पष्टीकरण द्यावे लागले की, त्यांच्या म्हणण्याचा विपर्यस्त केला गेला आहे. वास्तविक पाहता भारतातील बहुसंख्य हिंदू समाज हा जगातील सर्वात मोठा सहिष्णू समाज आहे. नास्तिकतेची घोषणा करूनही केवळ नाव मुस्लिमसदृश्य असल्यामुळे त्यांना हा सगळा द्रविडी प्राणायाम करावा लागला. त्यांच्या मनातील ही भीती बहुसंख्यांकांच्या लेखी आपण राष्ट्रविरोधी समजले जाऊ नये या भावनेतून निर्माण झाली आहे, हे स्पष्ट आहे. 

चौथे उदाहरण कंगणा रानावतचे आहे. मागच्याच वर्षी बॉलीवुडच्या नेपोटिझम (भाई-भतीजा वाद) वर मुखरपणे बोलल्यामुळे ती अचानक प्रकाशझोतात आली. तिने म्हटले की, ’’मुंबईत मला पाकव्याप्त कश्मीरसारखी परिस्थिती वाटत आहे.’’ तिने पुढे असेही म्हटले होते की, तिला मुंबई पोलिसांची भीती वाटते. महाराष्ट्र पोलीस, त्यातल्या त्यात मुंबई पोलिसांचा लौकिक, सचोटी, राष्ट्रनिष्ठा आणि धर्मनिरपेक्ष मुल्यांविषयींचे (त्यांचे) समर्पण हे जरी वादातीत नसले तरी इतर राज्यांच्या पोलीस दलाच्या तुलनेत उजवे आहे, एवढे नक्की. असे असतांना मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी करणे आणि मुंबई पोलिसांबद्दल भीती व्यक्त करणे हे सरळ-सरळ राष्ट्रद्रोही या श्रेणीत मोडणारे वक्तव्य होते. असे असतांना सुद्धा केवळ राज्यसरकारशी असलेल्या विरोधातून भाजपने तिची पाठराखन तर केलीच उलट केंद्र सरकारने तिला वाय दर्जाची सुरक्षा पुरवून आपल्याला न आवडणाऱ्या राज्यसरकारांच्या विरूद्ध आपण कुठल्या स्तरापर्यंत जाऊ शकतो याची देशाला प्रचिती करून दिली. 

भाजपचा राष्ट्रवाद या ठिकाणी सपशेल पराभूत झाला. कुठलेही विधान कोण करतय? त्याचा धर्म कोणता? यावरून ते चांगले का वाईट हे ठरविण्याचा प्रकार अलिकडे सुरू झालेला आहे. एकीकडे कंगना रानावतची पाठराखण केली गेली तर दूसरीकडे ’’आपली पत्नी किरण राव हिला आपल्या देशातील परिस्थितीची भीती वाटत असून, दुसऱ्या देशात जाऊन राहवेसे वाटते’’ असे आमीर खानने म्हटल्याबरोबर केवढा गहजब माजला होता हे वाचक विसरलेले नसतील. वक्तव्य किरण रावचे असतांना ट्रोल मात्र आमीर खान झाला होता. हे खऱ्या-खुऱ्या राष्ट्रवादाचे नव्हे तर छद्म राष्ट्रवादाचे उत्कृष्ट उदाहरण आहे. अलिकडे एकाच वर्गातील एकाच प्रकारच्या वक्तव्याचे सोयीने दोन अर्थ काढले जात आहेत. 

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची साधार भीती समोर उभी टाकलेली असतांना, अफगानिस्तानातील 300 कोटीची गुंतवणूक पाण्यात गेलेली असतांना, चीन दाराच्या आत येवून उभा राहिलेला असतांना देशात एकोप्याची गरज असतांनासुद्धा असे मतभेद देश हिताचे नाहीत एवढी शालेय स्तरीय समजसुद्धा अलिकडे सत्ताधारी पक्ष विसरून गेलेला आहे, ही आश्चर्याची बाब आहे. 

विशेष म्हणजे भारतीय मुस्लिमांच्या बाबतीत जी कृत्रिम घृणा पसरविली जात आहे तिचा कडेलोट होण्यास सुरूवात झाली असून, दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील पसरत चाललेल्या किसान आंदोलनामध्ये जाट आणि मुस्लिम यांच्यातील सामंजस्य आकार घेत असल्याचे दिसत आहे. टिकैत यांच्या उत्तर प्रदेशातील सभेत ’अल्लाहु अकबर’ आणि त्या प्रत्युत्तरादाखल ’हर-हर महादेव’ सारख्या घोषणा सौहार्दपूर्ण वातावरणात झाल्यामुळे हिंदू-मुस्लिम सौहार्द निर्माण होतांना दिसत आहे. भारतीय मुस्लिमांच्या सचोटीबद्दल संशय घेणारे योगींचे विधान असो की शहांचे, भारतीय मुस्लिमांची निष्ठा नेहमीच वादातीत राहिलेली आहे, ही गोष्ट सामान्य हिंदू बांधवांना सुद्धा माहिती आहे. एवढेच नव्हे तर भारतीय मुस्लिमांच्या संबंधात बोलतांना दस्तुरखुद्द बराक ओबामा यांनी डिसेंबर 2017 मध्ये इंडिया टुडे एन््नलेव्हमध्ये भाषण दिल्यानंतर प्रधानमंत्री मोदींना व्यक्तीगतरित्या सांगितले होते की, ‘ऋेी र र्लेीपीीूं श्रळज्ञश खपवळरुहशीशींहशीश ळी र र्चीीश्रळा िेिर्ीश्ररींळेपींहरीं ळीीर्ीललशीीर्षीश्र, ळपींशसीरींशव रपव लेपीळवशीी ळीींशश्रष री खपवळरप -ुहळलह ळी पेीींंहश लरीश ळपीोशेींहशी र्लेीपीींळशी,ींहळीीर्हेीश्रव लश र्पेीीळीहशव रपव र्लीश्रींर्ळींरींशव,‘ (ढहश षेीाशी णड झीशीळवशपीं इरीरज्ञ जलरारीरळव. ऊशलशालशी 2017 ळप पशु वशश्रहळ.) ओबामांनी मोदींना म्हटले होते की, ’’ भारतासारख्या बहुमुखी समाजामध्ये मुस्लिम समाज हा यशस्वी समाज आहे. तो भारताशी समरस झालेला असून, स्वतःला भारतीय समजतो. याउलट अनेक देशांमध्ये अशी परिस्थिती नाही. म्हणून भारत सरकारने (मुस्लिम समाजाच्या समरसतेची) ही गोष्ट फक्त जपावीच असे नाही तर त्याचे संवर्धनही करावे.’’ ओबामांचे हे वाक्य मुस्लिमांच्या राष्ट्रनिष्ठेवर आंतरराष्ट्रीय मान्यतेची मोहर उठविणारे आहे. त्यांचे हे वक्तव्य आजही इंटरनेटवर उपलब्ध आहे. ज्यांना शंका असेल त्यांनी तपासून घ्यावे. 

दूसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे भारतीय हिंदू समाजाला सहिष्णूतेचे प्रमाणपत्र जावेद अख्तर यांचेकडून घेण्याची गरज नाही. हा समाज बाय डिफॉल्ट सहिष्णू आहे. शेकडो वर्षांच्या त्यांच्या सहवासात राहून मुस्लिम समाज सुद्धा जगातील इतर मुस्लिम समाजाच्या तुलनेत जास्त सहिष्णू बनलेला आहे. यातून भारतात राहणाऱ्या हिंदू-मुस्लिमांमध्ये एक नैसर्गिक सौहार्दाची भावना खोलपर्यंत रूजलेली आहे. याचा अनुभव दररोज व्यवहारातून येत असतो. विशेषतः जातीय दंगलींच्या काळात या दोन्ही समाजातील अनेक लोक एकमेकांच्या रक्षणार्थ नेहमी पुढे येतात व जोखीम पत्करून एकमेकांचे रक्षण करतात, याचे अनेक दाखले इतिहासात उपलब्ध आहेत. खरे तर भारत केवळ घटनात्मक तरतुदींमुळे धर्मनिरपेक्ष राष्ट्र आहे असे नाही तर सनातन हिंदू धर्मातील सहिष्णूतेच्या भावनेमुळे धर्मनिरपेक्ष आहे. असे असले तरी अलिकडे अल्पसंख्यांकांचा दुस्वास करणाऱ्यांची संख्या लक्षणीयरित्या वाढत आहे. ही सुद्धा एक अशी वस्तुस्थिती आहे जिला नाकारता येणे शक्य नाही. परंतु या वाढत्या घृणेचे कारण हिंदू समाजामध्ये सहिष्णूता कमी होत आहे हे नसून वाढत्या राजकारणामुळे असे होत आहे, असे मानण्यास ठोस पुरावा उपलब्ध आहे. विकिलिक्सने केलेल्या एका रहस्य उद्घाटनातून ही बाब समोर आलेली आहे. या संदर्भात तपशील असा की, भाजप नेते अरूण जेटली यांनी अमेरिकेच्या भारतीय प्रतिनिधी रॉबर्ट ब्लॅक यांच्याशी हिंदूत्वाच्या मुद्यावर बोलतांना असे म्हटले होते की, ’’ हिंदू राष्ट्रीयता ही आमच्यासाठी केवळ सत्ता मिळविण्याची संधी आहे.’’ रॉबर्ट ब्लॅकने जेटलींच्या या विधानाचा उल्लेख अमेरिकन सरकारला 6 मे 2005 रोजी पाठविलेल्या आपल्या अहवालात केला होता. ही माहिती सुद्धा इंटरनेटवर उपलब्ध आहे. यावरून भाजपचे खरे लक्ष्य सत्ता असून, सत्तेच्या सोपानावर चढण्यापुरता भाजपा ही राष्ट्रवादाचा आधार घेते हे चाण्नक्ष वाचकांच्या लक्षात येईल.

भाजपाने जाणून बुजून सत्ता मिळविण्यासाठी व टिकविण्यासाठी मुस्लिमांविरूद्ध आक्रमक भूमिका घेतली आहे. मात्र यात भावनेच्या आहारी जाऊन हिंदू समाजाने केंद्र सरकारला, ’’पवित्र गाय’’ समजण्याची चूक केली आहे, हे आता हिंदू नागरिकांनाही कळून चुकलेले आहे. या भावनेचा आविष्कार 17 सप्टेंबर रोजी पंतप्रधान मोदी यांच्या जन्मदिवशी समाज माध्यमांवर पहावयास मिळोला आहे. मोदींच्या अभिष्टचिंतन करणाऱ्यांपेक्षा त्यांच्यावर टिका करणाऱ्यांची व तो दिवस बेरोजगार दिवस म्हणून उघडपणे साजरा करण्याची हिम्मत लाखो तरूणांनी दाखविली आहे. आता फार काळ आपण ’अब्बाजान- तालीबान’ असे नारे देऊन हिंदू समाजाला मूर्ख बनवू शकत नाही, हे एव्हाना भाजपच्या लक्षात आलेच असेल. 

मुस्लिमांनीही भाजपच्या धोरणाचा विरोध करतांना एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी की, भाजपच्या सात वर्षाच्या शासन काळात एकही बॉम्बस्फोट झालेला नाही, त्यामुळे मोठ्या प्रमाणात मुस्लिम तरूणांची रवानगी तुरूंगात झालेली नाही, दिल्ली वगळता देशात इतरत्र दंगल झालेली नाही. या सात वर्षाच्या शासन काळाची तुलना काँग्रेसच्या कुठल्याही सात वर्षाच्या शासन काळाशी केली असता तुलनेने भाजपच्या काळातील नुकसान कमी आहे, हे मुस्लिमांना नाकारता न येण्यासारखे सत्य आहे. 

भारतीय लोकशाहीची एक शोकांतिका अशी आहे की, इतर समाज स्वतःच्या विकासाला नजरेसमोर ठेऊन मतदान करतात, या उलट मुस्लिम समाज आपल्या सुरक्षेला नजरेसमोर ठेऊन मतदान करतो. राष्ट्रीय भावनेचा दुरूपयोग कम्युनिस्ट वगळता सर्वच पक्षांनी केलेला आहे. मुस्लिमांना बहुसंख्य हिंदू समाजाकडून भविष्यात त्रास होईल, अशी भीती स्वातंत्र्य नजरेच्या टप्प्यात येताच अनेकांकडून व्यक्त केली गेली होती. फाळणीमुळे ती भीती काही अंशी खरी देखील ठरली होती. परंतु मौलाना अबुल कलाम आझाद आणि त्यांना नेता मानणारा मुस्लिम समाजातील एक मोठा वर्ग तसेच दारूल उलूम देवबंदच्या उलेमांना एकूणच हिंदू समाजाच्या सहिष्णू वृत्तीवर जास्त विश्वास होता. म्हणून या दोन्ही संस्थांनी फाळणीचा शेवटपर्यंत सर्वशक्तीनिशी विरोध केला होता, हे सत्य नाकारता येण्यासारखे नाही. 

आजही या दोन प्रमुख धार्मिक समुहांमधील दैनंदिन व्यवहार हे सामंजस्याचेच आहेत. या सर्व विवेचनावरून एक गोष्ट स्पष्ट होते की, राष्ट्रीयत्वाची भावना ही दोन्हीकडून चालविल्या जावू शकणाऱ्या तलवारीसारखी असते. खरे तर राष्ट्रवादाची भावना ही कृत्रिम असून, विश्वबंधुत्वासाठी घातक आहे. म्हणून इस्लाममध्ये राष्ट्रीयत्वाला फारसे महत्त्व नाही. खरे तर ईश्वराच्या या पृथ्वीवर माणसाला मुक्तपणे कुठेही संचार करण्याचा अधिकार असावा. कृत्रिम राष्ट्रवादाने तो हिरावून घेतलेला आहे. राष्ट्रवादाची भावना जरी एक महान भावना असली तरी त्या भावनेच्या वाजवीपेक्षा जास्त आहारी गेल्यास त्यातून समाजामध्ये संकुचितपणाची भावना वाढीस लागते आणि याच संकुचित पणातून आपल्याच देशाच्या नागरिकांना एकमेकाचे वैरी बनविण्यापर्यंत ती घेऊन जाते. राष्ट्रवादाच्या गर्भातूनच प्रादेशिकवाद, भाषावाद आणि इतर संकुचित विचारांची पैदास होते. कावेरी जलविवादामध्ये कर्नाटक आणि तामिळनाडू तर बेळगाव सीमावादामध्ये महाराष्ट्र आणि कर्नाटकातील लोक, भारतीय असूनसुद्धा एकमेकांचे हाडवैरी असल्यासारखे वागतांना दिसून येतात. या ठिकाणी राष्ट्रवादाची भावना काम करतांना दिसत नाही. अनेकवेळा मी अमूक राज्याचा, अमूक जिल्ह्याचा, अमूक गावचा आणि अमूक गल्लीचा इथपर्यंत राष्ट्रवादाचे स्खलन होत जाते. हाच राष्ट्रवाद इतर राष्ट्रांच्या चांगल्या गोष्टींचा द्वेष करायला शिकवितो. एका मर्यादित स्तरापर्यंत राष्ट्रवादाची भावना नियंत्रित ठेवायला हवी. तिचा अमर्याद विस्तार होणार नाही, याची दक्षता घ्यायला हवी. याचा धडा वसुधैव कुटुंबकम या सनातन संकल्पनेतून मिळतो. जिच्याकडे अलिकडे दुर्लक्ष होत आहे. याच भावनेची अभिव्यक्ती कुरआनमध्ये खालीलप्रमाणे करण्यात आलेली आहे. 

