Halloween Costume ideas 2015
Latest Post

सरफराज अ. रजाक शेख
एड. गाजीउद्दीन रिसर्च सेंटर, सोलापूर 
8624050403
इक्बालांच्या काव्यातील राष्ट्रविषयक चिंतन,
सांस्कृतीक राष्ट्रवाद तथा  टागोर आणि मार्क्स
16डिसेंबर 1982 च्या टाईम्स ऑफ इंडीयाच्या अंकात इक्बालांनी 1920 साली एडवर्ड थामसन या आपल्या मित्राला एक पत्र लिहले होते. ते प्रकाशीत करण्यात आले आहे. त्यामध्ये इक्बाल म्हणतात, “ पाकिस्तान नावाच्या योजनेचा पुरस्कर्ता असे तुम्ही मला संबोधता, पाकिस्तान ही माझी योजना नाही. अलाहबादच्या अखिल भारतीय मुस्लीम लीगच्या वार्षिक अधिवेशनातील माझ्या भाषणात जी योजना मी सुचवली ती म्हणजे मुस्लीम बहुसंख्यांक प्रांतांची निर्मिती होय.  तो प्रांत नियोजित भारतीय संघराज्याचा भाग असला पाहिजे. ”इक्बालांचा राष्ट्रवाद हा विशुध्द स्वरुपाचा होता. त्यांनी मांडलेल्या राष्ट्रवादामध्ये पाश्तात्य  विचारवंताप्रमाणे मानव कल्याणाच्या जाणीवा होत्या. राष्ट्र आणि त्याच्या संस्कृतीचा अभिमान देखील त्यामध्ये होता. कारण राष्ट्र हि संकल्पना ठराविक भौगौलिक क्षेत्राच्या साम्य असणाऱ्या संस्कृतीच्या इतिहासातून निर्माण होते. त्या इतिहासातील इतिहास पुरुष हे त्या राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रेरणा देत असतात. त्यामुळे राष्ट्रवादामध्ये राष्ट्राच्या इतिहासाविषयीच्या अभिमानाला खूप महत्व आहे.
रविंद्रनाथ टागोरांच्या तुलनेत इक्बालांच्या साहित्यामध्ये राष्ट्रविषयक जाणिवा अधिक आहेत. इक्बालांनी भारतीय इतिहासपुरुषांविषयी प्रचंड असे लिखाण केले आहे. आपल्या काव्यप्रतिभेने इक्बालांनी भारतीय विचारवंतांचा आणि त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे. वेगवेगळ्या धर्म पंथाच्या प्रमुखांविषयी त्याच्या संस्थापकांविषयी देखील इक्बालांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. इक्बालांच्या साहित्यात गौतम बुध्द, राम, गुरुनानक, चार्वाक, महाराणाप्रताप यांचे मोठे संदर्भ येतात. इक्बाल वसाहतवादाविरुध्द म्हणजे इंग्रजाविरुध्द संघर्ष केलेल्या 1857 च्या योध्द्यांविषयी कृतज्ञता प्रकट करतात. इंग्रजाविरोधातील लढ्यात शहादत पत्करलेल्या टिपू सुलतान यांच्याविषयी जावेदनामा मध्ये इक्बाल मोठ्या आत्मीयतेने लिहितात. टिंपूंची तुलना ते जगातील महान योध्यांशी करतात. इक्बाल इतिहासाला राष्ट्राची संस्कृती मानतात. पण इतिहासाला ते सांस्कृतीक संघर्षासाठीचे शस्त्र म्हणून पाहत नाहीत. उलट ते या देशातील बालकांना त्यांच्या संस्कृतीविषयीचा अभिमान शिकवतात. “हिंदुस्तानी बच्चों का कौमी गीत” या त्यांच्या कवितेत ते म्हणतात,
“ चिश्ती ने जिस जमीं में पैगामे हक सुनाया
नानक ने जिस चमन में वहदत का गीत गाया
तातारीयोंने जिसको अपना वतन बनाया
जिसने हजाजियों से दश्ते अरब छुडाया
मेरा वतन वही है। मेरा वतन वही है। ”
चिश्ती पंरपरेतल्या सुफी संतानी पाखंडाच्या विरोधात सत्यधर्माच्या प्रसारासाठी ज्या भूमीची निवड केली ती पाक जमीन हीच आहे. नानकांनी एकेश्वरवादाचे गीत जिथे गायले ते चमन हेच आहे. तातारी योध्यांनी ज्याला आपले राष्ट्र मानले तो माझा देश, माझे वतन तेच आहे  ते इतके महान आहे की हजाजिंनी देखील याच्या प्रेमापोटी अरबस्तानाचा त्याग केला. देशाचा गौरव करताना इक्बाल याच काव्यात पुढे म्हणतात -
“ युनानियों को जिसने हैरान कर दिया था
सारे जहाँ को जिसने इल्मो हुनर दिया था
मिट्टी को जिसकी ह़क ने जर का असर दिया था
तुर्की का जिसने दामन हिरों से भर दिया था
मेरा वतन वही है। मेरा वतन वही है।  ”
1947 मध्ये हिंदीच्या धर्मांध आग्रहापुढे भारतीय एकात्मतेचे प्रतिक असणाऱ्या उर्दूचा पराभव झाला नसता तर भारतीय बालकांना जाज्वल्य देशप्रमाची इक्बालची विचारधारा समजू शकली असती. खोट्या प्रतिकांचा गौरव करणाऱ्या गीतांऐवजी ते उज्वल देशाभिमानाची गीत गाऊ शकले असते. पण दुर्दैव इक्बाल आणि गालीबच्या  उर्दुचा ज्या देशात जन्म  झाला. त्या देशातून तिला विस्थापित होण्याची वेळ आली. हे सारं घडलं ते धार्मिक राष्ट्रवादाच्या उन्मादातून. 
ज्या काळी सावरकरांपासून बकीमचंद्र चटर्जीपर्यंत सारेच भारतीय संघराज्याच्या राष्ट्रवादाला सांस्कृतीक अधिष्ठान देण्यात मश्गूल होते. त्या काळात इक्बाल संमिश्र राष्ट्रवादाचा आधार देऊ पाहत होते. एकिकडे बंकीचंद्र त्यांच्या ‘आनंदमठ’ या कांदबरीत हिंदू-मुस्लीम दंगलीचे चित्र रेखाटतात. त्यातील दंगलखोर आणि मुस्लीमांचे शिरकाण करणाऱ्या पात्रांच्या ओठी ‘ वंदे मातरम’ हे गीत घालातात. हा देश म्हणजे फक्त मुस्लीमेतरांची अधिसत्ता आहे असे निक्षून सांगतात. त्याच काळात इक्बाल देशनिष्ठेची व्याख्या करताना नानकांपासून गौतम बुध्दांपर्यंतच्या साऱ्या इतिहासपुरुषांविषयी कृतज्ञ भाव व्यक्त करतात. इक्बालांनी भारतीय समाजाच्या शोषणाचे मर्म देखील शोधून काढले.
इक्बालांच्या शायरीतील सत्यशोधकी परंपरा आणि राष्ट्रनिष्ठा वेगळी आहे. इक्बालांनी ज्या प्रमाणे कांट, नित्शे, डंकेन या पाश्‍चात्य विचारवंताशी वाद घातला. त्यांचे समर्थन केले. त्यापध्दतीने त्यांनी समकालीन काही प्रादेशिक अब्राम्हणी चळवळींचा अभ्यास केला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. इक्बालांच्या काळातच 1910 ते 1930 च्या दरम्यान भारतात अनेक समाज सुधारणावादी चळवळी मोठ्या धडाक्यात सुरु होत्या. तामिळनाडूतील द्रविड चळवळ, बंगालातील समता चळवळ, महाराष्ट्रातील ब्राम्हणेतर चळवळ त्यावेळी राष्ट्रीय स्तरावर चर्चेचा विषय ठरली होती. याच काळात इक्बालांनी लिहिलेल्या अनेक कवितांमध्ये त्यांनी बहुजनांचे आणि इतल्या मुलनिवासी समाजाचे ब्राम्हणांकडून केल्या गेल्या शोषणाविषयी लिखाण केले. इक्बालांची एक कविता ब्राम्हणांना उद्देशून लिहलेली आहे. “ नया शिवाला ” हे त्याचे शिर्षक. त्यात इक्बाल म्हणतात-
“ सच कह दूं ऐ ब्रम्हण । गर तू बुरा न माने
तरे सनम कदों के बुत हो गए पुराने
अपनों से बैर रखना तूने बुतों से सिखा ”
ब्राम्हणांनी माणसा-माणसात भेद केला. त्यांच्या अहंकारांमुळे भारतीय समाजातील कित्येक वर्गांना पशू पेक्षा हीन जिणे जगावे लागले. त्यांच्या या कृत्याचा समाचार घेताना इक्बाल त्यांना म्हणतात ‘ तुम्हाला वाईट वाटणार नसेल तर मी तुला सांगतो की तुमच्या प्रिय व्यक्तींच्या देवता आता जुन्या झाल्या आहेत. यांच्यापासूनच तू भेद करणे शिकला आहेस. त्यांच्यामूळेच आपल्या लोकांपासून भेद करण्याचा बोध तुला मिळाला आहे.’ मराठीतल्या केशवसूती प्रवृत्तीचे मुर्तीभंजक विचार यामध्ये आहेत. पण त्याला नुसता काव्यात्म प्रेरणा नाहीत. त्यामागे सामाजिक प्रेरणा आहेत. कविता रचून इक्बाल कधी थांबले नाहीत. आपल्या शायरीच्या माध्यमातून समाजक्रांतीचा अंगार त्यांना पेटवायचा होता. दुर्दैवाने शायर इक्बाल, कवी इक्बाल आणि धर्मचिंतक इक्बालवर आपण जितके संशोधक केले तितके संशोधन समाजसुधारक आणि समाजसेवक इक्बालांवर होऊ शकले नाही. त्यामुळेच इक्बालांचे साहित्य प्रकाशात आले तरी त्यांच्या सामाजिक प्रेरणा मात्र दुर्लक्षित राहील्या. एकिकडे इक्बाल ब्राम्हणकृत शोषणाची मिमांसा करतात. तर दुसरीकडे एकेश्वरवादी समाजचिंतकांचा गौरव करतात.
इक्बाल देवतांचे अवडंबर नाकारून एकेश्वरवादाचा प्रसार करणाऱ्या विचारवंतांचा गौरव करताना कृतज्ञता व्यक्त करतात. भारतातील जितक्या वैदीक विरोधी अब्राम्हणी चळवळी झाल्या त्यांनी गौतम बुध्दांना प्रेरणा पुरुष मानले. गौतम बुध्दांसारखा महान धर्मचिंतक, समाजचिंतक भारतात होउन गेला याचे इक्बालांना अभिमान वाटायचे.  इक्बाल बुध्दांविषयी म्हणतात,
“ कौमने पैगामे गौतम की जरा परवाह न की
कद्र पहचानी न अपने गौहरे यकदानां की ”
भारतीयांना गौतम बुध्दांचा विसर पडला त्यामूळेच भारतभूमी शुद्रांच्या दुःखाचे आगार बनली असल्याचेही इक्बालांनी म्हटले आहे, इक्बाल म्हणतात,
“ आह । शुद्दर के लिए हिंदौस्तां गमखाना है
दर्द इन्सानी से इस बस्ती का दिल बेगाना है ”
शुद्रांविषयी आत्मीयता प्रकट केल्यानंतर इक्बाल पुन्हा ब्राम्हणांच्या अहंकारावर आघात करतात, इक्बालांच्या कवितेतील या ओळी खूप मार्मिक आहेत.
“ बरहमन सरशार है अबतक मये पिंदार में
शमे गौतम जल रही है महफिले अयार में ”
ब्राम्हण अजूनही आपल्या अहंकारात मस्त आहेत. त्यामुळेच भारतीयांनी प्रज्वलीत केलेला गौतम नावाचा दिवा परक्यांच्या मैफीलीत जळतोय. गौतम बुध्दांनी उठवलेला न्यायाचा अवाज न ऐकता आपण गाफील राहिल्याचे इक्बाल सांगतात
“ आह। बदकिस्मत रहे आवाजे हक से बेखबर
गाफिल अपने फल की शीरीनी से होता है”
  अशा वेदना प्रकट करुन इक्बाल पुन्हा गुरु नानकांच्या समतावादाने आशावादी होतात. नानक या कवितेत ते म्हणतात,
“ फिर उठी सदा तौहीद की पंजाब से
हिंद को इक मर्दे कामिल ने जगाया ख्वाब से  ”
इक्बालांच्या काव्यात अशा अनेक राष्ट्रीय प्रतिकांचा गौरव होतो. इतिहासाचा अभिमान प्रकट केला जातो. पण त्या तुलनेत सावरकरांपासून टागोरांपर्यंत समकालीनांनी  गौतम बुध्दांपासून शिवाजी महाराजांपर्यंत या सर्व इतिहासपुरुषांवर अन्यायच केला. सावरकरांनी शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाला काकतालीय ठरवून नाकारले. तर गौतम बुध्दांच्या बौध्द चळवळीला संपवणाऱ्या पुष्यमित्रशुंगाचा सावरकरांनी भारतीय इतिहासातील सोनेरी पान म्हणून गौरविले. भारतीयांच्या दुर्दैवाने भारतीय इतिहास प्रतिकांना नाकारणारे आज भारताच्या स्वाभिमानाचा तर भारतीय प्रतिकांना गौरवणारे इक्बाल निंदेचा विषय ठरले आहेत. 
इक्बालांच्या साहित्यात मानवकल्याणाची निष्ठा आहे. इक्बालांच्या साहित्यात गरीबांविषयीची कणव आहे. इक्बाल सामान्यांना विकसित करु पाहतात. इक्बाल त्यामुळेच गौतम बुध्दापासून चार्वाकापर्यंत सर्वांचा गौरव करतात. याच मानवकल्याणाच्या तडफेसाठी ते कार्ल मार्क्सच्या समाजावादी मुल्यांचादेखील गौरव करतात. त्याच्या नास्तिकतेला नाकारून इक्बाल मार्क्ससीझममधल्या इस्लामिक प्रेरणांचा शोध घेतात.
मार्क्स आणि इक्बालचा शिकवा, कुफ्र नाही, तर दुःखाचा शोध
मार्क्सने जगातील दुःखाचा शोध घेतला. त्याची कारणे धुंडाळली. समाजात दुःख पसरवणारे स्त्रोत त्याने निश्‍चीत केले. शोषणातून दुःखाची निर्मिती होते. हे त्याने ताडले. त्यासाठी धर्म ही व्यवस्था जबाबदार नाही. हे देखील त्याने मान्य केले. पण सामान्यांच्या कल्याणासाठी असलेली धर्म नावाची व्यवस्था, शोषकांच्या मक्तेदारीत अडकल्याचे त्याच्या नजरेने हेरले. मार्क्सची प्रवृत्ती बंडखोराची होती. त्यामुळे तो या धर्ममुखंडांविरोधात उभा राहीला. म्हणून इश्वर आणि माणूस यांच्यातील ‘दलाल’ व्यवस्थेला सुरुंग लागले. मग मार्क्स हा धर्मविच्छेदक असल्याचा प्रचार धर्ममुखंडांनी सुरु केला. तो आजतागायत सुरु आहे. पण मार्क्स इतके धर्माचे कौतूक कोणीच केले नाही. धर्म चांगला असेल. तर त्यातून ऐहीक कल्याण साध्य होतं. या धर्ममुल्यावर त्याची निष्ठा नव्हती काय? धर्म व्यवस्थेवर मळभ दाटलं. त्यामुळे धर्म व्यवस्थीत पणे कार्यरत होत नाही. हा मार्क्सचा शिकवा (गर्‍हाणे) होता. त्यामुळे त्याने हा शिकवा समाजासमोर मांडला. दास कापिटल म्हणजे मार्क्सच्या गार्‍हाण्याचा संग्रह. म्हणजे शिकवा.
इक्बालांनी देखील शिकवा मांडला. इक्बालांचा ‘जावेदनामा’ आणि ‘असरारे खुदी’ काय आहेत ? इक्बालांनी लिहलेली ‘शिकवा’ नावाची कविता हा त्यांचा शिकवा नाहीये. ती त्यांची काव्य प्रतिभा आहे. पण त्यांचा अस्सल शिकवा हा त्यांच्या दुसऱ्या ग्रंथात शब्दांकीत झालाय. धर्म नावाची उदात्त व्यवस्था कार्यान्वीत करणारे सर्वोत्तम प्रेषित येउन गेले. पण त्यांच्या विचारांना ग्रंथात बंदीस्त करुन आम्ही त्या प्रेषितांनाही पराभूत करतोय का? हे प्रश्न इक्बालांच्या विचारांनी अप्रत्यक्षपणे उपस्थित केले. इक्बालांनी मांडलेला इस्लाम तोच होता. जो प्रेषित सल्ल. यांंनी मांडलेला होता. इक्बालांनी सांगितलेली व्यवस्था देखील तीच होती. जी कुरआनने सांगितली होती.  त्याचा भौतीकतावाद इक्बालांनी इस्लामीझमच्या केलेल्या व्याख्येशी मेळ खाणारा नव्हता काय? (क्रमशः) 
(लेखक इतिहास संशोधक असून टिप सुलतान, इक्बाल इत्यादी इतिहासातील व्यक्तिमत्वांवर संशोधन करून ते त्यांचे विचार व्यक्त करतात) (भाग-2)

अंधेरो में शमा जलाए रखना, सुबह होगी जरूर माहोल बनाए रखना
एम.आया.शेख
9764000737
इस्लाम धर्म (मजहब) म्हणून सर्वांना स्विकार आहे मात्र एक व्यवस्था (दीन) म्हणून बहुतेक लोकांना स्विकार नाही. कित्येक मुस्लिमांना सुद्धा नाही. धार्मिक विधी, इबादतींसाठी मुस्लिम लाखोंच्या संख्येने एकत्रित येतात, कोट्यावधींचा खर्च करतात. मात्र प्रतक्षात जीवनात इस्लामी तत्त्वांना लागू करण्याचा आग्रह केला की पहिल्यांदा स्वतः मुस्लिमांमधूनच त्याचा विरोध सुरू होतो. फक्त धार्मिक विधींपुरता, व्यवस्थाशुन्य इस्लाम खरा इस्लाम नाही. असा इस्लाम खऱ्या इस्लामच्या  छायाचित्रासारखा आहे. सुंदर, देखणा, चमकदार मात्र निर्जीव. मौलाना अबुल आला मौदूदी यांनी 1941 साली जमाअते इस्लामीची स्थापना करतांना खऱ्या-खुऱ्या जीवंत इस्लामचा आग्रह धरला होता. त्यांच्या मते सकृतदर्शनी मुस्लिमासारखे दिसण्यापेक्षा खरे मुस्लिम असणे जास्त महत्वपूर्ण आहे. फार कमी लोकांनी त्यांच्या या संदेशाकडे लक्ष दिले. याचा अर्थ सकृतदर्शनी मुस्लिम दिसणे यास त्यांचा विरोध होता असे नाही. 
इस्लाम, कायद्याचा वापर करून समाजाचे नियमन करण्यापेक्षा अख्लाक (चांगल्या सवई) चा वापर करून समाजाचे नियमन करण्याला अधिक महत्व देतो. त्यासाठी समाजामध्ये पावित्र्य राखणे गरजेचे असते. म्हणूनच इस्लाममध्ये इबादतींची व्यवस्था केलेली आहे. सामाजिक बांधिलकी मजबूत व्हावी व एकोपा रहावा यासाठी लग्न आणि तलाक सुलभ करण्यात आलेले आहेत. मुस्लिमांनी अल्लाहच्या या दयेचा दुरूपयोग असा केला की लग्न महाग करून टाकलेली आहेत व एका दमात तीन तलाकचा दुरूपयोग मोठ्या प्रमाणात केलेला आहे. मागील काही महिन्यात झालेल्या प्रबोधनामुळे तीन तलाकच्या घटना जरी कमी झाल्या असल्या तरी पूर्णपणे नष्ट झालेल्या नाहीत. 
या विषयावर मागील काही महिन्यामध्ये इतके लिहिले आणि बोलले गेलेले आहे की, आता देशाच्या सर्वधर्मीय शालेय विद्यार्थ्यांनाही कळून चुकले आहे की तीन तलाकची व्यवस्था कुरआनमध्ये नाही. तोंडी तलाकच्या व्यवस्थेचा मुस्लिम पुरूषांनी दुरूपयोग केल्याने तीन तलाकचा मुद्दा सध्या ऐरणीवर आलेला आहे. राज्यसभेत या संबंधीचे बिल प्रलंबित आहे. 
तीन तलाक हा महिलांवर अन्याय आहे हे माहित असूनसुद्धा कित्येक पुरूषांनी मुक्तपणे त्याचा दुरूपयोग केला. एका दमात तीन तलाक दिल्याने देशातील अनेक महिलांना त्याचा फटका बसला. सततचा अन्याय सहन न झाल्याने मुस्लिम महिला जेंव्हा सर्वोच्च न्यायालयात गेल्या तेंव्हा सुद्धा कोर्टात आपली बाजू मांडण्यात मुस्लिमांना फारसे यश आले नाही. तीन तलाक भविष्यात कसे रोखणार? या संबंधीची ठोस योजना कोर्टासमोर मांडण्याचा एकीकडे मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड प्रयत्न करत असताना दूसरीकडे मात्र अनेक वर्तमानपत्रातून व वाहिन्यांमधून कोर्टात आलेल्या महिला कशा धर्मभ्रष्ट आहेत. इथपासून तर त्यातील काही वाईट चारित्र्याच्या कशा आहेत. हे सांगण्याकडेच बहुतेकांचे लक्ष होते. 
      या सर्व गुंतागुंतीचा फायदा भाजपाने उचलला नसता तरच नवलं. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या त्रिवार तलाकवर प्रतिबंध घालण्याच्या निर्णयाचा आधार घेत तात्काळ एक बिल लोकसभेत मंजूर करून घेतले.
प्रास्तावित कायदा कसा आहे? 
मुस्लिम वुमेन प्रोटेक्शन ऑफ राईट्स ऑन मॅरेजेस असे या कायद्याला नाव देण्यात आले असून यात खालील गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. 
अ) जर पतीने एका दमात तीन तलाक जरी दिला तरी तो लागू होणार नाही. 
ब) असे असले तरी असे करणाऱ्याला दोष सिद्धी नंतर तीन वर्षापर्यंत कैदेची शिक्षा व दंड होईल. 
क) आकारलेला दंड तलाक पीडितेकडे न जाता शासनाच्या तिजोरीत जाईल. 
ड) मुलांचा सांभाळ करण्याची जबाबदारी तलाक पीडितेवर राहील. खर्च मात्र पतीला द्यावा लागेल. सरकार यात काहीच मदद करणार नाही. एकंदरित हा कायदा मुस्लिम महिलांवर अन्याय करणारच आहे असे नाही तर हा मुस्लिमांच्या शरियतमध्ये सरळ हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न आहे. म्हणून असंवैधानिक आहे. अनुच्छेद 25 धर्म स्वतंत्र्याचा अधिकाराचा संकोच करणारा आहे.
तलाक पीडित महिलांची स्थिती
मुस्लिम समाजामध्ये स्त्रीचे स्थान प्रामुख्याने गृह केंद्रित आहे. इस्लामने स्त्रीसाठी घर चालविण्याचे उद्दिष्ट ठरवून दिलेले आहे. म्हणून समाजाचा कल आपल्या मुलींना गृहकर्तव्यदक्ष बनविण्याकडे असतो. शिवाय उच्च सहशिक्षणातून निर्माण होणारी गुंतागुंत टाळावी व मुलींचे लग्न वेळेवर लावून द्यावे, ही परंपरा असल्यामुळे मुस्लिम मुली उच्च शिक्षणापासून वंचित राहतात. अशा मुलींची तीन तलाक नंतर बिकट अवस्था होऊन जाते. उच्च शिक्षण नसल्याने तलाकनंतर उच्च दर्जाचं काम मिळत नाही. लोकांची धुनी-भांडी करून आपले व आपल्या चिमुकल्यांचे पोट भरण्याशिवाय पर्याय राहत नाही. शिवाय निकृष्ट अन्न, रक्ताशय, कमी हिमोग्लोबीन, लैंगिक शोषणांची संभावना, मुलांच्या शिक्षणाची दुरवस्था यामुळे उद्भवणाऱ्या भिषण परिस्थितीच्या चक्रात या दुर्देवी महिला व त्यांची मुले कायमची अडकून पडतात. 
समाजात अशा काही महिला नेहमीच असतात की त्यांना काम केल्याशिवाय गत्यांतर नसते. तलाक पीडित महिलांची देखभाल करण्याची जबाबदारी त्यांचे लग्न झाले नसताना ज्यांच्यावर होती त्यांच्यावरच पुन्हा येते. परंतु, काही कारणाने ते ती जबाबदारी पेलू शकत नसतील तर सरकारनी अशा महिलांसाठी सन्मानाने जगण्यासाठी रोजगार उपलब्ध करून द्यावा. ही कुठल्याही कल्याणकारी सरकारची जबाबदारी आहे. 
निरूपयोगी श्रीमंत मुस्लिम
जेव्हा सरकार आपली जबाबदारी पार पाडत नाही तेव्हा मुस्लिम समाजतील श्रीमंत तसेच बुद्धीवादी आणि उलेमा या सर्वांनी ती जबाबदारी स्विकारायला हवी. मात्र मुस्लिमांच्या या जबाबदार गटाने कधीच त्रिवार तलाक होऊ नये म्हणून गंभीर पावले उचलेली नाहीत किंवा तरूण तलाकपीडित गरजू महिलांच्या मदतीसाठी  कुठलीही ठोस व सुलभ व्यवस्था उपलब्ध करून दिलेली नाही. 
अलिकडे उलेमांच्या पुढाकाराने तीन तलाकच्या प्रस्तावित कायद्याच्या विरोधात देशभरात हजारो महिलांचे मोर्चे  निघत आहेत. ज्या मुस्लिम पुरूषांनी त्यांच्यावर अन्याय केला म्हणून त्या कोर्टात गेल्या त्याच निर्णयावर आधारित कायद्याच्या विरोधासाठी रस्त्यावर उतरण्याची पाळी त्यांच्यावर आली. किती हा दैवदुर्विलास? त्यात पुन्हा तेच लोक मोर्चासाठी त्यांना प्रेरित करीत आहेत ज्यांनी तीन तलाक दिले जात असतांना गप्प बसनेे पसंत केले होते. अशा या दुष्ट चक्रात मुस्लिम महिला या अडकलेल्या आहेत. एक तर आपल्या मुलींना पवित्र गाय बनवून ठेवावे व तीन तलाक झाल्यावर त्यांना वाऱ्यावर सोडून द्यावे हा काही मुस्लिम पुरूषांचा ढोंगीपणा आता संपावयास हवा. 
मोर्चे काढून फारसे कांही साध्य होत नाही. महाराष्ट्रात आरक्षणासाठी मुस्लिमांनी लाखोंचे मोर्चे काढले. त्यांचे काय झाले? हा इतिहास जुना नाही. तरी मोर्चे, धरणे, प्रदर्शन आदी लोकशाही आयुधे वापरून हा कायदा मंजूर होणार नाही यासाठी यथासंभव प्रयत्न करण्यास काही हरकत नाही. सरकारच्या मनोधैर्यावर जरी त्याचा परिणाम झाला नाही तरी समाजाच्या मनोधैर्यावर या मोर्चाचा चांगला परिणाम होईल यात शंका नाही.आता जेव्हा सरकारने हा कायदा आणण्याचा निर्णय केलेलाच आहे. राज्यसभेतही भाजपचे बहुमत होत आलेले आहे. म्हणून हा कायदा आज न उद्या मंजूर होईल याचीच शक्यता जास्त आहे. हा कायदा मंजूर होणार अशी शक्यता गृहित धरूणच मुस्लिम समाजाने पुढचे धोरण आखले पाहिजे. 
पुढचे संभाव्य धोरण
1) सरकार मदत करणार नाही याची मनाशी पक्की खुनगाठ बांधून वार्षिक जकातीमधून अशा महिलांना पुरेल असा निधी प्रत्येक शहरात राखून ठेवावा व त्याचे न्याय वितरण होईल यासाठी सज्जनांची समिती नेमावी. 
2) अशा महिलांचे पुनर्विवाह व्हावे यासाठी अनुकूल असे वातावरण समाजात जाणून बुजून तयार करावे व अशा महिलांना पुनर्विवाहसाठी प्रोत्साहन द्यावे. 
3) तीन तलाक किती भयंकर परिणाम करतो यासाठी जनजागृती करावी. 
4) ज्यांची लग्न होऊ घातलेली आहेत अशा तरूणांसाठी लग्नपूर्वी समुपेदशनांसाठी प्रत्येक शहरामधील एखाद्या दारूल उलूममध्ये, दारूल इस्लाह (सुधारणा केंद्र) सुरू करावे व तेथे त्यांना पती-पत्नींचे शरई अधिकार आणि कर्तव्य तसेच तीन तलाकमुळे होणारे सामाजिक नुकसान इत्यादींबाबत त्यांना एक आठवड्याचे प्रशिक्षण देण्यात यावे. त्याखेरीज त्यांचा निकाह लावला जाणार नाही असे काझींनी घोषित करावे.  5) शिवाय, नवीन लग्न होवून आलेल्या सुनेला कसे नांदवावे, यासंबंधी प्रौढांचेही समुपदेशन आवश्यक असल्यास करण्याची व्यवस्था दारूल इस्लाहमध्ये करण्यात यावी.  
6) तरूण मुलींनाही याच पद्धतीचे समुपदेशन देण्यासाठी तज्ञ व अनुभवी महिलांचे समुपदेशकांमार्फतीने दारूल इस्लाहमध्ये व्यवस्था करावी व लग्नानंतर सासरी कसे वागावे ज्यामुळे तीन तलाक पर्यंत प्रकरण पोहोचणार नाही, या संबंधीची त्यांची बौद्धिक तयारी करवून घ्यावी.
एवढे सगळे उपाय करून ही एखाद्याने तीन तलाक दिलाच तर त्याने दिलेला तीन तलाक असाधरण परिस्थितीत दिला गेलेला व योग्य होता का याची छाननी उलेमा व वकीलांच्या समितीने करावी व कारण योग्य नसेल तर त्याचा पुनर्विवाह सहजा सहजी होणार नाही यासाठी समाजाने एकत्रित रित्या योग्य ती पावले उचलावीत.
हा कायदा तलाक पीडित महिलांवर कसा अन्याय करणारा आहे. हे आता आपण पाहूया - 
1) पतीला तुरूंगामध्ये पाठवून सुद्धा लग्न मोडले जाणार नसल्याने कोण पती तुरूंगातून परत येऊन त्याच पत्नीशी पुन्हा संसार करील? 
2) पती तुरूंगात असतांना मुलांच्या सांभाळाची जबाबदारी गृहिणी असलेली तलाक पीडित महिला कशा पेलू शकतील? 
3) शिक्षेच्या भीतीने मुस्लिम पतीसुद्धा गुजरात पॅटर्न प्रमाणे तलाक न देता पत्नीला वाऱ्यावर सोडून देतील व आज अस्तित्वात नसलेला परित्याक्त्या महिलांचा एक नवा वर्ग मुस्लिम समाजात निर्माण होईल. त्यातून परत नवीन समस्या निर्माण होतील. 
4) या कायद्याचा पुढील टप्पा इस्लाममधील तोंडी तलाकच्या पद्धतीचेच समुळ उच्चाटन करणे आहे. याचा अंदाज या कायद्यातील ’तलाक’ या शब्दाच्या व्याख्येवरून येतो. दुर्देवाने तसे झाल्यास मुस्लिम महिलांच्या आत्महत्याचे किंवा त्यांच्या हत्येंचे प्रमाण भविष्यात वाढेल. अशी सार्थ भीती वाटते.
इस्लाममध्ये तोंडी तलाक देण्याची सुलभ व्यवस्था असल्याने ही अल्लाहची एका प्रकारची कृपाच आहे. सुलभ तलाक मिळाल्याने तलाक झालेल्या महिला स्वतःच्या हिमतीवर किमान जीवंत तरी राहू शकतात. तोंडी तलाकची व्यवस्था नष्ट झाल्यास त्यांना जीवंत राहणे देखील कठीण होऊन जाईल. अशा परिस्थितीत मुस्लिम समाजाला या महिलांकडे सहानुभूतीने पाहण्याची नव्हे तर सहकार्य करण्याची गरज आहे. हे जेव्हा उमजेल तोच सु दीन. समाज एकसंघ ठेवण्यासाठी कुटुंब व्यवस्था मजबूत ठेवावी लागते हे मान्य. परंतु, कुटुंबाचा पाठीचा कणा असलेल्या स्त्रीला असे एका दमात तीन तलाक देवून वाऱ्यावर सोडून देणे जितके वाईट तितकेच या प्रस्तावित कायद्याच्या भितीने त्यांचा परित्याग करणे सुद्धा वाईट. म्हणून आता आळस झटकून कामाला लागण्याची वेळ येवून ठेपलेली आहे. आपल्या विवाहित मुलींना/सुनेला शक्यतो तलाक दिलाच जाणार नाही, यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत. अल्लाहला हलाल गोष्टींमध्ये तलाक सर्वात अप्रीय गोष्ट आहे याचे भान सर्वांनी ठेवायला हवा. 
आपल्या मुलींना या दुष्टचक्रातून बाहेर काढण्याची सामुहिक जबाबदारी माझी, तुमची आणि सर्व मुस्लिम समाजाची आहे. अधिच भरपूर उशीर झालेला आहे अजून उशीर केला तर याचे दुष्परिणाम एक समाज म्हणून आपल्या सगळ्यांनाच भोगावे लागतील याची सर्वांनी खात्री बाळगावी. शेवटी अल्लाहकडे दुआ करतो की आपल्या सर्वांना या प्रश्नाला भिडण्याची शक्ती मिळो व खरे मुस्लिम असल्याचे सिद्ध करण्याची ही संधी आपल्यालाल चालून आलेली आहे अल्लाह करो या संधीचे सोने करण्याची सर्वांना सद्बुद्धी मिळो.(आमीन.)

सीमा देशपांडे - 7798981535
ईश्वराने मातीपासून आदम (अ.स.) पहिला (पुरुष) व हव्वा (अ.स.) (स्त्री) निर्माण केले तेव्हा ईश्वराने त्याच्याकडून एक करार/शपथ घेतली आणि आदमापासून  त्याच्या सर्व वंशांना वाढविले. आदम चे वंशज (पिढ्यानपिढ्या), ज्यांच्याद्वारे  पृथ्वीवर सर्वत्र मानवजातीचा विस्तार झाला, त्या सर्वांकडून एक करार घेतला. ईश्वराने  त्यांच्या आत्म्यांशी थेट संबोधन केले, म्हंटले  तुमचा स्वामी कोण आहे?  सगळ्या आत्म्यानी उत्तर दिले  निशंकपणे तुम्हीच स्वामी आहात.   व मग त्याच्याकडून साक्ष घेतली की ईश्वर/अल्लाह (मी) तुमचा स्वामी आहे कारण ईश्वराने आदमची व सर्व मानवजातीची निर्मिती केली. जेव्हा ह.आदम ला मातीपासुन निर्मित केले तेव्हा प्रलयाच्या दिवसापर्यंत जन्माला येणाऱ्या प्रत्येक आत्म्याने शपथ घेतली की अल्लाह त्यांचा स्वामी आहे. तेव्हा त्यानी ईश्वराचे प्रत्यक्ष दर्शन केलेले होते. प्रत्येक मानवाने मातेच्या गर्भाशयात दाखल होण्याआधीच एकेश्वरत्वाची शपथ घेतलेली असते. म्हणूनच प्रत्येक आत्म्यावर  शपथेचा शिक्कामोर्तब झालेला असतो. म्हणूनच जेव्हा कोणतेही  मुल जन्माला येते तेव्हा त्याचा एका ईश्वरावर (नैसर्गिकरीत्या) ठाम विश्वास असतो. त्यामुळे मानवाचा जन्म ईश्वराच्या एकाकीपणातील नैसर्गिक विश्वासातून झालेला आहे. तोच त्याचा निर्माता (एक ईश्वर ) आहे हे प्रत्येकजण पूर्णपणे ओळखून असतो. अरबी भाषेत या नैसर्गिक विचारांना फित्रा (जन्मजात) म्हणतात. परिणामी, प्रत्येक व्यक्तीने ईश्वराच्या एकात्मतेवर विश्वास अगदी बिजाअवस्थेपासुन वाहून आणलेला असतो. पण ही नैसर्गिक माहिती निष्काळजीपणाच्या स्तरांखाली दडली जाते आणि सामाजिक परिस्थितीमुळे दाबुन टाकली जाते. जर प्रत्येक मानवाला एकटे सोडले असते तर तो ईश्वर एकच आहे (अल्लाह) ह्या जाणीवे सोबतच वाढेल. परंतु सर्व मुलांवर त्यांच्या धर्माचा,पर्यावरणाचा, कुटुंबाचा, वंशाचा इतका परिणाम होतो की तो त्याची जन्मापूर्वीची शपथ विसरुन जातो. ईश्वराचे प्रेषित मुहम्मद (स.) यांनी म्हटले आहे की, ’प्रत्येक मानव जन्माला येतो तेव्हा त्याची जन्मजात अवस्था अशी असते कि तो जाणून असतो की, अल्लाहच आपला एकमेव निर्माता आहे ’ परंतु त्याचे आई-वडील त्याला एक हिंदू एक ज्यू किंवा ख्रिस्ती बनवतात .
जेव्हा मानव पृथ्वीवर जन्म घेतो तेव्हा त्याचे शरीर पूर्णपणे भौतिक नियमांशी समर्पित  होवुन जाते. जेव्हा की  हे भौतीक पर्यावरण ही ईश्वराने मानवासाठी निर्माण केले आहे. परंतु त्याची आत्मा निसर्गतःच ईश्वर त्याचा निर्माता आणि पालनकर्ता आहे ह्या विश्वासाला समर्पीत असते. मग प्रश्न पडतो की जेव्हा आपला आत्मा एका ईश्वराला मानतो तर हे भौतीक शरीर ह्या श्रद्धेला विरोध का बरे करते? कारण जेव्हा आपल्याला समज येते तेव्हा आपण जगाची वास्तविकता लक्षात घेऊन जीवनास प्रारंभ करतो. आईवडिलांनी संगितलेल्या निर्मिति वर आंधळा विश्वास  ठेउन धर्म पऱंपरा निभावतो आणि त्याचिच उपासना करतो. जसे (अनेकेश्वरत्व) मुर्तीपूजा, (कुलदैवत) वंशानुसार वैयक्तिक ईश्वर, देवी-देवता (ईश्वरच्या पत्नी, मुले). तसेच,  सर्वात भयानक म्हणजे  ईश्वराच्या अप्सरा..अजुन बरेच काही... म्हणजे ईश्वरामध्ये माणसांच्या सर्व गरजा व अवगुण ओतुन व  त्याचे उपहास करुन असे समजतात की आम्ही खूप ईश्वराची  उपासना आणि आराधना करतो. पण सत्य हे आहे की ईश्वर या सगळ्या अवगुण व गरजांपासून मुक्त व अत्यंत पवित्र आहे. प्रत्येक मनुष्याला जेव्हा समज येते तेव्हा त्याने ईश्वराच्या एकतत्वावर नक्कीच विचार करायला पाहिजे व त्याच धर्माचे अनुसरण केले पाहिजे जे ज्यात खरे ज्ञान व तर्क दिसून येतो. प्रत्येकाने स्वतःचे आत्मपरिक्षण करावे व जाणून घ्यावे की आपण निराकार ईश्वराची भक्ती करावी कि, वडिलोपार्जीत परपरेने बनविलेल्या मनुष्यरुपी ईश्वराची? असे करून काय आपण ईश्वराचा कळत नकळत अपमान करत नाही आहोत? 
त्याचबरोबर आत्मनिरिक्षण करावे की, स्वतःच्या भौतिक तीव्र इच्छेमध्ये जसे, या समाजात उच्च स्थान प्राप्त करावे , खुप पैसा कमवावा मग तो लाच, जुगाराद्वारे कमाविलेला का असेना, समाज ज्या पोशाखाची मागणी करतो मग तेच परिधान करावे मग त्यात शरीर उघडे राहीले तरी चालेल, मग एवढे सर्व प्राप्त केल्यावर कौटुंबिक खरे सुख हे सामाजिक करमणुकीच्या साधनाद्वारे मिळु शकते असा लोकांचा दृढ विश्वास होऊन बसला आहे. उदा.  नग्न चित्रे , प्रेम-विषयक चित्रपट, विरुद्ध लिंगी व्यक्तीशी गाठी-भेटी चे प्रसंग, नग्न व युगल नृत्ये, कामवासनेने ओथंबली चित्रपटे अजून बरेच काही ज्याला कला असे सोज्वळ नाव दिलेले आहे . पण अखेर हे आहे तरी काय? खरच ह्या ईच्छा आपली नैतीकता टिकविते काय? मग मनुष्यरुपी ईश्वर व त्याचेच नियम आपल्याला ह्याचे अनुसरण करायला लावत असतील तर त्याचे  परिणाम, दुराचार, अत्याचार, अन्याय, व्यभीचार,अश्‍लीलता, बलत्कार, हुंडाबळी, घटस्फोट या अनैतीकतेकडे जोमाने वाटचाल का करत आहे, यात नवल ते काय? 
तुम्हाला प्रत्येकाला वाटत नाही काय की, आपण सर्व चांगली माणसे बनावित? काय तुम्हाला हे ही वाटत नाही की, आपण सगळ्यांनी मिळून चांगली कुटुंब व्यवस्था आकाराला आणावी.  एक स्वच्छ आणि सुदृढ, नैतिक समाज घडवावा? अणि ह्या उफाळून आलेल्या अनैतिकतेचा नायनाट व्हावा? काय तुम्हाला असेही वाटत नाही की, तुम्हा-आम्हा सर्वानी नरकाग्नी चा मार्ग सोडुन स्वर्गाचा मार्ग स्वीकारावा? पण ही नैतीकता तेव्हाच माणूस अनुसरेल जेव्हा तो खऱ्या ईश्वराला जाणेल. जेव्हा मनुष्य खऱ्या ईश्वराला जाणेल तेव्हा तो आपल्यावर नाराज होवू नये म्हणुन त्याच्या नियमावली नुसार जीवन व्यतीत करेल. माणसाने याचे आत्मपरिक्षण केले नाही तर तो अनैतीकतेच्या भौतीक इच्छांमध्ये इतका वाहून जाईन की तो या दुनियेत तर शिक्षा भोगेलच पण त्यापेक्षा तिव्र व यातनामय शिक्षा मृत्युनंतर भोगेल. जी की अथांग असेल. स्वतःला नरकापासून वाचवायचे असेल तर खऱ्या ईश्वराची भक्ती करा जो की, निर्गुण, निराकार, शाश्वत, व अपरिवर्तनीय आहे व त्याच्याच नियमाचे अनुसरण करुन हे भौतीक जीवन व्यतीत करावे. चला तर मग आजपासुन स्वतः च्या आत्म्याचे परिक्षण सुरू करु व खऱ्या ईश्वराला जाणुन घेवु व अश्या धर्माचे  ज्ञान आत्मसात करु जो ईश्वर व मनुष्याचे प्रेम, एकेश्वरत्वाची वास्तवीकता व या भौतीक जीवनात नैतीकता टिकुन ठेवण्यास मदत करतो व त्याच बरोबर मृत्युपश्‍चात स्वर्गाकडे जाण्यास मार्गदर्शन करतो. ह्यासाठी ईश्वर आपणा सर्वांस मार्गदर्शन व सहकार्य करो, हीच कळकळीची प्रार्थना आहे. (तथास्तु!)

माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘जेव्हा कोणा मुस्लिमास एखादा मानसिक त्रास, एखादा शारीरिक आजार, एखादा शोक अथवा दु:ख पोहोचते आणि तो त्यावर संयम बाळगतो तेव्हा त्याच्या परिणामस्वरूप अल्लाह त्याचे पाप क्षमा करतो, इतकेच नव्हे तर त्याला एखाद काटा बोचतो, तोदेखील त्याच्या पापांच्या क्षमेची सबब बनतो.’’ (हदीस : मुत्तफक अलैहि)
माननीय सुफियान बिन अब्दुल्लाह (रजि.) यांच्या कथनानुसार,
मी पैगंबर मुहम्मद (स.) यांना विचारले, ‘‘इस्लामच्या बाबतीत अशी विस्तृत माहिती मला सांगा जेणेकरून पुन्हा कोणा दुसऱ्याला काही विचारण्याची आवश्यकता पडणार नाही.’’ पैगंबर म्हणाले, ‘‘‘आमनतु बिल्लाहि’ म्हणा आणि मग त्यावर दृढ राहा.’’ (हदीस : मुस्लिम)
स्पष्टीकरण : म्हणजे ‘दीन तौहीद’ (इस्लाम) चा मनुष्याने स्वीकारावा, त्याला आपली जीवनपद्धती बनवावे आणि मग कसल्याही प्रकारच्या प्रतिवूâल परिस्थितीला सामोरे जावे लागले तरी त्यावर दृढ राहावे; हीच आहे या जगात व पारलौकिक जीवनात यशाची गुरूकिल्ली.
माननीय मिकदाद (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘भांडणापासून सुरक्षित राहणारा मनुष्य नशीबवान आहे.’’ हे वाक्य पैगंबरांनी तीनदा म्हटले. मग म्हणाले, ‘‘परंतु परीक्षा व कसोटीत सापडल्यानंतरही सत्यावर दृढ राहणारा मनुष्य खूपच नशीबवान असून त्याच्यासाठी शाबासकी आहे.’’ (हदीस : अबू दाऊद)
स्पष्टीकरण : या हदीसमध्ये ‘फितना’ हा शब्द प्रयोग करण्यात आला आहे. ‘फितना’ म्हणजे ज्या कसोटींना एखाद्या मुस्लिमास या जगात सामोरे जावे लागते. जेव्हा असत्याचा प्रभाव व वर्चस्व वाढेल आणि सत्य पराभूत व पराधीन होईल तेव्हा सत्य स्वीकारणाऱ्यांना आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांना अनेक प्रकारचा त्रास सहन करावा लागतो ते सांगण्याची गरज नाही. अशा युगात असत्य आणि त्याचा अवलंब करणाऱ्यांनी निर्माण केलेले अडथळे आणि उत्पन्न करण्यात आलेल्या संकटे असूनसुद्धा एक मनुष्य सत्यावर दृढ राहतो तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) यांच्याद्वारे तो शाबासकी व दुआचा हक्कदार आहे.
तिबरानीने माननीय मुआज बिन जबल (रजि.) यांचे कथन उद्धृत केले आहे, त्यात असा उल्लेख आढळतो की जेव्हा ‘दीन’चे शासन डबघाईला येईल तेव्हा मुस्लिमांवर अशा शासकांचे राज्य येईल जे चुकीच्या दिशेने समाजाला नेतील. जर त्यांचे ऐकले तर लोक मार्गभ्रष्ट होतील आणि जर त्यांचे ऐकले नाही तर ते त्याला ठार करतील.
त्यावर लोकांनी विचारले, ‘‘हे पैगंबर मुहम्मद (स.)! अशा स्थितीत आपण आम्हाला काय मार्गदर्शन कराल?’’
तेव्हा पैगंबर मुहम्मद (स.) म्हणाले, ‘‘तुम्हाया ते सर्व या युगात करावे लागेल जे मरयमपुत्र इसा (अ.) यांच्या अनुयायींनी केले होते. त्यांना करवतीने कापण्यात आले आणि फासावर लटकविले गेले, परंतु त्यांनी असत्यापुढे शस्त्र ठेवले नाही. अल्लाहच्या अवज्ञेत जीवन जगण्यापेक्षा अल्लाहच्या उपासनेत मरण पत्करलेले बरे.’’
माननीय अनस (रजि.) यांच्या कथनानुसार,
पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘अशी परिस्थिती निर्माण होईल जेव्हा ‘दीन’वाल्यांना (इस्लामच्या अनुयायांना) ‘दीन’वर दृढ राहणे हातावर विस्तव घेण्यासारखे होईल.’’ (हदीस : तिर्मिजी, मिश्कात)
स्पष्टीकरण : परिस्थिती अतिशय वाईट होईल. असत्याचा उदोउदो होईल आणि सत्या 
संकटात सापडेल. अनेक लोक जगाची पूजा करू लागतील. अशा स्थितीत ‘दीन’च्या अनुयायींना शुभवार्ता दिली जाईल. विस्तवाशी खेळणे विराचे काम असू शकते. भित्रे लोक अशाप्रकारचा खेळ खेळत नाहीत.
विश्वास
माननीय अबू हुरैरा (रजि.) यांच्या कथनानुसार, पैगंबर मुहम्मद (स.) यांनी सांगितले, ‘‘तुम्ही जर अल्लाहवर चांगल्या प्रकारे विश्वास ठेवला तर तो पक्ष्यांना देतो तशी तुम्हालाही रोजी देईल. पक्षी सकाळी जेव्हा रोजीच्या शोधार्थ घरट्यांमधून बाहेर पडतात तेव्हा त्यांचे पोट आत गेलेले असते आणि संध्याकाळी जेव्हा आपल्या घरट्यांमध्ये परत येतात तेव्हा त्यांचे पोट भरलेल असते.’’ (हदीस : तिर्मिजी)

(२७६) अल्लाह व्याजाचा ऱ्हास करतो आणि दान-धर्माची वाढ करतो३२० आणि अल्लाह कोणत्याही कृतघ्न आणि वाईट आचरण करणाऱ्याला पसंत करत नाही.३२१
(२७७) होय, जे लोक श्रद्धा ठेवतील आणि पुण्यकर्म करतील आणि नमाज कायम करतील व जकात देतील, नि:संशय त्यांचा मोबदला त्यांच्या पालनकत्र्यापाशी आहे आणि त्यांच्यासाठी कोणत्याही भयाचा आणि दु:खाचा प्रसंग नाही.३२२
(२७८) हे ईमानधारकांनो, अल्लाहचे भय बाळगा आणि जे काही तुमचे व्याज लोकांकडून येणे बाकी असेल ते सोडून द्या, जर खरोखर तुम्ही ईमानधारक असाल.
(२७९) परंतु जर तुम्ही असे केले नाही, तर सावध व्हा, अल्लाह व त्याच्या पैगंबराकडून तुमच्याविरूद्ध युद्धाची घोषणा आहे.३२३ अजूनसुद्धा पश्चात्ताप कराल (आणि व्याज सोडून द्याल) तर आपली मूळ रक्कम घेण्याचा तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही कुणावर अत्याचार करू नका न तुमच्यावर कुणी अत्याचार करील.


३२०) या आयतमध्ये एक असे सत्य वर्णन करण्यात आले आहे जे नैतिक आणि आध्यात्मिक दृष्टीने तसेच आर्थिक आणि सांस्कृतिक दृष्टीने पूर्ण सत्य आहे. व्याजाने संपत्ती वाढते असेच दिसते आणि दान-पुण्याने संपत्ती घटते असे दिसून येते. परंतु सत्य हे आहे की मामला याविरुद्ध आहे. अल्लाहचा नैसर्गिक नियम हाच आहे की व्याज नैतिक, आध्यात्मिक तसेच आर्थिक व सांस्कृतिक प्रगती करण्यात अडथळाच बनून राहात नाही तर या सर्वांच्या पतनाचे कारण बनते. या विपरीत दान-पुण्याने (ज्यात कर्जे हसना (उत्तम कर्जसुद्धा सामील आहे) नैतिकता, आध्यात्मिकता, संस्कृती आणि आर्थिक स्थिती इ. सर्व विकसित होत जातात.
३२१) स्पष्टत: व्याजावर पैसा तोच व्यक्ती लावतो ज्याला गरजेपेक्षा जास्त मिळाले आहे. हा गरजेपेक्षा जास्त हिस्सा जो त्या व्यक्तीला मिळतो ती कुरआनच्या दृष्टीने अल्लाहची कृपा आहे. अल्लाहच्या कृपेची खरी कृतज्ञता व्यःत करणे म्हणजे अल्लाहने जशी त्याच्यावर कृपा केली त्याचप्रमाणे त्याने अल्लाहच्या इतर गरजवंत दासांवर मेहरबानी करावी. तो जर असे करत नसेल परंतु याविरुद्ध अल्लाहच्या कृपेला या उद्देशासाठी वापरतो, की त्या कमी उत्पन्न गटाच्या लोकांच्या त्यांच्या अल्पशा हिश्यातून आपल्या पैशाच्या जोरावर काही भाग हडप करत असतो तर असा मनुष्य खरे तर अल्लाहचा कृतघ्न आहे, तसेच अन्यायी, अत्याचारी आणि दुष्‌कर्मसुद्धा आहे.
३२२) या आयती (नं. २७३ ते २८१) मध्ये अल्लाहने पुन्हा पुन्हा दोन प्रकारच्या चारित्र्याला डोळ्यांपुढे ठेवले आहे. एक चारित्र्य स्वार्थ, लोभी आणि कृपण शायलॉकवृत्ती मनुष्याचे आहे. अशी व्यक्ती अल्लाह आणि दासांच्या हक्कांशी बेपर्वा बनतो. तो तर फक्त रुपये पैसे मोजण्यात आणि मोजून मोजून संभाळून ठेवण्यातच आणि संपत्ती वाढविण्यातच आपले आयुष्य वेचतो. दुसरे चारि्त्र्य एकेश्वरवादी, दानशूर आणि मानवतेचे भले करणाराचे चारित्रय आहे. तो अल्लाह आणि अल्लाहच्या त्या दासांच्या हक्कांविषयी जागरूक असतो. आपल्या कष्टाने कमवितो, स्वत: खातो आणि दुसऱ्यांना खाऊ घालतो; तसेच मन:पूर्वक भलाईच्या कामात खर्च करतो. पहिल्या प्रकारचे चारित्रय अल्लाहला अति अप्रिय आहे. जगात या चारित्र्याने भले समाज निर्माण न होता बिघाड निर्माण होतो आणि परलोकात अशा चारित्र्याच्या व्यक्तीसाठी दु:ख, परेशानी, पीडा व कष्टच आहे, याविरुद्ध अल्लाहला दुसऱ्या प्रकारचे चारित्रय अतिप्रिय आहे. यामुळेच जगात भल्या समाजाची घडण होते आणि परलोक सफलता यावरच आधारित आहे.
३२३) ही आयत मक्का विजयानंतर अवतरित झाली होती तेव्‌हा अरबस्थान इस्लामी शासनाच्या पूर्ण आधीन होते. यापूर्व व्याज एक अप्रिय वस्तू समजली जात होती. परंतु कायद्याने त्यावर बंदी घातली गेली नव्‌हती. ही आयत अवतरित झाल्यानंतर इस्लामी राज्याच्या सीमेत व्याजबट्ट्याचा व्यवहार फौजदारी गुन्हा बनला. अरबांच्या ज्या टोळया व्याज खात होत्या त्यांच्याकडे पैगंबर मुहम्मद (स.) यांनी आपले वसुली अधिकारी पाठवून त्यांना तंबी दिली की त्यांनी व्याजबट्ट्याच्या व्यवहारापासून दूर राहावे अन्यथा त्यांच्याविरुद्ध युद्ध पुकारले जाईल. आयतच्या अंतिम शब्दांनुसार इब्ने अब्बास, हसन बसरी, इब्‌ने सरीन आणि रूबैअ बिन अनस यांच्या मते जो मनुष्य इस्लामी राज्यात व्याज खाईल त्याला क्षमा-याचना (तौबा) करण्यास भाग पाडावे आणि मान्य केले नाही तर त्याला ठार करावे. दुसऱ्या   फिकाहशास्त्रींच्या  (फुकाह)  मते  अशा   व्यक्तीला   कैद   करणे   पुरेसे   आहे.  जोपर्यंत  तो व्याजबट्ट्यांचा व्यवहार बंद करण्याचे सोडत नाही, तोपर्यंत त्याला तुरुगांतून सोडले जाऊ शकत नाही.

statcounter

MKRdezign

Contact Form

Name

Email *

Message *

Powered by Blogger.
Javascript DisablePlease Enable Javascript To See All Widget