कवी हाशम पटेल हे संवेदनशील मनाचे कवी आहेत. मुस्लिम मनांची घुसमट आणि आक्रंदन त्यांनी आपल्या कवितेमधून मोठ्या ताकदीने मांडली आहे. हे आक्रंदन त्यांच्या मनाला अस्वस्थ करणारा आहे. कवी हाशम पटेल यांनी येथील व्यवस्थेच्या मुस्लिम समाजावरील हल्ला परतवून लावताना हिंदू-मुस्लिमांमध्ये दरी निर्माण करणाऱ्या मानसिकतेलाही धारेवर धरले आहे.
‘जरी जातीनं आम्ही मुसलमान
पक्का आमुचा इथल्या मातीशी इमान
या आम्ही तुमचे जुने मेहमान
तुम्ही आमचे जुने मेहमान’ (पृ.क्र. 39)
वरील ओळींमधून कवीने माणुसकीचा सुंदर सोहळा साजरा केला आहे. हिंदू-मुस्लिमांनी सन्मानाने जीवन जगावे. हिंदू- मुस्लिमांचा प्रतिष्ठेला येथील मूलतत्त्ववाद्यांनी हैराण केले आहे. येथील हिंदू-मुस्लिमांना आपापल्या धर्मातील मूलतत्त्ववाद नाकारून सन्मानाने जीवन जगता येऊ शकते. हे सांगतांना कवीने भारतीय मुस्लिमांची आचरणशैली ही इस्लामला मानणारी असली तरी त्यांची संपूर्ण निष्ठा ही भारत देशावर आहे. उपासना पद्धती वेगळी असली तरी त्यांचे भारत देशावर प्रेम आहे. याचे कारण असे की मुस्लिमांचा धार्मिक ग्रंथ कुरआन मुस्लिमांना आदेश देतो की तुम्ही ज्या देशात राहता त्या देशाप्रती तुम्ही निष्ठावंत असायला हवे. ज्या देशात राहता त्या देशाशी इमान राखलेच पाहिजे. दुसरा मुद्दा असा की भारतीय मुस्लिम हे धर्मांतरीत आहेत. ते या देशातील मूलनिवासी आहेत. ज्या धर्माचा पवित्र ग्रंथ आपल्या अनुयायांना आपल्या देशाशी निष्ठावंत राहण्याचा आदेश देतो आणि जो समाज येथील मूलनिवाशी आहे असा समाज परकीय कसा होऊ शकतो. मुस्लिम समाज तर इतरांपेक्षा अधिक राष्ट्रप्रेमी आहे. मुसलमान हा इमानधारक आहे. हिंदू- मुस्लिमांचा नात्यातील सौहार्दाचा कार्यक्रम कवी हाशम पटेल यांनी वरील ओळींमधून पेश केला आहे.
‘आणखी किती लूट व्हावी
उद्ध्वस्त प्रपंचाच्या भिंती
त्यांनी कधी उभी करावी?
येणारी सकाळ आबदेत उगवावी
जाणारी रात्र आबदेत जावी,
वळचणीत पडलेल्या मुसलमानांची
आणखी किती कुचंबना व्हावी?’ (पृ.क्र. 41)
कवी हाशम पटेल म्हणतात की, मुस्लिमांच्या वाट्याला आलेल्या वेदनांचा हिशोब मुस्लिमांनी करायला हवा. कवी वरील ओळींमधून मुस्लिम समाजाला नवे भान देऊ इच्छितो. कवी मुस्लिम समाजाला स्वतःचे आत्मपरिक्षणही करायला लावतो. मुस्लिम समाजाच्या वाताहतीला कारणीभूत कोण आहे? येथील सांस्कृतिक जीवनात मुस्लिमांचे स्थान काय आहे? मुस्लिम समाज सन्मानाने कसा जगेल? या सर्व मूलभूत प्रश्नांची चर्चा कवीने मुस्लिमांवर होणाऱ्या अमानुषतेच्या संकटातून सोडवण्यासाठी केली आहे. वरील ओळींतील कवीचे चिंतन हे मुस्लिम समाजाच्या नेणिवेला जागृत करणारे आहे.
‘जन्माने मी मुस्लिम आहे
जगणे मात्र माझे दलित आहे
सत्य मी हे सांगत आहे
दलित म्हणा हो मला दलित म्हणा.
आता तुमच्या टाचा खाली मी दबलो आहे
चालू जमान्याचा मी क्षूद्र आहे
आक्रंदणे माझे गगनभेदी आहे.
पण कोण ते ऐकत आहे.’ (पृ.क्र. 49)
कवी हाशम पटेल यांनी मुस्लिम समाजाची वास्तव परिस्थिती मोठ्या पोटतिडकीने आस्वादकांसमोर मांडली आहे. या देशात सातत्याने घडणाèया जातीय दंगली, हिंदुत्ववादी संघटनांचा प्रक्षोभ मुस्लिमविरोधी प्रचार, मुस्लिम समाजात शिक्षणाचा मर्यादित प्रसार या सर्व बाबींमुळे मुस्लिम समाजाची आजची परिस्थिती ही दलित वर्गापेक्षाही बिकट झाली आहे. हे सर्व पाहून कवीच्या मनात उद्रेक निर्माण होतो. हा उद्रेक जाणिवेच्या पातळीवरील आहे. कवी मुस्लिमांच्या दडपलेल्या जीवनाचा शोध एकीकडे घेतो आणि दुसरीकडे मुस्लिमांच्या जीवनाला का दडपले याचा छडा लावण्याचा निर्धारही वरील ओळींमधून निर्भयपणे करतो आहे.
‘आला योग मुस्लिमाला कधी देत नाहीत,
तेव्हा मुस्लिम आतून बाहेर रिताच राहतो.
ते धन्य मानतात पेटवण्यात
पेटलेले आणखी भडकावण्यात
तेव्हा मुस्लिमच जळतो’ (पृ.क्र. 50)
वरील ओळींमधून कवी हाशम पटेल यांनी येथील राजकीय पक्षांची मुस्लिम समाजविषयीची भूमिका स्पष्ट शब्दात मांडली आहे. कवी हाशम पटेल यांनी वरील ओळींमधून येथील राजकीय पक्षांचे चारित्र्यच मांडले आहे.
‘उठा उठा रे...
मुस्लिम गड्यांनों
सगळे व्हा सावधान
कराया तुमचे सारे उत्थान
संदेश तुम्हा कुरआनाचा
हिजरतचा तुम्हा नारा
कुठेच तुम्ही मागे नाही
तुमचा दर्जा न्यारा
लोटालोटीच्या रेट्याने
मागे तुम्ही पिछाडता
मग कशाला गप्प राहता
मरगळ कधी टाकता?’ (पृ.क्र. 89)
वरील ओळी मुस्लिमांचा आत्मविश्वास वाढविणाऱ्या आहेत. कवीला प्रकर्षाने वाटते की, मुस्लिम समाजाने आज भौतिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि सांस्कृतिकदृष्ट्या अद्ययावत राहावयाला हवे. इस्लामच्या पवित्र धर्मग्रंथ ‘कुरआन’चे तत्त्वज्ञान हे माणसाला अद्ययावत ठेवणारे तत्त्वज्ञान आहे. कवीने मुस्लिम समाजाला स्वतःची तपासणी करायला सांगितले आहे. कवीने वरील ओळींच्या निमित्ताने मुस्लिमांच्या मनात स्वाभिमान जिवंत करण्याचा प्रयत्न केला आहे. वरील ओळींच्या मनातील इच्छा ही आहे की, मुस्लिम समाजाने स्वाभिमानाचे महाआंदोलन निर्माण करावे. त्यांनी स्वतः आपल्या स्वाभिमानाचे मारेकरी ठरू नये. त्यांनी स्वतः त्यांच्यापुढील काळोखाचा अंधार दूर करावा. त्यांनी कुणाची लाचारी स्वीकारू नये. आज मुस्लिम समाजात निर्माण झालेली लाचारी ही ‘कुरआन’च्या जीवनशैलीच्या स्वच्छपणे विरोधी टोकाला राहिल्याने आली आहे. हे सांगायला कवी विसरत नाही.
‘आम्हा असेच कुठपर्यंत
तुम्ही उपरे ठेवणार
आम्ही हकदार तुमच्या बरोबरीचे
आम्हाला उचलून असे का हो देणार?
सत्ताप्रशासनात अशी तुम्ही
किती ही वाटमारी करणार.’ (पृ.क्र. 88)
वरील ओळींमधून कवीने पराकोटीचा संतापच व्य्नत केला आहे. कवीचा हा संताप समजावून घ्यायला हवा. कवीचा हा संताप माणुसकीच्या प्रस्थापनेसाठीच आहे. माणुसकीची असीम तहान कवीने वरील ओळींच्या शब्दांत बांधली आहे. भारतीय संविधानाचे कलम 14, 15 आणि 16 हे सर्वप्रकारच्या विषमतेचे निर्मूलन करणारे आहे, 25 वे कलम भारतीय लोकांना धर्म स्वातंत्र्याचे अधिकार देणारे आहे, 28 आणि 29 वे कलम अल्पसंख्याकांच्या हिताचे रक्षण करणारे आहे. भारतीय संविधान हे धर्म, वंश, लिंग, जात आणि जन्मस्थान अशा कोणत्याही कारणांवरून कोणत्याही माणसात भेद करीत नाही. पण येथील सामाजिक व्यवस्थेने आणि राजकीय व्यवस्थेने मुस्लिम समाजाला सर्वच सुखसुविधांपासून वंचित ठेवले आहे. मुस्लिमांना लाचार ठेवून या देशाला महासत्ता होता येणार नाही.
‘झगमगत्या भारता
महाशक्ती भारता
मागास मुसलमानांना
जगात कोठे दाखवता?’ (पृ.क्र। 98)
कवीने उपस्थित केलेला प्रश्न खूपच महत्त्वाचा आहे. एकीकडे भारत महाशक्ती होण्याच्या दिशेने पावले उचलत आहे. ही चांगली गोष्ट आहे. पण येथील मागास असलेल्या मुस्लिमांना मागास ठेवून देशाला महासत्ता बनता येणे शक्य नाही. केवळ मुस्लिमांनाच नव्हे तर या देशातील कोणालाही मागास ठेवून देशाला महाशक्ती होता येत नाही. कवीच्या जाणिवेच्या दृष्टीने वरील ओळी महत्त्वाच्या आहेत.
‘वंचितता मागासलेपणा
मुस्लिमांना शाप आहे
राजकीय आरक्षण
हेच अचूक उपाय आहे’ (पृ.क्र. 100)
वंचिततेमुळे, मागासलेपणामुळे मुस्लिमांचे श्वास गुदमरत आहेत. त्यांना स्वावलंबी जीवन जगता येत नाही. त्यांना इतरापुढे शरण यावे लागते. या सर्व अरिष्टांपासून परावृत्त करण्यासाठी मुस्लिमांना आज राजकीय आरक्षणाची नितांत गरज आहे. सत्तेत सहभागी असल्याशिवाय मुस्लिमांचे प्रश्न सुटणार नाही. संसदेत त्यांचे प्रतिनिधित्व नसल्यामुळे मुस्लिम समाजापुढे अनंत अडचणी निर्माण झाल्या आहेत. स्वतंत्र्य हरवलेल्या मुस्लिम समाजाला त्यांचे स्वातंत्र्य मिळवून देण्याचे एकमेव उपाय म्हणजे राजकीय आरक्षण आहे.
‘संग्राम’मधील भूकंपाच्या नोंदी
कवी हाशम पटेल संवेदनशील मनाचे कवी आहेत. त्यांनी ‘संग्राम’ या कवितासंग्रहात भूकंपाच्या नोंदी टिपल्या आहेत. 30 सप्टेंबर 1993 ला लातूर, किल्लारी मध्ये भयानक भूकंप आला होता. येथील लोकांनी भूकंपाच्या नैसर्गिक कौर्याचा सामना कसा केला? भूकंपग्रस्तांची पिळवणूक कशी करण्यात आली याचे वर्णन ‘गाव माझं जळतंय’, ‘भूकंग्रस्तांची वसाहत’, ‘त्यांना भूकंप वरदान ठरले’ या तीन कवितांमधून कवीने केले आहे. भूकंपामुळे जगण्याचे प्रयोजन गमावणाऱ्या माणसांनी नव्याने जगण्याच्या प्रयोजनाचे भावस्पंदन कवीने आपल्या शब्दांमधून मांडले आहे.
‘धक्क्यावरच्या धक्क्यानं
गाव सारं थरथरतंय
भूकंपाच्या धास्तीनं
काळीज पार फाटतंय’ (पृ.क्र. 66)
आजही भूकंपाच्या ध्न्नयातून गाव सावरले नाही. गावातील लोकांच्या मनात भूकंपाची सतत भीती असते. हे वास्तव कवीला सतत जाणवत आहे. भूकंपाची दहशत आजही गावात जाणवत राहते. भूकंपाच्या स्फोटाचे आवाज आजही गावात गुंजताना कवीला जाणवते.
‘उघड्या भूकंपग्रस्तांना
पावसाने झोडपले
अंथरायला धरती
पांघरायला आकाश
उघड्या माळावरती
भूकंपग्रस्तांची वसाहत’ (पृ.क्र. 67)
भूकंपातून सावरण्याआधीच पावसाने येथील लोकांना आपले कौर्यरूप दाखविले. भूकंप आणि पावसाच्या युतीने गावातील लोकांना संपविण्याचा कटच केला होता. या गावातील लोकांपुढे जेव्हा निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला तेव्हा गावातील लोकांनी धरतीलाच अंथरूण आणि आकाशालाच पांघरूण केले. उघड्यावरच गावातील लोकांनी आपल्या संसाराला नव्याने थाटले. भूकंपग्रस्तांच्या वाट्याला आलेल्या यातनांचे वास्तव कवीने वरील ओळींमधून मांडले आहे.
कवी हाशम पटेल यांचा संग्राम हा कवितासंग्रह मुस्लिमांच्या स्वप्नांना फुलविणारा कवितासंग्रह आहे. समकालीन जीवनात मुस्लिमांच्या जीवनाची स्थाननिश्चिती करतांना मुस्लिमांच्या जळत्या प्रश्नांशी ‘संग्राम’ हा कवितासंग्रह युद्ध करतो. त्याचबरोबर मुस्लिमांना अंकित करणाऱ्या मानसिकतेविरुद्धही निकराचा विद्रोह करतो. सामाजिक समतोल निर्माण करण्याची सळसळ ‘संग्राम’ या कवितासंग्रहातील प्रत्येक कवितेतून पाहावयास मिळते.
कवी हाशम पटेल यांनी येथील राजकीय व्यवस्थेवरही ताशेरे ओढले आहे. देशात कोणीच वंचित राहणार नाही अशा राजकारणाची आवश्यकता आज देशाला आहे. देशातील प्रत्येक नागरिकांना शांतता हवी आहे, प्रत्येकांना सामाजिक सुरक्षा हवी आहे. प्रत्येकाला स्वाभिमानाने जीवन जगता यावे. कोणत्याही प्रकारची विषमता देशात नसावी. ही माफक अपेक्षा कवीने येथील राजकारण्यांकडून केली आहे. विषमताविहीन समाजनिर्मितीसाठी राजकारण्यांनी प्रयत्न करायला हवे, किंबहुना असा समाज निर्माण करणे ही राजकारण्यांची जबाबदारी आहे.
डॉ. अक्रम. ह. पठाण
अंजूमन हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय,
नागपूर सदर, नागपूर. भ्रमणभाष : 8600699086
अमली पदार्थाचा जाळ्यात अडकलेले निष्पाप बालपण:-
मुलांच्या मादक पदार्थांच्या नशेच्या घटना सतत वाढत आहेत. गलिच्छ वातावरण, झोपडपट्टी क्षेत्राव्यतिरिक्त, त्यात संपन्न घरांमधील मुले देखील आहेत. लहान वयातच नशा मुलांच्या मेंदूवर, विकासावर घातक परिणाम करतो. अशी मुले मानसिक आजाराची शिकार होतात. नशेचे इंजेक्शन घेतल्यास एचआयव्हीसारख्या धोकादायक आजारांचीही शक्यता असते. आपल्या आजूबाजूचे वातावरण नशेसाठी सर्वात मोठे कारण आहे, ज्यांचे पालक किंवा शालेय शिक्षक मादक पदार्थांचे व्यसनाधीन असतात अशा मुलांमधे नशा करण्याचा धोका सर्वात जास्त असतो, चांगल्या संस्काराची कमतरता, ख़राब शेजार, वाईट संगत, मुलांवर इंटरनेट, टीव्ही फिल्म्सचे प्रभाव, नेहमी व्यस्त पालक जे मुलांना वेळ देत नाहीत, बऱ्याचदा मुलांच्या चुकांकडे दुर्लक्ष करतात आणि विचार न करता मुलांच्या बेकायदेशीर मागण्या पूर्ण करतात, पालकांचा मुलांवर नियंत्रण नसणे, अशी मुले नशेकडे त्वरित आकर्षित होतात. याव्यतिरिक्त, रस्त्यावर काम करणारी मुले सर्वात जास्त अमली पदार्थांच्या आहारी जातात.
मुलांमध्ये अमली पदार्थांचे व्यसन करण्याचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत:-
भारतीय शासनाच्या सामाजिक न्याय व अधिकारीता मंत्रालय तर्फे वर्ष 2018 मधील राष्ट्रीय सर्वेक्षणानुसार देशात 10 ते 17 वर्षाचा वयोगटातील तब्बल 1.48 कोटी मुले व्यसन करतात. व्हाइटनर, पंचर सोल्यूशन, कफ सिरप, पेट्रोल, थिनर, सनफिक्स बॉन्ड फिक्स यासारख्या तीक्ष्ण रासायनिक हानिकारक ज्वलनशील पदार्थांचा वास घेवून नशा करणाऱ्या मुलांची संख्या 50 लाख आहे आणि 20 लाख मुले भांग, 30 लाख मुलं दारू, तर 40 लाख मुलं अफीमचा नशा करतात. सिगारेट, तंबाखू, ड्रग्स सह इंजेक्शन व इतर पदार्थांचा नशा ही मोठ्या प्रमाणावर करतात. ही मुले रेल्वे स्थानक, बसस्थानक, झोपडपट्टी, निर्जन भागात, सार्वजनिक उद्याने अशा ठिकाणी गटांमध्ये मिळून नशा करतांनी आढळतात. लहान मुलापर्यंत हे जीवघेणे नशेचे विष सहज उपलब्धता ही सर्वात मोठी समस्या आहे. 2016 मध्ये दिल्ली सरकारच्या समाजकल्याण विभागाच्या पुढाकाराने केलेल्या सर्वेक्षणानुसार, देशाच्या राजधानीत 70 हजार मुले अमली पदार्थांच्या आहारी असल्याचे आढळले. आज कोरोना काळात, नशा करण्यासाठी अल्कोहोल आधारित हैंड सेनेटिझर प्यायचे व्यसन लागत आहे, असे अनेक प्रकरण समोर आलेत, ज्यामध्ये सेनेटिझरचे प्राशन करणारी व्यसनी व्यक्ती मृत्युमुखी पडली आहेत.
नशेमुळे गुन्ह्यांमध्ये झपाट्याने वाढ:-
क्राइम ब्युरोच्या नोंदीनुसार मोठ्या प्रमाणात गुन्हे, खून, दरोडा, अपहरण इतर सर्व प्रकारच्या गुन्हांमध्ये नशेचे प्रमाण 73.5% आणि बलात्कार सारख्या जघन्य गुन्ह्यात हे 87% टक्के पर्यंत आहे. देशातील वाढत्या गुन्हेगारी, गंभीर आजार आणि हिंसाचारामध्येही नशेची महत्त्वपूर्ण भूमिका आहे. नशेमुळे या लहान निर्दोषांचे बालपण उध्वस्त होत आहे, तसेच यांचात बाल गुन्हेगारी, आजारपणं ही फार वाढते. मुलांचा मानसिक विकास नशेच्या तावडीत थांबून जातो. नशेत माणसाचा स्वतावर नियंत्रण नसते आणि नकारात्मक विचार वेगाने वाढतात. पैशासाठी मुले खोटे बोलायला लागतात, जबाबदारी पासून दूर पडतात आणि नशेकरिता मोबाईल, पर्स, चेन स्नॅचिंग, वाहने चोरी सारखे गुन्हे करतात आणि ते मोठे होऊन गंभीर गुन्हे करायला लागतात. अशा प्रकारे, आपल्या समाजात एक नवीन गुन्हेगारी साम्राज्य सुरू व्हायला लागते. आजकाल ही लहान किशोरवयीन मुले मोठ्या गुन्ह्यात खूपच सक्रिय दिसत आहेत. आपण दररोज अशा बातम्या पाहतो आणि वाचतोच. कित्येकदा आपल्याला विश्वास सुद्धा बसत नाही की ही ऐवढी लहान-लहान मुले माणुसकीला काळीमा फासणारी घाण कृत्य कशी काय करू करतात? पण हे कटु सत्य आहे. कधी-कधी लोक या मुलांना चोरी करताना पकडतात आणि त्यांना थोडेसे रागावून, थापड़ मारून सोडून देतात, परंतु मुळात त्यांना योग्य मार्गदर्शन देण्याचा किंवा सुधरविण्याचा प्रयत्न होतांना दिसतच नाही. ही मुले आपल्या राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आहेत. जर आपण आज त्यांचे अस्तित्व व्यवस्थापित केले नाही तर आपण त्यांना भविष्यातील आधारस्तंभ कसे म्हणावे?
जागतिक आरोग्य संघटनेच्या मते अल्कोहोलच्या दुष्परिणामांवर धक्कादायक तथ्य आणि आकडेवारी
• दारूच्या व्यसनाने दरवर्षी 30 लाख हून अधिक लोक जीव गमावतात. दारू हे दर 20 मृत्यूंपैकी 1 मृत्यूचे कारण आहे. दर 10 सेकंदात एक व्यक्तीचा मद्यपान संबंधित कारणामुळे मृत्यू होतो.
• जगात जवळपास 38.3% लोकसंख्या दारू पीते, म्हणजेच हे लोक वर्षाला सरासरी 17 लिटर अल्कोहोलचे प्राशन करतात. एकंदरीत, अल्कोहोलमुळे जागतिक आजारांचे ओझे 5.3% टक्क्यांनी जास्त वाढते.
• सुमारे 3.10 कोटी लोक अंमली पदार्थांच्या दुष्प्रभावाने आजारी आहेत. सुमारे 1.10 कोटी लोक ड्रग्स इंजेक्ट करतात, त्यापैकी 13 लाख एचआयव्हीने जगत आहेत, 55 लाख हेपेटायटीस सी सह जगतात.
• 200 पेक्षा जास्त रोग आणि गंभीर जखमांसाठी मद्यपान हे एक मुख्य कारण आहे. नशेमुळे आयुष्यात मृत्यू आणि अपंगत्व वेळेपुर्वी येते. 20-39 वयोगटात होणाऱ्या मृत्यूंपैकी दरवर्षी, अंदाजे 13.5% मृत्यू दारूमुळे होतो.
• सुमारे 23.7 कोटी पुरुष आणि 4.6 कोटी महिला दारूशी संबंधित समस्यांचा सामना करत आहेत. भारतात दरवर्षी रस्त्यांवर होणाऱ्या अपघातात सुमारे 1 लाख मृत्युचा अप्रत्यक्षरित्या अल्कोहोलच्या गैरवापराशी संबंध असतो. दुसरीकडे, दरवर्षी 30 हजार कर्करोगाच्या मृत्यू मागील एक कारण म्हणजे मद्यपान होय.
सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाच्या अहवालानुसार, भारतातील सुमारे 15.10 कोटी लोक दारुचे गंभीर शिकार आहेत, त्यातील 7.7 कोटी लोकांना उपचारांची तातडीने गरज आहे. वर्ल्ड ड्रग रिपोर्ट 2020 नुसार, जगातील जवळपास 6.66 कोटी लोक गंभीर नशामुळे विविध विकारांनी ग्रस्त आहेत. कोरोना कालावधीत ही आकडेवारी आणखी वाढण्याची अपेक्षा आहे. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सुरू केलेला “सेफर”, एक उपचारात्मक उपक्रम आहे जो उच्च प्रभाव, पुरावा-आधारित, खर्च-प्रभावी हस्तक्षेपाचे निरीक्षण करून दारूमुळे होणारे मृत्यू, आजार आणि अपघात कमी करण्याचा प्रयत्न करतो.
नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने नुकतीच आंतरराष्ट्रीय ड्रग रॅकेटकडून सुमारे 1300 कोटी रुपयांची ड्रग जप्त केली, भारतात जप्त करण्यात आलेल्या 100 कोटी रुपयांची ड्रग, तर ऑस्ट्रेलिया मधून 1200 कोटी रुपयांची ड्रग जप्त करण्यात आली. काही दिवसांपूर्वी पोलिसांनी नवी मुंबईत अफगाणिस्तानातून भारतात आणलेली 1000 कोटी रुपयांची ड्रग जप्त केली आहे. 20 सप्टेंबर 2020 रोजी सीमा सुरक्षा दलाने जम्मू आंतरराष्ट्रीय सीमेवर 300 कोटी किंमतीची 62 किलो हेरॉईन जप्त केली. अशी बरीचशी ड्रग, नकली दारू, नशेचा भरमसाठ साठा जप्त केल्या जातो. परंतु अशा जीवघेणा अमली पदार्थांचे व्यसन लोकांमध्ये कमी होतांनी दिसत नाही. विषारी दारूमुळे मृत्यूची संख्याही वाढत आहे, दोन महिन्यांपूर्वीच विषारी दारूमुळे पंजाबमध्ये शेकडो लोकांचा जीव गेला. बऱ्याच राज्यात अशाच घटना घडल्या आहेत. व्यसनाधीन लोक केवळ स्वतःची नासाडी करीत नाहीत तर कुटुंब, शेजारी, नातेवाईक, समाज यांनाही लाजिरवाणे करतात. बॉलिवूड सुद्धा ड्रग्सच्या नशेपासून दूर नाहीत, सुशांतच्या बाबतीत ड्रग कनेक्शन विषयी नवीन माहिती गोळा केली जात आहे ज्यात सिनेमातील मोठया स्टार्सची नावे पुढे येत आहेत. पार्टीचा नावाखाली पुर्वीपासून नशा केला जात आहे.
स्वातंत्र्यानंतर देशात दारूचे व्यसन 60 ते 80 टक्क्याने वाढले आहे. हे खरे आहे की दारू विक्रीतून सरकारला मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. परंतु या प्रकारच्या उत्पन्नामुळे आपल्या सामाजिक संरचनेला तोटा होतो आणि कुटुंबचे कुटुंबे उद्ध्वस्त होतात. आपण वेगाने विनाशाकडे जात आहोत. सामाजिक न्याय आणि अधिकारिता मंत्रालयाने देशातील सर्वाधिक प्रभावित 272 जिल्ह्यांमध्ये 2020-21 साठी अमली पदार्थ विरोधी कार्य योजनेंतर्गत व्यसनमुक्ती अभियान सुरू केले आहे. केंद्र व राज्य सरकार दरवर्षी कोट्यवधी रुपये व्यसन मुक्तीसाठी अनुदान, लोकजागृती कार्यक्रम, जाहिराती आणि आरोग्य सेवा यासाठी खर्च करतात. व्यसनाधीनतेपासून मुक्त होण्यासाठी व्यसनी लोकांकरीता सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आत्मसंयम आणि दृढ इच्छाशक्ती, योग्य उपचार, मार्गदर्शन, कुटूंबाचा आणि प्रियजनांचा आधार, र्निव्यसनी मित्र, सकारात्मक प्रोत्साहन देणारी माणसं, पौष्टिक आहार, व्यायाम, आनंदीत वातावरण, स्वत:ला व्यस्त ठेवणे, जबाबदारी समजून घेणे, कौटुंबिक निष्ठा आणि सकारात्मक विचार करणे आवश्यक आहे. पालकांनी मुलांसाठी वेळ द्यावा, त्यांच्याशी मैत्रीपुर्वक वागावे, मुलांच्या संगतीवर लक्ष द्यावे, मुलांचे बदलत असलेले वर्तन समजून घ्यावे, समस्या दिसताच तज्ञाशी बोलावे, चांगले पालक आणि जबाबदार नागरिक होण्याचे कर्तव्य पार पाळावे.
-डॉ. प्रितम भि. गेडाम
भ्रमणध्वनी क्रं 82374 17041
महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमी योजनेचे (मनरेगा) महत्त्व पटवून देतांना सोनियांनी मोदी सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. ग्रामीण भागात बेरोजगारांना काम मिळावे म्हणून मनरेगा ही योजना लागू करण्यात आली होती. त्यावेळी भाजपाने कडाडून विरोध केला होता. इतकेच नव्हे तर या योजनेची टिंगल करत टर उडविली होती. याची सोनिया गांधी यांनी आठवण करून दिली. मनरेगा सारखी योजना नसती तर कोरोनाच्या या जीवघेण्या संकटाच्या काळात कोट्यावधी भूकबळी गेले असते, असा मोदी सरकारवर कडाडून शाब्दिक प्रहार केला.
कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावाचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे लाखो स्थलांतरित मजूरांना रोजगार नष्ट झाल्यामुळे मूळ गावी परतावे लागले होते. त्यांना पुन्हा रोजगार देऊन त्यांना जगण्याइतके पैसे मिळवून देण्यासाठी केंद्र सरकारला मनरेगाची व्याप्ती वाढविणे अपरिहार्य झाले.
हे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे महाभयानक संकट असले तरी ते भारतासमोर एक मोठे आर्थिक अरिष्ट आहे. या विषाणूंचा संसर्ग थोपवणे हे देशासमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे, त्यासाठी संपूर्ण देश स्थानबद्ध झाला आहे. एकूणच देश आर्थिक संकटाच्या खाईत लोटला गेला आहे, हे वास्तव आहे. तरीही आजघडीला देशात ज्या योजना राबविल्या जात आहेत त्यामुळे काही धनवान लोक अधिकाधिक गब्बर होत आहेत. त्याची तुलना पूर्वी चंपारण्यातील निळेची शेती करून गब्बर झालेल्या लोकांशी करता येईल. दुसर्या बाजूला कोट्यावधी तरुणांचे रोजगार काढून घेतले जात आहेत. लाखो छोटे छोटे उद्योग बंद पडले आहेत. शेतकर्यांची परिस्थिती मोठ्या हलाखीची झाली आहे. नवे रोजगार देणार्या सरकारी कंपन्यांचे खाजगीकरण होते आहे. बेकारी आणि बेरोजगारीचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे, असे सोनिया म्हणाल्या.
या जीवघेण्या संकटांमुळे कधी नव्हे ते भारतीय अर्थव्यवस्थेचा कणाच मोडून पडणार आहे अशी भीती सर्व थरांतून मोठ्या प्रमाणात व्यक्त होऊ लागली आहे. या अरिष्टाशी कसा मुकाबला करावा याबाबत सरकार गप्प बसले आहे. यापूर्वी देशात महामारी, प्लेग, देवी, स्वाईन फ्ल्यू, चिकन गुनिया, बर्ड फ्ल्यू, एड्स या सारख्या रोगांनी थैमान घातले होते, काही अंशी त्या-त्या परिस्थितीत आर्थिक संकटेही आ वासून उभी राहिली, मात्र त्यातून आपण सहिसलामत बाहेर पडलो, तथापि सध्या कोरोनामुळे आर्थिक अराजक निर्माण झाले आहे, ते न भूतो असे आहे.
अर्थतज्ञांच्या मते नोटा बंदीच्या निर्णयानंतर गेल्या तीन वर्षांपासून देशाला आर्थिक संकटाशी सामना करावा लागला आहे. त्यातून कसे बसे उठून देश आर्थिक विकासाच्या नव्या वाटेवर पाऊल ठेवत असतांनाच हा कोरोनाच्या जीवघेण्या हल्ल्याला तोंड द्यावे लागते आहे. तसेच नेमका आर्थिक वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात हा हल्ला झाल्यामुळे त्यांने अधिक उग्र स्वरूप धारण केले आहे,याचे कारण, आर्थिक व्यवहारांच्या दृष्टीने वर्ष अखेर ही अत्यंत प्रतिकूल वेळ असते. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या तीन महिन्यांच्या काळ महत्त्वाचा असतो.अनेक प्रकारची फायदेशीर गुंतवणुक याच काळात केली जाते, शिवाय देशातील सर्वात मोठ्या देयकांची परतफेड याच काळात केली जाते, आपण गेल्या 7-8 वर्षांपासून सर्वात निचांकी आर्थिक कामगिरी बजावली आहे, हे कुणालाच नाकारता येणार नाही. मागणीमध्ये सर्व पातळ्यांवर घसरण झाली आहे, निर्यातीसाठी आपण पूर्वीपेक्षा खूप मागे आलो आहोत, निर्यातीचे प्रमाण कमालीचे घटले आहे. पतपुरवठ्याचे संकट गेल्या 10-12 वर्षे टांगत्या तलवारी प्रमाणे आपल्या मानगुटीवर बसलेले आहे. गुंतवणुकीचा अभाव मोठ्या प्रमाणावर दिसून येत आहे, अनेक मोठ्या उद्योगांना दिलेल्या वित्तपुरवठ्याची परतफेड झालेली नाही, बड्या भांडवलदारांनी मोठ्या प्रमाणावर दिवाळे काढले आहेत, त्यामुळे अनेक राष्ट्रीयकृत बँकांनी माना टाकल्या आहेत. याच काळात रोजगाराची स्थिती बिघडली होती.देशात बेकारांच्या संख्येत कधी नव्हे तेवढी प्रचंड प्रमाणात वाढ झाली होती. देश या अभूतपूर्व संकटातून बाहेर पडण्यासाठी धडपड करत असतानाच कोरोनाने हल्ला केला आहे. या संकटातून सामना करण्यासाठी सुनियोजन, व कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे.पण सरकार ते घेतच नाही.
देशात 40 कोटी पेक्षा अधिक संख्येने कामगार वर्ग आहे. या कामगार वर्गापैकी 93 टक्के असंघटित क्षेत्रातील कामगार आहेत.रोजंदारीवरील कामगारांची संख्या सुमारे 9 कोटी इतकी आहे. 100 कामगारांमध्ये 75 कामगार हे हातावर पोट असणारे असे आहेत. हातगाडीविले, सुतार लोहार आदी स्वयंरोजगाराची कामे करणार्यांसह जे मिळेल ते काम करणार्यांची संख्या 25 टक्के आहे.सध्याच्या संकटाचा सर्वात जास्त परिणाम या वर्गावर होत आहे. कारण बरेच लोक रोजच्या रोज कमावून खाणारे आहेत. ते कायमपणे आर्थिक दृष्ट्या असुरक्षित जीवन जगत आहेत. रोज काम करून रोज मिळणार्या श्रमाच्या मोबदल्यातून यांची व त्यांच्या कुटुंबीयांची रोजीरोटी चालत असते. रोज काम केले तरच रोजची भाकर असा हिशेब असलेला हा बहुतांश कामगार वर्ग देशात आहे. या संख्येने मोठ्या असलेल्या वर्गाच्या दृष्टीने भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार शहरात रोजंदारीवर जगणार्या कुटुंबाची संख्या 25 ते 30 टक्के आहे.ही सर्व स्थलांतरित कुटुंबे असतात. दुसरा वर्ग सूक्ष्म व लघु उद्योग क्षेत्रात काम करणारे लोक आहेत. देशातील यांची संख्या साडेसात कोटींच्या आसपास आहे, देशातील उद्योगांना चालू ठेवण्यासाठी सरकारने पाऊल उचलले पाहिजे.
कोरोनाचे संकट वैश्विक असले तरी भारताच्या औद्योगिक व सामाजिक परिस्थिती हलाखीची बनवणारी ही महामारी ठरणार आहे. अगोदरच गत दशकात पांगळी बनलेली भारतीय अर्थव्यवस्था कोरोनामुळे जायबंदी होण्याची शक्यता आहे. कारण संपूर्ण देशात लॉकडाऊन मुळे सगळेच ठप्प झाले आहे.देश चालविण्याचे काम करणार्यांची बौद्धिक क्षमता काय आहे,याची चुणूक गेल्या काही वर्षांत सर्वांना आलेलीच आहे. मोठ्या प्रमाणात खुषमस्करे आणि अंधभक्त आजुबाजुला असलेले राज्यकर्तेच नोटा बंदीच्या निर्णयानंतर फसलो असल्याची भावना खाजगीत मान्य करित आहेत. त्यावर कढी म्हणून की काय जे देशात हुशार अर्थतज्ज्ञ आहेत, त्यांना पध्दतशीरपणे डावलून आपणास सोईचे होईल तशांची नेमणूक करण्यात या सरकारने आघाडी घेतली आहे. जे अर्थतज्ञ सध्या खुर्चीवर बसलेले आहेत, ते या आर्थिक अराजकतेत कोणती उपाययोजना करतात, तसेच कोरोनामुळे आर्थिक आणीबाणीच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या देशाला कसे सावरतात, यावर सर्व भारतीय साशंक आहेत.आणि हाच खरा चिंतेचा आणि चिंतनाचा विषय आहे. देशवासियांना मानसिक आणि आर्थिक आणीबाणीच्या संकटांतून बाहेर काढण्यासाठी धाडसी निर्णय घेतले जाण्याची नितांत गरज आहे, देशातील सर्व सामान्य माणसाला त्याचा पालक म्हणून मानसिक आधार आणि संरक्षण देण्याची जबाबदारी प्रत्येक देशाच्या राज्यकर्त्यांची आहे, त्यांनी ती सजगपणे व कोणत्याही सवंग लोकप्रियतेच्या आहारी न जाता पार पाडणे आवश्यक आहे, भारतीय अर्थव्यवस्था कोरोनामुळे निश्चितच आणीबाणीच्या उंबरठ्यावर उभी आहे. केंद्र सरकारने या आर्थिक समस्या बद्दल वेळीच सकारात्मक विचार करून पावले उचलली पाहिजेत. त्यासाठी प्रसंगी विरोधी पक्षांचेही सहकार्य घेतले पाहिजे, तरच आपल्या देशातील संभ्रमाचे वातावरण निवळेल.
- सुनिलकुमार सरनाईक, कोल्हापूर
9420351352
(लेखक भारत सरकारच्या वतीने स्वामी विवेकानंद राष्ट्रीय पुरस्काराने तसेच आचार्य बाळशास्त्री जांभेकर दर्पण पत्रकार पुरस्काराने सन्मानित ज्येष्ठ पत्रकार आहेत)
- शाहजहान मगदूम
मो.: 8976533404
शाहीन बागसारख्या सार्वजनिक ठिकाणी घेराव बरे नव्हे; अशा प्रकरणात प्रशासनानेच कारवाई करायला हवी; सुप्रीम कोर्टाचा महत्वाचा निकाल
सुप्रिम कोर्टाचा निकाल शिरसावंद्य मात्र तो येणार्या काळात लोकशाहीतील आंदोलनप्रक्रियेला निश्चित दुबळा करून टाकेल व नागरिक अन्य मार्ग शोधल्याशिवाय राहणार नाहीत, असेच वाटते.
सुप्रीम कोर्टाच्या निकालातील
3 महत्वाचे मुद्दे
1. निदर्शने, आंदोलने करण्यासाठी शाहीन बागसारख्या परिसरांमध्ये घेराव सहन केला जाऊ शकत नाही.
2. शाहीन बाग रिकामे करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी कारवाई करायला हवी होती.
3.अशा प्रकरणांमध्ये अधिकारी आणि प्रशासनाने न्यायालयांमागे न लपता स्वतः कारवाई करायला हवी.
तिसरा मुद्दा न पटण्यासारखा आहे. न्यायालयावर नागरिकांचा जेवढा विश्वास आहे तेवढा विश्वास सरकार व प्रशासनावर नाही. शाहीन बाग प्रकरणात न्यायालयाने वेळीच निर्णय दिला असता तर हे प्रकरण थांबले असते. मात्र गलिच्छ राजकारणामुळे लोकशाहीतील तिन्ही स्तंभ दुबळे होताना दिसत आहेत.
या आधिच्या सुनावणीत कोर्टाने म्हटले होते की, विरोध आणि जनतेच्या हालचाली यांमध्ये एक समतोल हवा. संसदीय लोकशाहीत सर्वांना विरोध करण्याचा अधिकार आहे. पण, विरोध करताना प्रदीर्घ काळासाठी लोकांनी रस्ते अडवून ठेवावे का असा सवाल न्यायालयाने केला होता. जर सरकारकडून आंदोलनकर्त्यांचे समाधान होत नाही तोपर्यंत आंदोलने सुरूच राहतात, हा धडा लोकशाहीप्रेमी नागरिकांनी महात्मा गांधी यांच्याकडून शिकला आहे. मात्र भविष्यात आंदोलने चिरडून टाकली जातील, याची भीती वाटत आहे.
- बशीर शेख
संपादकांची गाडी हॉटेल ग्रँड हयातकडे निघालेली आहे. मागच्या सिटवर बसलेले संपादक (नेहमीप्रमाणेच)
स्वतःवरच खुश आहेत.
संपादक :- (मनातल्या मनात) चला, देवा नाना आपल्याला भेटायला तयार झालेत यातच आपण अर्धा डाव जिंकला ! आपली भेट आटोपली की चॅनलवाल्यांना ब्रेकींग न्युज आणि पेपरवाल्यांना उद्याची हेडलाईन मिळणार. खरं म्हणजे देवा नानांची अशी भेट घेऊन बारामतीकरांना आणि दिल्लीच्या बाईला गुगली टाकावी अशी कधीपासून इच्छा होती. असं करायला मोठे मालक परवानगी देता की देत नाही अशी धाकधूक होती, पण देव मदतीला धावला. छोट्या मालकांनी नाईट लाईफच्या नादी लागून करून ठेवलेले पराक्रम निस्तरता निस्तरता मोठया मालकांना फुल्ल एसीतही घामाच्या धारा लागल्या. आता हे सर्व आवरायला देवा नानाच लागतील हे लक्षात आल्यावर त्यांनी ती जबाबदारी माझ्यावर टाकली. झालं ! जे मला हवं होतं तेच मी करावं म्हणून मालकांनी मला आग्रह धरला, म्हणून मग आता देवा नानांना घेऊन फाईव्ह स्टारमध्ये जेवावं लागणार आहे. स्वतःच्या पैश्यांनी फाईव्ह स्टारमध्ये जेवायला नाही परवडत आणि दुसऱ्याला न्यायचं म्हटलं तर अंगावर काटाच येतो ! अर्थात पक्षाच्या कामाने जेवलो म्हणून बिल मागून घेता येईल. आता देवा नानांना छोट्या मालकांना वाचवा म्हणून गळ घालतांनाच भविष्यात आपल्याला परत जुळवून घेता येईल का याचा अंदाज घ्यावा लागेल. थोडा समजूतदारपणा दाखवावा लागेल, थोडे सूचक इशारे करावे लागतील. घटस्फोटित नवरा बायको वर्षभरानंतर भेटले तर ते असंच वागत असतील का ?
-२-
देवा नानांची गाडी हॉटेल ग्रँड हयातकडे निघालेली आहे. मागच्या सिटवर बसलेले देवा नाना बऱ्याच दिवसांनंतर खुश दिसतायेत.
देवा नाना :- (मनातल्या मनात) हे असं असतं बघा. आंधळा मागतो एक आणि - - - असं झालं आहे. कधीपासून विचार करत होतो, की संपादकांची जाहीरपणे गुप्त भेट घ्यावी आणि तिची ब्रेकिंग न्युज करून बारामतीकर दादांना गुगली टाकावी. नुसतंच येतो येतो करतायेत कधीपासून. त्यांना दाखवायलाच हवं की जुने मित्रसुद्धा वेटिंगला आहेत म्हणून. मी काहीतरी हालचाल करण्याच्या बेतातच होतो तोपर्यंत संपादकांचाच फोन आला, की आपण एकत्र जेवण घेऊयात म्हणून. मला माहीत आहे, नाईट लाईफचा खेळ छोटूच्या अंगाशी आलायं. त्याला वाचवा म्हणून गळ घालतील आणि दुसरा घरोबा मानवत नसेल म्हणून परत पहिल्या घरात घुसता येईल का याचा अंदाज घेतील. जाऊ द्या. बारामतीकर दादांना गुगली तर टाकली जाईल ना ? आपल्याला काय, आम के आम गुठलीयोंके दाम !
-३-
हॉटेल ग्रँड हयातमध्ये संपादक आणि देवा नाना समोरासमोर बसलेले आहेत. संपादक मेनूकार्ड देवा नानांकडे सरकवतात.
देवा नाना :- तुम्हीच मागवा जे मागवायचं ते. माझ्या तर तोंडाची चवच गेली आहे वर्षभरापासून.
संपादक :- अहो, चवीचं काय घेऊन बसलात नाना, आमच्या तर प्रत्येक घासात खडा निघतोय वर्षभरापासून.
देवा नाना :- घाईगडबडीत खिचडी बनवायच्या नादात डाळ तांदूळ नीट पाहून नाही घेतलेत ना की असं होणारच.
संपादक :- हो ना. खिचडी पचायला हलकी असते म्हणे. आम्हांला तर जड जातेय पचायला.
देवा नाना :- हसत करावे कर्म, भोगावे मग रडत तेचि, यालाच तर म्हणतात ! बरं, ते असू देत. मुख्य विषय काय आहे ते बोला. कसं काय भेटावंस वाटलं एकदम ?
संपादक :- नानासाहेब, छोट्या मालकांना त्रास होईल असं वाटतंय. आपण मदत करावी अशी मोठ्या मालकांची विनंती आहे.
देवा नाना :- तसे आपण जुने मित्र आहोत. मदत तर करायलाच हवी, पण त्याचं काय आहे की, तुम्ही मला टांग मारल्यापासून दिल्लीतलं माझं वजन थोडं कमीच झालेलं आहे, तरी हे बिहारचं आटोपलं की बघतो प्रयत्न करून.
संपादक :- बिहारचं आटोपेपर्यंत तर आमचे छोटे मालकच आटोपलेले असतील नानासाहेब. ताबडतोब काहीतरी करायला हवं, नाहीतर बैल गेला आणि झोपा केला असं होईल ते.
देवा नाना :- (मिश्कीलपणे) एक दुरुस्ती सुचवू का, छोटीशी ?
संपादक :- सुचवा की.
देवा नाना :- बछडा गेला आणि झोपा केला असं म्हणा.
संपादक :- नाना साहेब, हे तुम्ही बोलू शकता. आम्ही कसं बोलणार ? बरं, ते असू द्या. म्हणजे काहीही बोला, पण काहीतरी करा.आपली जुनी मैत्री आहे. परत केव्हाही चॅनलाईज होऊ शकते. काय ?
देवा नाना :- संपादक, कोणाचा बंद पडलेला पेपर चालवायला घेण्यापेक्षा स्वतःचा नवा पेपर काढलेला कधीही चांगला असतो. काय ?
संपादक :- (नेहमीप्रमाणे कोडगेपणा स्वीकारत) आता पेपरचा विषय काढलात म्हणून विचारतो. आमच्या पेपरसाठी मुलाखत केव्हा देता ?
देवा नाना :- मी कुठे वाचतो तुमचा पेपर ? मी कशासाठी मुलाखत देऊ ?
संपादक :- पत्रकारांना या आपल्या भेटीचं कारण सांगण्यापूरतं तरी हो म्हणा. आणि हो, मला खरंच माजी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घ्यायची इच्छा आहे.
देवा नाना :- अस्स? मग अजून सहा महिने थांबा आणि तुमच्या मालकांचीच मुलाखत घ्या की !
-मुकुंद परदेशी, मुक्त लेखक,
भ्रमणध्वनी क्र. ७८७५०७७७२८