’’लोकहो, आम्ही तुम्हाला एका पुरुष व एका स्त्रीपासून निर्माण केले आणि मग तुमची राष्ट्रे आणि वंश बनविले जेणेकरून तुम्ही एकमेकांना ओळखावे. वास्तविकतः अल्लाहजवळ तुमच्यापैकी सर्वात जास्त प्रतिष्ठित तो आहे जो तुमच्यापैकी सर्वात जास्त ईशपरायण आहे. निश्चितच अल्लाह सर्वकाही जाणणारा आणि खबर राखणारा आहे.’’  (सुरे अलहुजरात आयत नं.13)

कुरआनमधील सिद्धांत सुद्धा जागतिक मानवकल्याणाचा सिद्धांत आहे. एकंदरित सनातन हिंदू धर्माच्या वसुधैव कुटुंबकम या तत्वाला डोळ्यासमोर ठेवून हिंदूंनी व सुरे हुजरातची वर नमूद  आयत क्रमांक 13 मध्ये फरमाविलेल्या तत्वाला मुस्लिमांनी डोळ्यासमोर ठेऊन एकमेकांच्या सहकार्याने देशाचा विकास केला तरच भारताचे भविष्य उज्ज्वल होईल. त्याशिवाय चीनी ड्रॅगनचा सामना करणे शक्य होणार नाही. जय हिंद ! 

- एम.आय.शेख


उत्तर प्रदेश निवडणुकीच्या तोंडावर कारवाई : विविध सामाजिक, धार्मिक संघटना, राजकीय पक्षांचा योगी सरकावर आरोप

maulana kaleem siddiqui

उत्तर प्रदेशमध्ये मंगळवार, 21 सप्टेंबर रोजी प्रसिद्ध आलीमे दीन मौलाना कलीम सिद्दीकी यांना अवैध धर्मांतरण प्रकरणात मेरठमधून अटक करण्यात आली. एटीएसने त्यांच्यावर लोकांना लालूच देवून धर्मांतरणासाठी प्रवृत्त करण्याचा आरोप लावला आहे. याशिवाय ते स्वतः ट्रस्ट चालवून अनेक मदरश्यांना आर्थिक मदत करत होते, असाही त्यांच्यावर आरोप लावण्यात आला आहे. त्यांच्यावर लावलेले आरोप बिनबुडाचे आणि उत्तर प्रदेश निवडणुकांमध्ये भाजपाला फायदा होईल, या उद्देशाने मौलानांना अटक केली असल्याचा आरोप विविध सामाजिक, धार्मिक संघटना व राजकीय पक्षांनी लावला आहे. 

एटीएसचे असेही म्हणणे आहे की, मौलाना कलीम सिद्दीकी यांनी विदेशातून मोठ्या रकमा हवाला आणि इतर अवैध मार्गाने मिळत होत्या. एटीएसने सांगितले की, कलीम सिद्दीकी यांच्या खात्यात आजमितीला दीड कोटी रूपये बहरीनमधून आल्याची नोंद आहे. त्यांच्या अकाउंटमध्ये एकूण तीन कोटी रूपये होते. एटीएसने असाही आरोप लावला आहे की, मौलाना उमर गौतम यांच्याकडून मिळविण्यात आलेल्या दस्ताऐवजामध्ये ज्या लोकांच्या धर्मांतरासंबंधीची माहिती मिळाली होती, त्यांचा जवळचा संबंध मौलाना कलीम सिद्दीकी यांच्याबरोबर होता. 

उत्तर प्रदेश एटीएसने पत्रकार परिषद घेऊन मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर असा आरोप केला की, राष्ट्रीय पातळीवर त्यांचे अवैध धर्मांतराचे काम असून, ते वेगवेगळ्या शैक्षणिक, सामाजिक आणि धार्मिक संस्थांच्या पडद्यामागे धर्मांतराचे काम करत असतात. यासाठी त्यांना विदेशातून मदत मिळते. त्यांचे काम अतिशय सुनियोजित पद्धतीने संघठितपणे चालते. ते भारताचा सर्वात मोठा धर्मांतर सिंडीकेट संचालित करतात. बिगर मुस्लिमांची दिशाभूल करून प्रसंगी भीती दाखवून तसेच आर्थिक लालूच दाखवून ते गरीबांना धर्मांतरासाठी प्रेरित करत असतात. युट्यूब मार्फतही त्यांचा हा प्रचार जोरात सुरू आहे. 

कायदा व सुव्यवस्था प्रशांतकुमार यांनी प्रेस कॉन्फरन्समध्ये अशी माहिती दिली की, आतापर्यंत दहा आरोपींना अटक करण्यात आलेली आहे. ज्यापैकी सहांच्या विरूद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे. चार लोकांच्या विरूद्ध चौकशी चालू आहे. यापूर्वी 20 जून 2021 ला अवैध धर्मांतरांचे रॅकेट चालविणाऱ्यांना अटक करण्यात आलेली होती. ज्यांना ब्रिटनमधील अनेक धार्मिक संघटनांकडून 57 कोटी रूपयांची फंडिंग केली गेली होती. या रकमेच्या खर्चाचा तपशील आरोपींना देता आलेला नाही. 

मौलाना कलीम सिद्दीकी हे उत्तर प्रदेशच्या खतोली क्षेत्रातील फुलत गावाचे रहिवाशी आहेत. -(आतील पान 7 वर)

 ते ग्लोबल पीस सेंटरचे अध्यक्ष आहेत. शिवाय, जमियते वलीउल्लाह या धार्मिक संघटनेचेही अध्यक्ष आहेत. ते अनेक मदरशांचे प्रभारी आहेत. शिक्षणाच्या क्षेत्रात भरीव कामगिरी केल्यामुळे त्यांची देश आणि विदेशामध्ये चांगली ओळख आहे. त्यांची गणती देशाच्या मोठ्या इस्लामिक विद्वानांमध्ये होते. प्रसिद्ध बॉलिवुड अभिनेत्री सना खानचा निकाह ही त्यांनीच पढविला होता. अगदी अलिकडे मौलाना कलीम सिद्दीकी यांची संघप्रमुख मोहन भागवत यांच्याशी संघाद्वारे आयोजित राष्ट्रप्रथम राष्ट्र सर्वपरी या कार्यक्रमांमध्ये भेट झाली होती. 

मौलानांच्या या अटकेनंतर अनेक लोकांनी ही कारवाई उत्तर प्रदेशाच्या आगामी निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून करण्यात आली असल्याचा आरोप केलेला आहे. सहारनपूरचे बसपाचे खा. हाजी फजलुर्रहेमान यांनी सांगितले की, मौलाना कलीम सिद्दीकी यांची अटक उत्तर प्रदेश भाजपा सरकारचा निवडणूक जिंकण्याचा एक हतकंडा आहे. उत्तर प्रदेशाची जनता या सरकारच्या कामाविषयी नाराज असून, त्यामुळे चिंतेत असलेल्या भाजपाने राज्यामध्ये दहशत पसरविण्यास सुरूवात केलेली आहे. ती समाजामध्ये विघटन करून निवडणूक जिंकू इच्छिते. त्यांनी या घृणेच्या कृतीचा निषेध करून मौलाना कलीम सिद्दीकी यांना तात्काळ सोडण्याची मागणी केली. दरम्यान, बुधवारी कलीम सिद्दीकी यांना कोर्टासमोर उभे करून एटीएसनी त्यांची पोलीस कोठडी मागितली होती, परंतु कोर्टाने ती दिली नसल्याची माहिती पुढे आली आहे. 

आम आदमी पार्टीचे आ. अमानुल्लाह खान यांनी उत्तर प्रदेश सरकारवर असा आरोप केलेला आहे की, योगी सरकार मुस्लिमांवर अत्याचार करत आहे. कलीम सिद्दीकी यांची अटक त्या अत्याचाराचाच एक भाग आहे.  विशेष म्हणजे, काँग्रेस आणि इतर धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या पक्षांनी हा अहवाल लिहिपर्यंत तरी या अटकेसंबंधी कुठलीच प्रतिक्रिया दिलेली नव्हती. ही बाब लक्षणीय आहे. 

आंतरधार्मिक संवाद कुठलाही अपराध नाही

मौलाना कलीम सिद्दीकी यांना सोडण्याची मागणी : एसआयओ

प्रसिद्ध इस्लामी विद्वान मौलाना कलीम सिद्दीकी आणि त्यांच्या साथीदारांची अटक करून सत्तारूढ हिंदुत्ववादी शक्तींद्वारा आंतरधार्मिक संवादांवर प्रतिबंध लावण्याचा आणि उत्तर प्रदेश निवडणुकांअगोदर सांप्रदायिक भेदभाव निर्माण करण्याचा एक चुकीचा प्रयत्न असल्याचे एसआयओचे म्हणणे आहे. मौलाना कलीम सिद्दीकी यांना भारत देशात विभिन्न धर्मांतील लोकांकडून व्यापक प्रमाणात सन्मानित करण्यात येत आहे. कारण त्यांच्या प्रयत्नांतून मित्रत्वाचे आंतरधार्मिक संवादाच्या माध्यमातून सांप्रदायिक सद्भाव आणि सौहार्दाला बळ मिळते. त्यांनी आपले जीवन विभिन्न समुदायातील अविश्वास आणि चुकीच्या धारणांना दूर करण्यात समर्पित केले आहे. त्यांचा असाही प्रयत्न राहिला आहे की, वेगवेगळ्या समुदायांनी एक-दूसऱ्यांप्रती जाणून घेणे, त्यांना समजणे आणि व्यापक स्तरावर सामाजिक संवादाचे वातावरण निर्माण करणे. मौलाना कलीम सिद्दीकी यांच्यावर लावण्यात आलेल्या आरोपांत थोडीही सत्यता नाही. त्यांच्यावर लावण्यात आलेला आरोप असा आहे की, त्यांनी लोकांना जबरदस्ती प्रलोभन देवून धर्म परिवर्तन करण्यासाठी मजबूर केले. जसे की यूपी एटीएसने आपल्या चुकीच्या आणि काल्पनिक तक्रारीत म्हटले आहे.  

आमचे असे म्हणणे आहे की, मौलाना कलीम सिद्दीकी यांना निवडणुकीच्या लाभासाठी युपी सरकार द्वारा बळीचा बकरा बनविला जात आहे. आम्ही अशा अटकेची कडी निंदा करतो आणि त्यांना तत्काळ सोडून देण्याची अपील करतो. निर्दोष मुसलमांनाना वारंवार त्रास देणे निंदनीय आहे असे प्रकार तात्काळ थांबविले जावेत. या प्रकारची कृत्य फक्त संशय आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण करेल आणि देशाच्या सामाजिक एकोप्यासाठी घातक सिद्ध होईल. प्रत्येकाला आपल्या आवडीचा धर्म मानने आणि प्रचार करण्याचा अधिकार आपल्या संविधानाने दिलेला आहे. यूपी सरकारचा धर्मांतरण विरोधी कायदा अशा स्वातंत्र्याला कमकुवत करत आहे आणि सामान्य नागरिकांना त्रास देण्याचे एक साधन बनले आहे. आम्ही आशा करतो की, शासन सत्याची बाजू घेईल आणि माननीय न्यायालय संवैधानिक मुल्यांना स्थापित करून न्याय देईल. 

 - मुहम्मद सलमान अहमद, राष्ट्रीय अध्यक्ष, स्टूडेंट्स इस्लामिक ऑर्गनायजेशन ऑफ इंडिया (एसआईओ)



मागचा आठवड्यात अदानी ग्रुपच्या मालकीच्या मुद्रा पोर्टवर डायरेक्टर ऑफ रेव्हिन्यू इंटेलिजन्स ने रूटिन चेकिंगमध्ये पाहिले असता तीन हजार किलो मादक पदार्थ आढळून आले. देशात आतापर्यंत मादक पदार्थांचा एवढा मोठा साठा कधीच सापडला नव्हता. देशाच्या तरूण पिढीला मादक पदार्थाच्या सापळ्यात अडकवून पिढीची पिढी नासविण्याचे विजयवाडा येथील कंपनीचे षडयंत्र उघडे करून त्याची माहिती देशासमोर ठेवणे सरकारचे कर्तव्य आहे. मात्र काही ग्राम मादक पदार्थ सापडल्यामुळे अभिनेता सुशांतसिंह राजपूतची प्रेयसी रिहा चक्रबर्ती हिला तुरूंगात डांबण्यात आले होते आणि महिनाभर तिचा मीडिया ट्रायल करण्यात आला होता. आज तीन हजार किलो मादक पदार्थ मिळूनसुद्धा मीडियामध्ये स्मशान शांतता आहे. हाच भेदभाव देशाला खड्ड्यात घालण्यासाठी पुरेसा आहे. विशेष म्हणजे या कंटेनरमध्ये टॅलकम पावडर असल्याची हास्यास्पद माहिती देण्यात आली. जिच्यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. लवकर या संदर्भात देशासमोर विस्ताराणे माहिती मांडली गेली पाहिजे.

 


सभ्यतांच्या उदय आणि ऱ्हासाबद्दल काही विचार या आधीच्या लेखात मांडले आहेत. आणखीन काही गोष्टींचा या संदर्भात तपास करताना असे दिसून येते की सभ्यतांचा विस्तार होत असताना किंबा एका ठराविक स्थितीस पोहोचल्यानंतर त्यांना ज्या समस्यांशी तोंड द्यावे लागते, ज्या आव्हानांना सामोरे जावे लागते त्याचे प्रत्युत्तर देण्याची त्यांची क्षमता असते किंवा नाही. मुळात सभ्यतांचा जन्म कठीण प्रसंगातून होतो. अशा कोणत्याही सभ्यतेच्या अनुयायांमध्ये समोरील आव्हानांना तोंड देण्याची मानसिक तयारी नसेल तर त्या सभ्यतांचे भवितव्य धोक्यात आल्याशिवाय राहात नाही. कोणत्याही सभ्यतेचा प्रवास सतत सुरू असावा लागतो. एक व्यक्ती असो की समाज अथवा त्यापासून उदयास आलेली सभ्यता हे सर्व या विश्वाचे (Universe) घटक आहेत. ज्या प्रकारे धरती इतर ग्रह, धरतीवरील प्रत्येक सजीव आणि निर्जीव अस्तित्व या विश्वाचे घटक आहेत. हे ब्रह्मांड निर्मितीनंतर स्थिर नसून आपल्या प्रवासाच्या प्रत्येक बिंदूवर सदैव विस्तारत आहे. एका व्यक्तीपासून जसे कुटुंब जन्माला येते, त्यापासून समाज, संस्कृती; तसेच या जगातील सर्व सभ्यता विस्तारत आहेत. हा सृष्टीचा नियम आहे. जर काही कारणाने विश्वातील एखादे अस्तित्व या सृष्टीच्या नियमाविरूद्ध जात असते तर मग त्याचा मृत्यू अटळ आहे. अशाच प्रकारे सभ्यतांना विस्तारायला हवे. त्या सभ्यतेमध्ये विस्तारासाठी पूरक तत्त्वे असायला हवीत. कोणत्याही संस्कृती-सभ्यतेमध्ये विभाजनाला थारा नसतो. यासाठी ती सभ्यता साऱ्या मानवजातीला आकर्षित करणे गरजेचे असते. जर मानवजातीला वेगवेगळ्या निकषांवर विभागले जात असेल तर ही प्रक्रिया सृष्टीच्या नियमांविरूद्ध जात आहे असे समजले जावे आणि नियमांचे उल्लंघन करणे म्हणजे स्वतःच्या विनाशाला आमंत्रण देण्यासारखे आहे. त्याचबरोबर त्या सभ्यतेची नैतिक मूल्ये सर्वसमावेशक असायला हवेत. जर समाजातील मानवांना निरनिराळ्या निकषांवर विभागले गेले तर मग संस्कृतीचे वेगवेगळ्या परंपरेत विभाजन होईल. याचा अर्थ संस्कृतीचे रूपांतर परंपरेत होईल. परंपरा कोणत्याही मानवी समूहासाठी प्रगतीची दारे उघडत नाही. प्रगतीचे दार बंद झाले की ती संस्कृती स्वतःहून आपला विनाश ओढवते. तसेच सभ्येमध्ये संतुलन असणे गरजेचे आहे. म्हणजे त्या त्या सभ्यतेतील माणसामाणसांमध्ये कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाऊ नये. वंश, वर्ण, जात अशा प्रकारचे भेदभाव जर माणसामाणसांमध्ये केले जाऊ लागले तर ती संस्कृती स्वतःच विभाजनाकडे जाते. अशा संस्कृतीवर आधारित सभ्यतादेखील मग एक सभ्यता म्हणून शिल्लक राहात नाही.

जगात ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माने मानवजातीची विभागणी केली, पण ही विभागणी वर्ण, वंश, जात या निकषांवर नाही. ख्रिस्ती धर्माने मानवजातीला ख्रिस्ती आणि बिगर ख्रिस्ती अशी विभागणी केली, तर दुसरीकडे इस्लाम धर्माने सकल मानवजातीची विभागणी श्रद्ध आणि अश्रद्ध अशी केली. म्हणजे ही बिभागणी अटळ नाही. आज जे लोक ख्रिस्ती नाहीत उद्या ते ख्रिस्ती धर्मात प्रवेश करू शकतात. तसेच ज्या लोकांनी इस्लाम धर्मावर आज श्रद्धा ठेवलेली नाही ते उद्या श्रद्धा बाळगू शकतात.

कोणतीही वैश्विक सभ्यता ज्या धर्मावर ती आधारित असेल त्या धर्माची विचारधारा देखील वैश्विक असायला हवी. म्हणजे वैश्विक नियमांशी सुसंगत असायला हवी. त्याच्या शिकवणी एखाद्या विशिष्ट समाज-समूहासाठी, भौगोलिक क्षेत्रातील रहिवाशांसाठी, विशिष्ट जाती-समुदायासाठी नव्हे तर साऱ्या मानवजातीसाठी असायला हवी. त्याचे संबोधन साऱ्या मानवजातीला असायला हवे. या निकषांवर जगातील दोन सभ्यतांमध्ये बरेच साम्य आहे. एक ख्रिस्ती आणि दुसरे इस्लाम. या दोन्ही सभ्यता ज्या धर्मावर आधारित आहेत त्यांच्या शिकवणी साऱ्या मानवजातीसाठी आहेत. यासाठी ईश्वराची कल्पना एकत्वाची असावी. इस्लाम धर्मात एकमेव ईश्वराची कल्पना असल्याने सारी मानवजात समान आहे. समानता ज्या सभ्यतेत नसेल ती सदोष असेल आणि दीर्घकाळानंतर त्या सभ्यतेत विभागनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. एकाच ईश्वराने साऱ्या मानवजातीला एक पुरुष आणि एका स्त्रीच्या जोडप्याद्वारे जन्म दिला असल्याने सारे मानव एकसमान आहेत. जर मानसामाणसांत भेदभाव केला गेला तर तो धर्माच्या शिकवणींविरूद्ध असल्याने त्याला महत्त्व उरत नाही. ख्रिस्ती धर्मात ईश्वराचे तीन रूप मानले जात असल्याने काही प्रमाणात त्या धर्माच्या अनुयायांमध्ये समानतेचा अभाव आढळतो. एका प्रख्यात इतिहासकाराने असे म्हटले आहे की पाश्चिमात्य राष्ट्रवादाने राष्ट्रवादाच्या विषाणूला जन्म दिला म्हणून ख्रिस्ती सभ्यता एकसंघ राहू शकली नाही. आज ज्या सभ्यतेला ख्रिस्ती सभ्यता म्हणतात ती खऱ्या अर्थाने पाश्चिमात्य सभ्यता आहे.

आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही सभ्यतेने मानवजातीच्या विकासात योगदान द्यायला हवे. आज जगात पाश्चात्य सभ्यतेला महत्त्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. याचे कारण असे की मानवी जीवनाचा एकही पैलू त्यांनी असा सोडला नाही ज्याच्या विकासात पाश्चात्य विचारवंतांनी आपले योगदान दिले नसेल. विज्ञानाचे क्षेत्र असो की मानवजातीच्या आरोग्याचे तंत्रज्ञान असो की इतर कोणतेही क्षेत्र, या सर्वांमध्ये पाश्चिमात्यांनी भरीव योगदान दिलेले आहे. पण त्याचबरोबर जगातील इतर राष्ट्राचा नाश करण्यात देखील पाश्चात्य सभ्यताच सर्वांत अग्रेसर आहे. त्याचे हे कर्तृत्व सृष्टीच्या नियमांविरूद्ध असल्याने त्याला याचे परिणाम आज ना उद्या भोगावे लागणार आहेत हेदेखील निश्चित. ख्रिस्ती धर्मियांच्या आधी मुस्लिम शास्त्रज्ञांनी विद्वानांनी जगभर ज्ञानाचा प्रसार केला. ते विज्ञानाचे क्षेत्र असो की तंत्रज्ञानाचे मुस्लिम वैज्ञानिकांनी बरेच शोध लावलेले आहेत. बरेच तंत्रज्ञान विकसित केले आहे. त्याचबरोबर समाजशास्त्र, इतिहास, वाड्मय आणि इतर ज्ञानाच्या साऱ्या स्रोतांची सुरुवात मुस्लिमांनी केली. नंतरच्या काळात यूरोपियनांनी हा वारसा पुढे चालवतच इतर नवनवीन शोध लावले आणि तंत्रज्ञानाचा विकास केला, जो आम्ही सध्या पाहात आहोत. खगोलशास्त्र आणि अंतरिक्ष विज्ञान या क्षेत्रांमध्येदेखील मुस्लिमांनी बरेच संशोधन केले. जगातली पहिली नासासारखी वेधशाळा तुर्कीमध्ये होती.

इस्लामी शिकवणींची सुरुवातच मानवजातीच्या भल्यासाठी योगदान देण्याच्या आदेशाने होते. कोणतीही मुस्लिम व्यक्ती जोपर्यंत मानवजातीच्या कल्याणासाठी कार्यरत असत नाही तोवर तो सदाचारी होऊ शकत नाही. कोणत्याही सभ्यतेला धर्माचा, धार्मिक ग्रंथाचा मुलाधार नसेल तर ती सभ्यता जास्त काळ टिकू शकत नाही. धर्माशी बंड करून जगात कम्युनिझमची विचारधारा विकसित करण्यात आली. त्या विचारधारेवर आधारित राष्ट्र सभ्यतेची निर्मिती करताना रशिया, चायना वगैरे देशांमध्ये २-४ कोटी लोकांची हत्या केली गेली. मानवजातीचे रक्त सांडून जी सभ्यता जगात रुजविण्याचे प्रयत्न केले गेले ती जेमतेम ५० वर्षे टिकली नाही. चायनाने उघडपणे जरी कम्युनिझमशी फारकत घेतली नसली तरी त्या राष्ट्रात ती नष्ट झाली आहे. नावापुरता कम्युनिस्ट पक्ष जीवंत ठेवला आहे, ते जगाला दाखवण्यासाठी. निधर्मी सभ्यता असो की निधर्मी राज्यसत्ता मानवजातीने त्यांना कधीही महत्त्वाचे स्थान दिलेले नाही. सभ्यतेचा आधार नेहमी धार्मिक शिकवण, आचारविचार, नीतीशास्त्र, धार्मिक विधी राहिला आहे.

पण या धार्मिक शिकवणींचा आधार कोणता? प्रत्येक धर्मात धर्मग्रंथ असतात ज्यांना धर्माचे, धार्मिक शिकवणींचे मूळ समजले जाते. पण हे धार्मिक ग्रंथ कशाच्या आधारवर आहेत? ख्रिस्ती आणि इस्लाम धर्माचे धर्मग्रंथ मानवाने रचलेले, साकारलेले नाहीत, तर ते एकमेव ईश्वराने पाठवलेले आहेत. या ग्रंथांमध्ये ज्या शिकवणी आहेत त्या बुद्धिमत्तेला आव्हान देणाऱ्या नाहीत तर बुद्धिमत्ताच या शिकवणींचा मुलाधार आहे, असे जाहीरपणे घोषणा करतात. शिवाय धर्मग्रंथामधील शिकवणी शंकास्पद नसायला हव्यात. कुरआनातील शिकवणींची सुरुवातच अशी होते की हा धर्मग्रंथ अल्लाहने पाठविलेला आहे यात शंका नाही आणि त्याबरोबर या धर्मग्रंथातील कोणतीही गोष्ट अशी नाही जी शंकास्पद असेल. जगाने कितीही ज्ञान-विज्ञान-तंत्रज्ञानाचा विकास केला असला तरी आजदेखील इस्लामचा धर्मग्रंथ कुरआनातील कोणत्याही गोष्टींना विज्ञानाने आव्हान दिलेले नाही.

सांगायचे तात्पर्य हे की कोणत्याही सभ्यतेच्या शिकवणींचा मुलाधार भक्कम असणे गरजेचे आले. जर यात त्रुटी आढळत असतील तर मग एक तर तो ग्रंथ मानवाने रचलेला आहे किंवा यातील मजकुरामध्ये मानवांनी आपल्या आवडीनिवडीनुसार ढवळाढवळ केलेली असेल.

(उत्तरार्ध)

- सय्यद इफ्तिखार अहमद

मो.: ९८२०१२१२०७



माणूस जन्माला आला की त्याला स्वातंत्र्य व सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळतो आणि तो संविधानाने आपणास बहाल केला आहे. जात, धर्म, लिंग, वर्ण, वंश अशा सगळ्या भेदाच्या पलीकडे जाऊन समतापूर्ण वातावरण, आनंदाने जगण्यासाठी पोषक सभोवताल मिळणे हासुद्धा आपला परम अधिकार आहे. तो आपणांस जन्मजात मिळतो. व्यक्ती जन्माला आल्यानंतर त्याला बालवयात सर्व सुविधा मिळण्याचा अधिकार मिळतोच आणि मिळालेला असतोच. शिक्षणाचा अधिकार, रोजगार अधिकार, विकासाचा अधिकार, व्यवसायाचा अधिकार, मतदानाचा अधिकार, मुक्तपणे भ्रमण-संचार अधिकार, मालमत्ता व साधने बाळगण्याचा अधिकार, आरोग्यपूर्ण जीवन जगण्याचा अधिकार, शोषणापासून मुक्त राहाण्याचा अधिकार; राजकीय नेतृत्व, शासकीय अधिकारी व कर्मचारी यांचेकडून सेवा घेण्याचा अधिकार. असे एक ना अनेक अधिकार जन्मातच माणसाला मिळतात. सर्वसामान्य आणि लोकशाही देशातील नागरिक म्हणून पुढे त्याला बोलण्याचा, लिहिण्याचा अधिकार व विविध माध्यमांतून अभिव्यक्त होण्याचा, संघटित होण्याचा, अन्यायाविरुद्ध आवाज उठविण्याचा, अहिंसक मार्गाने आपले म्हणणे मांडण्याचा अधिकार मिळालेलाच असतो. हे सर्व अधिकार आपणांस सभ्य नागरिक, समाजांत आपोआप बहाल झालेले असतात. तरीही आपल्यापैकी अनेकांना वरील अधिकारांचा पुरेपूर लाभ मिळत नाही आणि आपण तो मिळविण्यासाठी प्रयत्न सुध्दा करत नाही.

अनेकांना समतेचा अधिकार असूनसुद्धा जात-धर्म अशा भेदांना बळी पडावे लागते. शिक्षणाचा अधिकार असूनसुद्धा आज कित्येक मुलांना आज शासनाच्या विविध शैक्षणिक संस्था, सेवा-सुविधा असूनसुद्धा गरिबीमुळे शिक्षण मिळत नाही. हसण्या-बागडण्याच्या वयात मुलांना अवैध धंदे व इतर ठिकाणी कामगार म्हणून वेठबिगारी करावी लागते, यासारखे वाईट नाही. बालिक आणि महिला कामाच्या ठिकाणी उच्चपदावरील अधिकारी व कर्मचारी यांचेकडून होणऱ्या शोषणाला बळी पडत आहेत. आपण रोज वृतमानपत्रात वाचतो आणि विसरून जातो. सामान्य नागरिकांना काय पाहिजे असतं- दोन वेळचे अन्न, अंगभर कपडे, डोक्यावर आपलं स्वतःचं आणि हक्काचं घर. या सर्वांपासून आज सर्वसामान्य जनता वंचित आहे. शेतीतून उत्पन्न संपत्तीचे शोषण होत रहावे अशी पध्दतशीर व्यवस्था असल्याने ग्रामीण भारतातील शेतमजूर लोक शहरांत स्थलांतरित होऊन झोपडपट्टीत नरकयातना भोगत आहेत. इतके खराब जीवन जगत आहेत त्याची आपण कल्पनासुध्दा करू शकत नाही. त्याचबरोबर आदिवासी, भटके विमुक्त आणि अल्पसंख्याक लोकांना मूळ सामाजिक प्रवाहात कसलेही स्थान नाही. जातीय व धार्मिक हिंसाचार, अतिरेकी हल्ले यात मोठे राजकीय नेते, पुढारी कधी भरडले आहेत का? नाही. सर्वसामान्य माणूसच यात भरडला जात आहे. मग आंदोलन, मोर्चाच्या वेळी होणारी पोलीस कारवाई कार्यकर्ते यांचेवर होते आणि कार्यकर्ते असतात ते म्हणजे सर्वसामान्य. यामुळे राजकीय पक्ष व संघटना, सेवाभावी संस्था, युनियन व इतर पक्षाचे गट यांच्यामुळे सामाजिक सुरक्षितता हा मानवी अधिकार पायदळी तूडवला जात आहे.

मग आपणांस असा प्रश्न पडतो की इतके भरपूर मानवी अधिकार कार्यकर्त्यांना असताना आमच्या समाजात इतका मोठ्या प्रमाणात अन्याय आणि अत्याचार का? या आमच्या प्रश्नाला अनेक कंगोरे व अनेक पदर आहेत. परंतु मूळ प्रश्न असा गंभीर आहे त्याचा विचार सर्व पक्ष-संघटनांच्या मृगजळामागे धावणारे कार्यकर्ते व आम्ही अधिकारांची भाषा भरपूर करतो. परंतु आम्ही आमचे कर्तव्य विसरतो आणि पदाला बळी पडतो आणि स्वतःचा स्वाभिमान विकून एखाद्याच्या ताटाखालचे मांजर म्हणजे कार्यकर्ते होतो. भारतीय राज्यघटनेने माणसाला माणसाप्रमाणे वागणूक व अधिकार आम्हास सांगितली आहेत ती आपल्या डोक्यावर थैमान घालणारे राजकीय व अन्य लोक पाळतता का? जो कार्यकर्ता किंवा समाज आपले हक्काधिकार विसरतो त्या समाजात कार्यकर्त्यांना आपले हक्काधिकार सहजासहजी मिळत नाहीत. हा सर्व दोष आपलाच आहे, कारण गाफील आणि झोपलेल्या व्यक्तीच्या घरात चोरी होते. जो सतत जागरूक असतो व सावध असतो त्याच्या घरात चोरी करण्याचे धाडस चोर करत नाहीत. याचा साधा आणि सोपा अर्थ असा होतो की आपणांस कोणाचेही कार्यकर्ते बनवण्यासाठी समाजात आपल्या आजूबाजूला असे चोर फिरत असतात. तुमच काम चांगल आहे, माणसांचे बळ आहे, घरची परिस्थिती बेताची आहे यांच्यावर अशा चोरांचे लक्ष असते. म्हणून आपण गाफील न राहाता सतर्क राहाण्याची गरज आहे.

या उलट या चोरांना आता रान मोकळे झाले आहे, कारण आमचा समाज जागरूक नाही. धर्म, जाती, पंथ, संप्रदाय, प्रांत, भाषा, शैक्षणिक-सांस्कृतिक निरक्षरता, फुटिरता अशा विषमतेच्या विषाने तो मुर्छित झालेला आहे, म्हणजे कार्यकर्ते होताना. जेवण, काही थोडे आर्थिक आमिष यामुळे तो भुललेला आहे. संविधानातील समतेच्या मूल्यांचा नेहमीच आपल्या दलबदलू वागण्यामुळे अनादर झाला आहे. आपण जागरूक नसल्याने समाजाचे आर्थिक व राजकीय शोषण होताना आपण बघतो. गरीबांचे अज्ञान, हतबलता व मध्यमवर्गीय आत्मकेंद्री वृत्ती यामुळे मानवी अधिकारांचे रक्षण करणारे सकारात्मक दबावगट उरलेले नाहीत. ज्याप्रमाणे अंधाऱ्या रात्री सुसाट वारा वहात असताना हातांची ओंजळ करून दिवा विझू नये यासाठी आपणच प्रयत्न करणे गरजेचे आहे. नाहीतर भविष्यात आपण आणि आपली येणारी पिढी अंधारात चाचपडत राहील. आज वादळात सापडलेल्या दिव्यासारखी परस्थिती कार्यकर्त्यांची झाली आहे. हा दिवा विझू नये म्हणून कर्तव्याशील ओंजळी म्हणजे या रस्ता भटकलेल्या कार्यकर्त्यांना रस्त्यावर आणण्यासाठी ओंजळीरुपी मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, तरच कार्यकर्तारूपी दिवा वाचणार आहे.

सांगेल तसे म्हणजे जी-हुजुरी करण्यासारखे काम करणारा म्हणजे कार्यकर्ता. काही ठिकाणी आपण बघतो काही कार्यकर्ते परस्थितीमुळे याला बळी पडले आहेत, तर काही पक्षाचे पुढारी यांच्या भुलभुलैया आश्वासनांना बळी पडतात. काही जण फक्त पदासाठी आणि खोटा आव आणण्यासाठी कार्यकर्ते होतात. मग काय आपल्या गाडीवर अमुक कार्यकर्ता, टी-शर्ट, विविध ग्रुप तयार होतात. आंदोलन, मोर्चा, दंगेधोपे, जाळपोळ यासाठी अशा कार्यकर्त्यांचा वापर केला जातो. त्या वेळी त्यात शिक्षण पूर्ण झालेले तरूण यांच्यावर पोलीस केस दाखल होते. भविष्यात कोठेही नोकरी नाही, जनसामान्यांच्या मनात प्रतिष्ठा खराब, त्यामुळे लग्न नाही. मग व्यसनाधीनता, गुंडगिरी, अवैध धंदे अशा विविध मार्गाला असे तरूण लागतात. त्या वेळी ज्या नेत्याचा, पक्षाचा, संघटनेचा, सेवाभावी संस्था, युनियन यांचा तो कार्यकर्ता आहे त्याचा प्रमुख बघायलासुध्दा कोर्टात, पोलीस स्टेशनला जात नाही. त्या वेळी स्वतःची जमीन गहाण ठेवून विकून आपल्या मुलांना कचेरीतून सोडवून आणणारे आई-वडील मी बघितले आहेत. मग आता कुठं गेले या कार्यकर्त्यांचे नेते? विचार करण्याची गरज आहे. डिजिटलवर नाव आलं की कार्यकर्ता स्वतःला नेता समजतो. आई-वडील रोजगार करतात. मग पोरगं कोणाचातरी कार्यकर्ता झाला, व्याजाने कर्ज काढून गाडी घेऊन दिली जाते. मग गाडीप्रमाणे कपडे बुट. सोबत असणारे कार्यकर्ते यांचा खर्च. मग काय सहा महिने ते एका वर्षात शेती, घर विकलेले कार्यकर्ते मी बघितले आहेत. आता कुठ आहे नेता तुमचा? प्रश्न मनाला करा उत्तर निश्चित मिळेल.

कोणत्याही भुलभुलैयाला बळी पडू नका. जर कोणी म्हणत असेल तुमचं सामाजिक कार्य चांगलं आहे, तुम्ही आमच्याकडे या. तर तुम्ही त्यांना विचारा की तुम्ही आमच्यासाठी काय करणार? पद नको. पदातून नोटा पडत नाहीत. आमच्या हाताला काम द्या. एखादा सक्षम व जगण्याचा पक्का रोजगार द्या. एखादा उद्योग उभा करून आम्हाला चार पैसे मिळविण्याचे साधन तयार करून द्या. मग बघा, जो तुम्हाला कार्यकर्ता म्हणतो किंवा ‘आमच्या पक्षात, सेवाभावी संस्थेत, युनियनमध्ये या’ म्हणणारा म्हणील, ‘मी तुम्हाला फोन करून कळवतो.’ त्याचा फोन तुम्हाला भविष्यात येणार नाही.

कार्यकर्ता सक्षम असेल तरच तुमचा नेता, पुढारी, संघटना अध्यक्ष व इतर कोणीही असो तो सक्षम होणार आहे. नाही तर जो कार्यकर्त्यांना सक्षम करू शकत नाही त्याने कार्यकर्त्यांना खोटं आश्वासन देऊ नये. कारण स्वतः फाटका असणारा, वेळोवेळी दलबदलू असणारा कार्यकर्त्यांचे भले करू शकत नाही. स्वतःचे चप्पल फाटकं असणारा दुसऱ्याला काय नवीन चप्पल घेऊन देणार! विचार करा. एखाद्याचा कार्यकर्ता- ताटाखालचे मांजर होण्यापेक्षा कष्ट करून जगा, मानाने जगा. तुम्हाला संविधानाने भरपूर हक्काधिकार दिले आहेत, त्यांचा वापर करा. कायदा सर्वांसाठी समान आहे, त्याचासुध्दा वापर करून बघा, यश निश्चित मिळेल!

- अहमद नबीलाल मुंडे



कोरोनाचा उद्रेक होणार म्हणून गेल्या वर्षी मार्चच्या २० तारखेला पंतप्रधानांनी देशभर लॉकडाऊन जाहीर केला. लोकांना घरापासून किमान ५-५० किमी दूर असताना देखील त्यांना आपल्या घरी पोचण्याचीही संधी मिळाली नाही. १३७ कोटी लोकसंख्येच्या या देशात किमान दहा-पाच कोटी नागरिक देशभर इतरत्र विखुरलेले असतील. परदेशात गेलेले असतात, त्यांची संख्या वेगळीच. त्या सर्वांना आपल्या घरी पोचण्याची संधी दिली गेली नाही. केवळ दोन तासांचा कालावधी लॉकडाऊन जाहीर होण्यापासून त्याची अंमलबजावणी होण्यात होता. अशात आपली घरंदारं, मुलाबाळांना सोडून किती लोक कुठे कुठे अडकून पडले होते. मुंबईत देशाच्या इतर राज्यांतून लाखो प्रवासी मजूर रोजगारासाठी येऊन राहातात. त्यांचे कायमचे घर किंवा ठिकाणा नसतो. राहायला कुठे जागा मिळाली तर इतर कोणत्याच सुविधा त्यांना मिळत नाहीत. अशा परिस्थितीत आपले पोट आणि आपल्या गावी सोडून आलेल्या आपले आईवडील, मुलंबाळं आणि पत्नी व इतर नातलगांच्या दोन वेळ पोट भरण्याची व्यवस्था करायला ते मुंबईत दाखल झालेले असतात. इतक्या हलाखीच्या परिस्थितीमध्ये जगण्याऱ्या लाखो प्रवासी मजुरांना लॉकडाऊनला सामोरे जावे लागले. त्यांचासुद्धा पोट भरण्याचा प्रश्न निर्माण झाला. यातच कोरोनाच्या संसर्गाची भीती. कसे ते लोक राहू शकत होते मुंबईत. सरकारने परिवहनाची सगळी व्यवस्था बंद केली. रेल्वे नाही, बसेस नाहीत, स्वतःची वाहनं जरी असतील काही लोकांकडे तर तीसुदधा प्रवासासाठी वापरण्याची बंदी. एक कामगिरी मात्र सरकारने जरूर केलेली होती. परदेशात जी उच्चभ्रू मंडळी अडकून पडलेली होती, लाखाच्या आसपास त्यांच्या सोयीसाठी विशेष विमाने चालू होती. एकदा ही मंडळी मायतेशी परतली की सरकारने लॉकडाऊन जाहीर केला. बाकीच्या कोट्यबधी प्रवासी मजुरांशी, गोरगरिबांशी सरकारचे देणे घेणे नसल्याने त्यांना वाऱ्यावर सोडून दिले.

अशात एक माणूस समोर येतो – सोनू सूद त्याचे नाव! त्याच्या माणुसकीने जन्म घेतला आणि मग तो या अ़डकून पडलेल्या गोरगरिबांना आपापल्या गावी पाठवून देण्याची सोय करू लागला. त्या अगोदर लाखो लोक हजारो किमीचा प्रवास पायीच करत आपल्या घराकडे निघाले. जवळ पैसे नाहीत. खायला काही नाही. अशात इतर स्वयंसेवी संस्थादेखील बाहेर पडल्या. जागोजागी रस्त्यात अशा लोकांच्या जेवणाची सोय करू लागल्या. पाण्याच्या बाटल्या, अन्नाची पाकिटे पाटू लागले. काही लोक रेल्वेमार्गाच्या कडेला उभं राहून प्रवाशांना अन्नाची पाकिटे, पाणी वाटत होते. देशात कोट्यवधी लोकांचे असे हाल होत असताना शासन-दरबारचा कुठे थांगपत्ता नव्हता. सोनू सूदने जणू शासनाचीच भूमिका घेतली. त्या एकट्या माणसानं लाखो प्रवासी मजुरांना बसेसची सोय करून ज्यांना त्यांना त्यांच्या गावी पाठवून दिले. शासनाला जमले नाही ते त्याने एकट्याने करून दाखवले. गोरगरीबांसहित अशा काही लोकांनाही त्याने चार्टर्ड विमानाने देशात आणले जे तिथे अडकून पडले होते. आणीबाणीच्या काळात लोकांच्या सेवेसाठी जर कोण कार्य करत असेल, आपली जबाबदारी नसताना शासनाची भूमिका घेत असेल तर त्याने या कार्यासाठी कुठून पैसे आणले, किती आणले, कुठे खर्च केले, किती शिल्लक आहेत, पैशांची अपरातफर केली का? असे प्रश्न सहसा कुणी विचारत नसतो. कारण जो माणूस अडकलेल्यांना मदतीचा हात देत आहे, आपल्या कमाईचे पैसे खर्च करीत असेल, जाहिरातींद्वारे आणि इतर मार्गांनी. म्हणजे त्याच्या उद्दिष्टाशी सहमत असलेय्या मंडळींकडून मिळालेल्या देणग्यांमधून खर्च करत असेल तर त्याने असा कोणता गुन्हा केला? त्याने जर लाखो लोकांचे पोट भरले, त्यांना त्यांच्या घरी पोहचवले तर त्याचा कोणता गुन्हा यात? ज्या महान कार्यासाठी, माणुसकीच्या अशा काळी सेवेसाठी ज्या वेळेस सरकारनेही काही केले नव्हते अशा वेळी जर त्याने लोकांची सोय केली असेल तर त्यासाठी त्याला पारितोषिक द्यायला हवे होते. त्याचा सन्मान करायला हवा होता. म्हणजे इतरही श्रीमंत लोकांना या महान कार्याची प्रेरणा मिळावी.

पण आपल्या देशाच्या सत्ताधाऱ्यांचे काय विचार आहेत, कोणती विचारधारा आहे याचा उलगडा होत नाही. असे वाटते की लोकांनी जगू नये. म्हणजे त्यांना जगू देऊ नये. एकामागून एक समस्येमझ्ये गुरफटून त्यांना ठेवावे आणि या यातनांमधूनच त्यांनी या जगाचा निरोप घ्यावा. असे जर वाटत असेल तर कोण काय करू शकतो.

- सय्यद इफ्तिखार अहमद

संपादक, 

मो.: ९८२०१२१२०७


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget