Halloween Costume ideas 2015
Latest Post


भारताचा इतिहास अनेकतेमध्ये एकतेचा राहिलेला आहे. मात्र राजकारण्यांनी आपली मतपेटी घट्ट करण्यासाठी अनेकानेक मार्गाने लोकांत फूट पाडून राज्य करण्याची नीति अवलंबिली आहे. मुळात ही नीति इंग्रजांची. भारतातून इंग्रज गेले मात्र त्यांच्या काही नीति अजूनही शिल्लक आहेत. त्यापैकी डिव्हाईड अँड रूल ही एक. जगात भारताची विविधतेने नटलेला मात्र एकता टिकवून ठेवलेला सर्वात मोठा लोकशाही देश अशी ओळख आहे, या प्रिय देशाची ही ओळख आता कमीत कमी होत असून, मणिपूर दंगली नंतर तर जगात आता दंगली, अत्याचार, धर्मांधतेने बरबटलेला देश अशी होताना दिसत आहे. आम्ही आता 77 वा स्वातंत्र्य दिन साजरा करत आहोत, मात्र अनेक दुःख आणि वेदनेसह असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही की, केंद्रात आणि ज्या राज्यातही भाजपची सरकारे आहेत तेथून विकासाच्या गंगेचा आलेख उंचावता दिसायला पाहिजे मात्र त्या राज्यातून विद्वेषी भाषणे, दंगली, अत्याचार, अविवेकी बोलणे, बुलडोजरचा वापर याच्यासारख्या बातम्या येत आहेत. त्यामुळे संवेदनशील देशवासियांची मने उदासीन होत आहेत. त्या ठिकाणी देशाच्या एकात्मतेला तडा जाताना पहावयास मिळत आहे. मणिपूर, हरियाणा, मध्यप्रदेश, गुजरात, छत्तीसगड आदी राज्यांत तर तेथील अल्पसंख्यांक, मागासवर्गीय आणि आदिवासींचा कठीण काळातून प्रवास सुरू आहे. 

गेल्या तीन महिन्यांहून अधिक काळ झाला भाजपशासित मणिपूर राज्य जळत आहे. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे मणिपूरमध्ये संघर्ष शिगेला पोहोचला आहे. आपल्या सुरक्षेसाठी तेथील जवळपास सर्वच समाजानी शस्त्र उचलली आहेत. एकमेकांना ते टोकाचे शत्रू मानायला लागले आहेत. तेथील गावांच्या सीमेंना जणू युद्धाचे स्वरूप आले आहे, अशी परिस्थिती आहे. महिलांच्या अवस्थेबाबत तर बोलायचे काहीच उरले नाही. इले्नट्रॉनिक मीडियांनी तेथील केलेले वृत्तांकन पाहता मणिपूर राज्यात सुखशांती नांदायला 50 वर्षे लागतील की काय, अशी परिस्थिती आहे. शासनकर्त्यांनी विकास करायचा नसला तर कमीत कमी लोकांमध्ये फूट पाडून त्यांचे जीवन तर उध्वस्त होईपर्यंत राजकारण करू नये. हरियाणाच्या नूह, मेवात आणि गुरूग्राम भागात दंगलीचे लोण पसरले. कोट्यावधी रूपयांच्या मालमत्तेची हानी झाली, शेकडो कुटुंब रस्त्यावर आली, जवळपास 6 नागरिकांचा मृत्यू झाला, अनेक गंभीर जखमी झाल्याचे समोर आले आहे. धार्मिक रॅली काढून शक्तीप्रदर्शन करणे, जाणूनबुजून अल्पसंख्यांक बहुल क्षेत्रातून रॅली घेवून जाणे, धार्मिक स्थळांसमोर जोरजोराने ढोलताशे वाजणे, अपशब्दांचा वापर करणे, पोलिसांना न जुमानने, रॅलीत येतानाच शस्त्रास्त्र सोबत आणणे आणि जाणून बुजून दंगे भडकावणे असा सर्रास प्रकार भाजप शासित राज्यांतून समोर येत आहे. त्यानंतर सरकार लागलीच बुलडोजर घेवून पीडित भागात घरे पाडायला सुरूवात करते. कायदा, सुव्यवस्थेचे तीन तेरा होत असतानादेखील तेथील मुख्यमंत्री आणि सरकारमधील नेत्यांची मतांसाठी भूमिका एकतर्फी दिसून आली. घरे पाडताना हा ही विचार होताना दिसत नाही की, जर कोणी आरोपी असेल तर त्याला जेलमध्ये टाकून त्याच्यावर ट्रायल चालवावे. मात्र अख्खं घर पाडून कुटुंबासह सर्वांनाच रस्त्यावर आणले जात आहे. मग त्यामध्ये महिला, मुले, वृद्ध सगळ्यांनाच मरणयातना. दुकानांची मोडतोड करून लाखोंचे नुकसान. यातून फक्त राष्ट्रीय संपत्तीचेच नुकसान होत नाही तर मानसिक आणि सामाजिक नुकसान होते. त्यामुळे अन्याय आणि अत्याचारातून गुन्हेगारीकरण वाढते. दंग्यांची सुरू असलेली मालिका कधी थांबणार, असा प्रश्न संवेदनशील भारतीय जागरूक नागरिकांना पडला आहे. प्रधानमंत्री आणि राष्ट्रपतींनी यात लक्ष घालावे, अशीच मागणी जनतेतून होत आहे. 

शेवटी न्यायालयानेच दखल घेतली

मणिपूरमधील उफाळलेली दंगलीबद्दल ज्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने कठोर भूमिका घेतली त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी आपले मौन सोडले. तेथील परिस्थितीची चौकशी करण्यासाठी न्यायालयाने समिती बनविली. तेथील सरकारच्या भूमिकेबद्दल शंका उपस्थित करून पोलिस प्रशासनाच्या भूमिकेवरही न्यायालयाने खडे बोल सुनावले.  

हरियाणामध्ये नूह, मेवात भागत बुलडोझरने एकाच समाजाची घरे पाडली जात असल्याचे व तेथे अन्याय होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर हरियाणा उच्च न्यायालयाने स्वतः संज्ञान घेत घरे पाडू नका असा आदेश शासनाला दिला. 

मणिपूर आणि हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांच्या भूमिका संशयास्पद दिसून येत आहेत. भाजपाने खुशाल राज्य करावे मात्र मतांवर डोळा ठेऊन नाहीतर सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या प्रधानमंत्र्यांच्या घोषवाक्यानुसार करावे आणि देशहितासाठी द्वेषाचे राजकारण बंद करावे. अशी आर्त हाक पीडित नागरिकांतून व्यक्त होत आहे. लवकर दंगे बंद होवून तेथे सुखशांती नांदावी, अशी प्रार्थना ईश्वराकडे.


- बशीर शेख



नैराश्य, उदासीनता, राग व चिडचिड वाढण्याचे एक कारण दुसऱ्यांकडून अपेक्षा ठेवणे हेही आहे. कोणतीही व्यक्ती कितीही प्रिय असली आणि कितीही जवळची असली तरीही ती आपल्या सर्वच अपेक्षांवर खरी उतरू शकत नाही म्हणूनच माणसाने लोकांकडून कशाचीही अपेक्षा ठेवू नये. आपण मात्र लोकांना त्यांचे हक्क द्यावेत. लोकांशी शरीयतनुसार वागावे आणि आपल्या सर्व आशा, अपेक्षा अल्लाहवर ठेवाव्यात. निर्मात्या ईश्वरावर विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीची हीच खरी शान असते की, तो आपले प्रत्येक कार्य केवळ अल्लाहसाठीच करतो आणि त्याचे बक्षीसही अल्लाहकडेच मागतो. आदरणीय पैगंबर (स) यांनी केलेल्या प्रार्थनेवरून हेच स्पष्ट होते, 

अल्लाहुम्मज-अलनी मिम्मन तवक्क-ल अलय-क फ-कफय-तहू वस्तहदा-क फ-हदय-तहू  वस्तन्सर-क फ-नसर्-तहू. (कन्जुल उम्मालुल अद्ईयतल् मुत्लकह-5106) (adbimiras.com)


अनुवाद 

 हे अल्लाह! मला त्या लोकांमध्ये सामील कर ज्यांनी तुझ्यावर विश्वास ठेवला तेंव्हा तू त्यांच्यासाठी पुरेसा ठरला, ज्यांनी तुझ्याकडे मार्गदर्शन मागितले तेंव्हा तू त्यांना मार्गदर्शन केले आणि ज्यांनी तुझ्याकडे मदत मागितली तेंव्हा तू त्यांना मदत केली.

माणसाला दुसऱ्यांकडून मदतीची अपेक्षा असते, दुसऱ्यांकडून आदर हवा असतो, स्वत:चा मान सन्मान ठेवण्याची अपेक्षा असते, इतरांकडून प्रेम हवे असते. प्रत्येक व्यक्ती स्वत:चा सुखसमाधान शोधत असते. अशा परिस्थितीत दुसऱ्यांनी आपल्या आनंदासाठी झटावे ही अपेक्षाच चुकीची आहे, म्हणून अपेक्षाभंग होऊन दु:खी होण्याचे टाळायचे असेल, तर कोणी आपली काही मदत करेल, कोणी आपल्याकडे लक्ष देईल यासारखे विचार सोडून द्यावे. कोणी आपल्याशी कसे बोलावे, वागावे, राहावे याकडे फारसे लक्ष न देता, दुसऱ्यांना सुखी, समाधानी व आनंदी ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो या विचारानुसार जे जगतात, वागतात, त्यांच्या प्रत्येक गरजेच्या वेळी अल्लाह त्यांच्यासाठी पुरेसा असतो.

या जगात आणि मृत्युनंतरच्या जीवनात प्रत्येक गरज पुर्ण होण्यासाठी माणसाने आपले डोळे केवळ अल्लाहकडेच लावावेत. आपल्या निर्मात्याशी आपले संबंध अधिकाधिक मजबूत करावे व दृढ विश्वासाने त्याच्याकडूनच प्रत्येक गोष्टीची अपेक्षा ठेवावी.

........................... क्रमशः


- अब्दुल कय्यूम शेख अहमद.

9730254636 - औरंगाबाद.



दरवर्षी 1 ते 7 ऑगस्ट या कालावधीत रजाअत (स्तनपान) सप्ताह जगभरात साजरा केला जातो. 1989 साली जेव्हा युनिसेफ आणि डब्ल्यूएचओ दोघांनीही जगभरातील मातांना आवाहन केले होते की, मातांमध्ये स्तनपानासाठी जागृती निर्माण करा, त्यांना सहकार्य करा आणि  त्यांना प्रोत्साहन द्या. जगात सर्वप्रथम स्तनपाला उत्तेजन देण्याचे कार्य ’वर्ल्ड अलायन्स फॉर ब्रेस्टफीडिंग ऍक्शन’द्वारे सुरू केले गेले. आज या स्तनपान आंदोलनामध्ये 17 देशांचा समावेश आहे. तसेच हा दिवस 170 देशांमध्ये साजरा केला जातो. महिलांमध्ये स्तनपानाबाबत जागरुकता निर्माण करणे हा या आंदोलनाचा उद्देश आहे. यावर्षी या आंदोलनाची मध्यवर्ती कल्पना ’स्तनपानासाठी स्टेप अप: आईला शिक्षित करा आणि त्यांना पाठिंबा द्या’ अशी आहे.

अल्हम्दुलिल्लाह, सर्वशक्तिमान अल्लाहने मनुष्याला निर्माण केल्यानंतर तसेच सोडले नाही, तर त्याला मार्ग दाखवला, त्याला मार्गदर्शन केले आणि आईच्या पोटात आणि बाहेर पडल्यानंतरही त्याच्या उदरनिर्वाहाची व्यवस्था केली. नुकत्याच जन्मलेल्या बाळाच्या उदरनिर्वाहाचा हा नाजूक आणि सुंदर प्रवास गर्भधारणेदरम्यान प्रसूतीपूर्वीच सुरू होतो, जेव्हा स्त्रीच्या स्तनांमध्ये लक्षणीय बदल होतात. उदाहरणार्थ, निप्पलमध्ये एक काळा किंवा गुलाबी प्रभामंडल तयार होतो ज्याला एरोला म्हणतात. शिवाय स्तनांमध्ये जडपणा येतो. प्रसूतीनंतर आश्चर्यजनक पद्धतीने हे जड पडलेले स्तन ताबडतोब दूध तयार करू लागतात, जेव्हा बाळ दूध पिऊ लागते. काही स्त्रियांना प्रसूतीपूर्वी त्यांच्या स्तनातून जाड, चिकट स्त्राव सुद्धा होऊ शकतो.

संमतीची कृती

सामान्य प्रसूतीमध्ये बाळाच्या जन्मानंतर एक तासाने स्तनपानास सुरुवात करावी, तर सिझरिंगद्वारे प्रसूती झाल्यास, बाळाला दुधासाठी तीन दिवस वाट पहावी लागते आणि तोपर्यंत वरचे दूध दिले जाते.

स्तनदामातांनी याकडे लक्ष द्यावे

(1) बाळाला दूध पाजण्यासाठी चांगली, स्वच्छ, निवांत, जास्त त्रास न होणारी एकांत जागा योग्य असते. हे लक्षात ठेवा.

(2) स्तनपान करतांना बाळासाठी योग्य स्थिती असणे खूप महत्वाचे आहे.

(3) प्रभावी आणि यशस्वी आहार देण्यात बाळाच्या तोंडाची स्थिती महत्त्वाची भूमिका बजावते. बाळाच्या तोंडात फक्त स्तनाग्र टाकू नका, तर वर नमूद केलेल्या एरोलाच्या सभोवतालचे क्षेत्र देखील ठेवा. अन्यथा, स्तनाग्रावर फोड येणे, निप्पल क्रॅक होणे इत्यादी वेदना होऊ शकतात. स्तनपान झाल्यानंतर ती जागा चांगली स्वच्छ करावी. तसेच क्रीम लावावे. 

(4) स्लॉचिंग (झुकून दूध पाजणे) ही चुकीची स्थिती आहे, जी नवीन माता अज्ञानामुळे स्वीकारतात, ज्यामुळे त्यांना पाठदुखीचा त्रास होतो. बाळाला मांडीवर उशी घेऊन पाजणे चांगले. 

(5) झोपून स्तनपान केल्याने बाळाच्या नाकात दूध जाण्याचा धोका वाढतो आणि स्तनाग्रांचा भारही बाळावर पडू शकतो. तुमच्यासाठी आणि बाळासाठी कोणती स्थिती योग्य आणि आरामदायक आहे हे पाहण्यासाठी तुम्ही स्वतः प्रयोग करू शकता.

(6) स्तनपानाची दिनचर्या बनवता येते. दिवसा प्रत्येक दोन ते तीन तासांनी आणि रात्री दर 3 ते 4 तासांनी दूध पाजणे चांगले असते. जर बाळ दिवसा जास्त झोपत असेल तर त्याला उठवा आणि त्याला पाजवा. दीर्घकाळ स्तनपान न केल्याने स्तनांमध्ये जडपणा, वेदना, गुठळ्या, ताप इ. ब्रेस्ट ऍबसेस देखील होऊ शकतो, याचा अर्थ स्तन सुजतात आणि त्यात पू जमा होतो. जे शस्त्रक्रियेने काढून टाकावे लागतात, म्हणून प्रतिबंधात्मक उपाय करणे आवश्यक आहे.

(7) स्तनपान करताना जास्त पाणी प्या, कारण दूध बनवण्यासाठीही पाण्याची गरज असते, त्यामुळे कोमट पाणीही वापरता येते.

(8) दूध आणि फळांचा रसही घेता येतो.

(9) स्तनपान करताना आईने मनःशांती राखली पाहिजे, कारण ती खूप महत्त्वाची भूमिका बजावते. आई फक्त बाळालाच दूध पाजत नाही, तर नकळत तिच्या भावना, संवेदना, भीती, राग, सकारात्मक किंवा नकारात्मक विचारांनाही पाजत असते. आईने तिच्या शारीरिक आरोग्याबरोबरच तिच्या मानसिक आरोग्याकडेही लक्ष देणे अत्यंत आवश्यक आहे.नेहमी सतर्क रहा, सकारात्मक विचार करा, नकारात्मक विचार आणि भावना टाळा, जेणेकरून तुमचे मूल एक सकारात्मक व्यक्ती बनून मोठे होईल. साहबिया आणि चांगल्या स्त्रियांची उदाहरणे आपल्यासाठी लागू आहेत की त्या ज्या पद्धतीने स्तनपान करत असत आणि त्याच वेळेस कुराणाच्या श्लोकांचे पठण करत असत.

(10) काही मुले आईशी खूप जोडलेली असतात, आईला सोडू इच्छित नाहीत आणि आईला कंटाळा येतो, कारण ते दूध पिण्यात बराच वेळ घालवतात. तेव्हा तुम्हाला काय करायचे आहे धीर धरा. आईच्या पायाखाली असाच स्वर्ग ठेवलेला नाही. बाळाचे पोट पूर्ण भरल्यावर ते स्वतःहून दूध पिणे बंद करेल. तेव्हा पाजविण्याची सक्ती करू नये. काही बाळांना दिवसापेक्षा रात्री जास्त आहार घेेण्याची सवय असते आणि त्यांना वारंवार दूध द्यावे लागते. याला क्लस्टर फीडिंग म्हणतात. यामध्ये बाळ रात्री जेवढे दूध पिते दिवसभर तेवढे पीत नाही. ही एक सामान्य गोष्ट आहे. अशा वेळी संध्याकाळी किंवा घरात इतर माणसे असतील तर आईला सर्व काम सांभाळून मदत करता येते.

दुधाच्या कमतरतेची कारणे

आईच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याचा तिच्या दुधावर मोठा परिणाम होत असतो. उदा. (1) जास्त राग (2) जास्त ताण, 3) दूध कमी झाल्याची शंका इत्यादीमुळे आईचे दूध कमी होऊ शकते. जर बाळ नीट झोपत असेल, वजन वाढत असेल आणि दिवसातून 3 ते 5 वेळा लघवी करत असेल तर त्याला पुरेसे दूध मिळत आहे, असे समजावे. बाळाला सहा महिने फक्त आईचे दूध द्यावे, बाकी कशाचीही गरज नाही आणि याला एक्सक्लुझिव्ह ब्रेस्टफीडिंग असे म्हणतात. सहा महिन्यानंतर दोन वर्षांपर्यंत बाळाला दूध आवडते. तथापि, दुधाबरोबर खालील पदार्थही दिले जाऊ शकतात. दलिया, रवा, शीरा, फळे इ.

स्तनपान करताना सावधगिरी बाळगा

बाळाला बाटलीने दूध पाजू नका. गाईचे दूध चमच्याने पिण्याची सवय लावा. म्हशीच्या दुधात पाणी मिसळा, अन्यथा जुलाब होऊ शकतात. स्तनपान करताना कॉफी, चहा टाळा. त्यामुळे लोह कमी होते. शेंगदाण्यामुळे अ‍ॅलर्जी होऊ शकते. आंबट फळांपासून सावध रहा. जसे संत्री, द्राक्षे, अननस इ. तूर डाळ, मांस आणि अंडी यांसारख्या वायूचा धोका असलेले पदार्थ टाळावेत. मसालेदार पदार्थ आणि जंक फूड टाळणेही महत्त्वाचे आहे. लोणचे, तिखट इत्यादी खाण्यात काळजी घ्या.

दूध वाढवण्यासाठी 

(1) बडीशेपचा उपयोग करावा. 

(2) दूध वाढवण्यासाठी मेथीचे दाणेही महत्त्वाचे आहेत. रात्री भिजवून सकाळी घ्या. 

(3) पपई, गाजर घ्या. 

(4) रात्री स्तनपान केल्याने अधिक प्रोलॅक्टिन तयार होते. त्यामुळे स्तनपान करण्याची सवय लावा. 

(5) शतावरीचे सेवन दूध वाढवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावते.

(6) खाण्यापूर्वी आणि नंतर एक ग्लास पाणी घ्या. 

(7) मुलाला अधिक आपुलकी द्या.

(8) नकारात्मक विचार शक्यतो टाळा.

(9) दररोज कोमट पाण्याने स्नान करावे.


काही गैरसमज

(1) आईला सर्दी व ताप असल्यास बाळाला स्तनपान करू नये. ही पूर्णपणे निराधार गोष्ट आहे, पण ताप आल्याने आईच्या रक्तात अँटीबॉडीज तयार होतात जे बाळाला मिळतात आणि बाळाला इतका ताप येत नाही. ताप दुधाने येत नाही तर आईने बाळाचे चुंबन घेतल्याने, शिंकताना आणि खोकताना तोंड रुमालाने न झाकल्याने येते.

(2) स्तनपानामुळे महिलांच्या स्तनांमध्ये ढिलेपणा येतो, हे किती खरे आहे याचा अंदाज तुम्ही लावू शकता.

(3) स्तनपान करताना तुम्ही मेकअप, जड रसायने असलेली क्रीम्स लावू शकता, असे अजिबात नाही. सौंदर्यप्रसाधनांमधील रसायने तुमच्या बाळालाही हानी पोहोचवू शकतात. स्तनपान करताना औषधे घेता येतील का? होय, परंतु तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच घेतली पाहिजे.


स्तनपानानंतर दूध सोडण्याचा टप्पा येतो : WHO आणि IHO (भारतीय आरोग्य संघटना) च्या मते, मुलाला दोन वर्षांनी दूध सोडले पाहिजे. अलहम्दुलिल्लाह कुराणमध्ये सुद्धा 1458 वर्षांपूर्वी सांगितले आहे. दोन वर्षाच्या आत लहान मुलांनी स्वतःहून दूध सोडल्यास त्याचा त्याच्या आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. म्हणून दूध अचानक सोडू नये. तर ते हळूहळू सोडेल याकडे लक्ष द्यावे.

अलहम्दुलिल्लाह आईचे दूध हे अल्लाहचे अनमोल वरदान आहे. त्यावर बालकाचा हक्क आहे. आज आधुनिकतेच्या चक्रात माता याला दोष मानत आहेत, हा विचार पूर्णतः चुकीचा असून तो दुरुस्त करता येतो. आईच्या दुधात सुरुवातीला कोलोस्ट्रम असते, जे रोगांशी लढण्यास मदत करते आणि बाळाची प्रतिकारशक्ती वाढवते आणि आईला स्तनपानाचा फायदा देखील होतो कारण ती स्तन आणि गर्भाशयाच्या कर्करोगापासून आणि प्रसूतीनंतर सुरक्षित राहते. 

सर्वशक्तिमान अल्लाहला प्रार्थना करते की, अल्लाह त्या सर्व बहिणींवर कृपा करून ज्या आनंदाने बालसंगोपनासाठी स्तनपानाचे कर्तव्य आनंदाने पार पाडत आहेत. आणि त्या बहिणी ज्या हे कार्य पार पाडत नाहीत त्यांना अल्लाहने सद्बुद्धी द्यावी. 


- डॉ. सिमीन शहापुरे


कानडी भाषांतर 

आदिलशाही आणि बहामनी मुळे कानडी भाषा मुस्लिम राजवटीतल्या विद्वानांच्या संपर्कात आली. आदिलशाहीतल्या अनेक विद्वानांनी त्यांच्या कवितांमध्ये कानडी शब्दांचा वापर केल्याचे दिसून येते. शिवाय कानडी भाषेत आदिलशाही, टिपू सुलतान यांचे अनेक फर्मान उपलब्ध आहेत. कानडी आणि मुस्लिमांच्या सहसंबंधांचा हा इतिहास पाहता कुरआनचे अनुवाद मध्ययुगीन काळातच कानडी भाषेत व्हायला हवे होते. पण ते झाल्याची नोंद कुठेही आढळत नाही. पण इस्लामच्या तत्वज्ञानाच्या प्रसारासाठी कानडीतून प्रयत्न झाल्याचे संदर्भ मात्र उपलब्ध आहेत. कानडी भाषेत कुरआनचे भाषांतर मुस्लीम राजवटीत होऊ शकले नाही. पण ही उणीव म्हैसूरचे प्रागतिक विचारांचे राज्यकर्ते श्री कृष्णराज वडीयार यांनी कुरआनच्या कानडी अनुवादाची गरज बोलून दाखवली. म्हैसूर दरबारात व्यंकटरमण्णा हे भाषांतरकार म्हणून सेवा बजावत होते. त्यांनी महाराजांच्या आदेशाने कुरआनचे भाषांतर सुरु केले. पण पहिल्या अध्यायाचे भाषांतर केल्यानंतर त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर हे भाषांतर पुर्ण करण्यासाठी म्हैसूरचे एक विद्वान आराय केसरी यांच्याकडे जबाबदारी देण्यात आली. त्यांनी एक वर्षात अनुवाद पुर्ण केले. १९४९ साली हे भाषांतर पवित्र कुरआनच्या नावाने हे प्रकाशित करण्यात आले. पण हे भाषांतर योग्य नव्हते. कारण अनुवादकांना अरबी भाषा ज्ञात नव्हती. त्यांनी युसूफ अली यांच्या इंग्रजी अनुवादावरुन हे कानडी रुपांतर केले होते. त्यामुळे सय्यद कासीम यांनी कुरआनचे अनुवाद सुरु केले. आणि त्याच्या पहिल्या अध्यायाचे भाषांतर करुन ते प्रकाशित केले. पण हे भाषांतर पुर्ण झाले अथवा अपूर्ण राहिले याची माहिती मिळत नाही.१२

मल्याळम भाषांतर 

मल्याळम ही दक्षिणेतील महत्वाची भाषा आहे. सन १८७० मध्ये पहिल्यांदा कुरआनचे मल्याळम भाषांतर झाले. मायान कुट्टी इलय्या (अरकाल) यांनी पहिल्यांदा कुरआनचे भाषांतर केले. मायान कुट्टी यांनी आरकालच्या शाही घराण्यात त्यांचे लग्न झाले होते. त्यामुळे त्यांनी कुरआनचे मल्याळम भाषांतर करण्याचा निर्णय घेतला. मायान कुट्टी यांनी यांनी केलेले हे भाषांतर सहा खंडात उपलब्ध आहे. भाषांतर केल्यानंतर त्याचे प्रकाशन मुंबई येथून करण्यात आले. पण मालबारच्या किनारपट्टीवर हे अनुवाद लोकप्रिय ठरले नाही. उलेमांनीही यावर नापसंतीची मोहर उमटवली. ही नापसंती कशासाठी होती, हे मात्र स्पष्ट होत नाही. मायान कुट्टी यांनी केलेल्या भाषांतरीत कुरआनची एक प्रत इस्लामिक सेंट्रल सिवील स्टेशन कालीकट येथे उपलब्ध आहे. मल्याळम भाषेतील दुसरे अनुवाद वेंकम अब्दुल कादर स्वातंत्र्यपुर्व काळात दुसऱ्यांदा कुरआनच्या अनुवादाचे प्रयत्न केले. पण इंग्रजांच्या षडयंत्रामुळे ते पुर्ण होउ शकले नाही. कालांतराने हैदराबादच्या निजाम ट्रस्टच्यावतीने मौलवी अदासरीन यांनी मल्याळम भाषेत अनुवाद प्रयत्न सुरु केले. त्यांनी एका अध्यायाचे भाषांतर केले. आणि एका अध्यायानंतर हे भाषांतर थांबले. कुरआनचे मल्याळम भाषेतील दुसरे संपूर्ण अनुवाद मालापुरम येथील उमर मौलवी यांनी केले. मायान कुट्टी यांच्यानंतर संपुर्ण भाषांतर करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. त्याशिवाय सुरैल एम. कोयाकुट्टी, एस.एम. कृष्णराव, कोचीन, मौलाना सी. एन. अहमद बाकवी यांनी अनुवाद केल्याची नोंद उपलब्ध आहे. 

मराठी भाषांतर

मराठी भाषेत मुस्लिमांच्या साहित्यनिर्मितीचा इतिहास शेख मोहम्मद यांच्याही पूर्वीपासून आढळतो. मुस्लिम राजवटींनीही मराठी भाषेत अनेक फर्मान काढल्याचे दिसून येतात. आदिलशाही, टिपू सुलतान यांचे काही मोडी फर्मान उपलब्ध आहेत. मध्ययुगापासून मराठीत साहित्य निर्मिती करणाऱ्या मुसलमानांनी मराठीत इस्लामविषयी केलेल्या लिखाणाचे काही त्रोटक दाखले उपलब्ध आहेत. दौलताबाद परिसरातील काही सुफींनी मराठी कवींनी त्यांच्या कवितांमध्ये  इस्लामी तत्त्वज्ञानाच्या काही सुत्रांचा वापर केल्याचे दिसून येते. त्यामुळे कुरआनच्या अनुषंगाने मराठीत मध्ययुगापासून लेखन होते असे म्हणायला वाव आहे. पण कुरआनचे अनुवाद मराठी भाषेत इतर प्रादेशिक भाषांप्रमाणे विसाव्या शतकाच्या सुरुवातीला झाले आहे. हैदराबादचे निजाम मीर उस्मान अली यांनी हे अनुवाद प्रकाशित केले होते. हकिम मीर मोहम्मद याकुब खान यांनी हे भाषांतर केले होते. सन १९१५ साली खान यांनी हे भाषांतर पूर्ण केले. भाषांतर पूर्ण झाल्यानंतर निजाम मीर उस्मान अली यांच्याकडे हे भाषांतर प्रकाशित करण्यासाठी मदत मागितली. ८ फेब्रुवारी १९१५ रोजी प्रकाशनासाठी ७५०० रुपये मंजूर करण्यात आले. त्याशिवाय मराठवाड्यातील मसजिद आणि मदरश्यांमध्ये वितरीत करण्यासाठी निजाम सरकारच्यावतीने मराठी कुरआनच्या या प्रती मोठ्या प्रमाणात विकत घेण्यात आल्या.१३ हकिम मीर मोहम्मद याकूब खान यांनी केलेले हे भाषांतर पहिले आणि अखेरचे असे भाषांतर होते जे मूळ अरबीतून मराठीत करण्यात आले होते. त्यांच्यानंतर मराठीत जितके अनुवाद झाले ते इतर भाषांमधील अनुवादांचे रुपांतरण होते. त्यामुळे हकिम मीर मोहम्मद याकूब खान यांचे भाषांतर विस्मृतीत गेले असले तरी त्याचे महत्व अबाधित आहे. याव्यतिरिक्त राजर्षी शाहू महाराजांनीदेखील कुरआनच्या अनुवादासाठी प्रयत्न केले होते. त्यांनी २५ हजार रुपये निधी यासाठी मंजूर केला होता. अनुवादासाठी तीन लोकांची एक समिती बनवली होती. ज्यामध्ये हकिम भोरे खान, अब्दुल इनामदार, मास्टर गुलाम अहमद हे त्याचे सदस्य होते. शिवाय एक मौलवी मदतनीस म्हणून दिले होते. मराठी अनुवादासाठी मसुदा कलप्पा निटवे यांच्या जय नंदरा मुद्रणालयात छपाईचे काम सुरु करण्यात आले. पण ६ मे १९२२ रोजी शाहू महाराजांचे निधन झाल्यानंतर हे छपाईचे काम पूर्ण होऊ शकले नाही.१४    

गुजराती भाषांतर 

मुसलमानांचा संबंध किनारपट्टीवरील प्रदेशाशी दहाव्या शतकाच्या पुर्वीपासून आला आहे. गुजरात हे किनारपट्टीवरील राज्य असल्यामुळे येथेही मुसलमान प्रेषितांच्या काळापासून येत असल्याचे दाखले मिळतात. त्यामुळे इस्लामचे संस्कृतीकारण गुजरातमध्ये इतर राज्यांपेक्षा जुने आहे. वली गुजराती हा मुसलमान कवी गुजरातीतला कालीदास मानला जातो. त्यामुळे मुसलमानांचे संस्कृतीकारण या राज्यात खूप प्रबळ राहिले आहे. गुजराती भाषेत कुरआनचे अनुवादही इतर प्रादेशिक भाषांपेक्षा काही काळ आधी झाले आहे. सन १८७९ मध्ये अब्दुल कादर बीन लुकमान१५ यांनी गुजरातीमध्ये कुरआनचे भाषांतर केले होते. त्यांच्यानंतर मराठीत कुरआनचा अनुवाद करणारे हाकिम मीर मोहम्मद याकूब खान यांनी कुरआनचे गुजराती भाषांतर केले होते. त्यांनी मराठीप्रमाणेच गुजरातीच्या अनुवादासाठी निजाम मीर उस्मान अली यांच्याकडून मदत घेतली होती.१६   

बंगाली भाषांतर 

शाहिस्तेखानच्या काळात बंगालमध्ये अनेक बदल घडून आले. त्याने हुगळी नदीच्या किनाऱ्या शहराची रचना करताना अनेक कलाकेंद्रे निर्माण केली. इब्राहीम आदिलशाहप्रमाणे त्यानेही बंगालमध्ये विद्वानांना आश्रय देण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे बंगालमध्ये अकबरी दरबाराप्रमाणे एक विद्वत्त परंपरा निर्माण झाली होती. त्याच्या काळातच अनेक अरबी, फारसी शायर बंगालमध्ये आश्रयाला आले होते. त्यामुळे बंगालला समृध्द अशा मुस्लिम साहित्यीकांची परंपरा लाभली आहे. या परंपरेतूनच इस्लामविषयीची चर्चा बंगालमध्ये सुरु झाली. आणि त्यातूनच कुरआनच्या तिसऱ्या अध्यायाचे १८६८ साली भाषांतर केले. गुलाम अकबरअली मिर्झापुरी यांनी हे अनुवाद केले होते. पण कुरआनच्या अनुवादाचा हा पहिला प्रयत्न नव्हता असे अनेक विद्वानांचे मत आहे. त्यांच्या मते मौलवी अमिरुद्दीन यांनी कुरआनचे पहिले भाषांतर केले होते. पण मौलवी अमिरुद्दीन यांच्याविषयी इतिहासाच्या साधनांमध्ये आधिक तपशील आढळत नाही. कुरआनच्या भाषांतराची संकल्पना बंगालीमध्ये कुणी मांडली अथवा तसा प्रयत्न कुणी केला हा वादाचा विषय असला तरी पहिले समग्र अनुवाद कुणी केले याविषयी निश्चित असे संदर्भ उपलब्ध आहेत. बंगाली ब्राह्मण कुटुंबात जन्मलेल्या सुरेशचंद्र सेन यांनी १८८० साली केला होता. १८८० साली अनुवाद झाल्यानंतर त्याच्यात काही दुरुस्त्या करुन १८८२ साली हे भाषांतर प्रकाशित करण्यात आले होते. त्यानंतर १८९९ नईमुद्दीन आणि गुलाम सरुर यांनी पुन्हा कुरआनचे अनुवाद केले.१७ अशाप्रकारे १९ व्या शतकाच्या उत्तरार्धात सुरु झालेल्या अनुवादाची ही परंपरा बंगालमध्ये आजही कायम आहे.    

पंजाबी भाषांतर

पंजाबी भाषेत सुफींच्या कव्वाल्या, सुफी गीतांची परंपरा यातून कुरआनचे परिचय १६ व्या शतकापुर्वीच झाले होते. पण कुरआनचे थेट अनुवाद मात्र पंजाबीत हाफीज मुबारकउल्लाह यांनी १८७० मध्ये केला होता. त्यानंतर कुरआनचा काही भाग मौलाना नवाशाह यांनी भाषांतरीत केला होता. हे भाषांतरीत अध्याय लाहोरहून प्रकाशित करण्यात आले होते. पंजाबी भाषेमध्ये प्रेषित यूसुफ (अ.) यांच्या आयुष्यावर आधारित सूरह यूसुफ या अध्यायाचे विश्लेषण करण्यात आले. पंजाबीत तब्बल १३ जणांनी सूरह यूसुफ या अध्यायाचे विश्लेषण केले आहे. 

समारोप- कुरआनच्या भाषांतराची परंपरा भारतात मध्ययुगीन काळापासून पाहायला मिळते. ही परंपरा आजही कायम आहे. कुरआनचा अर्थ लावण्याच्या विविध ज्ञानपरंपरा जेंव्हापासून निर्माण झाल्या तेंव्हापासून अनुवादाविषयी मतभेद व्हायला लागले, असे दिसून येते. त्यामुळे वेगवेगळ्या पंथांच्या विद्वानांनी आपआपल्या पंथनिष्ठांनुसार अनुवाद करुन घ्यायला सुरुवात केली. त्यामुळे एकट्या उर्दू भाषेत पन्नासहून आधिक अनुवाद झाले असण्याची शक्यता नाकारता येत नाही. अनुवादसोबत विश्लेषणातही मतभिन्नतेमुळे विपुलता आढळते. १८५७ नंतर भारतात उर्दू भाषेत अनुवाद करण्याची जणू चढाओढ लागली होती. सर सय्यद यांच्यापासून जर आपण कुरआनच्या विश्लेषणाचा आणि अनुवादाचा इतिहास समजून घ्यायला सुरुवात केली तर खूप वेगवेगळे संदर्भ आपल्याला दिसून येतात. सर सय्यद यांनी आधुनिक दृष्टीतून कुरआनचे विश्लेषण केले होते. पण सर सय्यद यांनी केलेल्या या विश्लेषणावर टिका करताना विश्लेषण विज्ञानवादी असल्याचे म्हटले गेले.१८ सर सय्यद यांच्यानंतर आधुनिक दृष्टीने कुरआनचा अर्थ लावण्याचा प्रयत्न मौलाना आझाद यांनी केला. त्यांनी सूरह फातिहाचे केलेले विश्लेषण जगभर चर्चेचा विषय ठरले.१९ कुरआनच्या आधुनिकदृष्टीने केलेल्या विश्लेषणामध्ये मौलाना वहीदुद्दीन खान२० यांच्यापर्यंत अनेकांचा समावेश होतो. मौलाना अबुल आला मौदूदी, मौलाना अब्दुल करीम पारेख यांच्या अनुवादित कुरआनचे रुपांतरण अनेक प्रादेशिक भाषांमध्ये करण्यात आले आहे.

ज्या पध्दतीने मुस्लिमेतर विद्वानांनी काही प्रमाणात कुरआनचे भाषांतर करण्यासाठी प्रयत्न केले आहेत. त्याच्या कैक पटीने मुस्लिम विद्वानांनी आणि राज्यकर्त्यांनी अनेक हिंदू धर्मग्रंथांचे फारसी, उर्दू आणि अन्य प्रादेशिक भाषांमध्ये अनुवादासाठी प्रयत्न केले आहेत. भगवद्‌गीतेचे भाषांतर तर मध्ययुगीन काळापासून अनेकवेळेस करण्यात आले. अकबर, इब्राहीम आदिलशाह, दारा शुकोह अशा राज्यकर्त्यांनी आणि राजघराण्यातील लोकांनी हिंदू धर्मग्रंथांचे भाषांतर करण्यासाठी अथवा त्याच्या अभ्यासासाठी एक मोहीमच चालवली होती. त्यांच्या कालावधी सिंहासन बत्तीशीपासून ऋग्वेदापर्यंत अनेक हिंदू धर्मग्रंथांची भाषांतरे झाली त्याच्यावर ग्रंथ लिहीण्यात आले. भारतात कुरआन आणि हिंदू धर्मग्रंथांच्या अनुवादाची ही जी परंपरा निर्माण झाली आहे ती खरोखरच गौरवास्पद आहे. 

(लेखक गाजीउद्दीन रिसर्च सेंटरचे सदस्य आहेत. फारसी, उर्दू भाषेचे आणि मध्ययुगीन इतिहासाचे अभ्यासक आहेत.)

संदर्भ- 

१२) गुलाम याह्या अंजुम, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. ५५६

१३) सय्यद दाऊद अश्रफ, किताबों के कदरशनास आसिफ साबीह, पृष्ठ क्र. २२-२३

१४) सय्यद शाह गाजीउद्दीन, राजर्षी शाहू महाराज हयात और कारनामें, पृष्ठ क्र. १६१

१५) गुलाम याह्या अंजुम, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. ५६३

१६) सय्यद दाऊद अश्रफ, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. २४-२५

१७) गुलाम याह्या अंजुम, पुर्वोक्त, पृष्ठ क्र. ५६६-६७

१८) अल्ताफहुसैन हाली, हयात ए जावीद, भाग १, पृष्ठ क्र. १८४

१९) मौलाना आझाद, तर्जुमानुल कुरआन, खंड १ -२

२०) मौलाना वहीदुद्दीन खान, तजकीरुल कुरआन खंड १-२

(भाग ३, समाप्त)


- सय्यद शाह वाएज





जोर्डेन डिंएंगडेह विरुद्ध एस.एस.चोप्रा केस 

एकसमान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने मत व्यक्त केलेले दुसरे महत्वाचे प्रकरण श्रीमती जोर्डेन डिंएंगडेह विरुद्ध एस.एस.चोप्रा यांचे आहे. [ Ms. Jordan Diengdeh vs S.S. Chopra AIR 935, 1985 SCR Supl. (1) 704] यामध्ये न्या. जे.ओ. चिनप्पा रेड्डी यांच्या एकल पीठाने ख्रिश्चन विवाह कायदा १८७२ संदर्भात टिप्पणी केली. याचिकाकर्त्या महिलेला मा. न्यायालयाने कोणताही दिलासा दिला नाही. परंतु न्यायालयासमोर जो मुद्दाच नव्हता त्यावर मतप्रदर्शन करून, एकसमान नागरी कायदा त्वरित लागू करण्याचा जोरदार पुरस्कार केला. 

सरला मुद्गल विरुद्ध भारतीय संघराज्य प्रकरण 

एकसमान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात मा. सर्वोच्च न्यायालयाने टिप्पणी केलेले सरला मुद्गल केस ही तिसरी महत्वाची केस आहे. यामध्ये हिंदू व्यक्तीने इस्लाम धर्म स्वीकारून दुसरा विवाह करणे बेकायदेशीर असल्याचा निर्णय देण्यात आला होता. या प्रकरणाच्या निकालपत्रात विविध धर्माच्या वैय्यक्तिक कायद्याच्या संदर्भात कायद्यांच्या संदर्भात चर्चा करण्यात आली होती. या प्रकरणात न्यायालयाने भारतीय संविधानातील अनुच्छेद ४४ व धार्मिक स्वातंत्र्य विषयक अनुच्छेद २५,२६,२७ बाबत मत व्यक्त केले आहे. यासंदर्भात न्यायालय म्हणते की, अनुच्छेद २५ अन्वये धार्मिक स्वातंत्र्याची हमी दिली आहे परंतु संविधानातील अनुच्छेद ४४ मध्ये धर्म आणि विवाह, वारसाहक्क इत्यादी व्यक्तिगत सामाजिक-धार्मिक कायदे धर्मनिरपेक्ष असावेत असे सूचित केले आहे.हे पाहता विवाह, वारसाहक्क इत्यादी संबंधी कायदे यांची संविधानाने अनुच्छेद २५,२६,२७ द्वारे दिलेले धार्मिक बाबींसंबंधीचे हक्क यांची गल्लत करू नये. अशी गल्लत करण्यास वाव मिळू नये यासाठी एकसमान नागरी कायदा करण्यात यावा असे मतप्रदर्शन (obiter dicta)मा. सर्वोच्च न्यायालयाने केले.

अहमदाबाद वुमेन एक्शन ग्रुप व इतर विरुद्ध भारतीय संघराज्य प्रकरण

एकसमान नागरी कायदा लागू करण्यासंदर्भात आणखी एक महत्वाची केस म्हणजे अहेमदाबाद वुमेन एक्शन ग्रुप व इतर विरुद्ध भारतीय संघराज्य ही आहे. (AIR 1997, 3 SCC 573) यामध्ये याचीकार्त्यानी एक जनहित याचिका दाखल करून एकसमान नागरी कायदा लागू करण्याचे निर्देश सरकारला द्यावेत असी मागणी केली होती. मा. सर्वोच्च न्यायालयाने सदर बाब संसदेच्या अखत्यारीत असल्याचे कारण देऊन यासंदर्भात न्यायालयाने हस्तक्षेप करणे उचित नाही असे म्हणून सदर याचिका फेटाळली. मात्र या केसच्या सुनावणी दरम्यान भारतात प्रचलित विविध धर्मियांचे वैय्यक्तिक कायदे तसेच संविधानाच्या अनुच्छेद १३ अंतर्गत येणारे कस्टमरी लॉ किंवा रूढी परंपरागत कायदे यांची सविस्तर चर्चा करण्यात आली.

तथाकथित समान नागरी कायद्याविषयी लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरसमज पसरविण्याचे काम RSS-BJP ने सुरु केले आहेत. सद्याच्या केंद्र  सरकारने तथाकथित समान  नागरी कायद्याचा कोणताही मसुदा वगैरे प्रकाशित न करता यावर जनतेची मते मागवून याविषयीच्या गोंधळात भर टाकली आहे. यामुळे  काहीना वाटते की, समान नागरी कायदा म्हणजे सर्व जातीधर्माच्या लोकांना लागू होणारा एकच कायदा. समान नागरी कायद्याविषयी विशिष्ट विचारसरणीच्या  बऱ्याच लोकांचा  असा समज आहे की, हा कायदा झाला म्हणजे कोणालाही आरक्षण देता येणार नाही, ऍट्रॉसिटी कायदा रद्द होईल, मुस्लिमांना चार बायका करता येणार नाही, मुस्लिमांना तलाक देता येणार नाही. हा कायदा म्हणजे मुस्लीम स्त्रियांवर होणारा अन्याय रोखणारा कायदा आहे इत्यादी अनेक गैरसमज या प्रस्तावित कायद्याविषयी लोकांमध्ये पसरले आहेत. यासंदर्भात हे समजून घेतले पाहिजे की, समान नागरी कायदा असा कोणताही कायदा संविधानाला अपेक्षित नाही. संविधानाच्या अनुच्छेद ४४ मध्ये अपेक्षित कायदा एकसमान नागरी विधीसंहिता  ( Uniform Civil Code ) होय. 

एकसमान नागरी विधीसंहितेची आवश्यकता आहे किंवा कसे?

विवाह, घटस्फोट, दत्तक घेणे, वारसाहक्क इत्यादी बाबत देशात अनेक कायदे, रूढी व परंपरा अस्तित्वात आहेत. एकच धर्म मानणाऱ्या लोकांमध्ये विवाहादी प्रथा परंपरा, घटस्फोटाच्या पद्धती, संपत्तीचे वारसांमध्ये वाटप करण्याच्या पद्धती इत्यादीमध्ये सारखेपणा नाही.  यामध्ये बहुतेक सर्वच धर्मांच्या स्त्रियांच्या हक्काबाबत पक्षपातीपणा आढळतो. बरेचदा असा प्रचार केला जातो की, मुस्लीम पुरुषांना चार बायका करण्याची कायद्याने मुभा आहे. हिंदुना मात्र एकच विवाह करण्यास कायदा परवानगी देतो. मुस्लीम पुरुष त्याचा  बायकोला न्यायालयीन प्रक्रिया न अवलंबिता  कधीही घटस्फोट देऊ शकतो. मात्र, हिंदू,बौद्ध,जैन,शीख, ख्रिश्चन,पारसी या धर्माच्या लोकांना न्यायालयीन प्रक्रिया न अवलंबिता  कधीही घटस्फोट  देता येत नाही. वरवर पाहता या बाबी खऱ्या आहेत.बहुतेक सर्वच धर्मांच्या स्त्रियांना या बाबतीत पक्षपाती पद्धतीने वागणूक देण्यात आली आहे. यामुळे सर्व धर्मांच्या लोकांसाठी याबाबतच्या कायद्यात एकसारखेपणा असला पाहिजे आणि सर्वच स्त्रियांना त्यांचे हक्क सारखेपणाने देण्यात आले पाहिजेत  असे वाटणे स्वाभाविक आहे. मात्र प्रत्यक्ष वस्तुस्थिती तपासल्यास हे समज अपुऱ्या माहितीवर आधारित आहेत. भारतात राहणाऱ्या विविध धर्म, जाती, जमाती, समुदाय यांच्यामध्ये विवाह, घटस्फोट, दत्तक घेणे, वारसाहक्क इत्यादी बाबत एकसारखेपणा नाही.

भारतामध्ये अस्तित्वात असलेले वैय्यक्तिक कायदे 

भारतामध्ये विवाह, घटस्फोट, दत्तक घेणे, वारसाहक्क इत्यादी संबंधी हिंदू वैय्यक्तिक कायदा, मुस्लीम वैय्यक्तिक कायदा, ख्रिश्चन विवाह कायदा, पारसी विवाह कायदा याशिवाय  विविध राज्यात व केंद्रीय स्तरावरील एकूण १६ वेगवेगळे कायदे अस्तित्वात आहेत. ते पुढीलप्रमाणे

१) श्री प्रताप हिंदू कंसोलीडेशन ऑफ लॉज  एक्ट १९७७, जम्मू-काश्मीर

२) जम्मू-काश्मीर ख्रिश्चन विवाह व घटस्फोट कायदा 1957,

३) जम्मू काश्मीर मुस्लीम पर्सनल लॉ (शरियत) एप्लिकेशन एक्ट 2007   

४)  पाँडेचरी फ्रेंच सिव्हील कोड 1819. 

५) हिंदू विवाह (पाँडेचरी) सुधारणा ) कायदा 1971, 

६) गोवा,दिव,दमन -पोर्तुगीज सिव्हील कोड 1867,

७) गोवा,दिव,दमन हिंदू युसेजेस डीक्रीज  1880 

८) भारतीय ख्रिश्चन विवाह कायदा  -1872

९) भारतीय घटस्फोट कायदा -1869

१०) पारशी विवाह आणि घटस्फोट कायदा, 1936. 

११) आनंद विवाह (सुधारणा) कायदा – 2012 (शीख विवाह)

१२) विशेष विवाह कायदा, 1954,( Special Marriage Act, 1954, )

१३) भारतीय उत्तराधिकार कायदा, 1925,( Indian Succession   Act, 1925, )

१४) पालक आणि पाल्य कायदा, 1986 (The Guardians and Wards Act, 1986 )

१५)  मिझो विवाह, घटस्फोट आणि संपत्तीचा वारसा कायदा, 2014 मिझोरम 

१६) आसाम,मेघालय, त्रिपुरा, नागालँड आणि मिझोराम स्थानिक प्रथा-परंपरा कायदा (संविधान दुरुस्ती 1962)

वरील १६ कायद्याशिवाय विविध समुदायाच्या प्रथा-परंपरा यांना सुद्धा भारतीय संविधानाच्या अनुच्छेद १३ अन्वये कस्टमरी कायदा म्हणून मान्यता आहे. अशा कस्टमरी कायद्यांची संख्या शेकड्यांच्या घरात आहे. 

(भाग ५, क्रमशः)


- सुनील खोबरागडे



प्रेषित मुहम्मद (स.) म्हणाले, "तुम्ही लोक दुसऱ्या लोकांचे अनुनय आणि पालन करू नका. म्हणजे असा विचार करु नका की जर इतरांनी आमच्याशी चांगला व्यवहार केला तर आण्हीही त्यांच्याशी तसाच व्यवहार करू आणि जर कुणी आमच्यावर अन्याय, अत्याचार केले तर आम्हीदेखील त्यांच्यावर अत्याचार करू. असे करू नका. इतरांनी जर तुमच्याशी चांगला व्यवहार न करता तुमच्यावर अत्याचार जरी केले तरी तुम्ही त्यांच्याशी चांगल्या रीतीनेच वागा. आणि जर तुमच्याशी कुणी वाईट वागले असेल तर तुम्ही त्यांच्यावर अतिरेक करू नका."         (ह. हुजैफा (र.), तिर्मिजी, तरगीब व तरहीब)

प्रेषित मुहम्मद (स.) यांनी शिकवण दिली की, "जर एकादा माणूस पहिल्यापासून कुठं बसलेला असेल तर त्याला उठवून तुम्ही त्या जागेवर बसू नका. एकाध्या मजलिसमध्ये बसणाऱ्यांनी नंतर येणाऱ्यासाठी मोकळी जागा उपलब्ध करावी."

(ह. अब्दुल्लाह बिन उमर, मसुनद अहमद)

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात की "जर तुम्ही तीन माणसं एकत्र बसलेले असाल तर एका माणसाला बगळून दोन माणसांनी आपसात गुपचूपपणे बोलू नये."

ही हदीस ऐकल्यावर अबु सालेह नामक एका व्यक्तीने अब्दुल्लाह बिन उमर यांना विचरालं की जर चार माणसे एकत्र बसलेले असतील तर त्यातील दोन माणसांनी आपसात बोलावे की नाही? अब्दुल्लाह इब्ने उमर (र.) यांनी उत्तर दिले की अशा स्थितीत काही हरकत नाही.

प्रेषित मुहम्मद (स.) म्हणतात, "ज्या व्यक्तीमध्ये तीन गोष्टी असतील अशा व्यक्तींना अल्लाह न्यायनिवाड्याच्या दिवशी आपली सुरक्षा प्रदानकरील. आणि त्यास स्वर्गात दाखल करील.

(१) दुर्बलांशी मायाळूपणाने वागणे, (२) आपल्या मातापित्यांशी स्नेह आणि आपुलकीचा व्यवहार करणे आणि (३) गुलामांशी आणि सेवकांशी चांगला व्यवहार करणे.

त्याचबरोबर तीन गोष्टी अशा आहेत ज्यावर आचरण करण्याने अल्लाह आपल्या सान्निध्यात जागा देईल.

कडाक्याची थंडी असताना गार पाण्याने वुजू करणे, अंधार पडलेला असताना मस्जिदीला जाणे आणि भुकेल्या माणसांना जेवण देणे."

(ह. जाबिर (र.), तरगीब व तरहीब)

ह. मआजबिन जबल (र.) यांनी सांगितले की प्रेषित मुहम्मद (स.) यांनी दहा गोष्टींची शिकवण दिली.

१) अल्लाहबरोबर कुणास भागीदार करू नका. यासाठी तुमची हत्या जरी केली जाणार असली तरी.

२) आपल्या मातापित्यांची अवज्ञा करू नका, जरी त्यांनी तुम्हास पत्नी सोडण्याचे आदेश दिले तरी.

३) अनिवार्य नमाज सोडू नका. जो असे करील अल्लाह त्याची सुरक्षा काढून घेईल.

४) मद्यपान करू नका. सर्व कुकृत्यांची जननी दारु आहे.

५) अल्लाहची अवज्ञा करू नका, तसे केल्यास अल्लाहला राग येतो.

६) तुमच्या सैन्यातील सगळे सैनिक मारले गेले असले तरी शत्रुहा पाठ दाखवू नका.

७) जर कुठे महामारी पसरली असेल तर तेथून पळ काढू नका.

८) आपल्या ऐपतीनुसार घरच्यांना खाण्यापिण्याची सोय करा.

९) आपल्या घरच्यांचे प्रशिक्षण करा.

१०) अल्लाहचे अधिकार अदा करण्यासाठी आपल्या घरच्यांना भीती दाखवत जा.

(तरगीब व तरहीब, संदर्भ- तिबरानी)

संकलन : सय्यद इफ्तिखार अहमद



(१) येऊन ठेपला अल्लाहचा निर्णय, आता त्याच्यासाठी घाई करू नका. तो पवित्र आहे आणि श्रेष्ठ आहे त्या अनेकेश्वरत्वापासून जे हे लोक करतात. 

(२) तो या दिव्य प्रकटनाला ज्या दासावर इच्छितो आपल्या आज्ञेने दूतांव्दारे अवतीर्ण करतो. (या सूचनेसह की लोकांना) ‘‘सावध करा, माझ्याशिवाय तुमचा कोणीही ईश्वर नाही, म्हणून तुम्ही माझीच भीती बाळगा.’’ 

(३) त्याने आकाशांना व जमिनीला सत्याधिष्ठित निर्माण केले आहे, तो फार उच्च व श्रेष्ठ आहे त्या अनेकेश्वरत्वापासून जे हे लोक करीत आहेत. 

(४) त्याने मानवाला एका लहानशा थेंबापासून निर्माण केले आणि पाहता पाहता तो भांडखोर बनला. 

(५) त्याने जनावरे निर्माण केली ज्यांच्यात तुम्हाकरिता पोषाखही आहे आणि अन्नदेखील आणि तर्‍हेतर्‍हेचे दुसरे फायदेसुद्धा.


१) म्हणजे तो प्रकट होण्याची व अंमलात येण्याची वेळ जवळ आली आहे. बहुधा या फैसल्याने अभिप्रेत पैगंबर मुहम्मद (स.) यांचे मक्केहून हिजरत करणे आहे. थोड्याच कालावधीनंतर तसा हुकूमही दिला गेला. कुरआनच्या अध्ययनाने कळते की पैगंबर ज्या लोकांमध्ये नियुक्त केला जातो, ते जेव्हा इन्काराची सीमा गाठतात तेव्हा पैगंबराला हिजरत-स्वदेश त्यागाची आज्ञा दिली जाते व हाच हुकूम त्यांच्या भाग्याचा निकाल लावतो. त्यानंतर त्या लोकांवर एकतर विनाशकारी प्रकोप येतो किंवा पैगंबर व त्याच्या अनुयायींकरवी त्यांचे मूळ कापून टाकले जाते.  

२) आत्म्याने अभिप्रेत पैगंबरी कार्य आणि दिव्य प्रकटन होय ज्यांनी समृद्ध होऊन पैगंबर कृती व उक्ती करीत असतो.  

३) याचे दोन अर्थ असू शकतात व बहुधा दोन्ही अभिप्रेत आहेत. एक अर्थ असा की अल्लाहने वीर्याच्या क्षुद्र अशा थेंबापासून तो मनुष्य जन्मास घातला, जो वादविवादाची  क्षमता बाळगतो व आपल्या उद्देशासाठी युक्तिवाद करू शकतो. दुसरे असे की ज्या माणसाला अल्लाहने वीर्यासारख्या क्षुद्र द्रव्याने जन्मास घातले आहे, त्याच्या अहंभावाचा अतिरेक तर पाहा की खुद्द अल्लाहविरूद्धच भांडण्यासाठी तो तत्पर बनला आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget