Halloween Costume ideas 2015
Latest Post


प्रसारमाध्यमांतील अलीकडील बातम्यांनुसार असे दिसून आले आहे की उत्तर प्रदेश सरकार दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या कुटुंबांना अनेक अधिकृत कल्याणकारी योजनांचा लाभ घेण्यापासून वंचित ठेवणाऱ्या कायद्याच्या मसुद्यावर विचार करीत आहे. हा प्रस्तावित लोकसंख्या नियंत्रण कायदा मात्र अत्यंत घातक आहे कारण हे पाऊल केवळ घटनात्मक आणि कायदेशीरदृष्ट्या संशयास्पद नाही, तर यामुळे समाजातील पूर्वग्रह आणि कट्टरता आणखी तीव्र होईल. या वादग्रस्त योजनेवर राज्यभरातील लोकांमध्ये वादविवाद आणि चर्चा घडून येतील ज्यामुळे जातीय ध्रुवीकरणाला धार येईल. मानवी मूल्ये आणि आरोग्याच्या बाबतीतही या धोरणाचे परिणाम अत्यंत हानीकारक ठरतील. यामुळे सर्वसाधारणपणे गर्भपात आणि विशेषत: स्त्री भ्रूण हत्यांमध्ये तीव्र वाढ होईल. कमी स्त्रिया असल्यामुळे दीर्घकालीन परिणाम अत्यंत धोकादायक ठरू शकतात ज्यामुळे अधिक बहुविधता आणि स्वैराचार वाढीस लागेल. वाढत्या अनैतिकतेमुळे कौटुंबिक व्यवस्था अधिकाधिक कमकुवत होईल. यामुळे एचआयव्ही/एड्ससह अधिक लैंगिक संक्रमित आजार होतील, ज्यामुळे आजही देशात दरवर्षी २० लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो. दोन मुलांचे धोरण लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी, राष्ट्रीय आर्थिक संकटांचे निराकरण करण्यासाठी किंवा कुटुंबांना त्यांची मुले दोन किंवा कमी मर्यादित ठेवण्यास प्रवृत्त करण्यासाठी फारसे कामी येणार नाही. मुस्लिमांना हिंदूंपेक्षा जास्त मुले आहेत आणि सरकारने दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या कुटुंबांना अधोरेखित करून धाडसी प्रदर्शन केले आहे, असा निहित संदेश यामधून पुढे येतो. हिंदूंना 'त्यांच्या देशात' धार्मिक अल्पसंख्याक करण्याचा मुस्लिमांचा 'कट' अस्तित्वात असल्याबद्दल संघ परिवाराने दीर्घकाळापासून युक्तिवाद केला आहे. इस्लाम कुटुंब नियोजनाला विरोध करतो आणि म्हणूनच तो आधुनिक गर्भनिरोधक पद्धतींच्या विरोधात आहे, असा युक्तिवाद त्यांच्याद्वारे केला जातो. लोकसंख्या नियंत्रण कायदा दीर्घकाळापासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अजेंड्यावर आहे. तथाकथित 'वाढती' कुटुंबे, तथाकथित लव्ह जिहाद, गोमांसाचा वापर (भारताच्या बहुतेक भागात म्हशी), कमी जातीच्या हिंदूंचे इस्लाममध्ये जबरदस्तीने किंवा फसवे धर्मांतर करणे, घरगुती दहशत आणि अर्थातच प्रादेशिक बाह्य निष्ठा या सर्व गोष्टी संपूर्ण समुदायाला बदनाम करण्यासाठी आणि त्यांचे राक्षसीकरण करण्यासाठी हिंदू उजव्या राजकीय नियमावलीत दीर्घकाळ आवश्यक आहेत. इतर सर्व आरोपांप्रमाणेच, अनियंत्रित मुस्लिम लोकसंख्या वाढीचे सूत पूर्णपणे खोटेपणा, वस्तुस्थिती आणि चुकीची माहिती उपलब्ध करण्याच्या मंचावर गुंफले गेले आहे. अनेक तज्ज्ञांच्या मतानुसार मुस्लिमांकडे अखंड ब्लॉक म्हणून पाहिले जाऊ शकत नाही; त्यांच्या वाढीचा दर अनेक हिंदू आणि आदिवासी समुदायांच्या बरोबरीचा आहे. आदित्यनाथ हे एकमेव भाजप मुख्यमंत्री नाहीत ज्यांनी या संभाव्य आग लावणारे मार्ग सुरू केले आहेत; आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा यांनी अनेक दिवसांपूर्वी राज्यातील मुस्लिम रहिवाशांना दारिद्र्य आणि दीर्घकालीन सामाजिक समस्यांना तोंड देण्यासाठी 'सभ्य कुटुंबनियोजन धोरण' स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. केवळ मुस्लिमांनाच दारिद्र्याचा सामना करावा लागतो आणि हे केवळ मोठ्या कुटुंबांमुळे होते, सरकारी धोरणांमुळे निर्माण झालेल्या आर्थिक विषमतेमुळे नाही, असे त्यांचे मत आहे. गेल्या आठवड्यात सरमा यांनी औपचारिकपणे जाहीर केले होते की त्यांचे सरकार हळूहळू राज्याद्वारे वित्तपुरवठा केलेल्या विशिष्ट योजनांअंतर्गत लाभ मिळविण्यासाठी दोन मुलांचे धोरण लागू करेल; या विषयावर केंद्रीय कायद्याव्यतिरिक्त केंद्राने देऊ केलेल्या योजना या नियमातून वगळल्या जातील. आरोग्य आणि शैक्षणिक उपक्रमांचा विस्तार करणे आणि अशा पावलांद्वारे मुस्लिम लोकसंख्येची वाढ तपासणे हे राज्य सरकारचे प्राथमिक असल्याचे सरमा यांनी यापूर्वी सांगितले होते. विशेष म्हणजे, सरमा स्वत: पाच भावंडांपैकी एक आहेत. आसाममध्ये काही विशिष्ट क्षेत्रांमध्ये दोन मुलांचा आदर्श आधीच अस्तित्वात आहे. २०१८ मध्ये राज्याच्या पंचायत कायद्यात या संदर्भात दुरुस्ती करण्यात आली होती. आसाम सरकारने यापूर्वी दोनपेक्षा जास्त मुले असलेल्यांना सरकारी नोकरीतून काढून टाकण्याचा निर्णय घेतला आहे. आसाम हे एकमेव राज्य नाही जे दोनपेक्षा जास्त मुले असलेल्या लोकांना सेवा आणि महत्त्वाचे म्हणजे हक्क प्रतिबंधित करते. राजस्थान, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश, गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक आणि ओडिशा ही अशी राज्ये आहेत जिथे काही विशिष्ट परिस्थितीत अशाच मर्यादा अस्तित्वात आहेत - मुख्यतः निवडणुका लढण्यासाठी. महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशनेही लोकांना सरकारी नोकऱ्या मिळविण्यापासून रोखले आहे. गेल्या काही वर्षांत सर्वोच्च न्यायालयाने वरील अनेक राज्य कायदे वैध ठरवले आहेत. वैयक्तिक निवडी आणि गोपनीयतेशी संबंधित बाबी राज्याद्वारे प्रभावित केल्या जाऊ शकत नाहीत. सरमा तसेच आदित्यनाथ यांच्या कृती राजकीय हेतूने प्रेरित आहेत. उत्तर प्रदेशातील निवडणुकांपूर्वीच हे विधेयक सादर करणे ही भाजपमागे हिंदूंना एकत्र आणण्यासाठी एक जातीय खेळी असल्याचे मानले जाते, सामाजिक दृष्टीने, कमी जातीच्या हिंदूंची, विशेषत: दलितांची लोकसंख्या नियंत्रणात ठेवण्याचा हा प्रयत्न असू शकतो.                                             

-शाहजहान मगदुम

कार्यकारी संपादक

मो.:८९७६५३३४०४



(९२) अशाचप्रकारे त्या लोकांवरदेखील आक्षेपास कोणतेही स्थान नाही ज्यांनी स्वत: येऊन तुम्हाला विनंती केली होती की आम्हाला स्वारी उपलब्ध करून दिली जावी. आणि जेव्हा तुम्ही सांगितले की मी तुमच्यासाठी स्वारीची व्यवस्था करू शकत नाही तेव्हा ते निरुपाय होऊन परत गेले. आणि स्थिती अशी होती की त्यांच्या डोळ्यातून अश्रू वाहात होते व त्यांना या गोष्टीचे अतोनात दु:ख होते की ते स्वखर्चाने जिहाद प्रवेशाची ऐपत बाळगत नव्हते.९३ 

(९३) तथापि आक्षेप अशा लोकांवर आहे जे धनवान आहेत आणि तरीदेखील तुमच्यापाशी विनवणी करतात की त्यांना जिहादप्रवेशाची माफी देण्यात यावी, त्यांनी घरी बसून राहणाऱ्यांमध्ये सामील होणे पसंत केले व अल्लाहने त्यांची हृदये मुहर केली. म्हणून आता त्यांना काही समजत नाही (की अल्लाहजवळ त्यांच्या या वागणुकीचा काय परिणाम निघणार आहे.)

(९४) तुम्ही जेव्हा परतून त्यांच्याकडे पोहचाल तेव्हा ते निरनिराळी निमित्ते सादर करतील, परंतु तुम्ही स्पष्ट सांगून टाका, निमित्त पुढे करू नका! आम्ही तुमच्या कोणत्याही गोष्टीचा विश्वास ठेवणार नाही. अल्लाहने आम्हाला तुमच्या हकीगती दाखविल्या आहेत. आता अल्लाह आणि त्याचा पैगंबर तुमचे वर्तन पाहील. मग तुम्ही त्याच्याकडे परतविले जाल जो परोक्ष व अपरोक्ष सर्वकाही जाणणारा आहे. आणि तो तुम्हाला दाखवून देईल की तुम्ही काय करीत होता. 

(९५) तुम्ही परतल्यावर ते तुमच्यासमोर शपथा वाहतील जेणेकरून तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळा कराल. तर बेलाशक तुम्ही त्यांच्याकडे कानाडोळाच करा,९४ कारण हे अपवित्र आहेत व त्यांचे खरे ठिकाण नरक आहे. - जे त्यांच्या कमाईच्या मोबदल्यात त्यांच्या नशिबी येईल.

(९६) ते तुमच्यासमोर शपथा वाहतील जेणेकरून तुम्ही यांच्याशी प्रसन्न व्हावे. वास्तविकत: तुम्ही यांच्याशी प्रसन्न झाला तरी अल्लाह कदापि अशा अवज्ञाकारी लोकांशी प्रसन्न होणार नाही.

(९७) हे बदावी अरब द्रोह (कुप्रâ) व कपटाचार (निफाक) दांभिकतेत अधिक कठोर आहेत व यांच्याबाबतीत या गोष्टीची शक्यता जास्त आहे की त्या धर्माच्या मर्यादापासून अपरिचित असतील जो धर्म अल्लाहने आपल्या पैगंबरावर अवतरला आहे.९५ अल्लाह सर्वकाही जाणणारा व बुद्धिमान आहे. 

(९८) या बदावींमध्ये असे असे लोक उपस्थित आहेत जे अल्लाहच्या मार्गात काही खर्च करतात तर त्याला आपल्यावर जबरदस्तीचा भुर्दंड समजतात९६ आणि तुमच्याबाबतीत आपत्तीची वाट पाहात आहेत (की तुम्ही एखाद्या चक्रात अडकावे तेव्हा त्यांनी आपल्या मानगुटीवरील या व्यवस्थेच्या ताबेदारीचे जू झुगारावे ज्यात तुम्ही त्यांना जखडले आहे.) वास्तविकपणे दुष्टतेचे चक्र खुद्द यांच्याच मानगुटीवर आहे. आणि अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो. 

(९९) आणि याच बदावींमध्ये काही लोक असेसुद्धा आहेत जे अल्लाह व परलोकवर श्रद्धा ठेवतात, आणि जे काही ते खर्च करतात त्याला अल्लाहपाशी सान्निध्य व त्याच्या पैगंबराकडून कृपेची दुआ मिळविण्याचे साधन बनवितात. होय, ते अवश्य त्यांच्याकरिता जवळीकीचे साधन आहे. आणि अल्लाह अवश्य त्यांना आपल्या कृपेत दाखल करील. नि:संशय अल्लाह क्षमाशील व दया दाखविणारा आहे.

(१००) ते मुहाजिर व अन्सार ज्यांनी सर्वप्रथम ईमानचा संदेश स्वीकारण्यात पुढाकार घेतला व तसेच जे प्रांजळपणे नंतर त्यांच्या मागे आले, अल्लाह त्यांच्याशी प्रसन्न झाला व ते अल्लाहशी प्रसन्न झाले. अल्लाहने त्यांच्याकरिता अशा बागा उपलब्ध केल्या आहेत ज्यांच्या खालून कालवे वाहात असतील व ते त्यांच्यात सदैव राहतील, हेच महान यश आहे.

(१०१) तुमच्या सभोवती जे बदावी राहतात त्यांच्यापैकी बरेचसे दांभिक आहेत आणि याचप्रमाणे खुद्द मदीनावासियांतसुद्धा दांभिक आहेत जे दांभिकपणामध्ये पटाईत झालेले आहेत. तुम्ही त्यांना ओळखत नाही, आम्ही त्यांना ओळखतो.९७ जवळ आहे ती वेळ जेव्हा आम्ही त्यांना दुहेरी शिक्षा देऊ,९८ मग ते जास्त मोठ्या शिक्षेसाठी परत आणले जातील. 

(१०२) आणखी काही लोक आहेत ज्यांनी आपल्या चुका कबूल केल्या आहेत. त्यांचे कृत्य मिश्रित आहे, काही चांगळे आहेत तर काही वाईट. अशक्य नव्हे की अल्लाह यांच्यावर पुन्हा मेहरबान होईल कारण अल्लाह क्षमाशील व दया दाखविणारा आहे. (१०३) हे पैगंबर (स.)! तुम्ही यांच्या मालमत्तेतून दान घेऊन यांना शुद्ध करा आणि (सद्वर्तनाच्या मार्गात) यांना प्रोत्साहित करा आणि यांच्यासाठी कृपेची दुआ करा कारण तुमची दुआ यांच्यासाठी समाधानकारक ठरेल, अल्लाह सर्वकाही ऐकतो व जाणतो.




९३) अशी माणसे जी इस्लामी जीवनपद्धतीच्या  सेवाकार्यात मग्न आहेत व बेचैन आहेत आणि एखाद्या खऱ्या विवशतेमुळे किंवा साधनाअभावी सेवा करू शकले नाहीत. अशा स्थितीत त्यांना अतिव दु:ख होते जसे एखाद्या भौतिकवादीला नोकरी गमावण्याचा किंवा भौतिक लाभापासून वंचित राहण्याचे दु:ख होते. त्यांचा उल्लेख अल्लाहजवळ सेवा करणाऱ्यातच होईल जरी त्यांनी प्रत्यक्षात सेवा केली नसेल. म्हणजे त्यांनी हातापायांनी जरी काम केले नसेल तरी मनापासून सेवेतच गुंतून राहिले होते. तबुकच्या युद्धानंतर परतताना पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपल्या साथीदारांना सांगितले, ``मदीनेत काही लोक असे आहेत ज्यांनी तुमच्या सहवासात घाटी पार केली आणि प्रत्येक ठिकाणी तुमच्याबरोबर होते.'' साथीदारांनी आश्रर्यचकित होऊन विचारले, ``काय मदीनेत राहूनसुद्धा?'' उत्तरात सांगितले गेले, ``होय, मदीना येथेच राहून कारण विवशतेने त्यांना रोखून धरले अन्यथा ते घरी थांबणाऱ्यांपैकी नव्हतेच.''

९४) पहिल्या वाक्यात ``न पाहण्यासारखे करणे'' म्हणजे क्षमा करणे आहे आणि दुसऱ्या वाक्यात संबंध तोडणे असा आहे. ते तर इच्छितात की तुम्ही त्यांच्याशी संघर्ष करू नये परंतु चांगले आहे की तुम्ही त्यांना दुर्लक्षित करावे आणि समजावे की तुम्ही एकमेकांशी संबंध विच्छेद करुन आहात.

९५) जसे पूर्वी आम्ही उल्लेख केला आहे, येथे अरब `बदावी' म्हणजे अरब खेडूत आहेत जे मदीना शहरालगत चोहोबाजूला राहात होते. हे मदीना शहरात एका सुदृढ शक्तीचा उदय पाहून प्रथम प्रभावित झाले. नंतर इस्लाम आणि अनेकेश्वरत्वाच्या संघर्षात काही काळ अवसरवादी बनून राहिले आणि स्वार्थसिद्धी वर्तन स्वीकारून होते. नंतर इस्लामी राज्यसत्ता हिजाज आणि नज्दच्या मोठ्या भागात पसरली आणि विरोधी कबिल्यांची शक्ती कमी होत गेली. अशा स्थितीत या `बदावी' लोकांनी आपले हित यातच जाणले की इस्लामच्या छत्रछायेखाली यावे. परंतु यांच्यापैकी कमी लोक असे होते ज्यांनी इस्लामला सत्य जीवनपदध्ती म्हणून मनापासून स्वीकारले होते आणि इस्लामच्या निकडींची पूर्तता करण्यास तत्पर होते. अधिकतर `बदावी' इस्लाम स्वीकारण्यास निष्ठा आणि आस्थापूर्वक तयार नव्हते तर निव्वळ स्वार्थापोटी त्यांनी इस्लामचा स्वीकार केला होता. त्यांची प्रकट इच्छा हीच होती की त्यांच्या वाट्याला फक्त लाभ यावे जे सत्तेत असलेल्या सदस्यांना प्राप्त् होतात. परंतु इस्लामची नैतिक बंधन, नमाज, रोजे यांची बंधने तसेच जकात देणे, अनुशासन व व्यवस्थेत ते इतिहासात प्रथमत: कसले गेले होते. हे सारे त्यांना अत्यंत अप्रिय होते. तसेच  तन, मन, धन अल्लाहच्या मार्गात अर्पण करणे इ.पासून वाचण्यासाठी अनेक बहाणेबाजी करीत होते. त्यांना सत्याशी काहीच घेणे देणे नव्हते. तसेच आपली खरी सफलता कशात आहे याची त्यांना पर्वा नव्हती. त्यांना आर्थिक लाभ, आराम, जमीनजुमला आणि उंट, शेळयामेंढ्या आणि संपत्तीशी अतिप्रेम होते. ते अशाप्रकारची श्रद्धा ठेवत होते जशी पीर फकिरांसाठी ठेवली जाते. त्यांच्यापुढे नजराणे, नैवेद्य व नियाज दिली जाते आणि याच्या मोबदल्यात पीर व संत त्यांच्या कमाईत बरकत, संकटापासून सुरक्षा तसेच इतर कामांसाठी गंड्डे, दोरे व ताविज (ताईत) देतात. आणि त्यांच्यासाठी दुवासुद्धा करतात. परंतु अशा ईमान व आस्था धारण करण्यासाठी पूर्ण जीवनव्यवहाराला नैतिकता आणि आदेशांच्या आधीन करून एका विश्वव्यापी सुधारात्मक मिशनसाठी तन, मन, धन अर्पण करण्यास ते तयार नव्हते. त्यांच्या या दशेचा येथे उल्लेख आला आहे. शहरवासीयांपेक्षा हे खेडूत अधिक धोकेबाज वर्तन ठेवून होते आणि सत्याला विरोध करण्याची अधिक शक्ती त्यांना प्राप्त् होती. याचे कारण म्हणजे शहरातील लोक ज्ञानी आणि सत्यवादी लोकांच्या सहवासात राहून इस्लामी जीवनपद्धतीच्या आदेशांना आणि सीमांना ओळखतात. परंतु हे खेडूत जीवनभर एक आर्थिक पशु म्हणून रात्रंदिवस उपजीविकेच्या चक्करमध्ये फसलेले असतात. आपल्या पशुवत जीवनावश्यकतेपेक्षा दुसरीकडे लक्ष देण्याची सवड त्यांना मिळत नाही. म्हणून इस्लामी जीवनपद्धतीशी अनभिज्ञ ते राहत होते. पुढे आयत १२२ मध्ये त्यांच्या या रोगावर उपाय सांगितला गेला आहे.

येथे या तथ्याकडे इशारा करणे अनुचित होणार नाही की या आयतींचे अवतरण झाल्यानंतर सुमारे दोन वर्षांनी माननीय अबू बकर (रजि.) यांच्या आरंभिक खिलाफत काळात इस्लामी जीवनपद्धतीपासून विमुख होणे आणि जकात न देण्याने तुफान उठले होते त्याचे महत्त्वाचे कारण या आयतमध्ये दिले आहे.

९६) म्हणजे जी जकात यांच्याकडून वसूल केली जाते त्याला ते एक दंड समजतात. प्रवाशांचा सत्कार आणि आदरातिथ्य जे दायित्व त्यांच्यावर टाकले गेले आहे ते त्यांना खटकते. एखाद्या युद्धाप्रसंगी ते मदत करतात तेव्हा आपल्या हार्दिक भावनेने आणि अल्लाहला प्रसन्न करण्यासाठी देत नाहीत तर अनास्थेने आणि आपल्या निष्ठेचा पुरावा देण्यासाठी देतात.

९७) आपल्या द्रोहाला लपविण्यासाठी ते इतके अभ्यस्त झाले होते की स्वत: पैगंबर मुहम्मद (स.) आपल्या उच्च् श्रेणीचा दूरदृष्टीपणा आणि विचार ठेवूनसुद्धा त्यांना ओळखू शकले नाहीत.

९८) दुप्पट शिक्षेने तात्पर्य म्हणजे एकीकडे जगाच्या प्रेमात पडून ईमान आणि निष्ठेच्या जागी धोकेबाजी आणि द्रोह त्यांनी स्वीकारले. हे जग त्यांच्या हातून निसटणारच आणि ही संपत्ती, प्रतिष्ठा व आदराच्या जागी उलटे अपमान आणि असफलता मिळेल. दुसरीकडे ज्या मिशनला हे विफल करू इच्छितात आणि त्याविरुद्ध चालबाजी करतात, त्यांच्या इच्छा आणि प्रयत्नाविरुद्ध त्यांच्या डोळयांसमोर ती चळवळ  समृद्ध होईल.


होय! स्त्री आणि पुरूषांची बौद्धिक क्षमता वेगळी असते हे आधुनिक विज्ञानाने सिद्ध केलेले आहे. मात्र सर्वसाधारण समाज असाच आहे की, स्त्री-पुरूषांची बौद्धिक क्षमता सारखीच असते, काही अज्ञानी लोक स्त्रीच्या बौद्धिक क्षमतेला पुरूषापेक्षा कमी समजतात. आपल्याला आश्चर्य वाटेल की हे दोन्ही विचार चुकीचे आहेत. ते कसे हे आज आपण पाहू. 

19 व्या शतकात ब्रिटनमध्ये एक बुद्धिजीवी होऊन गेला. त्याचे नाव एडवर्ड विल्यम लेन (1801 ते 1876) असे होते. तो एक लेखकच नव्हता तर तत्वज्ञानी, चिंतक, भाषांतरकार आणि शब्दकोषाचा रचनाकार होता. लेनने कुरआनचा सखोल अभ्यास केला होता. त्यासाठी त्यांनी इजिप्तमध्ये कित्येकवर्षे वास्तव्य केले होते. शब्दकोषासाठी लागणारा डेटा जमा करण्यासाठी त्याने अरबी भाषाही आत्मसात केली होती. कुरआनचे महात्म्य कमी करण्यासाठी त्याने एक पुस्तक लिहिले होते ज्याचे नाव ’’सिले्नशन्स फॉर्म द कुरआन’’ असे आहे. हे पुस्तक 1843 साली प्रसिद्ध झाले.  त्यात त्याने असा सिद्धांत मांडला की,’’द फॅटल पॉईंट इन इस्लाम इज द डिग्रेडेशन ऑफ वूमन’’ याचा अर्थ कुरआनची सर्वात मोठी (अल्लाह क्षमा करो) चूक ही आहे की, कुरआनने महिलांचा सन्मान कमी केला आहे. कुरआनमध्ये महिलांना बौद्धिकदृष्ट्या दुय्यम स्थान देण्यात आलेले आहे. (संदर्भ : पान क्र. 90). 

आपल्या या दाव्याच्या पुष्ट्यार्थ त्याने कुरआनच्या एका आयातीचा पुरावा म्हणून उपयोग केला. ती आयत म्हणजे, ’’ हे श्रद्धावानांनो! जेव्हा एखाद्या ठराविक मुदतीसाठी तुम्ही आपापसांत कर्जाची देवाणघेवाण कराल, तेव्हा ते लिहून घेत चला. उभयपक्षांमध्ये एका माणसाने न्यायाचे दस्तऐवज लिहावे. ज्याला अल्लाहने लिहिण्या-वाचण्याची क्षमता प्रदान केली आहे त्याने लिहिण्यास नकार देता कामा नये. त्याने लिहावे आणि दस्तऐवजाचा मजकूर त्याने सांगावा ज्याच्यावर जबाबदारी येते (अर्थात कर्ज घेणारा), आणि त्याने अल्लाहच्या क्रोधाचे भय बाळगले पाहिजे की जो करार झाला असेल त्यात काहीही कमी-जास्त करू नये. परंतु जर कर्ज घेणारा स्वतः नादान किंवा दुर्बल अथवा मजकूर सांगण्यालायक नसेल तर त्याच्या मुखत्याराने न्यायसंगतरीतीने मजकूर सांगावा. नंतर आपल्या पुरुषांपैकी दोघांची यावर साक्ष घ्या.    

जर दोन पुरुष नसतील तर एक पुरुष आणि दोन स्त्रिया असाव्यात म्हणजे जर एखादी विसरली तर दुसरीने तिला आठवण करून द्यावी.(संदर्भ : कुरआन सुरे बकरा: आयत नं. 282)

वरील आयातीचा आधार घेऊन त्याने असा सिद्धांत मांडला की, इस्लामिक इव्हिडन्स अ‍ॅ्नट (इस्लामचा पुराव्याविषयक कायदा) मध्ये दोन महिलांच्या साक्षीला एक पुरूषांची साक्षी समान समजले गेले आहे आणि ही महिलांच्या बौद्धिक क्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे करणारी गोष्ट आहे. कुरआनमध्ये महिलांच्या बौद्धिक क्षमतेचे आकलन दुय्यम दर्जाचे गणले गेलेले आहे. हा महिलांचा अपमान आहे. 

सकृतदर्शनी लेनचा हा दावा पटण्यासारखा आहे. त्यामुुळे पुस्तक बाजारात आल्यानंतर त्याच्यावर लोकांच्या उड्या पडणे स्वाभाविक होते आणि झालेही तसेच. हे पुस्तक त्या काळातील बेस्ट सेलर ठरले आणि समस्त युरोपने एकमताने हे ठरवून टाकले की, इस्लाम फक्त स्त्री विरोधीच धर्म नसून तो विज्ञान विरोधीही आहे. लोकांच्या अज्ञानात भर घालणारा आहे. लोकांनाही लेनचा हा दावा पटला. कारण त्यांना स्त्री आणि पुरूष यांच्यातील बौद्धिक क्षमतेत कुठलाच फरक आढळून येत नव्हता. अनेक महिला महत्त्वाच्या पदावर कार्यरत असल्याचे त्यांना अवतीभोवती दिसत होते. एवढेच नव्हे तर अनेक महिला अशा उच्चपदावर विराजमान होत्या जिथपर्यंत पोहोचणे पुरूषांनाही कठीण होते. अशा परिस्थितीत कुरआनचा हा आदेश की, आर्थिक व्यवहार करताना एका पुरूषाची साक्ष दोन स्त्रीयांच्या बराबर आहे, कोणालाही रूचणारा नव्हता, पचणारा तर नव्हताच नव्हता. अगदी दीडशे वर्षापर्यंत असेच समजले गेले की, अ‍ॅडवर्ड लेनचा दावा खरा आणि कुरआनचा आदेश चुकीचा आहे. 

तसे पहाता ब्रिटिश हे बऱ्याच अंशी प्रामाणिक वृत्तीचे असतात. कालौघात जेव्हा त्यांच्यापैकी काही प्रामाणिक लोकांच्या लक्षात ही बाब आली की, त्यांच्या समाजात घटस्फोटाचे प्रमाण सातत्याने वाढत आहे. या उलट मुस्लिम समाजामध्ये तोंडी घटस्फोट देण्याची परवानगी असतानासुद्धा त्यांच्यात त्याचे प्रमाण फार कमी आहे, असे का? ही बाब त्यांना बुचकाळ्यात टाकणारी होती. त्यांना हे ही माहित होते की, साधारणपणे ब्रिटिश तरूण-तरूणी लग्नाआधी डेटिंग करतात. एकमेकांना समजून घेतात व नंतर विवाह करतात. हा सरळ-सरळ प्रेमविवाह असतो. तरीसुद्धा लग्नानंतर काही वर्षातच नव्हे तर अनेक प्रकरणांत काही महिन्यातच घटस्फोट का होत आहेत? या मागे स्त्री पुरूषांचा बौद्धिक फरक तर कारणीभूत नाही ना? झाले! बोलून चालून ब्रिटिशच ते ! लागले कामाला. त्यांनी स्त्री-पुरूषांच्या बौद्धिक क्षमतेची नव्याने चिकित्सा करण्यास सुरूवात केली. अनेक विद्यापीठात हा विषय पीएचडीसाठी निवडला गेला आणि शेवटी त्यांच्या लक्षात आले की, स्त्री पुरूषांची बौद्धिक क्षमता बरोबर जरी असली तरी ती सारखी नसते. आणि त्या दोहोंमधील फरक ईश्वरीय (नैसर्गिक) असल्यामुळे त्यात बदलही करता येत नाही. या शोधाअंती त्यांच्या लक्षात आले की, पुरूष हा सिंगल ट्रॅक माईंडेड असतो. तर स्त्री ही मल्टिट्रॅक माईंडेड असते. या शोधाचा संदर्भ 29 ऑ्नटोबर 2013 साली सार्वजनिक करण्यात आला. जो की, बीबीसीच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. त्याचा मतितार्थ खालीलप्रमाणे, 

Women 'better at multitasking' than men, study finds It is not a myth- women really are better than men at multitasking, at least in certain cases, a study says... says co-author Dr Gijbert Stoet, of the University of Glasgow, "Multitasking is getting more and more important in the office, but it's very distracting, all these gadgets interrupting our workflow''

www.bcc.com/news/science-environment-24645100 (accessed on 07.04.2021)

या शोधाप्रमाणे पुरूष हा सिंगल ट्रॅक माईंडेड असल्यामुळे तो एका वेळी एकच काम करू शकतो मात्र स्त्री ही मल्टीट्रॅक माईंडेड असल्यामुळे एकाच वेळी अनेक कामे करू शकते. याचा अर्थ स्पष्ट आहे, पुरूष सिंगल ट्रॅक माईंडेड असल्यामुळे लिहून घेतलेला आर्थिक व्यवहार पूर्णपणे तो आत्मसात करू शकतो. म्हणून त्याची एकट्याची साक्ष पुरेशी असते. याउलट स्त्री मल्टिट्रॅक माईंडेड असल्याकारणाने एखाद्या वेळेस असेही होऊ शकते की, झालेला व्यवहार ज्याची तिला साक्ष द्यावयाची आहे, पूर्णपणे तिच्या लक्षात राहणार नाही. म्हणून दोन स्त्रियांची साक्ष अनिवार्य करण्यात आलेली आहे. ज्या योगे एकीला जर काही तपशीलाचा विसर पडला तर दूसरी तिची पूर्तता करू शकेल. या मागे स्त्रीला बौद्धिक दृष्ट्या कमी लेखण्याचा दुरान्वयेही संबंध नाही. आणि म्हणून स्त्रीची बौद्धिक क्षमता पुरूषापेक्षा कमी असते असे समजण्याचे ही काहीएक कारण नाही. उलट स्त्रीला तिच्या एकाच वेळी निभवाव्या लागणाऱ्या वेगवेगळ्या जबाबदाऱ्या नीट पार पाडता याव्यात म्हणून तिला ईश्वराने अष्टावधानी बनविलेले आहे. हा तर ईश्वराने स्त्रीला प्रदान केलेला सन्मान आहे. आणि ही बाब इतकी स्पष्ट आहे की, प्रत्येक घरात सहज अनुभवली जाऊ शकते. जरा सावध निरिक्षण करून पाहिल्यास आपल्या लक्षात येईल की, समजा एखादा पुरूष घरात आपल्या आवडीचे पुस्तक वाचत बसलेला असेल तर त्याला दारावरची बेल कोणी वाजविली तरी त्याची त्याला जाणीव होत नाही. उलट स्त्री स्वयंपाक घरात स्वयंपाक करीत असेल तरी शयन कक्षात मूल झोपेतून उठल्याची चाहूल तिला सहजपणे लागते. 

सुबहानल्लाह ! (ईश्वर पवित्र आहे.) सर्वश्रेष्ठ रचनाकार आहे. अलहम्दुलिल्लाह (अल्लाहचे)  आभार की पुन्हा एकदा सिद्ध झाले की, कुरआन विज्ञान विरोधी नाही तर आपले सिद्धांत सिद्ध करण्यासाठी विज्ञानाला कुरआनाचा आधार घ्यावा लागतो. म्हणून कोणी मान्य करो अथवा न करो सत्य एकच आहे ते म्हणजे देअर इज नो वे बट इस्लाम.

(दुःख फक्त एकाच गोष्टीचे वाटते की स्त्रीयांच्या बौद्धीक क्षमतेसंबंधिचा प्रश्न इंग्रजांनाच पडला व त्याचे उत्तरही त्यांनीच शोधून काढले. मुस्लिमांपैकी कोणी नव्हे.)

- एम.आय.शेख



प्रेषित मुहम्मद सल्ललाहु अलैही व सल्लम यांनी सांगितले की, मुस्लिमांच्या घरांमध्ये सर्वात अधिक चांगले घर ते आहे ज्यात एखादे अनाथ बालक असावे आणि त्याच्याशी चांगले वर्तन केले जात असावे आणि मुस्लिमांचे सर्वाधिक वाईट घर ते आहे ज्यात एखादा अनाथ असावा आणि त्याच्याशी वाईट वर्तन केले जात असावे (संदर्भ: अबुल हुरैरा (र). इब्ने माजा)

कोरोनाच्या महामारीने अनेकांना अनाथ व्हायला भाग पाडले आहे. देशात कोरोनाच्या दोन्ही लाटेत आतापर्यंत सरकारी आकड्यानुसार 4.03 लाख जणांचा मृत्यू झाला असून, एकट्या महाराष्ट्रात 1.23 लाख लोक मृत्यूमुखी पडले आहेत. प्रत्यक्षात हा आकडा यापेक्षा कितीतरी जास्त असावा!  अचानक आलेल्या या कोरोनाच्या दुहेरी लाटेमुळे अनेकांच्या घरातील कर्तेधर्ते पालक मरण पावल्यामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. अनेकांचे आई-वडिल दोन्हीही गेल्याने मुले अनाथ झाली आहेत. तसेच पती गेल्याने महिला विधवा झाल्या आहेत. इन्स्टिट्यूट ऑफ इकॉनॉमिक ग्रोथच्या सर्व्हेक्षणानुसार 63.10 टक्के पुरूष तर 36.90 टक्के स्त्रियांचा मृत्यू झाला आहे. याचा अर्थ पुरूषांच्या मृत्यूचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनाथ आणि विधवा होण्याचे प्रमाणही चिंताजनक आहे. या कारणास्तव अनाथ व विधवा महिलांच्या पुनर्वसनासाठी विशेष प्रयत्न होणे गरजेचे आहे. नुकतेच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी म्हटले आहे की, ‘कोरोना’ने अनेक कुटुंबांवर झालेले परिणाम हे भयंकर आहेत. ज्यांच्या मागे आर्थिक पाठबळ नाही अशा अनाथ मुलांचा आणि विधवांचा प्रश्न त्यामुळे गंभीर झाला आहे. त्यांच्या समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकारनं काही उपाय योजले असले, तरी तळागाळातल्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी समाजाने संघटित प्रयत्न करणे आवश्यक आहे. विधवा स्त्रियांचा आत्मविश्वास वाढविण्यासाठी राज्यभरात स्थानिक पातळीवर त्यांच्यासाठी  ‘कम्युनिटी सपोर्ट ग्रुप्स’ (समूह आधार केंद्र) तयार करणं, व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षण देत त्यांना अर्थसाक्षर करणं आणि त्यांचं समुपदेशन करणं या त्रिसूत्रीचा  अवलंब करणं अत्यंत गरजेचं आहे असे त्या म्हणाल्या. 

मुव्हमेंट फॉर पीस अँड जस्टीस फॉर वेलफेर आणि आयटा शिक्षक संघटनेने लातूर जिल्ह्यात अनाथांची संख्या जमा करण्याचा प्रयत्न सुरू केला असून, त्यांना शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी प्रयत्न केले जात आहे. लातूर व औसा शहरात  116 अनाथ बालके आढळून आली आहेत. अजून पूर्ण जिल्ह्याचा डाटा जमा झाला नाही. फक्त दोन शहरातून 116 बालके आढळली असली तरी हा आकडा फार मोठा असल्याचे सामाजिक कार्यकर्तेर् रजाऊल्लाह खान म्हणाले.  बालसंगोपन योजनेतून अनाथांना महिनाकाठी 1100 रूपये मिळतात. त्यासाठी जिल्हा महिला बालविकास विभाग येथे अनाथांचे फार्म भरून नोंद करणे गरजेचे आहे. ज्यांना याबद्दल अधिक माहिती व फॉर्म हवे आहेत त्यांनी 9326080740 या व्हॉटस्अ‍ॅप नंबरवर मॅसेजद्वारे संपर्क करावा. खान म्हणाले, अनेक योजना आहेत मात्र आम्ही सध्या बालसंगोपन या योजनेवर काम करत आहोत. ज्याचा फायदा आम्ही अनाथांना पोहोचवित आहोत. असे कार्य राज्यभरात प्रत्येक ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.    

मंत्री यशोमती ठाकूर यांनी सूचविलेले उपाय हे देखील फार महत्त्वपूर्ण आहेत. ’’त्या म्हणतात, 21 व्या शतकातील गरजेच्या असलेल्या व्यावसायिक कौशल्यांचं प्रशिक्षण देणं हे अनिवार्य ठरतं. जेणेकरून या स्त्रियांना दीर्घकालीन आर्थिक घडी बसवण्यात यश मिळेल आणि एकदा त्यांची आर्थिक घडी नीट बसली की मग हळूहळू त्यांची कौटुंबिक घडीदेखील बसायला मदत होईल. म्हणून समाजातील कौशल्यविकासात काम करणाऱ्या विविध घटकांनी एकत्र येऊन यावर उपाययोजना केल्यास त्याचा नक्की फायदा होईल. अचानक खांद्यावर पडलेली जबाबदारी पेलण्याची तयारी किंवा तेवढी ताकद प्रत्येक स्त्रीमध्ये असेलच असंही नाही. त्यांना या गोष्टीचा प्रचंड मानसिक ताण येऊ शकतो. त्यामुळे या स्त्रियांचं समुपदेशन करणं अतिशय गरजेचं आहे. योग्य समुपदेशन आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास त्या निश्चित त्यांच्यासमोर उभ्या राहिलेल्या या पहाडासामान समस्येवर योग्य तोडगा काढून यशस्वीरीत्या मार्गक्रमण करत राहातील. याचबरोबर तरुण मुलामुलींनी एकत्र येऊन महाराष्ट्रात ठिकठिकाणी स्थानिक पातळीवर या स्त्रियांसाठी ‘कम्युनिटी सपोर्ट ग्रुप्स’ (समूह आधार केंद्र) तयार केले पाहिजेत. या केंद्रांमधील वेगवेगळ्या क्रियाकल्पांमुळे या स्त्रियांचा आत्मविश्वास आणि मनोबल वाढेल. या केंद्रांद्वारे त्यांना एकमेकींशी संवाद साधून एकमेकींचे प्रश्न समजून घेता येतील व आपापल्या वैयक्तिक अनुभवांवरून त्यावर एकमेकींना उपाय सुचवणं सोपं होईल, तसंच या केंद्रांद्वारे त्यांना योग्य ते प्रशिक्षणदेखील दिलं जाऊ शकेल. तरुण-तरुणींबरोबर राज्यातील महिला बचत गटांनी पुढे येऊन हा आधार गटांचा उपक्रम राबवल्यास त्याची परिणामकारकता वाढीस लागेल. बचत गटातील स्त्रियांना आर्थिक, कौशल्यविषयक व   इतर अनेक महत्त्वाच्या विषयांवर आपल्या अनुभवांद्वारे आधार गटातील स्त्रियांना मार्गदर्शन करून उत्तम प्रकारे सहाय्य करता येऊ शकेल.

या समस्यांमधून चांगला तोडगा हवा असेल तर आज गांधीजींनी शिकवलेल्या विकेंद्रीकरणाच्या तत्त्वांचं पालन करणं गरजेचं आहे. एकाच मोठ्या उपक्रमापेक्षा आपण सर्वांनी जर ‘हायब्रीड’ पद्धतीनं काही छोटे- मोठे उपक्रम राबविण्याचे धोरण अवलंबविले तर नक्कीच आपल्याला समाजात आमूलाग्र बदल घडवून आणून या स्त्रियांना व त्यांच्या कुटुंबाला सहाय्य करणं सोपं जाईल. सामाजिक बदल घडवायचा असेल तर मोठ्या मोठ्या गोष्टीच केल्या पाहिजेत असं नाही. आपण आपल्या शेजारी राहाणाऱ्या किंवा आपल्या जवळपास राहणाऱ्या कोरोनाग्रस्त कुटुंबांना जरी आपापल्या परीनं मदत केली तरी त्यामुळे समाजात मोठ्या प्रमाणात सकारात्मक बदल घडवून आणता येतील, असेही श्रीमती ठाकूर म्हणाल्या.’’

अनाथाबद्दल प्रेषित मुहम्मद (सल्ल.) यांनी अनुयायांना आवाहन करताना म्हटले आहे की, ’’मी आणि अनाथांचा पालक तसेच इतर गरजवंतांचा पालक आम्ही दोघे जन्नतमध्ये अशा प्रकारे असू’’ हे सांगून प्रेषित (सल्ल.) यांनी मधले बोट आणि तर्जनीच्या बोटाद्वारे इशारा केला आणि या दोन्ही बोटांच्या दरम्यान थोडेसे अंतर राखले (बुखारी, सुहैल बिन सईद (र.),

प्रेषित (सल्ल.) यांनी सांगितले, मुस्लिमांच्या घरामध्ये सर्वात अधिक चांगले घर ते आहे, ज्यात एखादे अनाथ बालक असावे आणि त्याच्याशी चांगले वर्तन केले जात असावे. (इब्ने माजा अबु हुरैरा र.)

एका माणसाने प्रेषित सल्ल. यांच्या जवळ आपल्या हृदयाची कठोरता व सक्तीचा उल्लेख केला. तेव्हा प्रेषित (सल्ल.) यांनी सांगितले की, अनाथाच्या डोक्यावर स्नेह, प्रेमाचा हात फिरवा आणि दीन दुबळ्यांना खाऊ घाला.’’ (मिश्कात, अबु हुरैरा रजि.)

प्रेषित सल्ल. यांनी असेही सांगितले की, ’’हे माझ्या अल्लाह ! मी दोन कमजोर स्वरूपाच्या लोकांच्या ह्नकास आदरणीय ठरवतो. म्हणजे अनाथ आणि पत्नीच्या हक्कास.’’ (निसाई खालीद बिन उमर (र.))

पैगंबर मुहम्मद सल्ल. यांच्या वरील वचनांनी कळते की, अनाथांची सेवा करण्यास प्रत्येकाने प्राधान्य दिले पाहिजे. अनेक महाभुती अशाही असतात की त्या अनाथांचे संगोपन करतात मात्र त्यांच्यापासून अधिक लाभ उकळण्याचा प्रयत्न करतात. त्याबद्दल कुरआनमध्ये आले आहे की, ’’आणि अनाथांचे धन व्यर्थ खर्चासह खाऊ नका आणि घाई माजवित त्यांच्या तरूण होण्याच्या भयाने आणि जो श्रीमंत असेल तर त्याने अनाथाचा माल खाण्यापासून फार अलिप्त राहिले पाहिजे, आणि जो गरीब असेल तर त्याने अनाथांच्या धनातून नियमानुसार खाल्ले पाहिजे.’’

एकंदर आजची परिस्थिती पाहता अनाथ होणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. विधवांची संख्या वाढली आहे. अशा परिस्थितीत दोघांचेही पुनर्वसन होणे गरजेचे आहे. तसेच ज्या महिला विधवा झाल्या आहेत. ज्यांच्या कुटुंबात त्यांची देखभाल करणारे कोणी नाहीत, अशांसाठी पुनर्विवाहासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. जेणेकरून त्यांचे आयुष्य सुखी जाईल. आजही समाजात विधवा महिलांना नीट वागविले जात नाही. माहेरकडील मंडळीही काही दिवस त्यांच्याशी नीट वागतात मात्र काही वर्षानंतर त्यांच्याशी अबोला धरतात. परिणामी, अशा महिला आत्महत्या करण्याकडे वळतात व  आपले आयुष्य संपवून टाकतात. त्यामुळे सामाजिक संघटनांनी विधवा महिलांसाठी वधू-वर मेळावे आयोजित करून त्यांचे पुनर्वसन करणे गरजेचे आहे.

इस्लाममध्ये शारीरिक आणि आर्थिक ऐपत असणाऱ्या पुरूषांना एकापेक्षा जास्त आणि चार पर्यंत लग्न करण्याची जी तरतूद केलेली आहे, त्याची अंमलबजावणी करण्याचीही खरी वेळ आली. हिंदू बांधवांचा पुनर्विवाह टाळण्याकडे कल असतो. त्यासाठी त्यांची धार्मिक मान्यता आडवी येते. भारतात मुस्लिम समाज अल्पसंख्यांक असून, बहुसंख्यांच्या चालीरितीचा त्यांच्यावर नकळत परिणाम होत असतो. विधवांचा पुनर्विवाह हा एक असाच विषय आहे, जरी वर्जित नसला तरी दुर्लक्षित जरूर आहे. एरव्हीही समाजामध्ये अनेक कारणांमुळे महिलांची संख्या ही पुरूषांच्या संख्येपेक्षा नेहमीच जास्त असते. अशा परिस्थितीत ज्या अतिरिक्त स्त्रिया असतात त्यांच्या लैंगिक आणि आर्थिक गरजा वैधरित्या पूर्ण करून त्यांना समाजामध्ये सन्मानाचा दर्जा पुन्हा बहाल करण्यासाठी विधवाच नव्हे तर परित्नत्या आणि घटस्फोटित महिलांच्या पुनर्विचाराचा गांभीर्याने विचार करूनच जमणार नाही तर क्षमताधारी सर्व पुरूषांनी पुनर्विवाह करण्याचा निश्चय केला पाहिजे. यात दोन प्रमुख अडचणी आहेत. एक दोन बायका असलेल्या पुरूषाकडे समाजामध्ये थोड्या कलुषित दृष्टीने पाहिले जाते व विवाहित महिलाच आपल्या घरात सवत आणण्यास कधीच तयार होत नाहीत. 

पहिल्या अडचणीकडे सपशेल दुर्लक्ष करून दुसरा विवाह केला जावू शकतो. मात्र सवतीचा प्रश्न सोडविणे थोडेसे अडचणीचे आहे. मात्र या संदर्भात इस्लामच्या उपदेशांसंबंधी समुपदेशन केले गेल्यास व विधवांच्या प्रश्नाचेे गांभीर्य विवाहित महिलांना समजावून सांगितल्यास व दूसरी स्त्री जरी घरात आली तरी त्यांच्यावर अन्याय होणार नाही, याचा विश्वास पतीने दिल्यास हा प्रश्नही मार्गी लागण्यास वेळ लागणार नाही. 

- बशीर शेख



स्त्री म्हटले की अन्याय सहन करणारी अशी परिभाषा सर्वमान्य झालेली आहे. अगदी त्रेतायुगापासून स्त्री वर अन्याय होत आहे आणि आजही तो कोणत्या ना कोणत्या मार्गाने चालूच आहे. स्त्री युगानयुगे अन्याय सहन करत आलेली आहे. जगाच्या पाठीवरील सर्वच राष्ट्रात तिच्यावर अन्याय होत आहेत. इतिहासात डोकावून पाहिले तर इराक, भारत, चीन, अरब प्रत्येक ठिकाणी तिच्यावर अन्याय व तिची अवहेलना व्हायची. यत्र नारिस्ते पूजेतम रमते तत्र देवता, असे म्हणणाऱ्या आणि मानणाऱ्या भारत देशांमध्ये स्त्रीला जिवंत जाळण्याची प्रथा होती. ग्रीकमध्ये तर स्त्रीला आत्मा आहे की नाही यावर वाद विवाद होते. स्त्री अगदी अन्यायाने ग्रासून गेली होती. स्त्रीला अधिकार किंवा हक्क हे शब्द सुद्धा माहित नव्हते. मात्र इस्लाम धर्माने स्त्रियांना अन्याय, अत्याचारापासून वाचविले व तिला न्याय दिला. स्त्रीवर होणाऱ्या अत्याचार व गुलामी विरुद्ध आवाज उठविला. 

रात स्त्रीच्या तीन स्पष्ट भूमिका असतात. आई, पत्नी व कन्या. इस्लामने या तिनी भूमिकांना अत्युच्च स्थान प्रदान केले आहे.

1.आईच्या रूपात स्त्रीचा दर्जा

      इस्लाममध्ये अल्लाह आणि पैगंबर यांच्या नंतर आईला सर्वोच्च दर्जा प्राप्त आहे. मुलांना आई-वडील दोघांशी सद्व्यवहार करण्याचा आणि आज्ञा पालनाचा आदेश देतो. कुराणमध्ये याचा उल्लेख आहे. आई आपल्या बालकास नऊ महिने पोटात वाढविते व दोन वर्षे आपले दूध पाजवीते. त्यामुळे आईचे आपल्यावर अनंत उपकार असतात. त्यामुळे असे म्हटले जाते की, आईच्या पायाखाली स्वर्ग आहे. मुहम्मद पैगंबरांनी तर आईच्या बाबतीत सद्व्यवहाराची ताकीदच केली आहे. माननीय अबू हुरैरा रजि. यांनी सांगितले की, एक इसम पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांच्याकडे आला व त्याने  पैगंबर (सल्ल.) यांना विचारले, माझ्या सद्व्यवहारास सर्वाधिक योग्य कोण आहे? पैगंबरांनी उत्तर दिले, तुझी आई! पुन्हा त्याने तोच प्रश्न दोन वेळेस विचारला. प्रेषितांनी दोन्ही वेळेस आईच सद्व्यवहारास अधिक पात्र असल्याचे सांगितले. व नंतर वडील असे म्हटले. अल्लाहने आईला खूप मोठे श्रेष्ठत्व बहाल केले आहे.

2. पत्नीच्या रूपात स्त्रीचा दर्जा 

इस्लाममध्ये स्त्रीचे स्वतंत्र अस्तित्व मान्य करण्यात आले आहे. इस्लामची अशी मान्यता आहे की, विवाहामुळे तिचे व्यक्तिमत्व पतीच्या व्यक्तिमत्त्वात विलीन होत नाही अथवा ती आपल्या पतीची सेविका वा दासी बनत नाही. पैगंबरांना त्यांच्या एका साथीदाराने पत्नीच्या अधिकारा बाबतीत विचारले असता पैगंबर (सल्ल.)  म्हणाले, जेव्हा तुम्ही भोजन कराल तेव्हा तिलाही भोजन द्या जेव्हा तुम्ही वस्त्रे परिधान कराला तेव्हा तिलाही वस्त्रे द्या. रागाच्या भरात तिला मारहाण करू नका तिला बरे वाईट बोलू नका तिच्याशी मतभेद विकोपाला गेल्यास तिला घरातून हाकलून न देता घरातच तिच्याशी अलिप्त रहा. जर तिची एखादी सवय वाईट वाटत असेल तर तिची दुसरी चांगली सवय कोणती आहे त्यावर लक्ष द्या. प्रेषित (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार उत्तम तोच आहे जो आपल्या पत्नीशी सत्यनिष्ठ आहे आणि चांगली वर्तणूक ठेवून आहे. 

3. कन्येच्या रूपात स्त्रीचा दर्जा

अज्ञानकाळात म्हणजेच इस्लामपूर्व काळात मुलांना गर्वाचे साधन आणि श्रेष्ठ संपत्ती समजत होते. परंतु मुली त्यांच्याकरिता क्लेशदायक होत्या. मुलींना ते लज्जास्पद समजत असत आणि त्यांच्याविषयी बोलताना देखील त्यांची मान शरमेने खाली जात होती इतकेच नव्हे तर कठोर हृदयी बाप आपल्या मुलींना जिवंत दफन करीत होते. पैगंबर मुहम्मद (सल्ल.) यांनी मुलींच्या पालनपोषणाची प्रेरणा दिली तसेच पैगंबर यांचे म्हणणे असे होते की, तुमच्यापैकी ज्याला तीन मुली अथवा तीन बहिणी असतील आणि तो त्यांच्याशी सद्व्यवहार करीत असेल तर त्याला स्वर्गात निश्चितच स्थान प्राप्त होईल. तसेच एका प्रसंगी अल्लाहचे पैगंबर मुहम्मद  (सल्ल.) यांनी सांगितले जी व्यक्ती दोन मुलींची त्यांच्या तारुण्यावस्थेपर्यंत पालनपोषण करील,  अंतिम निवाड्याच्या दिवशी ती व्यक्ती आणि मी अशा तऱ्हेने एकत्र येऊ असे म्हणून पैगंबरांनी दोन बोटे जुळवून दाखवली. तसेच मुलींशी घृणा करू नका त्या सहानुभूतीची प्रतिमा व अति मौल्यवान आहेत. (हदीस मसनद अहमद). पैगंबर (सल्ल.) यांच्या म्हणण्यानुसार ’’आपल्या त्या मुलीवर उपकार करा जी (वैधव्यामुळे अथवा घटस्फोट दिला गेल्यामुळे) तुमच्याकडे परत पाठविली गेली असेल आणि तुमच्याशिवाय दुसरा कोणीही तिचा पालक नसेल.’’

पैगंबर (सल्ल.) यांचे हे विचार ऐकूणच मन भरून येते. वरील नैतिक स्वरूपाचे अधिकार व उच्च सन्मान व प्रतिष्ठेचे ज्ञान इस्लामने मानवाला प्रदान केले आहेत. इस्लामी शिकवणीचा आढावा घेण्यात आला तर स्पष्टपणे एका स्त्रीचे अधिकार खालील प्रमाणे सांगितले आहेत.

1. एका महिलेस समाजात सन्मानाने जीवन व्यतीत करण्याचा अधिकार आहे. कुरआननेे हे अधिकार दिले आहेत. जो कोणी त्यांच्या या अधिकाराचे हनन करील त्यास अंतिम निवाड्याच्या दिवशी अल्लाहसमोर जवाब द्यावा लागेल.

2. इस्लामने शिक्षणाचा अधिकार पुरुष व महिला दोघांना फक्त प्रदानच केला नसून मुलींच्या शिक्षणावर विशेष लक्ष दिले आणि मुलींचे पालनपोषण त्यांचे शिक्षण प्रशिक्षण आणि उत्साहपूर्ण विवाह इत्यादी करणाऱ्यास स्वर्गाची शुभ सूचना दिली आहे. 

3. इस्लामने विवाहाच्या बाबतीत मुलींच्या परवानगीनेच होईल असे स्पष्ट सांगितले आहे. जोपर्यंत विधवा वा घटस्फोट मिळालेल्या महिलेचे मत प्राप्त होत नाही तोपर्यंत तिचा विवाह केला जाणार नाही आणि कुमारीकेची अनुमती घेतल्या शिवाय तिचा विवाह होणार नाही.

4. इस्लाममध्ये ’महेर’ दिला जातो. म्हणजेच लग्नामध्ये वराने वधूस द्यावयाची रक्कम. हा महिलेचा अधिकार आहे. महिलेला महेर दिलाच जातो तो देणे अनिवार्य राहील. महेर विना विवाह वैध नसेल. विवाह प्रसंगी पतीकडून पत्नीस धन, दागदागिने व संपत्ती देणे अनिवार्य आहे. तिची स्वतःची संपत्ती आहे. यास महेर म्हटले जाते. परंतु ते निश्चित करणे अनिवार्य असते. 

5. इस्लाममध्ये स्त्रीच्या पालनपोषणाची जबाबदारी विवाहापूर्वी पित्यावर विवाहानंतर तिच्या उपजीविकेची जबाबदारी पतीवर येते.  तसेच महत्त्वाची बाब म्हणजे जर पत्नी पतीच्या नातेवाईकांबरोबर एकत्र कुटुंबात राहू इच्छित असेल तर ती वेगळ्या घराची मागणी करू शकते हा तिचा वैधानिक अधिकार आहे. इस्लामने स्त्रीला व्यवसाय आणि उद्योग धंद्याचेे स्वातंत्र प्रदान केले आहे. स्त्रियांना वारसा हक्कांबाबत पुरुषांप्रमाणेच हक्क दिलेले आहेत. इज्जत व अब्रू प्रत्येक माणसाची मौल्यवान संपत्ती असते. इस्लामने स्त्रीस इज्जत व अब्रूचा हक्क प्रदान केला आहे. उत्तम चारित्र्यवान श्रद्धावंत भोळ्याभाबड्या स्त्रीयांच्या चारित्र्यावर आरोप करण्यास मनाई करण्यात आली आहे. याविरूद्ध इस्लामी कायद्यानुसार असे कठोर पाऊल उचलले आहे की जो कोणी एखाद्या स्त्रीवर व्याभिचार व चारित्र्य हिनतेचा मिथ्या आरोप करील त्याला 80 फटके मारले जावेत आणि कोणत्याही प्रकरणात त्याची साक्ष ग्राह्य धरले जाऊ नये. इस्लाम स्त्रीस समीक्षण व आपले मत व्यक्त करण्याचा देखील अधिकार प्रदान करतो. अशा प्रकारे वरील सर्व बाबीचे सूक्ष्म निरीक्षण केले तर इस्लाम धर्माने स्त्रियांवर होणारे अनेक अन्याय व अत्याचार दूर करून त्यांना प्रतिष्ठेचे व श्रेष्ठत्वाचे स्थान दिले आहे. 



कोरोना महामारीच्या काळात मृत पावलेल्यांच्या प्रती कोरडी संवेदना केंद्र व राज्य सरकारांनी देऊ नये तर कृतीत संवेदना दिली पाहिजे. कारण कोरोना महामारीच्या काळात अनेकांनी आप्त, नातेवाईक, भाऊबंद, मित्र-सवंगडी तर कोणी आईला गमावले तर कोणी वडील गमावला तर कोणी मुली-मुलांना गमावले, काहींचे संपूर्ण घरच उजाडले यांचे दु:ख संपूर्ण देशाला आहे यात दुमत नाही. परंतु अशा कठीण घडीला आर्थिक मदत अत्यंत जरूरी असते. कारण आज पैसा नाही तर काहीच नाही. याची पहल म्हणून केंद्र सरकारने १४ मार्च २०२० ला गृहमंत्रालयाने अधिसूचना जारी केली होती. त्यात नमूद केले होते की कोरोनाने मृत्यू झालेल्यांच्या परिवाराला ४ लाख रुपये देण्यात येईल. परंतु अवघ्या दहा दिवसांतच ४ लाख रुपये साहाय्यता देण्याची अधिसूचना केंद्र सरकारने मागे घेतली व यावर स्पष्टीकरण देवतांना सरकार सांगते की "प्राकृतिक आपदा" (भूकंपपीडित, पूरपिढीतांना, त्सुनामी) यांना आर्थिक मदत देण्यात येते. त्यामुळे कोरोना महामारी यात येत नाही. ही केंद्र सरकारची पळवाट अत्यंत दु:खद आणि चिंताजनक व हास्यास्पद वाटते.

आज देशातील प्रत्येक व्यक्ती अनेक (कर) टॅक्सच्या रूपाने सरकारच्या तिजोरीत आपले योगदान देत असतो. यातून देशाच्या विकासाचा मार्ग सुलभ होतो व यातूनच राजकीय पुढाऱ्यांचा खर्च सुद्धा होतो. परंतु जो व्यक्ती टॅक्सच्या रूपात सरकारच्या तिजोरीत अरबो रूपया जमा करतो व त्या व्यक्तीवर जेव्हा दु:खाचा डोंगर कोसळतो तेंव्हा सरकार बघ्याची भूमिका बजावून आर्थिक मदत न देता पळवाटा काढत असल्याचे केंद्र सरकारच्या नीतीवरून स्पष्ट दिसून येते. परंतु सर्वोच्च न्यायालयाने गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत महत्त्वाचे आणि जनतेच्या हितार्थ कठोर निर्णय घेतले. त्याचप्रमाणे सर्वोच्च न्यायालयाने दिनांक ३० जून २०२१ बुधवारला कोरोनाने  मृत्यु झालेल्या कुटुंबीयांना आर्थिक मदत मिळालीच पाहिजे हा आदेश जाहीर केला.

केंद्र सरकारने कोरोना महामारीला "राष्ट्रीय आपदा" जाहीर केले होते. त्या अनुषंगाने आर्थिक मदत देणे गरजेचे आहे. परंतु सरकार आर्थिक मदत देण्यापासून पळ काढत असल्याचे याचिकाकर्ता रीपक कंसल आणि गौर कुमार बन्सल या वकिलांच्या लक्षात आले व त्यांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली. यांनी केलेल्या दोन स्वतंत्र याचिकांवर न्यायालयाने आर्थिक मदत देण्याचे आदेश दिले. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे काटेकोरपणे पालन करून वेळ न गमवीता २ लाख रुपये केंद्र सरकारने व २ लाख रुपये राज्य सरकारने याप्रकारे ४ लाख रुपये आर्थिक मदत म्हणून कोरोनाने मृत्यू झालेल्या परिवाराच्या स्वाधीन करावी, अशी अपेक्षा आहे.

सरकारी आकडेवारीनुसार कोरोनाने आतापर्यंत ४ लाखा पेक्षा जास्त  लोकांचा मृत्यू झालेला आहे. यात ग्रामीण क्षेत्राची नोंद अत्यल्प आहे. त्यामुळे सरकारने ग्रामीण भागाकडे सुध्दा लक्ष देऊन तिथे सुध्दा आर्थिक मदत पोहचवीण्याची व्यवस्था केली पाहिजे. आर्थिक मदतीसाठी केंद्र व राज्य सरकारमध्ये तालमेल असणे गरजेचे आहे. कारण "जान है तो जहान है" हा मूलमंत्र केंद्र व राज्य सरकारने अंगीकारून सर्वोच्च न्यायालयाच्या ६ आठवड्यांची वाट न पाहता युध्दपातळीवर कार्य सुरू करून आर्थिक मदत मृतांच्या परिवारापर्यंत ताबडतोब पोहचवली पाहिजे.

बिहार सरकारने कोरोनाने मृत्यू झालेल्या परिवारांना ४ लाख रुपये देण्याची घोषणा केली. हीच भूमिका देशातील सर्व राज्यांनी घेतली पाहिजे यात राजकारण नको. देशातील राजकीय पुढाऱ्यांनी एकमेकांवर ताशेरे ओढून कुत्र्या-मांजरासारखे भांडू नये. आज कोरोना महामारी लक्षात घेता देशातील ९० टक्के परिवाराचे महागाईने कंबरडे मोडले आहे. यात विरोधक व सत्ताधारी राजकारण करून आपला धर्म पूर्ण करीत असल्याचे दिसून येते. यामुळे मरते आहे गरीब व सर्वसामान्य जनता.

कोरोनाने मृत्यू झालेल्या परिवारावर आर्थिक संकट का ओढावले यांचा विचार केंद्र व राज्य सरकारांनी करणे गरजेचे आहे. कारण महागाईने प्रत्येकांच्या खिशाला कात्री लावली आहे. आज गॅस सिलेंडरचा विचार केला तर गेल्या वर्षभरात १४० रूपयांनी महाग झालेला आहे. पेट्रोल-डिझेलने संपूर्ण सीमा ओलांडली आहे. गोडेतेलाचे भाव (खाण्याचे तेल) आभाळाला टेकले आहे. म्हणजे तेल, तिखट, मीठ, डाळ, गहू, तांदूळ महाग, म्हणजे गरीबांसाठी सरकारकडुन स्लोपॉईझन तर नाही ना! असा प्रश्र्न उध्दभवतांना दिसतो. गॅससिलेंडर वरील सबसिडी नाहीच्या बरोबरीने आहे. म्हणजेच केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे महागाईला वनवा लागून गरीब व सर्वसामान्य होरपळतांना दिसत आहे. महागाई, कोरोना महामारी यावर पक्ष-विपक्ष फक्त राजकारण करतांना दिसत आहे. यामुळे  सर्वसामान्यांपुढे प्रश्र्न आहे की "जगावे की मरावे"अशी परिस्थिती आहे. म्हणजेच देशातील ९० टक्के लोकांची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे.

महागाईमध्ये सुधारणा जर झाली नाही तर शेतकऱ्यांप्रमाणेच गरीब व सर्वसामान्य जनता आत्महत्येचा सहारा घेऊ शकतात याला नाकारता येत नाही. कारण अनेकांच्या नौकऱ्या गेल्या, अनेक बेरोजगार झाले, अनेक कंपन्या मृतावस्थेत आहेत. त्यामुळे गरीब व सर्वसामान्यांपुढे प्रश्न आहे की "जाये तो जाये कहा". कारण कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेने संपूर्ण देश थर्रावला, त्यामागोमाग ब्लॅक फंगसचा ( म्युकरमायकोसिस) चा कहर सुरू झाला, आता डेल्टा प्लसच्या व्हेरीऐंटने दहशत निर्माण केली आहे तर कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हणजेच कोरोना महामारीच्या चक्रव्यूहात संपूर्ण जनता फसल्याचे दिसून येते. या भयावह चक्रव्यूहातून बाहेर काढण्याचे काम केंद्र व राज्य सरकारचे आहे. केंद्र सरकाने (सेंट्रल व्हिस्टा) नवीन संसद भवनाचे काम ताबडतोब रोखून त्यावर येणारा खर्च २० हजार करोड रुपये कोरोना महामारीच्या कार्याकरीता खर्च केले पाहिजे कारण ही राष्ट्रीय आपदा आहे. आपण जगलो तर नवीन संसद भवन (सेंट्रल व्हिस्टा) नंतर बांधता येईल. त्यामुळे आताच संसद भवन बांधने जरूरीचे नाही किंवा आवश्यक नाही. पुढल्या वर्षी देशातील ५ राज्यामध्ये विधानसभा निवडणुका आहेत. त्या निवडणुका ताबडतोब रद्द करायला पाहिजे. कारण आपण अजूनपर्यंत कोरोना महामारीतून सावरलेलो नाही. या विधानसभा निवडणुका झाल्या तर यात राजकीय पक्षांकडून करोडों रूपयांचा खर्च होईल. हाच खर्च राजकीय पुढाऱ्यांनी कोरोनाने मृत्यू झालेल्या परिवाराच्या उपयोगात आणले तर खरे देशहीताचे व जन हीताचे कार्य समजल्या जाईल.

आज देशातील कोरोना महामारीने मृत्यू झालेल्या परिवार आर्थिक अडचणीत का सापडला आहे. याचा विचार केंद्र सरकार मुळातच करीत नसल्याचे दिसून येते. कोरोनाने मृत्यू झालेला परिवार आर्थिक अडचणीत सापडण्याचे मुख्य कारण म्हणजे महागाई. त्यामुळे जोपर्यंत महागाई कमी होत नाही तोपर्यंत गरीब व सर्वसामान्यांचे जगणे कठीणच राहील हे स्पष्ट दिसून येते. आज महागाईमुळे देशात अनेक नवीन नवीन समस्यांनी जन्म घेतल्याचे दिसून येते. यात मुलांचे शिक्षण, खाण्यापिण्याच्या प्रश्न, भुकमरी, उपासमारी, कुपोषण, संपूर्ण टॅक्समध्ये मोठ्या प्रमाणात वाढ म्हणजे आज सरकारने व पक्ष-विपक्षाच्या राजकीय पुढाऱ्यांनी सर्वसामान्यांना वाऱ्यावर सोडल्याचे दिसून येते. यावरून स्पष्ट होत आहे की गरीबवर्ग हा गरीबच होत आहे तर श्रीमंत वर्ग हा श्रीमंत होत आहे.

केंद्र सरकारने अर्थव्यवस्थेला बूस्टर डोस देऊन ६ लाख २९ हजार कोटींचे पॅकेज जाहीर केले. यात मुख्यत्वे करून छोटे व्यापारी आणि इतर व्यक्तींसाठी १ लाख २५ हजार रुपयांपर्यंत कर्ज देण्याचे प्रावधान आहे. अनेकांचा व्यापार बुडाला सरकार जवळुन कर्ज घेऊन परतफेड कशी करणार याचा विचार सरकारने केला काय? सरकार पुन्हा लोकांना कर्जाच्या खाईत लोटुन स्लोपॉईझन तर देत नाही ना! यापेक्षा सरकारने महागाईवर अंकुश लावला तर सर्वांचे जगने शक्य होईल अन्यथा आत्महत्येची पाळी येवू शकते. राजकीय पुढाऱ्यांनी व सरकारने सर्वसामान्यांना किंवा छोट्या व्यापाऱ्यांना कर्ज न देता आर्थिक मदत केली पाहिजे. कारण देशाच्या राजकीय पुढाऱ्यांजवळ करोडो ते अरबो रूपयांची चल-अचल संपत्ती आहे.

केंद्र सरकार कोरोनाने मृत झालेल्या परिवाराला आर्थिक मदत देण्याची टाळाटाळ करतांना म्हणते की २०१५ चा आपदा कायदा कोरोना महामारीला लागु होत नाही. असे सांगुन केंद्र सरकारने हात झटकण्याचे काम केले. परंतु सर्वोच्च न्यायालयाने १८७ पानांची माहिती देताना केंद्र सरकारची कान उघाडणी करत सांगितले की मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत द्यावीच लागेल किती द्यायची हे सरकारने ठरवावे. त्यामुळे केंद्र व राज्य सरकारांनी वेळ न गमावता प्रत्येकी २-२ लाख देऊन ४ लाखांची आर्थिक मदत ताबडतोब दिलीच पाहिजे. कारण संपूर्ण जगाचा विचार केला तर भारताची आर्थिक बाजू आजही मजबूत आहे. त्यामुळेच जगात भारताला "सोने की चिडिया"म्हटल्या जाते. परंतु या सोण्याच्या चिमनीला राजकीय पुढाऱ्यांनी स्विसबॅकेत नेऊन बंदिस्त केले आहे व सोन्याची चिमणी गुदमरतांना दिसत आहे. ही अत्यंत दुःखद आणि गंभीर बाब आहे. याचेच प्रायचित्य आज देशाची १३० कोटी भोळीबाभडी जनता भोगत आहे. त्यामुळे राजकीय पुढाऱ्यांनो थोडी जनाची नाही तर मनाची लाज ठेवून डांबून ठेवलेली चल-अचल संपत्ती बाहेर काढावी कारण कोरोना महामारीने देशात "मोठी आपदा" निर्माण केली आहे.

सध्या देशातील गंभीर परिस्थिती पाहून केंद्र व राज्य सरकारे, पुंजीपती, राजकीय पुढारी, बॉलीवुड क्षेत्र यांनी खुल्या हाताने व खुल्या मनाने आर्थिक मदत करण्याची नितांत गरज आहे. आज देशातील जनतेचे आर्थिक अडचणीचे मुख्य कारण म्हणजे "वाढती महागाई" होय.

- रमेश कृष्णराव लांजेवार

नागपूर, मो.नं.९३२५१०५७७९


statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget