Halloween Costume ideas 2015
Latest Post

सध्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर भारतातील लोकशाहीला अतिशय खडतर राजकीय प्रवासाला तोंड द्यावे लागत आहे. सर्व राजकीय मडळींची नीतीमत्ता अतिशय खालच्या  पातळीवर पोहोचली आहे. जवळपास सर्वच राजकारणी परस्परांच्या चुका काडण्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्यात निर्लज्जतेची परिसीमा गाठताना दिसत आहेत. पंतप्रधान  निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर अंतराळ यशाची घोषणा करतात, निवडणुकीशी धर्मकारण जोडतात, योगी आदित्यनाथ भारतीय लष्कराची संभावना ‘मोदी सेना’ करतात, सरकारी यंत्रणांकडून नेमके विरोधकांवर धाडसत्र सुरू होते... यांतील कोणतीच घटना निवडणूक आयोगाच्या लेखी आचारसंहितेचे उल्लंघन ठरत नाही! हे विशेष! लोकशाहीतील एका स्वायत्त  संस्थेचे अशा घटनांकडे दुर्लक्ष होताना काहीच वाटत नाही. त्यामुळे निवडणूक आयोगाची विश्वासार्हता अगदीच खालच्या तळाला गेल्यासारखे वाटते. निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर  तब्बल ६६ माजी सनदी अधिकारीच प्रश्न निर्माण करत असतील तर त्याची दखल घ्यायला हवी. निवडणूक आयोगाचे तीनही आयुक्त हे निवृत्त माजी प्रशासकीय अधिकारी आहेत. पण  हा आयोग आपल्या कर्तव्यात कुचराई करीत असल्याचा आरोप त्यांच्याच एकेकाळच्या काही सहकाऱ्यांनी थेट राष्ट्रपतींना पत्र लिहून केला आहे. खरे तर निवडणुकांची घोषणा झाली  त्याचवेळी निवडणूक आयोगाविषयी जनसामान्यांच्या मनांत शंकेची पाल चुकचुकली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय शास्त्रज्ञांनी विकसित केलेल्या उपग्रहमारक क्षमतेची केलेली घोषणा, त्यांचे महाराष्ट्रातील निवडणूक प्रचारसभेत धर्मकारण जोडणे, त्यांचे केरळमधील वायनाड मतदारसंघात हिंदू अल्पसंख्य आहेत असा धर्माचा संबंध निवडणुकीशी जोडणे  त्याचप्रमाणे भारतीय लष्कराची संभावना ‘मोदी सेना’ या शब्दांत योगी आदित्यनाथ यांनी करणे, ‘नमो टीव्ही’चे प्रकरण, पंतप्रधान मोदी यांच्यावरील चित्रपट प्रदर्शनास बंदी घालण्यात  झालेला विलंब, हा सर्व प्रकार निवडणूक आयोगाला आचारसंहितेचे उल्लंघन वाटला नाही. नीती आयोगाच्या अध्यक्षांनी काँग्रेसच्या न्याय योजनेवर टीका करणारे राजकीय वक्तव्य   करणे, राजस्थानचे राज्यपाल कल्याण सिंग यांनी जाहीर कार्यक्रमात लोकसभा निवडणुकीत भाजप जकिंणे महत्त्वाचे आहे, कारण देशाला नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान झाले पाहिजे, असे उद्गार काढणे हा सर्व प्रकार लोकशाहीला मारक आहे असेच अनेक राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे. या पाश्र्वभूमीवर आयकर खात्याकडून वा अन्य सरकारी यंत्रणांकडून सुरू  असलेल्या धाडसत्रांकडे पाहायला हवे. पहिल्यांदा कर्नाटकातील जनता दलाच्या मंत्र्यांवर अशी धाड घातली गेली. राजकीय हेतूनेच हे छापे घातले जात असल्याचा आरोप यातून अधिकच  अधोरेखित झाला आहे.
आयकर विभाग अशा कारवाईच्या बाबतीत पूर्ण निष्पक्ष आहे हे आपण कधी म्हणू शकलो असतो, जेव्हा त्यांचे छापे भाजप किंवा त्यांच्या मित्र पक्षांशी संबंधितांवरही पडले असते. पण  केवळ मोदी विरोधकांनाच लक्ष्य करून ही कारवाई झाल्याने त्यावरून राजकीय वादंग उद्भवणे अत्यंत स्वाभाविक आहे. असा पक्षपातीपणा सरकारी यंत्रणेकडून उद्भवू नये याची काळजी  निवडणूक आयोगानेच घेणे अपेक्षित आहे. सध्या निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवरच काही जणांकडून आक्षेप सुरू झाले आहेत. आचारसंहिता सुरू असतानाही सरकारकडून सरकारी  यंत्रणांचा असा बिनदिक्कत राजकीय वापर सुरू असेल तर तो गंभीर मामला मानला पाहिजे. अशा प्रसंगांमध्ये निवडणूक आयोगाची जबाबदारी अधिक वाढते. किंबहुना आयोग अत्यंत  जागरूकपणे सरकारी यंत्रणेचा राजकीय कारणासाठी होणारा वापर हाणून पाडत आहे, हे लोकांच्या लक्षात आणून देणे हे निवडणूक आयोगाचे प्राथमिक कर्तव्य आहे. निवडणूक आयोग  हाच देशातल्या पक्षनिरपेक्ष निवडणूक यंत्रणेचा कणा आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने शेषन यांच्या काळातील बाणेदारपणा पुन्हा दाखवण्याची वेळ आली आहे. सत्ताधारी पक्ष सरकारी  यंत्रणेचा गैरवापर करून निवडणुकांवर प्रभाव टाकू नये यासाठीच तर आचारसंहिता असते. त्याच्या काटेकोर अंमलबजावणीबाबत आयोगाची भूमिकाही तितकीच कठोर असणे अपेक्षित  असते. हेडमास्तरच्या भूमिकेतून त्यांनी या साऱ्या यंत्रणेवर लक्ष ठेवून ही निवडणूक यशस्वीरित्या पार पाडणे अपेक्षित आहे. आयकर विभागाच्या छाप्यांतून राजकीय हेतू साधला जात असेल तर निवडणूक आयोगाला तातडीने काही उपाय योजावेच लागतील. तर दुसरीकडे गेल्या काही वर्षांत लोकांना जात, धर्म, लिंग किंवा प्रदेशाच्या नावावर ठार मारले जात आहे,  त्यांच्यावर हल्ले होत आहेत, त्यांच्याशी भेदभावाचा व्यवहार होत आहे. देशाचे विभाजन करण्यासाठी, भीती उत्पन्न करण्यासाठी आणि अधिकाधिक लोकांना पूर्ण नागरिक म्हणून  जगण्यापासून वंचित करण्यासाठी विद्वेषाच्या राजकारणाचा वापर केला जात आहे. या अनुषंगाने विद्वेषाच्या राजकारणाला मतदान न करता लोकांच्यातील विभाजनाला मत देण्याचे  नाकारावे, हिंसा, धमक्या आणि सेन्सॉरशिपच्या विरोधात मत द्यावे असे आवाहन देशातील १००० हून अधिक लेखक, कलाकार, संगीतकार व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व  नागरिकांना बहुविध व समताधिष्ठित भारतासाठी मतदान करण्याचे आवाहन करावे लागत आहे, यावरून सध्या लोकशाही किती मोठ्या प्रमाणात धोक्यात आली आहे याची प्रचिती येते.

-शाहजहान मगदुम
(मो.:८९७६५३३४०४, Email: magdumshah@eshodhan.com)

दुर्दैवाने आजकाल मुलांमध्ये मैदानी खेळामधील रस संपत चाललेला आहे, जो कधीकाळी तरूणांना वेड लावणारा होता. आपण प्रत्यक्ष आपल्या डोळ्यांनी पाहिलेले आहे की, उन्हाळ्याच्या  सुट्टीमध्ये मैदानात आणि गल्लोगल्ली मुलं आपापली गट करून प्रत्येक खेळ खेळत होती. ज्यामुळे त्यांचे शरीर सुदृढ राहत होते. निर्विवादपणे खेळण्याची ती संधी अल्लाह सुबहानहू तआला ने त्यांना दिलेली होती. कबड्डी, क्रिकेट, खो-खो, व्हॉलीबॉल इत्यादी खेळांतून मुलांची आरोग्यदायी वाढ होत होती. हे सर्व खेळप्रकार आता मागे पडलेले असून, तंत्रज्ञानावर  आधारित मोबाईल गेमवर येऊन तरूण पिढी विसावली आहे. या खेळाने खरे पाहता मुलांचं लहानपण हिरावून घेतलेले आहे. आपल्या छोट्याश्या वयामध्ये ते एकटे पडलेले आहेत. त्यांचे  मित्र तुटलेले आहेत. प्रत्येकजण स्वतंत्र राहू इच्छितो.
आता मुलं एकत्रित खेळ खेळत नाहीत की, खळखळून हसत नाहीत. मस्तीसुद्धा करीत नाहीत. आजकाल बुद्धीबळ, कॅरम, लुडो आणि सापशिडी सारखे खेळही त्यांना आवडेनासे झालेले  आहेत. मित्रांबरोबर गप्पा मारण्यातही त्यांना रस उरलेला नाही. आज मुलं पूर्णपणे एकांतात रमतात. त्यांचा सारखा शोध सुरू असतो कधी आणि कुठे त्यांना एखादा रिकामा कोपरा  मिळेल आणि ते तिथे निवांत बसून आपल्या प्रिय मित्र म्हणजेच स्मार्टफोनमध्ये मग्न होऊन जातील.
असेही ऐकण्यात आले आहे की, दज्जाल एका डोळ्यांनी आंधळा असेल आणि लोकांना पथभ्रष्ट करेल. लक्षपूर्वक पाहता मोबाईल फोनलाही एकच डोळा (कॅमेरा) असतो. या मोबाईल फोनमध्ये लहान, मोठे, स्त्री, पुरूष सर्वच एवढे गुंग होत आहेत की, त्यात त्यांचे मानसिक आणि शारीरिक दोन्ही प्रकारचे आरोग्य उध्वस्त होत आहे, हे ही त्यांना कळेनासे झाले आहे.  इतपत या फोनचा वापर वाढलेला आहे. मोबाईल फोन कधीचाच मैदानी खेळांचा पर्याय म्हणून लोकांच्या जीवनात आलेला आहे. एका अंदाजाप्रमाणे 50 ट्न्नयापेक्षा जास्त लोक या  फोनच्या मायाजालात अडकलेले आहेत.
प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी एकदा एक अंगठी बनविली आणि आपल्या बोटात घातली व फर्माविले की, ’ इसने आज मेरी तवज्जोह तुम्हारी तरफ से हटा दी है, एक नजर इसे देखता  हूं और एक नजर तुम्हे’ आणि त्यानंतर प्रेषित सल्ल. यांनी ती अंगठी काढून टाकली. (संदर्भ : नसाई 5301).
यावरून स्पष्ट होते की, प्रेषित सल्ल. यांना अंगठी बोटात घातल्यावर त्यांचे लक्ष वारंवार त्या अंगठीकडे जात होते. प्रेषित जेव्हा आपल्या सोबत्यांसोबत बसले असले तरी त्यांचे लक्ष  बोटाकडेच जात होते. आपल्यामध्ये होत असलेला हा बदल त्यांनी तात्काळ अनुभवला. त्यांच्या लक्षात आले की, आपले लक्ष या अंगठीमुळे विचलित होत आहे. आपल्या महान  उद्देशापासून ही अंगठी काही प्रमाणात का होईना आपल्याला दूर घेऊन जात आहे. म्हणून तात्काळ त्यांनी ती अंगी काढून टाकली.
ज्याप्रमाणे आज लोकांनी स्वतःला मोबाईल फोनशी जोडून घेतलेले आहे. हे मोबाईल तर इतके लक्षवेधी आहे की, पाहणाऱ्याचे नुसते लक्षच विचलित होत नसून, मानसिक आणि शारीरिक आरोग्यावरही त्याचा विपरित परिणाम होत आहे. आपल्या महान प्रेषितांच्या या कृतीचा गांभीर्याने विचार करून आपण निर्णय घेतला पाहिजे की, मोबाईल फोनमध्ये एवढा  जीव गुंतविणे योग्य नाही. जो की तुम्हाला तुमच्या आप्तस्वकीयांपासून सुद्धा दूर घेउन जात आहे. मुलांमध्ये खोटे बोलण्याची सवय, खोट्या सबबी सांगण्याची सवय ही केवळ मोबाईलफोनमुळे वाढत आहे. मोबाईलमध्ये उपलब्ध असलेल्या इंटरनेटवर ते काय- काय पाहत असतील, कोणत्या गोष्टी आणि गीत ऐकत असतील, कोणते फोटो पाहत असतील, हे  त्यांचे त्यांनाच माहित. एवढे मात्र नक्की की मोबाईलवर पाहिल्या जाणाऱ्या सामुग्रीमुळे मुलं वाममार्गाकडे वेगाने जात आहेत. आज इंटरनेट हेच लहान मुलांपासून त्यांचे बालपण हिसकावून घेत आहे आणि तारूण्यामध्ये प्रवेश करणाऱ्या मुलां-मुलींना वाममार्गाला लावत आहेत. मुलां-मुलींना फॅशनच्या नावाखाली अर्धनग्नतेला प्रोत्साहित करत आहेत. त्यामुळे नवीन  पिढी निर्लज्जपणे वागत आहे.
मोबाईलने आज नवीन पिढीच्या त्या सर्व गोड आठवणी हिरावून घेतल्या आहेत. ज्याचा अनुभव मागच्या पिढीने काही वर्षापूर्वीच घेतला होता. किती चांगले झाले असते जर आपण व आपल्या मुलांनी प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्यावर नमूद हदीसचा विचार करून मोबाईल फोनचा चुकीच्या वापर करून आपण स्वतःला रोखू शकलो असतो. मोबाईलशी एवढे प्रेम करू  नये की, ज्यामुळे आपण आपले आरोग्य, मित्र, शिष्टाचार, संस्कृती, आणि धार्मिक आचरणापासून दूर होऊन जावू.

- फेरोजा तस्बीह
मिरजोळी, 9764210789

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य, यांच्या पहिल्या स्मृतीदिनानिमित्त ‘भाई वैद्य फाउंडेशन’ आणि ‘आरोग्य सेने’तर्फे देण्यात येणारा पहिला ‘लोकनेते भाई वैद्य पुरस्कार’, 2 एप्रिल  2019 रोजी ज्येष्ठलेखिका नयनतारा सहगल यांना देण्यात आला. त्यावेळी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगगवारे केलेल्या नयनतारा सहगल यांच्या भाषणाचा अनुवाद ‘द वायर मराठी’ हे  संकेतस्थळ व पुरोगामी जनगर्जनेच्या सौजन्याने.

हल्ली आपल्या आजूबाजूला मुळी ‘समाजवाद’ हा शब्दच ऐकू येईनासा झालेला आहे. सध्याच्या बाजारपेठेचा आहारी गेलेल्या, उपभोगवादी समाजामध्ये प्रत्येक गोष्टीची किंमत तिच्या  बाजारपेठेतल्या मूल्यावरून जोखली जात आहे. ज्या समाजातले मूठभरच प्रतिष्ठित लोक अतिश्रीमंत असतात, त्या समाजात समाजवाद ‘आउटऑफ फॅशन’ आणि कालबाह्य झालेला  आहे, असे समजले जाते. आजच्या नव्या भारतात काही मोजक्या अब्जाधीशांकडे देशातली बहुतांश संपत्ती एकवटली आहे, तर दुसरीकडे याच देशात कोट्यवधी लोक दारिद्र्यरेषेखाली  राहत आहेत. ही असमानता आता जणू सगळीकडे गृहीतच धरली जात आहे. त्यामुळेच आजच्या या परिस्थितीत संपूर्ण जीवनभर व्रतस्थपणे समाजवादी राहिलेल्या एका महान  व्यक्तीच्या स्मृतीप्रीत्यर्थ मिळणारा हा पुरस्कार स्वीकारताना मला विशेष आनंद होतो आहे. ज्या माणसाचा आदर्श बाजारपेठेतली मूल्ये नव्हे, तर मानवी मूल्ये राहिलेला आहे, अशा  एका थोर व्यक्तीच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार आहे.
वयाच्या 18व्या वर्षीच भाई काँग्रेस सोशलिस्ट पार्टीचे सदस्य बनले. त्यांनी देशसेवेचा आपला निश्चय कधीच ढळू दिला नाही. आपल्या राजकीय आयुष्याची सुरुवात त्यांनी ब्रिटिशांशी  लढा देण्यापासून सुरू केली. अगदी किशोरवयातच ते ‘भारत छोडो’ अभियानात सहभागी झाले होते. त्यानंतर स्वतंत्र भारतातदेखील त्यांनी सर्व भारतीयांना न्याय्य व समतेची वागणूक  मिळावी यासाठीच ते अखेरपर्यंत काम करत राहिले. सन 1931 पासूनच समाजवाद काँग्रेस पक्षाच्या आर्थिक धोरणाच्या केंद्रस्थानी राहिलेला होता. ‘हा केवळ एक आर्थिक सिद्धांत नसून  आयुष्य कसे जगावे यासाठीचे तत्त्वज्ञान आहे,’ असे नेहरूंनी समाजवादाबद्दल म्हटले होते. त्यांच्या दृष्टीने तत्कालीन भारतातल्या वास्तवाला संवेदनशीलपणे तसेच व्यावहारिकपणे हाताळण्याचा तो सर्वांत योग्य मार्ग होता. आपला निधर्मी लोकशाही राष्ट्राच्या विकासाचा डोलारा ज्यावर उभा राहिला, त्याला आधार देणारे समाजवादाचे मॉडेल हाच खरा पाया होता.
देश-विदेशातल्या सर्वोत्कृष्ट आणि सर्वांत बुद्धिमान लोकांनी याला साथ दिली. भारतातल्या ज्या झपाटून गेलेल्या तरुणांना सामाजिक आणि आर्थिकबदल देशात घडवून आणायचे होते, विशेष करून त्यांना समाजवादाने आकर्षित केलेच होते. भाई वैद्य अशाच काही झपाटलेल्या पुरोगामी तरुणांपैकी एकहोते. एक राजकीय कार्यकर्ता या जबाबदारीतून त्यांनी पोर्तुगिजांच्या  जोखडातून गोव्याची मुक्तता करून घेण्यासाठीच्या स्वातंत्र्य लढ्यात भाग घेतला होता. सन 1974मध्ये जयप्रकाश नारायण यांच्या इंदिरा गांधी सरकारच्या विरोधातल्या दडपशाहीविरोधी  चळवळीतही त्यांनी भाग घेतला होता. त्यावेळी खरेतर भाई वैद्य आणि माझ्या भेटीचा योग आला असता. कारण त्यावेळी मीही जेपींच्या चळवळीतच काम करत होते. जेपींच्या आग्रहामुळे मीत्यांच्या ‘एव्हरीमन्स वीकली’ या साप्ताहिकात त्या काळात स्तंभ लिहीत होते. जून 1975 मध्ये आणीबाणी जाहीर झाल्यानंतर सेन्सॉरच्या बडग्याखाली हे साप्ताहिक बंद  करण्यात आले. त्याच्या शेवटच्या अंकाच्या प्रती तर फाडून नष्टकरण्यात आल्या. अगदी तोवर मी त्या साप्ताहिकात नेमाने लिहीत होते. भाई वैद्य पुण्याचे महापौर होते. ज्यावेळी  सगळ्या विरोधी पक्षांना गप्प करण्यात आले होते, त्यावेळी भाईंनी मात्र आणीबाणीविरोधात एक सार्वजनिक सभा घेतलेली होती. त्यांना लगेचच तत्कालीन मिसा (म्हणजे आंतरिक  सुरक्षा व्यवस्था अधिनियम) या कुख्यात कायद्याखाली तुरुंगात टाकण्यात आले.
1975 ते 1977 या काळात त्यांनी हा तुरुंगवास भोगला. अगदी किशोरवयापासूनच भाई वैद्य जेव्हा एखादी राष्ट्रीय आपत्ती असेल, तेव्हा हिरिरीने त्यात सहभाग होत हे दिसतेच. राष्ट्रीय महत्त्वाच्या गोष्टींत ते नेहमीच सहभागी होत असत. जेव्हा कुठल्याही प्रकारचे स्वातंत्र्य धोक्यात येई, तेव्हा ते अगदी अढळपणे त्या लढ्यामध्ये सहभागी होत. काँग्रेस  समाजवादी पक्षाने स्वतःला नंतर काँग्रेसपासून वेगळे केले. याचे कारण महात्मा गांधींची मवाळ आर्थिक धोरणे या पक्षाला पसंत नव्हती. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर या पक्षाने शेतकरी  आणि कामगार हा केंद्रबिंदू असणारा स्वतःचा तीव्र परिवर्तनवादी कार्यक्रम राबवायला सुरुवात केली. या पक्षाला आपण कधी सत्तेवर येऊ, अशी किंचितशीही अपेक्षा नव्हती. त्यातल्या  कुणालाच वैयक्तिक तर सोडाच, राजकीय स्वरूपाचा फायदाही नको होता. या पक्षाचे सारे सदस्य एका विशिष्टध्येयापोटीच राजकारणात कार्यरत होते. उराशी असे उदात्त ध्येय  बाळगलेल्या त्या काळच्या स्त्री-पुरुषांमध्ये भाई वैद्य यांचं नाव अग्रस्थानी घेतले पाहिजे.
आता काळ खूपच बदललेला आहे. सद्यःकालीन भारताचे आपल्या देशाच्या 60 च्या दशकातल्या राजकारणाशी काहीही नाते उरलेले नाही. निधर्मी वातावरणावरच आता मुळात हल्ला  होतो आहे. समान हक्क आणि समान नागरिकत्व यांच्या चिंधड्या करण्यात येत आहेत. भारतीयांची विभागणी आता हिंदू व अन्य यांमध्ये करण्यात येते आहे. वास्तवात ही विभागणी  हिंदू आणि अन्य अशी नसून, ती हिंदुत्ववादी या नावानं ओळखली जाणारी अतिरेकी जमात आणि अन्य लोक अशीच खरेतर आहे. खऱ्या हिंदुत्वाच्या अर्थाच्या तर हे अगदी विरुद्ध आहे.  अनेकविवेकनिष्ठ हिंदू या जातीयवादी विचारधारेला व परकीय म्हणून हिणवल्या जाणाऱ्या अन्य भारतीयांच्या विरोधात राबवल्या जाणाऱ्या सूडबुद्धी व हिंसाचार यांनी प्रभावित असलेल्या  राजकीय कार्यक्रमाला विरोध करत आहेत. सध्याच्या आपल्या लोकशाहीत मुद्दामच धर्माला कोणतीही भूमिका दिलेली नाही. या साऱ्याचा उद्देश आपल्या निधर्मी लोकशाहीच्या जागी एक  हिंदू राष्ट्रप्रस्थापित करणं हा आहे. आपल्या देशाची स्थापना करणाऱ्या राज्यघटनेच्या समितीमध्ये बहुसंख्य लोक हिंदू होते, तरीदेखील त्यांनी स्वातंत्र्यानंतर एका धार्मिक ओळखीवर  आधारित देशाची संकल्पना फेटाळून लावली होती. एका निधर्मी देशातच सर्व धर्मांबद्दल आदर राहील व त्याचं संरक्षण केलं जाईल, हे त्यांना पक्के ठाऊक होतं. त्यामुळेच सर्व  भारतीयांना आपापल्या विश्वासानुसार धर्माचे आचरण करता येऊ शकले असते. घटना समितीनं लोकशाहीची निवड करण्यामागे विविध संस्कृतींचे पाईक असलेल्या सर्वांनाच एकसमान मताधिकार मिळावा, नागरिकत्वाचे अधिकार सर्वांना समान असावेत हे उद्देश होते. आता या सुसंस्कृत वारशालाच नष्ट करण्याचे प्रयत्न जोमाने सुरू आहेत.
या नव्या आक्रमक हिंदुत्वाच्या व्याख्येनुसार अन्य धर्मीयांना आता परकीय म्हणण्यात येते आहे. विशेष करून त्यातल्या मुस्लीमांना तर देशाचे शत्रू असल्यासारखेच वागवण्यात येते  आहे. हे यावरच थांबत नाही, तर ज्या लोकांचे सत्ताधारी हिंदुत्व विचारधारेसोबत वैचारिक मतभेद आहेत, त्यांची तर चक्क राष्ट्रद्रोही अशीच संभावना करण्यात येत आहे. जे हिंदुत्वाला  अनुकूल मते मांडणार नाहीत त्यांना वेचून-निवडून शिक्षा देण्यात येत आहेत. या नव्या हिंदुत्ववादी भारतात शोधक वृत्ती, वैज्ञानिक दृष्टिकोन, विवेकपूर्ण दृष्टिकोन आणि कल्पकता,  वैचारिक स्वातंत्र्य या गोष्टींना स्थान असणार नाही. भारत हे एक लोकशाही राष्ट्र आहे याकडे दुर्लक्ष करून आपण मागे मागेच जाऊ पाहतो आहोत.
कुठल्याही लोकशाहीमध्ये नागरिकांना राष्ट्रद्रोहाच्या किंवा कटकारस्थानांच्या खोट्या आरोपांवरून तुरुंगात पाठवलं जात नाही. ज्या नागरिकांचा कोणताही दोष नाही, त्यांचा सार्वजनिकरीत्या छळ करण्यात येत आहे. ते केवळ मुस्लीम आहेत म्हणून त्यांना ठेचून मारण्यात येत आहे. जमावांचे हे हल्ले मुख्यतः मुस्लीमांवर होत असतात. ख्रिश्चनांच्या चर्चेसची जमावाद्वारे मोडतोडकेली जाते. आता ख्रिश्चन धर्मीयांचाही छळ सुरू झालेला आहे. खऱ्या लोकशाहीमध्ये अज्ञात मोटारसायकलस्वार येऊन नागरिकांना गोळ्या घालत नाहीत. पाच  विख्यात विवेकवादी लोकांच्या बाबतीत आणि मुक्त विचाराचं समर्थन करणाऱ्या लोकांच्या बाबतीत मात्र आपल्या देशात हे घडले. अंधश्रद्धायुक्त कल्पना नाकारण्याबद्दलचे व स्वतंत्र  विचार करण्याबद्दलचे शासन म्हणून त्यांना मोटारसायकलस्वार पाठवून गोळ्या घालण्यात आल्या. याहूनही महत्त्वाची गोष्ट म्हणजे, कुठल्याही सुदृढ लोकशाहीत गुन्हेगारांना अटक केली  जाते व त्यांनी केलेल्या गुन्ह्यांबद्दल शिक्षाही दिली जाते. येथे मात्र बरोबर उलटे घडत आहे. येथे गुन्हेगार मोकाट हिंडत आहेत. त्यांना सत्ताधारी पक्षाचं केवळ संरक्षणच पुरवून थांबत  नाही, तर त्यांचा सत्कारदेखील होतो आहे. सध्या जे सत्तेत आहेत त्यांनी अगदी स्पष्ट संदेश दिलेला आहे: एकतर आमच्यासोबत राहा किंवा परिणाम भोगायला तयार व्हा. अर्थातच,  हा आपल्या घटनात्मक तरतुदींवरच थेट हल्ला आहे.
आपली घटना जीवन, स्वातंत्र्य आणि समानता यांचा सर्व नागरिकांना हक्कमिळण्याची खात्री देते. आजवर जे समाजघटक आपल्या विविध संस्कृती असलेल्या देशात शतकानुशतके राहत आहेत, ज्यांचे अस्तित्व आपण अगदी गृहीतच धरून चालतो, जे लोक अगदी शांततेन आपल्यासोबत राहात आहेत, ती जीवन पद्धतीच नष्टकरण्यात येते आहे. स्वातंत्र्यानंतर उभारणी करण्यात आलेल्या भारताच्या सर्वसमावेशक अशा मुख्य लोकशाही गाभ्याचा आणि भारतीयत्व या संकल्पनेचाच आज रानटीपणे विध्वंस होताना दिसतो आहे. हा विध्वंस  साऱ्याच क्षेत्रांना व्यापून टाकतो आहे. आज अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला तर होतोच आहे. इतिहास, विज्ञान, कला, माहिती, शिक्षण किंवा संस्कृतीचे अनेक पैलू दर्शवणाऱ्या  अनेकसंस्था देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर स्थापन करण्यात आल्या होत्या. या साऱ्या संस्थांवर आता सत्ताधारी गटाच्या मूलतत्ववादी वृत्ती असणाऱ्या लोकांनी कब्जा केलेला आहे.  विद्यापीठांचे स्वातंत्र्य व त्यांचा सच्चेपणा याबाबतच आता शंका उपस्थित करण्यात येत आहेत. सरकारविरोधी विचार मांडण्याबद्दल विद्यार्थ्यांना अटक करण्यात येते आहे. वास्तवात  काय घडले होते, याचा कुठलाही विचार न करता शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये मोठ्या प्रमाणावर बदल करून इतिहासाचे पुनर्लेखन केले जात आहे.
एक दोन राज्यात तर पाठ्यपुस्तकांतून मोगल साम्राज्याचा इतिहासच काढून टाकण्यात आलेला आहे. काही पाठ्यपुस्तकांमध्ये गांधी व नेहरू यांचा उल्लेखच केलेला नाही किंवा तो  असलाच तर त्यावर टीकाच करण्यात आलेली आहे. संग्रहालये आणि वेगवेगळ्या अकादमी यांना सरकारी नियंत्रणाखाली आणण्यात आलेले आहे. त्यामुळे त्यांचे स्वातंत्र्य तर गेलेलेच  आहे, शिवाय ज्या उद्देशाने त्यांची निर्मिती करण्यात आली तोही उद्देशही नष्ट होतो आहे. भारत स्वतंत्र झाल्यापासून आपला देश आधुनिक बनवण्यासाठी अत्यावश्यक अशा वैज्ञानिक  वृत्तीची जोपासना करण्यात आलेली होती. तिची जागा आज कुठल्यातरी प्राचीन दंतकथा आणि कल्पना घेऊ पाहत आहेत. याबाबतची एक आवडती कल्पना म्हणजे पूर्वीच्या हिंदू  संस्कृतीच्या सुवर्णकाळाशी जोडलेली ओळख. त्यावेळी म्हणे देश सांस्कृतिकदृष्ट्या, वांशिकदृष्ट्या आणि धार्मिकदृष्ट्या अत्यंत शुद्ध होता. हिंदूंचे शुद्धत्व बिघडवायला बाहेरच्या कुणाचाही  देशावर वाईट प्रभाव नव्हता. अशा प्रकारच्या धार्मिक ओळखीचे आणि कुठल्यातरी काल्पनिक वांशिक शुद्धतेचे तीव्र वेडामुळे भारत कधी आधुनिक राष्ट्र बनू शकेल का?
कुठलीही संस्कृती अन्य संस्कृतींची सरमिसळ होऊनच बनत असते. आपल्या सीमेपलीकडच्या संस्कृतीचा अजिबातच प्रभाव नसलेला एखादा शुद्ध वंश किंवा शुद्ध संस्कृती अशी गोष्ट  कधीच अस्तित्वात नसते. व्यक्ती आणि राष्ट्रीयत्व या दोहोंबाबतीतही हे लागू पडते. या गोष्टी अन्य लोकांसोबत होणाऱ्या देवाणघेवाणीमुळंच तयार होत असतात. आपल्याला अपरिचित  असणाऱ्या संस्कृतीचा आपल्यावर प्रभाव आहे आणि त्यामुळंच आपली मने अधिक विस्तारली आहेत, हे आपण त्यांचे देणे लागतो. त्यांनी आपलं आयुष्य समृद्ध केलेलं आहे; आणि  अर्थातच आपणही त्यांच्यावर आपला प्रभाव सोडलेला आहेच ना. मी उत्तर भारतात राहते. तिथली ऐतिहासिक स्मारक, संगीत, गीते, नृत्य, भाषा, अन्नपदार्थ आणि वागण्याबोलण्याची  रीत या साऱ्यांवरच इस्लामी वारशाचा ठसा आहे. भाषेबद्दल एक आठवण सांगते. 1947 नंतर स्वतंत्र भारतामध्ये नेमक्या किती भाषांना अधिकृत राष्ट्रीय भाषांचा दर्जा द्यावा असा प्रश्न  त्यावेळी उपस्थित झालेला होता. त्यावेळी असा दर्जा देण्यासाठी सुमारे तेरा भाषांची यादी काढण्यात आलेली होती. पंतप्रधान पंडित नेहरूंनी ही यादी काळजीपूर्वक पाहिली. यात उर्दूचा  समावेश का केलेला नाही, अशी पृच्छा त्यांनी केली. त्यावर उर्दू ही कुणाचीच मातृभाषा नसते ना म्हणून असे केले, हे संबंधित विभागाच्या अधिकाऱ्याने उत्तर दिले. नेहरू म्हणाले, असे  आहे? ती तर माझी मातृभाषा आहे. त्यांनी उर्दूचा या यादीत समावेश करायला लावला. हे सांगताना मी कोणतीही अतिशयोक्ती करत नसून अगदी खरीखुरी, घडलेली गोष्ट सांगते आहे.  यातून मला आपल्या मिश्रसंस्कृतीय वारशाला अधोरेखित करायचे आहे. आपण अशा वास्तवात घडलेल्या घटनांमधून आपली विविधता आजवर जोपासली आहेच. याखेरीज आपली गाणी,  नृत्य आणि सिनमो यामंधनूही अशी विविधता सकारात्मकरीत्या, अगदी आनंदाने जोपासलेली दिसते. एक कादंबरीकार म्हणून माझ्या लेखनाचं बरंचसं श्रेय माझ्या हिंदू- मुस्लीम  वारशाला जातं. येथे मी तुम्हाला एक उदाहरण देते. माझ्या ‘मिस्टेकन आयडेंटिटी’ या कादंबरीत भूषणसिंग नावाच्या कवीचे एक पात्र आहे. सन 1929 मध्ये, ब्रिटिश राजवटीमध्ये  त्याला अटक करण्यात येते. कोर्टात त्यावर खटला भरण्यात येतो. सरकारी वकील त्याला विचारतात, तुमचा धर्म कोणता आहे? त्यावर भूषणसिंग उत्तरतो, माझा धर्म आहे कविता.  नाहीतर एरवी मी हिंदू-मुस्लीम असतो. सरकारी वकील यावर चिडतात आणि त्याला पुन्हा नीट उत्तर द्यायला सांगतात. ते पुन्हा विचारतात, तुम्ही कोण आहात? हिंदू की मुस्लीम?  भूषणसिंग यावर काही काळ विचार करतो मग तो म्हणतो, खरेतर माझी मातृभाषा हिंदी आहे आणि माझी पितृभाषा आहे उर्दू. मी या दोन्ही भाषांमध्ये स्वप्ने पाहतो. माझे अन्न आणि  त्यामुळे माझी पचनसंस्था बहुतांश मुस्लीम आहे, पण माझ्या शरीरातून जे रक्त वाहते ते आहे हिंदू पद्धतीने. आणि माझे हृदय एकदा या धर्मासाठी, तर एकदा त्या धर्मासाठी स्पंदत  असतं.
आज आपण भाई वैद्यांचं जीवन आणि त्यांचं कार्य यांची स्मृती जागवत असताना त्यांनी भारताच्या उभारणीसाठी जे योगदान दिलं ते पुन्हा एकदा स्मरू या. त्यानीं एका मुक्त आणि  न्याय्य समाजाच्या निर्मितीसाठी आपलं संपूर्ण आयुष्य वेचलं, ते पुन्हा एकवार आठवू या. त्यांच्या स्मृतीप्रीत्यर्थ मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार.

जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या अध्यक्षपदी सय्यद सआदतुल्ला हुसैनी यांची निवड नुकतीच झाली. त्यांचा जन्म 1973 चा असून, ते इले्नट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशन इंजिनिअर  आहेत. त्यांची स्वतःची एक संगणक कंपनी आहे. त्यांना इस्लामची अत्यंत चांगली समज असून, आत्तापर्यंत त्यांनी 12 पुस्तके आणि 200 पेक्षा जास्त लेख उर्दू आणि इंग्लिशमध्ये  लिहिलेले आहेत.
या पदावर निवड होण्यापूर्वी ते जमाअत-ए-इस्लामी हिंदचे उपाध्यक्ष होते. त्यापूर्वी ते स्टुडन्ट इस्लामिक ऑर्गनायझेशनचे राष्ट्रीय अध्यक्ष होते. ते बोर्ड ऑफ ह्युमन वेलफेअर फाऊंडेशन  दिल्लीचे सदस्य असून, सेंटर फॉर स्टडी अँड रिसर्च दिल्लीचे संचालक आहेत. इदारतुल तहेकीक व तसनीफ-ए-इस्लामी अलिगढचे ते आजीवन सदस्य असून, इस्लामिक अ‍ॅकॅडमिक ट्रस्ट  दिल्लीचे विश्वस्त आहेत. शिवाय, बोर्ड ऑफ इस्लामिक पब्लिकेशन दिल्लीचे सदस्यही आहेत. शिवाय, एडिटोरियल बोर्ड ऑफ तसनीफी अ‍ॅकॅडमी, एमएमआय पब्लिशर्स दिल्लीचे सदस्य  असून, अ‍ॅडव्हायझरी बोर्ड जमियतुल फलाह आजमगढचे माजी सदस्य राहिलेले आहेत. ते आपल्या लेखन शैली आणि विचारपूर्ण भाषणांसाठी इस्लामी जगतामध्ये परिचित आहेत. त्यांची  ही निवड 4 वर्षासाठी म्हणजे 2023 पर्यंत झालेली आहे. अगदी साधी राहणीमान आणि विनम्रतेने परिपूर्ण व्यक्तीमत्व असलेले हुसैनी हे त्यांच्या अभ्यासपूर्ण भाषणासाठी प्रसिद्ध आहेत.  भारतीय इस्लामी जगतात अंत्यत महत्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या या पदावर निवड झाल्यानिमित्त त्यांच्यावर सदिच्छांचा वर्षाव होतोय. जमाअतच्या देशभरातील सदस्यांनी मतदान करून  निवडून दिलेले प्रतिनीधी दर चार वर्षांनी अमीर (अध्यक्ष) निवडत असतात. जमाअतची ही लोकशाहीजन्य इस्लामी पद्धतही कौतुकास्पद आहे.

जमाअते इस्लामीच्या अध्यक्षांची निवड कशी होते?

जमाअते इस्लामी हिंदची स्थापना ऑगस्ट 1941 मध्ये अखंड भारत असताना लाहौर येथे झाली. देशाच्या फाळनीनंतर 1948 साली जमाअते इस्लामी हिंद नावाची स्वतंत्र संघटना अस्तित्वात आली जिचा जमाअत-ए-इस्लामी पाकिस्तानशी कुठलाच संबंध नाही. जमाअतए- इस्लामी हिंदचे पहिले अध्यक्ष अबुलैस इस्लाही नदवी हे होते. आतापावेतो या संघटनेचे पाच  अध्यक्ष झालेले असून, मागच्या आठवड्यात मौलाना जलालुद्दीन उमरी यांच्या ठिकाणी तरूण अभियंते व जमाअतचे उपाध्यक्ष सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची बहुमताने निवड झाली. ही निवड कशी होते? याबद्दल अनेक लोकांच्या मनामध्ये उत्सुकता आहे. लोकांना वाटते की, इतर संघटनांच्या निवडीप्रमाणेच या संघटनेध्येही काही लोक अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल   करत असतील, उमेदवार जोरदार प्रचार करत असतील आणि शेवटी त्यावर मतदान होऊन अध्यक्षाची निवड होत असावी. मात्र असा काही प्रकार येथे होत नाही. जमाअत-ए-इस्लामी  हिंद हिची व्यवस्था शुराई निजाम म्हणजे एकमेकांच्या सल्लामसलतीने चालणाऱ्या व्यवस्थेवर अवलंबवून आहे. जी की पूर्णपणे देशाच्या घटनेच्या आधीन काम असून नोंदणीकृत  संघटना आहे. जमाअत-ए-इस्लामीचे जवळ-जवळ 12 हजार पेक्षा अधिक सदस्य भारताच्या 20 मोठ्या राज्यात आहेत. 31 मार्च 2019 रोजी मागच्या अध्यक्षांची 4 वर्षांचा कार्यकाळ  संपला होता. पुढील अध्यक्षांच्या निवडीसाठी देशभरातून मजलिस-ए-नुमाईंदगान (प्रतिनिधी सभा)चे 157 सदस्य दिल्लीत जामिया नगरमधील जमाअत-ए-इस्लामी हिंदच्या मुख्य  कार्यालयात 1 एप्रिलपासूनच जमा झाले होते. त्यांची निवड याआधीच झालेली होती. प्रतिनिधी सभेच्या सदस्यांची निवडसुद्धा फेब्रुवारी 2019 मध्ये झाली. यांची निवड दोन टप्प्यामध्ये  झाली.
पहिल्या टप्प्यामध्ये जमाअते इस्लामीच्या प्रत्येक सदस्याने आपल्या पसंतीच्या राज्याबाहेरील सदस्याचे नाव सुचवायचे असते व दूसऱ्या टप्प्यात स्वतःच्या राज्यातील पसंतीचे नाव  सुचवायचे असते. यात स्वतःचे नाव सुचविता येत नाही. जमाअते इस्लामी हिंदचे वैशिष्ट्ये असे की, या संघटनेमध्ये कोणत्याही पदासाठी कोणालाही स्वतःचे नाव सुचविता येत नाही किंवा त्यासाठी लॉबिंग करता येत नाही. तसे काही आढळून आल्यास तात्काळ त्या सदस्याची संघटनेतून हकालपट्टी केली जाते.
दोन टप्प्यात झालेल्या निवडणुकीनंतर प्रतिनिधी सभेचे सर्व सदस्य दिल्ली येथे जमा झाले. प्रतिनिधी सभा ही जमाअते इस्लामी हिंदची सर्वात मोठी आणि प्रभावशाली सभा असते. या  सभेच्या सदस्यांना अमीरे जमाअतच्या निवडीचे व त्यांना काढून टाकण्याचे सुद्धा अधिकार असतात. शिवाय, चार वर्षाच्या काळामध्ये जमाअतची ध्येय धोरण ठरविणे तसेच कामाचे नियोजन करणे हे अधिकार याच प्रतिनिधी सभेला असतात. यावर्षी 1 एप्रिल पासून सुरू झालेल्या प्रतिनिधी सभेच्या राष्ट्रीय अधिवेशनामध्ये 157 सदस्यांनी आपसात विचारविमर्श  करून अनेक नावांपैकी सय्यद सआदतुल्लाह हुसैनी यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून बहुमताने निवड केली. येथेही सआदतुल्लाह हुसैनी यांनी स्वतःला अध्यक्ष करावे म्हणून नामांकन  दाखल केले नव्हते किंवा लॉबिंगही केलेली नव्हती. उलट ही जबाबदारी मला नको, असे ते म्हणत होते. उपस्थित 157 सदस्यांपैकी काही सदस्यांनी काही लोकांची नावे या पदासाठी  सुचविली होती. त्यावर ज्यांची नावे या पदासाठी सुचविली गेली होती. त्यांना बैठकीत सामील न करता त्या सर्व नावावर प्रतिनिधी सभेमध्ये सखोल चर्चा झाली. जमाअतच्या  संविधानाप्रमाणे अध्यक्षामध्ये जी गुणवत्ता हवी ती सुचविल्या गेल्या लोकांपैकी कोणामध्ये जास्त आहे. त्यांची बलस्थाने कोणती आहेत इत्यादीवर सखोल चर्चा झाली व त्यानंतर  सआदतुल्ला हुसैनी यांची बहुमताने निवड झाली. ही निवड मजलिसे नुमाईंदगान ने एकमताने 7 एप्रिल रोजी केली. त्यामुळे त्यांना राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून घोषित करण्यात आले. जमाअत-ए-इस्लामी हिंदचे अध्यक्षपद तर सोडा साध्या सदस्यात्वासाठीही जर कोणाची निवड करायची असेल तरी त्याचे चारित्र्य तपासले जाते, त्याचे व्यवहार तपासले जातात व  जमाअतच्या संविधानाच्या कलम 8 आणि 9 प्रमाणे त्याचा दर्जा आहे काय, हे पाहिले जाते. जमाअतचे सर्व व्यवहार पारदर्शक आणि काटेकोरपणे केले जातात.

- बशीर शेख
bashirshaikh12@gmail.com

हमारा काम ही दुश्मन से प्यार करना है
जमाने भर को दिया दर्स-ए-दोस्ती हमने

श्रद्धा आणि वर्तनाच्या आधारे जर का माणसांचे वर्गीकरण केले तर साधारणपणे तीन प्रकारची माणसं असतात. एकप्रकार अशा माणसांचा असतो की ज्यांना कुठलीच बंधने मान्य  नसतात. व्यक्ति स्वातंत्र्य हीच त्यांची विचारसरणी असते. प्रत्येक बाबतीत त्यांची स्वतःची अशी मतं असतात. असे लोक प्रचंड बुद्धी प्रामाण्यवादी असतात. कोणताही निर्णय ते  आपल्या बुद्धी प्रमाणे घेतात. त्यांना स्वतःच्या बुद्धीवर प्रचंड विश्वास असतो. अशा लोकांना कुठल्याही धर्माची बंधने आवडत नाहीत. स्वतःला एथिस्ट (नास्तीक) म्हणवून घेतांना त्यांना कोण कौतूक वाटतं.
दुसऱ्या प्रकारची माणसे एखाद्या धर्माला जरूर माणतात. परंतु धर्माचरणामध्ये स्वतःच्या बुद्धीलाच प्रमाण माणतात. जी धार्मिक बंधने त्यांच्या बुद्धीला पटतात त्या बंधनाची ते  अंमलबजावणी करतात जी पटत नाहीत त्यांचा ते विरोध करतात. त्यांची स्वतःची अशी जीवनशैली असते. त्यानुसार ते जगत असतात. त्यांच्यात काही प्रमाणात धार्मिकता तर काही प्रमाणात धर्म विरोध दोन्ही असतात. एकंदरित ते धर्माप्रमाणे चालत नाहीत तर धर्माला आपल्या प्रमाणे चालविण्याचा प्रयत्न करत असतात.
तीसऱ्या प्रकारचे लोक स्वतःच्या बुद्धीचा अजीबात वापर करत नाहीत तर वाडवडिलांच्या रीतिरिवाजाप्रमाणे जीवन जगत असतात. त्यांना दुसऱ्यांचे अंधानुकरण करतांना काहीच वाईट  वाटत नाही उलट अभिमान वाटतो.
पहिल्या प्रकारची माणसे स्वातंत्र्याच्या नावाखाली कोणतेही योग्य नियंत्रण सुद्धा नाकारतात. स्वैराचाराला सुद्धा स्वातंत्र्य समजण्याइतपत काहींनी प्रगती (?) साधलेली असते. त्यांना ही  गोष्टच मान्य नसते की विचार आणि वर्तनाच्या स्वातंत्र्यावर थोडी तरी बंधने असावित. मग अशा प्रकारची माणसं जेव्हा सर्व प्रकारच्या मर्यादा ओलांडतात तेव्हा अनियंत्रित होऊन  समाजाला हानी पोहचविण्यास सुरूवात करतात.
जी माणसं प्रत्येक बाबतीत स्वतःच्या बुद्धीवर विश्वास ठेवतात, आपल्या विचारांनाच सर्वश्रेष्ठ समजतात व त्यानुसारच आचरण करतात. प्रत्येक गोष्ट आपल्या बुद्धीप्रमाणेच सोडविण्याचा आग्रह धरतात. दूसऱ्यांच्या विचारांना काडीची किमत देत नाहीत. अशा माणसांचा असा समज असतो की त्यांना जगातल्या साऱ्या गोष्टी कळतात. त्यांच्या बुद्धीच्या वर  कुठलीच गोष्ट नाहिये. त्यांना प्रत्येक गोष्टींचा बारिक सारिक तपशील, आरंभ आणि अंत सर्व काही माहित आहेत. अशा अविर्भावात ते जगत असतात. आपण कुठल्याही परिस्थितीचे  विश्लेषण करून त्याचे अचूक निदान करू शकतो, यावर त्यांचा प्रचंड विश्वास असतो. आपण धर्मचिकित्सा करू शकतो, त्यातील क्लिष्ट गोष्टी सुद्धा आपणास समजतात. प्रत्येक  मार्गाचा शेवट आपल्याला तसाच माहित आहे जसा त्याचा आरंभ. अशा पद्धतीने जगणाऱ्या माणसांचे विचार जेव्हा त्यांच्या स्वतःच्या धर्मातील कांही संज्ञाशी जुळत नाहीत, तेव्हा असे  लोक त्या संज्ञाच बदलून त्या आपल्या विचारानुरूप करण्यासही मागे-पुढे पाहत नाहीत. कुरआनमध्ये बनी इसराईल नावाच्या ज्या लोकसमुहाचा उल्लेख केलेला आहे ते लोक असे  करण्यात तरबेज होते. कुरआन अशा लोकांना मुनाफिक (पाखंडी) असे म्हणतो. धर्माविरूद्ध बंड करण्याइतपत धाडस त्यांच्यात नसते म्हणून ते धर्मात राहून त्याच्या विरूद्ध आचरण करत असतात.
तिसऱ्या वर्गातील लोक तर बौद्धिकरित्या दिवाळखोर असतात. आपल्या घराण्या किंवा समुदायाच्या चालीरितींची डोळे झाकून अंमलबजावणी करीत असतात. त्यातील उघड हानी सुद्धा त्यांच्या लक्षात येत नाही. पहिल्या दोन वर्गातील लोक किमान बुद्धीचा बरा-वाईट कसा का असेना वापर तरी करत असतात. पण या तिसऱ्या वर्गातील माणसे तर चक्क बुद्धी गहाण  ठेवल्यागत वागत असतात. त्यांच्या एवढे सुद्धा लक्षात येत नाही की भुतकाळातील सर्वच रूढी ह्या योग्य नसतात. आजच्या काळात मोठ्या संख्येने जी माणंसे ज्या प्रमाणे वागत  आहेत ते सुद्धा सगळे योग्यच आहेत, असेही नाही. हंसक्षीर न्यायाने त्यातल्या चांगल्या गोष्टी घेऊन वाईट गोष्टींचा त्याग करावा हे सुद्धा त्यांच्या गावी नसते. यांची सर्वात मोठी चुकी  ही की हे लोक अकलेचा वापरच करत नाहीत.
म्हणजे गंमत पहा, पहिल्या दोन वर्गातील लोक बुद्धीचा क्षमतेपेक्षा अधिक वापर करतात तर तिसऱ्या गटातील लोक तिचा वापरच करत नाहीत. केवळ परंपरांचे अनुकरण करत  असतात. बुद्धीच्या दिवाळखोरीचे यापेक्षा मोठे उदाहरण ते कोणते? असे लोक म्हणत असतात की, आम्ही असे यासाठी वागतो की ही आमची वाडवडीलांपासून चालत आलेली परंपरा  आहे. किंवा असे म्हणतात की अमुक लोकांनी असे वागून प्रगती सधलेली आहे म्हणून आम्ही सुद्धा असेच वागतो. या काळात हे लोक सत्तेवर आहेत म्हणूनच ते योग्य आहेत. म्हणून  आम्ही सुद्धा त्यांच्या सारखेच वागतो. असे समजणे सुद्धा बौद्धिक दिवाळखोरीचे लक्षण होय. त्यांच्याकडे स्वतःचे असे कोणतेच एकक नाही की जे चांगले-वाईट, खरे-खोटे यात फरक करू  शकेल. ते समाजा हिंदू, मुस्लिम, ख्रिश्चन किंवा इतर कुठल्यातरी घराण्यात जन्मले असते तर त्यावरच ते आपला जीव ओवाळून टाकणार. योगयोगाने त्यांच्या काळात ब्रिटीश सत्तेवर  असतील तर ते ब्रिटिशांप्रमाणे वागणार, चिनी सत्तेवर असतील तर चिन्यांसारखे वागणार व त्यांच्या चालीरितीने श्रेष्ठ समजणार किंवा एखादा आफ्रीकण गट सत्तेवर असेल तर हे  आफ्रिकन चालीरितींना स्वतःच्या साठी श्रेष्ठ समजणार कारण यांचे स्वतःचे असे काही मतच नाही. मुळात कुठल्याही गोष्टीला श्रेष्ठ समजण्यासाठी हा युक्तीवाद होऊच शकत नाही के  ती आमच्या वाडवडिलांपासून चालत आलेली गोष्ट आहे किंवा जगात आजकाल असेच होत आहे. जगात तर यापूर्वी ही फार काही झालेले आहे, आजही होत आहे, म्हणून ते सगळेच  चांगले आहे? असे नाही. आपले काम त्यांचे अंधानुकरण करणे नाही. अल्लाहने बुद्धी यासाठी दिलेली आहे की चांगले आणि वाईट त्यातील फरक माणसाने करावा. हे काम बुद्धी अगदी  चांगल्या प्रकारे करू शकते. कुणामागे जाण्यापूर्वी त्याला चांगल्या प्रकारे पारखून घेणे की तो आपल्याला कोणत्या दिशेला घेऊन जाणार आहे? हे कामही बुद्धि चांगल्या प्रकारे करू शकते.

इस्लामच्या दृष्टीने श्रेष्ठ कोण?
इस्लाम वर नमूद तीन्ही प्रकारच्या माणसांना नाकारतो. पहिल्या वर्गाबद्दल इस्लामचे म्हणणे आहे की या वर्गातील लोक कुणाचेच मार्गदर्शन स्वीकारत नाहीत. त्यांचे असे मत आहे की,  त्यांच्यामध्ये एवढी क्षमता आहे की ते जगातील सर्वच गोष्टी स्वतः च्या बुद्धीच्या बळावर समजू शकतात. त्यांचे उदाहरण अशा लोकांसारखे आहे की जे अंधारामध्ये केवळ अंदाजावरून  चालत आहेत. शक्य आहे की ते, सरळही जाऊ शकतात व हे ही शक्य आहे की ते एखाद्या खड्ड्यात जाऊन पडू शकतात. कारण अंदाजावर मार्गक्रमण करणे कधीही विश्वासार्ह ठरू  शकत नाही. त्यात चांगल्या आणि वाईट दोन्ही शक्यता आहेत. किंबहुना वाईट घडण्याचीच जास्त शक्यता आहे. यासंदर्भात कुरआनमध्ये म्हटलेले आहे की,

’’जो लोग खुदा के सिवा दुसरों को खुदाई का हिस्सेदार ठहराते और उनको पुकारते हैं जानते हो वो किस चीज के पैरो हैं? वो सिर्फ गुमान के पैरो हैं और महेज अंदाजे पर चलते हैं.’’ (सुरे युनूस)
जेव्हा कुरआन अवतरित होत होते त्याच काळात बनी इसराईल स्वतःला प्रेषित मुसा अलै. यांना पैगंबर तर तौरातला अल्लाहचा ग्रंथ मानत होते. मात्र त्यांचे वर्तन या दोहोंच्या  विरोधात होते. त्या दोहोंच्याही शिकवणीचा अर्थ त्यांनी आपल्या मर्जी आणि सोयीप्रमाणे लावून ईश्वरीय मार्गदर्शनाचा चेहरामोहराच बदलून टाकला होता.
तिसऱ्या वर्गातील लोकांच्या बाबतीत जे बुद्धिमान असतानाही तिचा उपयोग न करता कोणाचेतरी अनुकरण करतात अशा लोकांना कुरआन खालील शब्दात संबोधतो. ’’ हे बहिरे, मुके  (व) आंधळे आहेत. तेव्हा हे मागे परतणार नाहीत.’’ (सुरे बकरा आयत नं. 18). इस्लाम त्यांना जनावरांपेक्षाही कमी समजतो. कारण जनावरांना तर बुद्धीच नसते. हे लोक तर बुद्धी असूनसुद्धा ती नसल्यासारखे इतरांचे अंधानुकरण करतात. या तिन्ही वर्गातील लोकांची विचारसरणी असंतुलित आहे, असे इस्लामचे म्हणणे आहे. या तीन वर्गाव्यतिरिक्त समाजामध्ये  इस्लाम एक चौथा वर्ग स्थापन करू इच्छितो ज्या वर्गातील लोक संतुलित विचार करणारे, आपल्या बुद्धीचा योग्य उपयोग करणारे तसेच योग्य मार्गाने जाणारे असतील. आता प्रश्न उत्पन्न होतो की, संतुलित विचार म्हणजे काय? बुद्धीचा संतुलित वापर कशाला म्हणतात? आणि योग्य मार्ग कुठल्या मार्गाला म्हणावे? तर याचे उत्तर असे की, बुद्धी ज्या आणि जितक्या कामासाठी बनविण्यात आलेली आहे, त्या आणि तितक्याच कामासाठी तिचा उपयोग करावा. तिच्यावर अधिक भार टाकला तर ती हँग होते, हे लक्षात घ्यावे. सर्वप्रथम बुद्धिचा  खरा वापर म्हणजे काय, हे ओळखण्यासाठी खालील प्रश्न स्वतः ला विचारावेत. 1. ही सृष्टी कोणी निर्माण केली? 2. ईश्वर एक आहे का अनेक? 3. माणसाला सद्मार्गावर चालण्यासाठी ईश्वरीय मार्गदर्शनाची गरज आहे किंवा नाही? 4. अल्लाह आणि त्याचे प्रेषित (अल्लाह क्षमा करो) खरे आहेत की खोटे? कुरआन  जीवन जगण्याचा जो मार्ग लोकांसमोर मांडतो तो  सरळ आहे का वाकडा?
वरील सर्व प्रश्नांवर सांगोपांग विचार केल्यानंतर जर तुमचे मन साक्ष देईल की, एका ईश्वराला मानने ही बाब तुमच्या प्रवृत्तीत सामील आहे, तुम्हाला खरोखरच असे वाटत असेल की,  सरळ मार्गाने जीवन जगण्यासाठी एक ईश्वरीय मार्गदर्शनाचा प्रकाश आवश्यक आहे आणि तो प्रकाश वेळोवेळी पृथ्वीच्या अनेक भागात पाठविण्यात आलेल्या पैगंबरांनी आणलेला प्रकाश  होय.
जर प्रेषित मुहम्मद सल्ल. यांच्या पवित्र जीवन आणि वर्तनाचा अभ्यास केल्यानंतर तुमचा असा विश्वास झालेला असेल की, एवढ्या उच्च चारित्र्याच्या माणूस खोटे बोलून जगाला  धोका देणार नाही. त्यांनी अल्लाह एक आहे व स्वतः त्याचे अंतिम प्रेषित असल्याचा जो दावा केलेला आहे तो खोटा असूच शकत नाही. माणसांसाठी योग्य मार्ग हाच आहे. वरील सर्व  प्रश्नांचा वेध घेतांना जी चिकित्सा करावी लागते ती करणे म्हणजेच बुद्धिचा संतुलित वापर करणे होय. एकदा का या सगळ्या प्रश्नांवर गांभीर्याने विचार केल्यावर विश्वास बसला की,  मग जगाच्या विरोधाची परवा न करता, कोणाचीही भीती न बाळगता, कुठल्याही हानीची तमा न करता हा मार्ग स्वतःसाठी निवडा व ह्याच मार्गावर आपल्या घरातील इतर सदस्य,  त्यानंतर गल्लीतील लोक, त्यानंतर शहरातील, त्यानंतर राज्यातील, त्यानंतर देशातील व शेवटी जगातील सर्व लोक चालतील, यासाठी यथायोग्य, निरंतर आणि आयुष्यभर प्रयत्न करत रहा. व्यापक मानवकल्याण हाच या जीवन पद्धतीचा हेतू आहे, म्हणून इस्लाममध्ये रंग, रूप, नाते संबंध, भाषा, प्रदेश, वंश याला काडीचे महत्व नसून केवळ श्रद्धेला महत्व आहे.  इस्लाममध्ये सर्वांचा दर्जा समान व सर्वांना समान काम दिलेले आहे. एकदा का प्रेषित मुहम्मद सल्ल. यांनी जगासमोर मांडलेल्या एक ईश्वर, एक ग्रंथ, एक प्रेषित या विचारांचा तुम्ही स्विकार केला की, तुमच्या बुद्धीचा अनिर्बंध वापर करण्याचा तुमचा अधिकार संपला. आता तुम्हाला कुरआन आणि हदीस यांच्या चौकटीत राहूनच बुद्धीचा वापर करावा लागेल, त्याबाहेर तुम्हाला जाता येणार नाही. तुम्हाला कोणताही निर्णय, कोणताही निवाडा स्वतःच्या मर्जीने करता येणार नाही. तो तुम्हाला अल्लाहच्या मर्जीनेच व प्रेषित सल्ल. यांच्या पद्धतीनेच करावा  लागेल. त्यावर टिका करण्याचा अधिकार सुद्धा तुम्हाला राहिलेला नाही. आता तुम्हाला तुमच्या बुद्धी कौशल्याचा वापर अल्लाहने दिलेल्या आदेशामागील आणि प्रेषितांनी घालून दिलेल्या पद्धतीमागील कार्यकारणभाव शोधण्यासाठीच करता येईल. मात्र तुमच्या बुद्धिला एखाद्या आदेशामागील कार्यकारणभाव उमजला नाही. तरी तुम्हाला त्या आदेशाच्याविरूद्ध जाता येणार  नाही.
एखादा निर्णय तुमच्या हिताच्या विरोधात जरी जात असेल तरी तुम्हाला विरोध करता येणार नाही. तेव्हा असे म्हणता येणार नाही की अल्लाहचा हा आदेश आमच्या घराण्याच्या किंवा आजकालच्या रीतिरिवाजांच्या विरूद्ध आहे. म्हणून याचे पालन मला करता येणार नाही. जो काही विचार करायचा तो इस्लाम स्विकारण्याच्या पूर्वीच करायचा. एकदा का इस्लाम  स्विकारला की अनिर्बंध विचार स्वातंत्र्याचा अधिकार संपतो व शरियतच्या चौकटीत राहूनच विचार करण्याचे बंधन येते. खरे पाहता बुद्धीला सुद्धा हीच गोष्ट पटते की कुठलाही अधिकार  अमर्याद नसावा मग तो विचार स्वातंत्र्याचा का असेना. जीवनाचा हाच मार्ग इस्लाम आहे आणि या मार्गावर चलणारेच मुस्लिम आहेत. आता प्रत्येक मुस्लिमाने ज्यांनी आपले नाव  आणि धर्म जनगणनेमध्ये मुस्लिम आणि इस्लाम लिहिलेला आहे त्यांनी स्वतः स्वतःचा आढावा घ्यावा की, वर नमूद अटी व शर्तींमध्ये किती बसतो?

- एम.आय.शेख
9764000737

(संदर्भ : जमाअते इस्लामीचे  संस्थापक सय्यद अबुल आला मौदूदी यांचा तर्जुमानुल कुरआन नोव्हेंबर 1933 मध्ये प्रकाशित ’मुसलमान का हकीकी मफहूम’ या लेखावर आधारित)

देशात सध्या १७ व्या लोकसभेसाठी निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. काही मुस्लिम संघटनांनी या वेळी आपापला मतदार जाहिरनामा जारी केलेला असला तरी या निवडणुकीत देशातील  दुसरी सर्वांत मोठी लोकसंख्या असलेला मुस्लिम समाज काहीसा शांत शांत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षदेखील या समुदायाला नेतृत्व देण्याऐवजी त्यांचे मतदान आपल्या  पदरात पाडून घेण्याचा छुपा मनसुबा राबविताना दिसत आहेत. त्यामुळे निवडणुकीत मुस्लिम समुदायाचा मुद्दा उपस्थित न करणारे राजकारणी आगामी लोकसभेत त्यांच्याविषयी काही  विशिष्ट मुद्दे उपस्थित करू शकतील काय, तसे मुद्दे मांडले जातील काय? त्यांच्या समस्या मांडण्यासाठी देशभरातून योग्य प्रमाणात नेतृत्व लोकसभेत पोहचेल काय? असा जळजळीत  प्रश्न उपस्थित होतो. भारतातील एकूण २९ राज्यांपैकी फक्त जम्मू-काश्मीर हे मुस्लिम बहुमत असलेले राज्य आहे.
उर्वरित सर्व राज्यांमध्ये मुस्लिम अल्पसंख्यक आहे. परंतु उत्तर प्रदेश, बिहार, प. बंगाल, केरळ, आसाम, महाराष्ट्र आणि कर्नाटक यासारख्या राज्यांमध्ये मुस्लिमांची संख्या बऱ्यापैकी  आहे आणि निवडणुकांमध्ये त्यांचे मतदान जय-पराजयात मुख्य भूमिका पार पाडते. दलित आणि मागासवर्गांशी हातमिळवणी करून अनेक पक्षांना त्यांनी सत्तेपर्यंत पोहोचविले आहे.  मात्र या वेळी सत्ताधारी भाजपकडून कट्टर हिंदुत्व आणि ध्रुवीकरणाच्या राजकारणाद्वारे मुस्लिमांना राजकीय स्वरूपात महत्त्वहीन बनविण्याचा प्रयत्न सुरू आहे.
सन २०१४ च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर अशी वातावरणनिर्मिती झाली की मुस्लिम मतदानाला अप्रासंगिक ठरविण्यात आले. मुस्लिमांविरोधात हिंदुंना उभे करण्याचे षङ्यंत्र रचण्यात आले. परिणामत: स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणविणाऱ्या पक्षांनीदेखील मुस्लिमांच्या मुद्द्यांवर बोलणे बंद केले. २०१४ मध्ये भाजप ‘सबका साथ सबका विकास’ या घोषवाक्यासह  निवडणुकीच्या मैदानात उतरली होती. भाजपला आपल्या कट्टर समर्थकांव्यतिरिक्त अ‍ॅन्टीइन्कम्बन्सीच्या स्वरूपात अनेक मतदान लाभले. स्वातंत्र्यानंतर देशात कदाचित ही पहिली  लोकसभा निवडणूक असेल ज्यात मुस्लिमांचे मुद्दे राजकीय पक्षांच्या अजेंड्यांमध्ये नाहीत आणि लोकसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व देणे कोणताही पक्ष फारसा उत्सुक दिसत नाही. मुस्लिमांचे मुद्दे उपस्थित केल्याने ध्रुवीकरण होईल आणि त्याचा थेट लाभ भाजपला होईल अशी भीती काँग्रेस, समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल यासारखे अनेक  पक्षांना वाटली. इतकेच नव्हे तर मुस्लिम बहुल समजल्या जाणाऱ्या मतदारसंघांदेखील या पक्षांना मुस्लिम उमेदवार उभा करताना ध्रुविकरणामुळे त्यांचे हिंदू मतदार भाजपकडे तर  जाणार नाहीत ना याची भीती वाटल्याचे जाणवले. याच्या परिणामस्वरूप लोकसभेतील भाजपच्या जागा वाढत गेल्या तसतसे मुस्लिमांचे प्रतिनिधित्वात घट होत गेली.
आठव्या लोकसभेत भाजपचे केवळ दोन खासदार होते. तेव्हा लोकसभेत ४६ मुस्लिम खासदार निवडून आले होते. २०१४ मध्ये भाजपचे सर्वाधिक २८२ खासदार निवडून आले तर मुस्लिम  खासदारांची संख्या २३ वर खाली आली. नंतर २०१८ मध्ये उत्तर प्रदेशातील कैराना लोकसभेच्या जागेसाठी झालेल्या पोटनिवडणुकीत राष्ट्रीय लोक दल या पक्षाच्या तिकीटावर तबस्सुम  हसन यांच्या विजयामुळे लोकसभेतील मुस्लिम खासदारांची संख्या २४ वर पोहोचू शकली. अशा प्रकारे उत्तर प्रदेशातून एक मुस्लिम खासदार लोकसभेत पोहोचला होता. लोकसभेच्या ८०  जागा असलेल्या या राज्यातून सार्वत्रिक निवडणुकीत एकही मुस्लिम खासदार निवडून आलेला नव्हता.
सन २०११ मधील जनगणनेनुसार भारतात मुस्लिमांची लोकसंख्या १७.२३ टक्के आहे. या आधारे लोकसंख्येच्या प्रमाणात प्रतिनिधित्वाचा मुद्दा उपस्थित करणाऱ्यांना ५४५ खासदारांच्या लोकसभेत ७७ मुस्लिम खासदार असावेत अशी अपेक्षा असते. परंतु कोणत्याही लोकसभेत मुस्लिम खासदारांची संख्या या आकड्यापर्यंत पोहोचू शकलेली नाही. पहिल्या लोकसभेत  मुस्लिम खासदारांची संख्या फक्त २१ होती. तेव्हा लोकसभेच्या एकूण सदस्यांची संख्या ४८९ होती. लोकसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व ४.२९ टक्के होते. तर गत लोकसभेत मुस्लिमांचे  प्रतिनिधित्व स्वातंत्र्योत्तर काळातील सर्वांत कमी राहिले आहे. लोकसभेचा कार्यकाळ समाप्त होईपर्यंत एकूण २४ मुस्लिम खासदार होते म्हणजे लोकसभेतील त्यांची टक्केवारी ४.२४ इतकी होते.
पहिल्या लोकसभेत मुस्लिम खासदारांची संख्या कमी असणे तर्कसंगत वाटते. त्या वेळी देशाला फाळणीच्या समस्येला तोंड द्यावे लागले होते. त्या वेळी मुस्लिमांनी पाकिस्तानच्या  स्वरूपात आपला वेगळा हिस्सा घेतला आहे अशी भावना समाजातील एका मोठ्या वर्गाची झाली होती. देशाचे स्वातंत्र्य आणि फाळणीनंतर सुमारे ६७ वर्षांनंतर झालेल्या २०१४ च्या  लोकसभा निवडणुकीत सर्वांत कमी मुस्लिम खासदार निवडून येणे म्हणजे राजकारणातील त्यांच्या तिरस्काराकडे इशारा असल्याचे म्हटले जाऊ शकते.
मागील लोकसभा निवडणुकीवर दृष्टी टाकल्यास आपणा आढळून येते की १६व्या लोकसभेत देशातील फक्त ७ राज्यांमधून मुस्लिमांचे प्रतिनिधित्व आले होते. सर्वाधिक ८ खासदार  पश्चिम बंगालमधून निवडून आले होते. बिहारमधून ४, जम्मूकाश्मीर आणि केरळमधून ३-३, आसाममधून २ आणि तामिळनाडू व तेलंगाणामधून एक-एक मुस्लिम खासदार निवडून  लोकसभेत पोहोचला होता. याव्यतिरिक्त केंद्रशासित प्रदेश लक्षद्वीपमधून एक खासदार निवडून आला होता. या ८ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात देशातील सुमारे ४० टक्के मुस्लिम  राहातात. यामध्ये लोकसभेच्या १७९ जागा येतात. देशाच्या उर्वरित २२ राज्ये आणि ६ केंद्रशासित प्रदेशांमधून लोकसभेत मुस्लिम प्रतिनिध्व अजिबात नाही. म्हणजेच लोकसभेच्या ३६४  जागा असलेल्या व एकूण मुस्लिम लोकसंख्येपैकी ५४ टक्के मुस्लिम असलेल्या राज्यांमधून एकही मुस्लिम खासदार निवडून आलेला नव्हता.
स्वातंत्र्यानंतर आजतागायत १६ लोकसभांसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये निवडून आलेले मुस्लिम खासदार आणि प्रत्येक लोकसभेतील त्यांच्या टक्केवारीवर दृष्टी टाकल्यास असे आढळून  येते की – पहिल्या लोकसभेपासून सहाव्या लोकसभेपर्यंत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व हळूहळू वाढले. पहिल्या लोकसभेत फक्त २१ मुस्लिम खासदार होते, तर सहाव्या लोकसभेत ही संख्या  ३४ पर्यंत पोहोचली. लोकसभेमध्ये मुस्लिमांची टक्केवारी ४.२९ वरून ६.२ पर्यंत पोहोचली. सातव्या लोकसभेत मुस्लिमांच्या प्रतिनिधित्वाने गती घेतली आणि लोकसभेतील मुस्लिमांची  संख्या ४९ वर पोहोचली. तेव्हा लोकसभेत मुस्लिमांची टक्केवारी ९.२६ होती. १९८४ मध्ये झालेल्या आठव्या लोकसभेच्या निवडणुकीत ४६ मुस्लिम खासदार निवडून आले परंतु १९८९  मध्ये हा आकडा खाली येऊन ३३ वर पोहोचला. विशेष म्हणजे याच काळात भाजपच्या खासदारांची संख्या वाढू लागली होती. त्याचबरोबर लोकसभेतील मुस्लिम खासदारांच्या संख्येला  उतरती कळा लागली. १९८९ मध्ये भाजपचे ८६ खासदार निवडून आले होते आणि या निवडणुकीत मुस्लिम खासदारांची संख्या ४६ वरून ३३ वर आली. म्हणजे लोकसभेत सरळसरळ १३  मुस्लिम खासदार कमी झाले. १९९१ मध्ये भाजपने १२० जागा जकिंल्या होत्या तेव्हा मुस्लिम खासदारांची संख्या आणखी कमी होऊन २८ वर आली.
सन १९९६ मधील लोकसभेच्या निवडणुकीत भाजपने १६३ जागा जकिंल्या तेव्हादेखील २८ मुस्लिम खासदारच निवडून येऊ शकले होते. सन १९९८ मध्ये झालेल्या लोकसभा निवडणुकीत  भाजपने १८२ जागा जकिंल्या होत्या, तेव्हा लोकसभेत २९ मुस्लिम खासदार निवडून आले होते. सन १९९९ मध्ये भाजपने पुन्हा १८२ जागा जकिंल्या. या वेळी मुस्लिम खासदारांची  संख्या ३२ झाली. परंतु २००४ मध्ये भाजपच्या लोकसभा सदस्यांची संख्या १८२ वरून १३८ झाली तेव्हा पुन्हा मुस्लिम खासदारांची संख्या वाढून ३६ वर गेली. सन २००९ मध्ये १५व्या  लोकसभेच्या निवडणुकीत मुस्लिम खासदारांची संख्या खाली येऊन ३० वर पोहोचली. लोकसभेतील मुस्लिमांचे घटलेले प्रतिनिधित्व चिंतेचा विषय आहे. परंतु याची चिंता कुणालाही नाही.  जर समाजाच्या दुर्बल घटकाला त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेत प्रतिनिधित्व दिले जात असेल तर मुस्लिम समुदायाला या सूत्रापासून का बाहेर ठेवले जात आहे? असा प्रश्न पडतो. सन २००६ मध्ये सच्चर समितीच्या अहवालात स्पष्टपणे म्हटले आहे की देशातील मुस्लिमांची स्थिती दलितांपेक्षा वाईट आहे. जर दलितांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात लोकसभेत प्रतिनिधित्व मिळाले असेल तर मग मुस्लिम समाज या भागिदारीपासून वंचित का आहे?
लोकसभेतील मुस्लिमांचे प्रतिनिधित्व ४.२४ ते ६.२४ दरम्यान असल्याचे आढळून येते हे त्यांच्या लोकसंख्येच्या १४.२ टक्क्यांपेक्षा खूपच कमी आहे. समाजातील दुर्बल घटक असलेल्या  भागाला म्हणजेच दलित व आदिवासींना लोकसभेत त्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात आरक्षण लाभले आहे. लोकसभेच्या ८४ जागा दलितांसाठी आरक्षित आहेत तर ४७ जागा  आदिवासींसाठी आरक्षित आहेत. याव्यतिरिक्त लोकसभेत अ‍ॅग्लो इंडियन समाजाच्या दोन लोकांना नामांकित केले जाते जेणेकरून त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांना लोकसभेत  प्रतिनिधित्व मिळावे. संविधान निर्मितीच्या वेळी अँग्लो इंडियन समाजाची लोकसंख्या देशातील कोणत्याही लोकसभेच्या मतदारसंघाइतकी नाही की तो समाज आपला प्रतिनिधी निवडून  लोकसभेत पाठवू शकेल, असे संविधान निर्मात्यांना वाटले होते. मागील सुमारे अडीच दशकांपासून लोकसभेत महिलांना ३५ टक्के आरक्षण देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामागेदेखील हाच  तर्क आहे की महिला सशक्तीकरणासाठी राजकारण आणि सत्तेत लोकसंख्येच्या प्रमाणात त्यांची भागीदारी आवश्यक आहे. १७ व्या लोकसभेत मुस्लिमांचे प्रतिनिधित्व वाढेल की घटेल,  हे निवडणुकीच्या निकालांतीच माहीत पडेल. मात्र उशिरा का होईना या मुद्द्याची जाणीव होईलच.

- शाहजहान मग़दुम

एप्रिल महिना सुरू होताच सूर्य आणि प्रचार दोन्ही तापत असल्याचा अनुभव येत आहे. प्रचारामध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी तर सोडा स्वतः पंतप्रधानांनी मर्यांदाचे उल्लंघन केल्याचे  स्पष्ट जाणवत आहे. एकीकडे योगी आदित्यनात आणि मुख्तार अब्बास नक्वी भारतीय लष्कराचे कौतूक करत असतांना त्यांना ’मोदी सेना’ म्हणून संबोधित केले. तर स्वतः मोदींनी  नवीन मत देणाऱ्या तरूण मतदारांनी बालाकोटच्या कार्यवाही करणाऱ्या सैनिकांना आपले पहिले मत समर्पित करावी अशी भावनिक हाक दिली. या दोन्ही गोष्टी आचारसंहितेच्या  उल्लंघनाचे उत्कृष्ट नमुने आहेत. एवढ्यावरच न थांबता भाजपाने डीटीएच सेवेच्या माध्यमातून नमो टीव्ही ऐन निवडणूक आचारसंहितेची परवा न करता लाँच केला, असा विरोधकांनी  आरोप केला. त्या टीव्हीच्या मार्फत रात्रंदिवस जोरदार प्रचार सुरू केलेला आहे. ज्युलियो रिबोरो व पूर्व नौसेना अध्यक्ष अ‍ॅडमिनरल रामदास यांच्यासह अनेक सेवानिवृत्त सनदी  अधिकाऱ्यांनी राष्ट्रपतींना पत्र लिहून वरील सर्व बाबींची पुरेशी नोंद निवडणूक आयोग घेत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे. शिवाय, नसरूद्धीन शहासह इतर 600 बॉलिवुड  कलाकारांनी भाजपला मतदान न करण्याचे आव्हान केलेले आहे. दरम्यान, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि भाजपा दोघांचेही जाहिरनामे प्रकाशित झालेले आहेत. काँग्रेसच्या  जाहिरनाम्यामध्ये 20 टक्के गरीब लोकांना महिना 6 हजार रूपये मदत देण्याचे आश्वासन देण्यात आलेले असून, बेरोजगारी - दूर करण्याचेही आश्वासन देण्यात आलेले आहे. शिवाय,  इंग्रजांच्या काळापासून चालत आलेले देशद्रोहाचे कलम काढून टाकण्याचे व नीति आयोग बरखास्त करण्याचा मनसुबा जाहीर केलेला आहे. या जाहिरनाम्याचे वैशिष्ट्य म्हणजे सच्चर  कमिटीबद्दल मौन बाळगण्यात आलेले आहे.
भाजपच्या जाहिरनाम्यामध्ये जम्मू कश्मीरला खास संवैधानिक दर्जा देणारे कलम 370 आणि 35 (ए) काढून टाकण्याबद्दल आश्वासित करण्यात आलेले आहे. शिवाय, राम मंदिरचे  निर्माण करण्याच्या आश्वासनासह अन्य आश्वासने देण्यात आलेली आहेत. भाजपकडून सर्वात जास्त प्रचार प्रधानमंत्री स्वतः करीत असून, त्यांनी दिवसातून 3 ते 4 सभा करण्याचा  सपाटा लावलेला आहे. प्रत्येक सभेमध्ये ते पुलवामा आणि बालाकोटचा उल्लेख प्रामुख्याने करत आहेत. त्यावरून त्यांचा इरादा स्पष्ट आहे. काँग्रेसने एकीकडे आपल्या जाहिरातीतून  भाजपची लाज काढायला सुरूवात केली असून, भाजपतर्फे काँग्रेसला पाकिस्तानी ठरविले जात आहे. प्रधानमंत्री मोदींनी काँग्रेसच्या निवडणूक जाहिरनाम्याला पाकिस्तान धार्जीने म्हणून  हिनविले आहे. दरम्यान, महाराष्ट्रात बहुजन वंचित आघाडीचीही दखल घेतली जात असून, तीसरा पर्याय म्हणून ते समोर येत आहेत. औरंगाबाद लोकसभा मतदार संघात अब्दुल  सत्तार यांनी घेतलेल्या नाट्यमय माघारीमुळे औरंगाबादच्या निवडणुकीमध्ये खैरे विरूद्ध जाधव विरूद्ध झांबर विरूद्ध जलील असा चौकौनी फड रंगणार असून कोणताही उमेदवार जिंकला  तरी फारसे मताधिक्य कोणालाही मिळणार नाही. ज्याचाही विजय होईल तो काठावरचा विजय होईल. महाराष्ट्राचे लक्ष या लढतीकडे लागलेले आहे.
एकंदरित लोकसभा निवडणूक प्रचारांमध्ये रंग भरत आहे. दरम्यान, काही प्रतिष्ठित संस्थांची भाकीतेही प्रकाशित झालेली असून, त्यात एनडीएला युपीएपेक्षा थोड्याशा जागा अधिक  मिळतील, असा अंदाज वर्तविला जात आहे.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget